Posts

प्रश्न : चैत्य पुरुष मुक्त होतो म्हणजे नेमके काय घडते?

श्रीमाताजी : बरेचदा साधनेच्या सुरुवातीच्या काळात व्यक्तीच्या मनामध्ये एक प्रकारची भावना निर्माण होते. ती भावना अशी असते की, जणु चैत्य पुरुष हा एखाद्या कठीण अशा कवचामध्ये, तुरुंगामध्ये बंदिस्त झालेला आहे आणि हीच गोष्ट त्याच्यातील चैत्य पुरुषाला बाह्यत: आविष्कृत होण्यापासून आणि बाह्यवर्ती चेतनेशी, बाह्य व्यक्तित्वाशी जागृत आणि सातत्यपूर्ण संबंध जोडण्याला प्रतिबंध करते.

एखाद्या पेटीमध्ये आपण बंदिस्त झालो आहोत किंवा ज्याच्या भिंती फोडून बाहेर पडावयास हवे, अशा एखाद्या तुरुंगात आहोत किंवा असे एखादे दार असावे की, ज्याच्या आत प्रवेश करावयाचा तर बलप्रयोग करावा लागेल, अशी काहीशी ही भावना असते. तेव्हा साहजिकच, जर एखादा कोणी ती भिंत पाडू शकला, ते दार उघडू शकला, तर आत बंदिस्त असलेला चैत्य पुरुष मुक्त होतो आणि आता तो बाह्यत: देखील आविष्कृत होऊ शकतो. ह्या सगळ्या प्रतिमा आहेत.

प्रत्येक व्यक्तीची, स्वभावत:, स्वत:ची अशी वैयक्तिक प्रतिमा असते, कमीअधिक फरकाने, तिची स्वत:ची एक वैयक्तिक पद्धत असते. ज्यांनी ज्यांनी ह्याची अनुभूती घेतलेली आहे अशा व्यक्तींच्या बाबतीत, काही प्रतिमा सर्वांनाच समानतेने अनुभवास आलेल्या असतात.

उदाहरणार्थ, जेव्हा एखादी व्यक्ती चैत्य पुरुषाचा शोध घेण्यासाठी, स्वत:च्या चेतनेच्या तळाशी खोल जाऊन पोहोचते, तेव्हा ती जणू काही विहिरीमध्ये खूप खाली, खाली, खाली उतरत आहे आणि जणू काही ती आता त्या विहिरीमध्ये अगदी तळाशी जाणार अशी भावना असते, प्रतिमा असते. हे तर उघडच आहे की या उपमा आहेत; परंतु अनुभवाचा मनावर जो ठसा उमटतो त्याच्याशी साधर्म्य राखणाऱ्या ह्या उपमा आहेत आणि त्यातून त्या अनुभवाची सघन अशी प्रचिती येते आणि त्यातून फार मोठी ताकद मिळते.

उदाहरणार्थ, व्यक्ती जेव्हा स्वत:च्या आंतरिक अस्तित्वाच्या शोधास सुरुवात करते किंवा ती स्वत:च्या विविध अंगांच्या शोधास सुरुवात करते, तेव्हा तिची बरेचदा अशी भावना होते की, ती जणू काही एका हॉलमध्ये किंवा खोलीमध्ये आतवर प्रवेश करते आहे. तेथील रंग, तेथील वातावरण, त्या खोलीमध्ये असणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टींच्या आधारे व्यक्ती अस्तित्वाच्या कोणत्या अंगाला भेट देत आहे ह्याचे स्पष्ट आकलन होऊ शकते. आणि मग, व्यक्ती एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाते, दरवाजे उघडते आणि अधिकाधिक आतल्या आतल्या खोल्यांमध्ये प्रवेश करत जाते, त्यातील प्रत्येक खोलीचे स्वत:चे असे एक स्वरूप असते. आणि बऱ्याचदा, हा आंतरिक प्रवास, ह्या आंतरिक भेटी रात्रीच्या वेळी घडून येतात. तेव्हा त्याला स्वप्नासारखे, अधिक सघन असे रूप प्राप्त होते आणि व्यक्तीला असे जाणवते की, जणू ती एखाद्या घरामध्ये प्रवेश करत आहे आणि ते घर तिच्या खूप परिचयाचे आहे.

