Tag Archive for: व्यावहारिक जीवन

 

प्रामाणिकपणा, विनम्रता, चिकाटी आणि प्रगतीसाठी असणारी दुर्दम्य तृष्णा या गोष्टी आनंदी व सफल जीवनासाठी आवश्यक असतात. पण या सगळ्या गोष्टींपेक्षा आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते आणि ती म्हणजे, प्रगतीच्या अगणित शक्यता असतात, याची व्यक्तीला खात्री असली पाहिजे. प्रगती म्हणजे तारुण्य. व्यक्ती अगदी शंभर वर्षांची असतानादेखील तरुण असू शकते.

– श्रीमाताजी (CWM 16 : 431)

 

तुम्ही तरुण मुलं म्हणजे देशाची आशा आहात आणि या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतःला घडविले पाहिजे.

*

एका गोष्टीबाबत तुम्ही निश्चितपणे खात्री बाळगू शकता आणि ती गोष्ट म्हणजे, तुमचे भवितव्य तुमच्या हाती आहे. तुम्ही जसे असावे असे तुम्हाला वाटते तसे तुम्ही व्हाल. तुमचा आदर्श, तुमची आकांक्षा जेवढी अधिक उच्च असेल तेवढे त्याचे प्रत्यक्षीकरण अधिक उच्च असेल. मात्र त्यासाठी तुम्ही दृढ निश्चय केला पाहिजे आणि तुमच्या जीवनाचे खरे ध्येय तुम्ही कधीही विसरता कामा नये.

*

तरुण असणे म्हणजे भविष्यामध्ये जीवन जगणे.
आपण जे बनायला हवे तसे बनण्यासाठी, आपण सद्यस्थितीत जे आहोत त्याचा त्याग करण्याची नेहमी तयारी ठेवणे म्हणजे तरुण असणे.
अमुक एखाद्या गोष्टीमध्ये कदापिही सुधारणा होणे शक्य नाही, असा विचार मनाला कधीही न शिवणे म्हणजे तरुण असणे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 122)

 

शिक्षिका : शाळेला लागलेली सुट्टी व्यतीत करण्याचा उत्तम मार्ग कोणता असे विद्यार्थी मला विचारत होते. त्यांना काय सांगावे?

श्रीमाताजी : मुलांना असे सांगावे की, स्वतःच्या आवडीचे एखादे काम करण्यासाठी किंवा काहीतरी नवीन शिकण्यासाठी किंवा त्यांच्या प्रकृतीमध्ये किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये एखादी कमतरता, एखादी उणीव असेल तर त्यावर मात करण्यासाठी सुट्टी म्हणजे एक चांगली संधी असते. त्यांनी अगदी मोकळेपणाने एखादा उपक्रम हाती घ्यायला हरकत नाही, त्याच्या माध्यमातून त्यांना स्वतःमधील काही क्षमतांचा शोध लागण्याचीसुद्धा शक्यता असते; त्यादृष्टीने ही एक चांगली संधी असते.

– श्रीमाताजी (CWM 12 : 356)

 

(मुलांचे नैतिक शिक्षण आणि त्यासाठी त्यांना आवश्यक असणारी संधी याविषयीचे विचार आपण कालच्या भागात लक्षात घेतले.)

मुलामध्ये जर काही दुर्गण असतील, त्याला वाईट सवयी लागलेल्या असतील, त्याच्यावर कुसंस्कार झालेले असतील – मग ते मनाचे असोत किंवा शरीराचे असोत – तरीही तो कोणीतरी गुन्हेगार आहे अशा पद्धतीने त्याला कठोरपणाने वागणूक देता कामा नये; तर संयम, नकार आणि सद्गुणांची स्थापना करणे या राजयोगाच्या पद्धतीनुसार दुर्गुणांपासून सुटका करून घेण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. त्या दुर्गणांचा विचार त्याने पाप किंवा अपराध म्हणून करता कामा नये तर, बऱ्या होऊ शकणाऱ्या आजाराची ती लक्षणं आहेत आणि दृढ संकल्पाद्वारे व सातत्यपूर्ण प्रयत्नाने त्यामध्ये बदल होऊ शकतो, असा विचार करण्यास त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. मनामध्ये जेव्हाजेव्हा मिथ्यत्वाचा (falsehood) उद्भव होतो तेव्हा त्यास नकार देण्यासाठी आणि सत्याद्वारे त्याची जागा घेण्यासाठी प्रत्येक मुलाला प्रोत्साहित केले पाहिजे; भीतीची जागा धैर्याने, स्वार्थीपणाची जागा त्यागाने आणि वैरभावाची जागा प्रेमाने घेण्यासाठी त्याला प्रोत्साहित केले पाहिजे. ज्या गुणांची अजून पुरेशी घडण झालेली नाही त्यांचा दोष म्हणून अव्हेर केला जाता कामा नये, याबाबत बरीच काळजी घेतली गेली पाहिजे.