आणि काळ, वेळेनुसार आंतरिक गोष्टी भिन्न भिन्न असतात. कधीकधी तेथे एक प्रकारची अत्यंत अव्यवस्था असते, सावळा गोंधळच असतो म्हणा ना, जेथे सर्व काही एकमेकांत मिसळून गेलेले असते, कधीकधी तोडक्यामोडक्या गोष्टीपण असतात, एकूणातच एक प्रकारचा गोंधळ असतो. तर कधी कधी, सर्व गोष्टी व्यवस्थित असतात, त्यांच्या त्यांच्या जागी ठेवलेल्या असतात, जणू काही कोणीतरी घर नीट आवरलेले असावे, घरातील गोष्टी स्वच्छ केलेल्या असाव्यात, व्यवस्थितपणे ठेवलेल्या असाव्यात. आणि गंमत म्हणजे, घर मात्र नेहमी तेच असते. घर ही तुमच्या आंतरिक अस्तित्वाची एक प्रकारची वस्तुनिष्ठ प्रतिमा आहे. आणि तेथे तुम्ही जे पाहता, तेथे जे काही करता, ते तुमच्या मानसिक कार्याचे प्रतीकात्मक रूप असते. मूर्त रूप येण्यासाठी ह्या गोष्टी उपयुक्त असतात. पण हे माणसामाणसांवर अवलंबून असते.

काही माणसं फक्त बुद्धिवादी असतात आणि त्यांच्या बाबतीत मग प्रत्येक गोष्ट ही संकल्पनांमध्ये व्यक्त होते, प्रतिमांमध्ये नाही. परंतु ते जर जडभौतिक प्रांतामध्ये अधिकाधिक खोलवर जात राहिले तर हा धोका असतो की, ते मूर्त वास्तवाला स्पर्श करू शकत नाहीत आणि केवळ संकल्पनांच्या प्रांतातच राहतात, मनाच्या प्रांतातच वावरतात आणि तेथेच अनंतकाळपर्यंत राहू शकतात. आणि जरी ती काहीशी अनिश्चित, अपरिमित अशी गोष्ट असली तरी त्यांना असे वाटू लागते की, ते प्रगती करत आहेत, मानसिकरित्या त्यांची प्रगती झाली आहे इ. इ. मन हे असे एक अतिविशाल, आणि अपरिमित असे क्षेत्र आहे की, जे सातत्याने नवीकृत (renewed) होत राहते. परंतु जर का एखाद्याला प्राणिक आणि शारीरिक अस्तित्वामध्ये प्रगती करावयाची इच्छा असेल तर, ज्याविषयी आपण आधी बोललो ते प्रतिमात्मक प्रतिनिधित्व कृती निश्चित करण्यासाठी, ती कृती अधिक सघन बनविण्यासाठी खूप उपयोगी ठरते.

अर्थातच ही गोष्ट काही पूर्णत: व्यक्तीच्या इच्छेबरहुकूम होत नाही, ती प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून असते. परंतु ज्या कोणाकडे प्रतिमांवर लक्ष केंद्रित करण्याची शक्ती असते त्यांना अजून एक सुविधा उपलब्ध असते.

ध्यानामध्ये, एका बंद दरवाजासमोर बसावयाचे. जणू काही ते पोलादी भरभक्कम दार असावे – आणि ते दार उघडावे आणि दाराच्या दुसऱ्या बाजूला जावे अशी इच्छा बाळगून त्या दारासमोर बसावयाचे. आणि संपूर्ण लक्ष, संपूर्ण अभीप्सा ही जणू काही एका घणामध्ये एकत्रित होते आणि त्याने दारावर घाव घातले जाताहेत, जाताहेत, आणि अधिकाधिक चढत्या वाढत्या शक्तीने व्यक्ती ते घाव घालत राहते.. जोपर्यंत ते दार एकदम उघडले जात नाही आणि व्यक्तीचा आत प्रवेश होत नाही तोपर्यंत हे चालू राहते. ह्याचा खूप जोरदार ठसा उमटतो.