बऱ्याचदा काही मुलांच्या अंगी एक प्रकारचा व्रात्यपणा आणि बेपर्वार्ई आढळून येते. पण तो व्रात्यपणा नसतो, तर त्यांच्या अंगी असलेले सामर्थ्य, महानता आणि उदात्तता ओसंडून वाहत असते; आणि दिसताना तो व्रात्यपणा असल्यासारखे दिसते. त्यांच्यातील या वृत्तीचे खच्चीकरण करता कामा नये, तर तिचे शुद्धीकरण केले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 01 : 391-392)

 

(विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण कसे द्यावे हे श्रीअरविंद यांनी सांगितले होते, ते आपण कालच्या भागात विचारात घेतले. त्या संदर्भात ते पुढे लिहीत आहेत…)

मुलांच्या अंतरंगात उठणाऱ्या नैतिक भावावेगांना प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची संधी – भलेही मग ती संधी त्यांच्या मर्यादित क्षेत्रातील का असेना – जोपर्यंत त्यांना दिली जात नाही तोपर्यंत नैतिक शिक्षणाचा प्रभाव त्यांच्यावर पूर्ण क्षमतेने पडू शकत नाही. ब्राह्मणाकडे असणारी ज्ञानतृष्णा, आत्म्याप्रत असणारी भक्ती, शुचिर्भूतता, त्यागबुद्धी; क्षत्रियाकडे असणारे धैर्य, साहस, सन्मान, उदात्तता, दाक्षिण्य, देशभक्ती; वैश्याकडे असणारी परोपकारवृत्ती, कौशल्य, उद्योग, दानशूरतेचे उपक्रम आणि सढळपणा; आणि शूद्राने स्वत:ला विसरून अगदी नि:स्वार्थपणे व प्रेमळपणाने केलेली सेवा या सर्व गोष्टी म्हणजे आर्यांची गुणवैशिष्ट्ये आहेत.

आम्ही आपल्या संपूर्ण राष्ट्रामध्ये आपल्या युवकांमध्ये अशाच प्रकारची नैतिक वृत्ती असावी अशी इच्छा बाळगत आहोत. पण आर्य परंपरेनुसार स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी जोपर्यंत आपण या युवकांना देत नाही तोपर्यंत आपल्याला ती तशी वृत्ती त्यांच्यामध्ये कशी काय आढळून येईल? मोठे झाल्यानंतर त्यांची जीवने ज्या द्रव्याने घडली जावीत असे आपण अपेक्षित करत आहोत तशी जीवने बालपणी व कुमारवयामध्ये त्यांना परिचित झालेल्या मूल्यांच्या आधारे घडविण्याची संधी आपण त्यांना दिली पाहिजे. म्हणूनच, प्रत्येक मुलाला, त्याच्या प्रकृतीमध्ये जे सर्वोत्तम आहे त्याचे विकसन करण्यासाठी बौद्धिक प्रोत्साहन दिले गेले पाहिजे आणि त्याला प्रत्यक्ष व्यवहारात देखील तशी संधी दिली गेली पाहिजे. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 01 : 391)

विद्यार्थ्यांना सदाचरणासाठी प्रेरित केले पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे, त्यांच्यावर कोणतीही गोष्ट लादता कामा नये किंवा त्यांच्यावर जबरदस्तीसुद्धा करता कामा नये; हा नैतिक शिक्षणाचा पहिला नियम आहे.

स्वतःच्या नैतिक आचरणाद्वारे विद्यार्थ्यांसमोर उदाहरण घालून देणे, रोजच्या रोज त्यांच्याशी संवाद साधणे आणि पुस्तकांच्या आधारे त्यांच्यासमोर काही आदर्श ठेवणे ही नैतिक शिक्षण देण्याची सर्वात उत्तम पद्धत आहे.

या पुस्तकांमध्ये लहान मुलांसाठी भूतकाळातील भव्योदात्त उदाहरणे असली पाहिजेत आणि ती उदाहरणे नैतिक धडे म्हणून असता कामा नयेत तर, त्यामध्ये विद्यार्थ्यांना गोडी वाटली पाहिजे. आणि कुमार वयातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या पुस्तकांमध्ये महान व्यक्तींचे महान विचार असले पाहिजेत; त्यांच्या उच्चतम भावनांना प्रज्वलित करतील असे, सर्वोच्च आदर्शांप्रत आणि आकांक्षाप्रत त्यांना प्रेरित करतील असे साहित्यामधील उतारे त्यामध्ये असले पाहिजेत. तसेच उच्चतर आदर्श, उदात्त भावभावना आणि महान विचार जिथे मूर्तरूपात आलेले आढळतील; अशी उदात्त उदाहरणे ज्यामधून दिसून येतील अशा प्रकारच्या इतिहासातील नोंदी आणि चरित्रं यांचा समावेश त्यामध्ये असला पाहिजे. हा एक उत्तम प्रकारचा सत्संग असतो आणि त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. अर्थात त्याद्वारे तात्पर्य सांगणे, उपदेश देणे टाळले पाहिजे. शिक्षक विद्यार्थ्यांसमोर ज्या महान गोष्टींचे उदाहरण ठेवत असतील त्याच गोष्टींद्वारे खुद्द त्या शिक्षकाच्या वैयक्तिक जीवनाची जडणघडण झाली असेल तर त्या गोष्टींचा मुलांवर होणारा परिणाम शतगुणित होतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 01 : 390-391)

 

शिक्षक : माताजी, शिक्षकांनी आणि प्रशिक्षकांनीच विद्यार्थ्यांना शिस्त लावली पाहिजे ना?

श्रीमाताजी : विद्यार्थ्यांना अनियमित, उद्धट किंवा निष्काळजी होण्यापासून रोखणे हे अर्थातच अगदी आवश्यक आहे. दुष्टपणाच्या किंवा हानीकारक खोड्या चालवून घेता कामा नयेत.

परंतु एक सर्वसाधारण व निरपवाद नियम असा असला पाहिजे की, विद्यार्थ्यांकडून ज्या गुणांची आपण अपेक्षा करतो त्या गुणांचे मूर्तिमंत उदाहरण शिक्षकांनी आणि त्यातही विशेषतः शारीरिक शिक्षणाच्या प्रशिक्षकांनी झाले पाहिजे. शिस्त, नियमितपणा, चांगले वळण, धैर्य, चिकाटी, प्रयत्नांची पराकाष्ठा या गोष्टी उपदेशाद्वारे शिकविण्यापेक्षा उदाहरणाद्वारे अधिक चांगल्या प्रकारे शिकविता येतात. जी गोष्ट करण्यास तुम्ही विद्यार्थ्यांना मनाई करता, ती गोष्ट तर तुम्ही त्यांच्यासमोर कधीच करता कामा नये, हा अगदी महत्त्वाचा नियम आहे.

आणखी असे की, कशाप्रकारे सांगितले असता त्या विद्यार्थ्याला सुयोग्य वळण लागेल यावरचा उपाय विद्यार्थ्यागणिक वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे विद्यार्थ्याला चांगले वळण लावण्याच्या दृष्टीने शिक्षकाने त्याच्याबरोबर चातुर्याने व विवेकाने वागले पाहिजे.

आणि म्हणूनच शिक्षक किंवा प्रशिक्षक होणे ही एक सर्वोत्तम साधना असते. अर्थात ती साधना कशी आचरणात आणायची ते त्या शिक्षकाला माहीत असले पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 361-362)

(श्रीमाताजी येथे शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत. परंतु व्यापक अर्थाने ते पालकांनाही उपयुक्त ठरू शकेल असे आहे.)

कधीही चूक करू नका.
कधीही रागावू नका.
नेहमीच समजावून घ्यायचा प्रयत्न करा.

एखादी गोष्ट का घडली, त्यापाठीमागे कोणती भावना होती, मुलांची आंतरिक जडणघडण कशी झाली आहे, त्यांच्यामधील कोणती गोष्ट अधिक सशक्त करण्याची आवश्यकता आहे, त्यांच्यामधील कोणत्या गोष्टीस प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे, या सर्व गोष्टींचे नीटपणे निरीक्षण करून त्या समजावून घेतल्या पाहिजेत.