जणू काही व्यक्ती प्रकाशामध्येच झेप घेते, ती व्यक्ती त्या प्रकाशाने पूर्ण उजळून निघते आणि तिला अचानक, एकाएकी जाणिवेमध्ये परिवर्तन झाल्याचा आनंद लाभतो; आपण कोणी निराळीच व्यक्ती बनलो असल्याचे तिला जाणवू लागते.

स्वत:च्या चैत्य अस्तित्वाशी संबंध प्रस्थापित करण्याचा हा एक अतिशय सघन आणि शक्तिशाली मार्ग आहे.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 266-268)

(श्रीअरविंदांना त्यांच्या पूर्वजीवनाविषयी एका शिष्याने प्रश्न विचारला होता, त्याला उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रातील हा मजकूर.)

जर कोणाला लौकिकतेचा त्याग करून, फक्त पारलौकिकतेची निवड करावयाची असेल, आणि त्यात त्याला शांती लाभत असेल तर त्याने तसे खुशाल करावे. शांती लाभावी म्हणून, लौकिकतेचा त्याग करणे मला स्वत:ला आवश्यक वाटले नाही. माझ्या परिघामध्ये मी भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही विश्वांचा समावेश करावा आणि केवळ स्वत:च्या मुक्तीसाठी नव्हे तर, येथील दिव्य जीवनासाठी, दिव्य चेतना आणि दिव्य शक्ती लोकांच्या अंत:करणात व या पार्थिव जीवनात स्थापित करण्याचा प्रयत्न करावा, या दिशेने मी माझ्या योगाकडे वळलो असे मला आढळून आले.

हे ध्येय, इतर ध्येयांसारखेच एक आध्यात्मिक ध्येय आहे असे मला वाटते आणि या जीवनात लौकिक, पार्थिव गोष्टींचा मागोवा घेणे, त्यांचा जीवनात समावेश करणे यामुळे, आध्यात्मिकतेला काळिमा फासला जाईल किंवा त्याच्या भारतीयत्वाला काही बाधा येईल असे मला वाटत नाही. माझा तरी वास्तवाचा आणि या विश्वाचे, वस्तुंचे, ईश्वराचे स्वरूप, याविषयीचा हा अनुभव व दृष्टिकोन राहिलेला आहे. हे त्यांबाबतचे जवळजवळ संपूर्ण सत्य असल्यासारखे मला वाटते आणि म्हणूनच त्याचे अनुचरण करणे ह्याला मी पूर्णयोग म्हणतो.

अर्थातच, एखाद्याला पूर्णतेची ही संकल्पना मान्य नसेल आणि ती तो नाकारत असेल किंवा या लौकिक जीवनाचा संपूर्णतया परित्याग करून, पारलौकिक जीवनावर भर देणाऱ्या आध्यात्मिकतेवर तो विश्वास ठेवत असेल तर तसे करण्यास तो मोकळा आहे, पण तसे असेल तर माझा योग करणे त्याला अशक्य होईल.

माझ्या योगामध्ये, परमात्मलोकाचा, आपल्या भूलोकाचा आणि या दरम्यानच्या सर्व जगतांचा आणि त्यांच्या आपल्या जीवनावरील व भौतिक जगतावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा आणि त्यांच्या पूर्ण अनुभवांचा समावेश होतो.

पण हेही शक्य आहे की, आधी केवळ परमपुरुषाच्या साक्षात्कारावर भर द्यायचा किंवा त्याच्या एखाद्या अंगावर भर द्यायचा, जसे की, आपला आणि आपल्या कर्मांचा स्वामी असलेल्या विश्वाधिपती कृष्ण, शिव यांच्या साक्षात्कारावर भर द्यायचा आणि या योगासाठी आवश्यक असे परिणाम साध्य करून घ्यावयाचे आणि नंतर (दिव्य जीवनाकडे वाटचाल आणि आत्म्याचा भौतिक जीवनावर विजय हे ध्येय जर एखाद्याने स्वीकारलेले असेल तर) त्याच्या पूर्ण परिणामांकडे वळणे शक्य आहे. वस्तुविषयक हा अनुभव, अस्तित्वविषयक हे सत्य आणि हा दृष्टिकोन यामुळेच ‘दिव्य जीवन’ आणि ‘सावित्री’ लिहिणे मला शक्य झाले.