शिक्षक म्हणून तुम्ही एवढेच करायचे आहे आणि मग मुलांना मुक्त सोडा. त्यांना मोकळेपणाने बहरू द्या. त्यांना अनेक गोष्टी पाहण्याची, अनेक गोष्टी हाताळण्याची, शक्य असतील तितक्या गोष्टी करण्याची संधी द्या. त्यामध्ये त्यांना खूप मजा वाटते. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, तुम्हाला जे माहीत आहे असे तुम्हाला वाटते, ते त्यांच्यावर लादण्याचा प्रयत्न करू नका.

त्यांच्यावर कधीही रागावू नका. नेहमी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही जे सांगाल ते समजून घेण्याची जर त्या मुलाची क्षमता असेल तर त्याला ते अधिक स्पष्ट करून सांगा. ते समजावून घेण्याचीही जर त्याची कुवत नसेल आणि त्याच्यामधील चुकीचे स्पंदन खऱ्या स्पंदनाने बदलून टाकण्याची तुमच्या अंगी क्षमता असेल तर तसे करा.

शिक्षकांसाठी एखादा प्रशिक्षण कार्यक्रम आखण्याची आवश्यकता आहे, तसा तो आखला तर ते अतिशय उत्तम होईल. अगदी लहान मुलांपासून त्याची सुरुवात केली पाहिजे. ती मुलं इतकी घडणक्षम असतात की, कोणत्याही छोट्याशा गोष्टीचा सुद्धा त्यांच्या मनावर खूप खोलवर ठसा उमटतो. लहान असताना मुलांना जर सत्याचे बाळकडू पाजले तर, जेव्हा ती मुलं मोठी होतील तेव्हा ती अगदी स्वाभाविकपणे बहरून येतील. आणि हे एक खरोखरच चांगले कार्य असेल.

– श्रीमाताजी (Conversation with a disciple : April 05, 1967)

जीवनऋतू – १७

(मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण कालच्या भागात विचारात घेतले.)

तुम्ही स्वतःला असे सांगितले पाहिजे की, “माझ्यामध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी मला अवास्तव, अशक्यप्राय, भ्रमरूप आहेत असे वाटत आहे त्याच खऱ्या आहेत आणि मला त्यांची जोपासना केलीच पाहिजे.” (येथे शरीराच्या दिव्यत्वाचा संदर्भ आहे, सामान्य जाणिवेला ती दिव्यता भ्रमरूप वाटत असते.) आणि मुलांनाही तीच शिकवण तुम्ही दिली पाहिजे. नेहमी कोणत्या ना कोणत्या अक्षमतेने तुम्ही मर्यादाबद्ध होता कामा नये किंवा सदानकदा कोणत्या तरी दुरिच्छेमुळे आपले पाय मागे खेचले जाऊ नयेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही तुमच्या अंतरंगामध्ये एक प्रकारची अशी खात्री रुजविली पाहिजे की, तीच गोष्ट मूलतः खरी आहे आणि तीच गोष्ट प्रत्यक्षात उतरविली पाहिजे. तसे झाले तर मग तुमच्या शरीराच्या पेशींमध्ये एक श्रद्धा जागी होते. तुमच्या शरीरामध्येसुद्धा त्याला एक प्रतिसाद मिळताना तुम्हाला आढळतो. जर त्याला आंतरिक इच्छेची जोड मिळाली, बळकटी मिळाली, तिचे मार्गदर्शन लाभले तर, साऱ्या मर्यादा हळूहळू नाहीशा होऊन जातील आणि खुद्द शरीरालाच तसे जाणवू लागेल.

…परंतु अगदी लहानपणापासूनच जर तुम्हाला सर्व तऱ्हेच्या नाउमेद करणाऱ्या, निराशाजनक गोष्टी शिकविल्या गेल्या असतील, म्हणजे ज्या गोष्टींमुळे विभाजन होते, विघटन होते अशा गोष्टी शिकविल्या गेल्या असतीत तर, हे बिचारे शरीर त्याच्या परीने उत्कृष्ट तेच करत असते पण ते त्या गोष्टींमुळे विकृत, दूषित झालेले असते, ते आता सुस्थितीत राहिलेले नसते आणि मग त्याच्या अंगी त्याच्या आंतरिक सामर्थ्याची, त्याच्या आंतरिक शक्तीची किंवा परिस्थितीला तोंड देण्याच्या शक्तीची जाणीव शिल्लक राहिलेली नसते. शरीर असे दूषित होऊ नये म्हणून योग्य ती काळजी जर घेतली गेली असेल तर त्यामध्ये विजयाबद्दलची एक स्वाभाविक खात्री असते. आपण आपल्या विचारांचा चुकीचा वापर करतो आणि त्याचा शरीरावर जो पगडा असतो त्यामुळे शरीर विजयाची खात्री गमावून बसते.