ईश्वराचा, पुरुषोत्तमाचा साक्षात्कार ही निश्चितच आवश्यक गोष्ट आहे. पण प्रेम, श्रद्धा, भक्ती यांतून त्या ईश्वराकडे वळणे, स्वत:च्या कर्मांच्या द्वारे त्याची सेवा करणे आणि केवळ बौद्धिक जाणिवेने नव्हे तर, आध्यात्मिक अनुभूतीच्या माध्यमातून त्याला जाणणे ह्यादेखील पूर्णयोगाच्या मार्गावरील आवश्यक गोष्टी आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 35 : 234-235)

मानसिक अस्तित्वाच्या आणि चैत्य प्राणाच्या शुद्धिकरणाच्या द्वारे, आध्यात्मिक मुक्तीसाठी लागणारी भूमी तयार करण्याचे काम केले जात असते – खरे तर शरीर आणि शारीरिक प्राण यांची शुद्धी देखील संपूर्ण सिद्धीसाठी आवश्यक असते पण तूर्तास शारीरिक शुद्धीचा प्रश्न आपण बाजूला ठेवू.

मुक्तीसाठी आवश्यक पूर्वअट आहे ती म्हणजे शुद्धी. सकल शुद्धी ही एक प्रकारची सुटका असते, मुक्ती असते; कारण शुद्धी म्हणजे बंधनात टाकणाऱ्या, बांधून ठेवणाऱ्या, अपूर्णता आणि गोंधळ यांनी अंधकार निर्माण करणाऱ्या गोष्टी फेकून देणे असते.

इच्छा-वासनांच्या शुद्धिमुळे चैत्य प्राणाची मुक्ती साध्य होते, चुकीच्या भावभावना आणि त्रासदायक प्रतिक्रिया यांच्या शुद्धीकरणातून हृदयाची मुक्ती साधली जाते. इंद्रिय-मनाच्या मळभ आणणाऱ्या संकुचित विचारांच्या शुद्धिकरणातून बुद्धीची मुक्ती साधली जाते आणि केवळ बौद्धिकतेच्या शुद्धीतून विज्ञानाची (Gnosis) मुक्ती साधली जाते. पण ह्या साऱ्या साधनभूत मुक्ती आहेत.

आत्म्याची मुक्ती ही अधिक व्यापक आणि अधिक मूलभूत स्वरुपाची असते; ही मुक्ती म्हणजे मर्त्यतेच्या मर्यादांमधून बाहेर पडून, चैतन्याच्या अमर्याद अशा अमर्त्यतेत खुले होणे असते.

काही विचारप्रणालींनुसार, मुक्ती म्हणजे सर्व प्रकृतीला नाकारणे, शुद्ध केवल अस्तित्वाची एक शांत स्थिती, निर्वाण किंवा विलोपन, आपल्या प्राकृतिक अस्तित्वाचे कोणत्यातरी अव्याख्येय अशा केवलामध्ये विलयन करणे हे होय. परंतु परमानन्दामध्ये निमग्न होऊन त्यातच राहणे, निष्क्रिय शांतीची विशालता, आत्म-विलोपनाद्वारे होणारी सुटका किंवा त्या ‘केवला’मध्ये स्वत:ला बुडवून टाकणे हे काही आमचे ध्येय नाही. फार फार तर, मुक्तीचा गर्भितार्थ आम्ही असा घेऊ शकतो की, आध्यात्मिक स्वातंत्र्यासाठी अपरिहार्य आणि सिद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या ह्या प्रकारच्या सर्व अनुभवांमध्ये सामायिक असणारा आंतरिक बदल यातून दर्शविला जातो.