विजयाबद्दलची ही खात्री नाहीशी न करता उलट, ती जोपासली पाहिजे. आणि जेव्हा अशी खात्री असते तेव्हा अभीप्सा बाळगण्यासाठी कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत, तर विजयावरचा हा आंतरिक विश्वास सहजतेने उमलून येतो. शरीर स्वतःमध्ये स्वतःच्या दिव्यत्वाची जाणीव बाळगून असते. पण ही जाणीव जर तुमचे शरीर हरवून बसले असेल तर ती जाणीव तुम्ही पुन्हा तुमच्या अंतरंगामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

एखादे मूल जेव्हा तुम्हाला त्याचे सुंदरसे स्वप्न सांगत असते; म्हणजे त्याच्या त्या स्वप्नामध्ये त्याच्याकडे बऱ्याचशा शक्ती होत्या, सर्व गोष्टी खूप सुंदर होत्या, असे जेव्हा ते मूल तुम्हाला सांगत असते तेव्हा त्याला, “हे असं काही खरं नसतं, जीवन असं नसतं,’’ असे सांगण्याची चूक कधीही करू नका. त्याउलट तुम्ही त्याला असे सांगा की, “हो, जीवन तसेच असले पाहिजे आणि ते नक्की तसे होईल.”

– श्रीमाताजी (CWM 09 : 163 & 165)

 

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो अशा मुलाच्या स्वप्नांमध्ये नेहमीच एक प्रकारची अभीप्सा असते. ती त्या मुलाच्या चेतनेच्या दृष्टीने एक प्रकारची आकांक्षा असते. म्हणजे सौंदर्याला कुरुपतेचा कलंक नसावा, अन्यायविरहित न्याय असावा, अमर्याद चांगुलपणा असावा आणि एक सचेत, सातत्यपूर्ण यश मिळावे, एक निरंतर चमत्कार घडावा असे त्याला वाटत असते. काहीतरी चमत्कार घडावेत अशी स्वप्नं ते पाहत असते. जगातील सर्व दुष्टपणा नाहीसा होऊन जावा आणि प्रत्येक गोष्ट नेहमी तेजोमय, सुंदर, आनंदी असावी असे त्याला वाटत असते. आणि म्हणूनच ज्या गोष्टींचा शेवट गोड होतो अशा गोष्टी मुलांना आवडतात. व्यक्तीने त्यावर विश्वास ठेवला पाहिजे.

जेव्हा शरीराला वेदनांची किंवा स्वतःच्या मर्यादांची जाणीव होते तेव्हा व्यक्तीने शरीरामध्ये अमर्याद सामर्थ्य, कुरुपताविरहित सौंदर्य आणि अद्भुत क्षमतांचे स्वप्न रुजविले पाहिजे. हवेमध्ये उंच भरारी घेण्याची, जिथे आवश्यकता आहे तिथे उपस्थित राहण्याची किंवा चुकीच्या गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची, आजारी व्यक्तीस बरे करण्याची अशी अनेकानेक स्वप्नं मूल लहानपणी पाहत असते. परंतु बरेचदा त्यांचे पालक किंवा शिक्षक त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरवतात आणि म्हणतात, “असं स्वप्नातच घडतं, असं काही खरं नसतं.” वास्तविक त्यांनी याच्या बरोबर उलट केले पाहिजे.

मुलांना असे सांगितले पाहिजे की, “तुला जे वाटतं आहे ते प्रत्यक्षात उतरवण्याचा तू प्रयत्न केला पाहिजेस. तू जे म्हणतो आहेस ते शक्य आहे आणि ती गोष्ट शक्य करून दाखविणारा जो अंश तुझ्यामध्ये आहे, त्याच्या संपर्कात तू आलास तर, ती गोष्ट तू निश्चितपणे करू शकशील. सामान्य जग त्याला काल्पनिक मानते. पण तू त्या खऱ्या वास्तविकतेच्या दिशेने स्वतःला विकसित केले पाहिजेस, त्या दिशेने तू तुझ्या जीवनाची आखणी केली पाहिजेस, जीवनाला दिशा दिली पाहिजेस.” मुलांना असे घडविले पाहिजे. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 162)