तेव्हा आपल्याला असे दिसून येईल की, मुक्तीमध्ये नेहमीच दोन गोष्टी अध्याहृत असतात – तिला नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन बाजू असतात – पहिली म्हणजे अस्वीकार करणे आणि दुसरी म्हणजे ग्रहण करणे. मुक्तीची नकारात्मक बाजू म्हणजे महत्त्वाच्या बंधांपासून सुटका, कनिष्ठ आत्म-प्रकृतीच्या प्रधान-गाठींपासून सुटका; तर सकारात्मक बाजू म्हणजे अधिक उच्चतर अशा अध्यात्मिक अस्तित्वाकडे उन्मीलित होणे किंवा त्या उच्चतर अस्तित्वामध्ये विकसित होणे.

पण ह्या प्रधान-गाठी आहेत तरी कोणत्या – मन, हृदय, चैत्य जीवनशक्ती ह्यांच्या साधनभूत गाठींच्या अधिक सखोल अशा वळणा-वाकणापेक्षा भिन्न अशा कोणत्या गाठी आहेत त्या? भगवद्गीतेमध्ये आपल्यासाठी त्यांचा निर्देश करण्यात आला आहे आणि इतकेच नव्हे तर, गीतेमध्ये त्यांचा वारंवार, जोरकसपणे उल्लेख केलेला आहे; त्या चार गोष्टी म्हणजे इच्छा-वासना, अहंकार, द्वैत, आणि प्रकृतीचे त्रिगुण; कारण गीतेनुसार, वासनारहितता, अहंकार-विरहितता, मन, आत्मा व चैतन्य यांचा समतोल आणि निस्त्रैगुण्य (त्रिगुणातीत) ह्या चार गोष्टी असणे म्हणजे स्वतंत्र असणे, मुक्त असणे होय. गीतेमधील हे वर्णन आपण स्वीकारायला हरकत नाही कारण ह्या विस्तृत वर्णनामध्ये सर्व महत्त्वाच्या बाबींचा समावेश झालेला आहे.

मुक्तीची सकारात्मक बाजू म्हणजे, आत्म्यामध्ये वैश्विकता असणे, ईश्वराच्या चैतन्याशी विश्वातीत ऐक्य साधणे, सर्वोच्च दिव्य प्रकृतीने संपन्न असणे – म्हणजे असे म्हणता येईल की, ईश्वरासारखे होणे किंवा आपल्या अस्तित्वाच्या कायद्याने त्याच्याशी एकत्व पावणे. मुक्तीचा संपूर्ण व सर्वांगीण अर्थ हा असा आहे आणि चैतन्याची परिपूर्ण मुक्ती देखील ह्यातच आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 674-675)

त्याग हा आम्हाला साधन म्हणूनच मान्य होईल; साध्य म्हणून कदापि मान्य होणार नाही; मानवात ईश्वरी पूर्णता प्रकट करणे हे आमचे साध्य आहे व ते सकारात्मक आहे, त्यामुळे त्याग हे नकारात्मक साधन आमचे मुख्य किंवा एकमेव साधन होऊ शकत नाही.

ईश्वराच्या मानवातील आत्मपरिपूर्तीहून वेगळे आणि तिला विरोधी असे जे असेल त्याचा आपण पूर्ण त्याग केला पाहिजे. तसेच या आत्मपरिपूर्तीपेक्षा निम्नतर वा आंशिक अशी जी जी सिद्धी असेल तिचाही आपण क्रमशः त्याग केला पाहिजे.

विश्वातील जीवनावर आपली आसक्ती असता कामा नये. ती जर असेलच तर, तिचा आपण नि:शेष त्याग करावयास हवा. तसेच विश्वातून होणाऱ्या सुटकेविषयी, मुक्तीविषयी, महान आत्मनिर्वाणाविषयीचीही आसक्ती आपल्यामध्ये असता कामा नये. आणि ती असेलच तर, तिचादेखील आपण नि:शेष त्याग केला पाहिजे. हा पूर्ण त्याग आमच्या साध्याला धरून आहे. आम्हाला आसक्ती मुळीच नको आहे; मग ती संसाराविषयी असो वा मुक्तीविषयी असो.

*

आपला त्याग हा आंतरिक त्याग असला पाहिजे हे उघड आहे; आसक्तीमय अशी इंद्रियांची वासना व हृदयाची वासना; विचार आणि आचार यांचा हट्टाग्रह; आणि जाणिवेच्या केंद्रातील अहंभाव या तीन गोष्टींचा आपण विशेषेकरून सर्वप्रथम त्याग करणे आवश्यक आहे. आपल्या निम्नतर प्रकृतीशी आपल्याला जखडून ठेवणारी अशी ही तीन बंधने आहेत. ह्या तीन बंधनांचा, आम्ही संपूर्ण त्याग केल्यावर, इतर कोणतेही बंधन आपल्याला बांधू शकत नाही. म्हणून आपण प्रथम आपल्या ठिकाणची आसक्ती आणि वासना पूर्णपणे फेकून दिली पाहिजे.

आसक्ती व वासनाविषयक त्याग :

आपण आसक्ती बाळगावी असे या जगात काहीही नाही; ना संपत्ती ना दारिद्रय, ना सुख ना दुःख, ना जीवन ना मरण, ना मोठेपणा ना लहानपणा, ना दुर्गुण ना सद्गुण; ना मित्र ना पत्नी, ना मुलेबाळे, ना देश, ना आपले कर्तव्य, ना सेवाकार्य, ना स्वर्ग, ना पृथ्वी, ना त्यांच्या आतले काही, ना त्यांच्या पलीकडचे काही. अगदी कशाविषयीही आपल्या ठिकाणी आसक्ती असता कामा नये.
मात्र याचा अर्थ असा नव्हे की, आपण कशावरच प्रेम करू नये, कोणताच आनंद उपभोगू नये; कारण आसक्ती म्हणजे प्रेमातील अहंभाव होय, प्रेम नव्हे. वासना म्हणजे विषयोपभोगाची जी भूक आहे त्यातील संकुचितता व असुरक्षितता आहे; तो वस्तुजातातील दिव्यानंदाचा शोध असत नाही.

आचारविचारांचा हट्टाग्रह :

आपल्या कनिष्ठ प्रकृतीशी आपल्याला बांधून ठेवणाऱ्या तीन बंधनांपैकी पहिल्या बंधनाचा, आसक्ती व वासनारूप बंधनाचा विचार झाला. आता दुसरे बंधन, विचार व आचार यांचा हट्टाग्रह. पूर्णत्व मिळविण्यासाठी ज्याप्रमाणे आपला अहंकारी आग्रह आपल्याला दिव्यकर्ममार्गात सर्वथा टाकून द्यावा लागतो त्याचप्रमाणे दिव्य ज्ञान परिपूर्ण व्हावयास हवे असेल तर तेथेही आपला अहंकारी आग्रह सोडावा लागतो.

जाणिवेच्या केंद्रातील अहंभाव :

उपरोक्त स्व-इच्छा म्हणजे मनातील अहंकारच असतो; की जो स्वत:च्या आवडीनिवडी, स्वत:च्या सवयी, स्वत: केलेल्या विचारांच्या, दृष्टिकोनांच्या, आणि इच्छेच्या भूतकाळातील वा भविष्यातील कल्पनांना घट्ट धरून राहतो. कारण त्या कल्पना वा रचना म्हणजेच तो स्वत: आहे किंवा त्या त्याच्या स्वत:च्या आहेत अशी त्याची धारणा असते. आणि मग त्यातून तो ‘मी’ आणि ‘माझे’ यांचे एक अतिशय नाजूक धाग्यांचे जाळे स्वत:भोवती विणत राहतो आणि एखादा कोळी ज्याप्रमाणे आपल्या जाळ्यात जीवन जगत राहतो तसाच हाही राहू लागतो.

कोळ्याला जसा त्याच्या जाळ्यावर केलेला आघात रुचत नाही, त्याचप्रमाणे कोणी धक्का दिलेला ह्या अहंकारी मनाला रुचत नाही, त्याचा ते द्वेष करते. कोळ्याला स्वत:च्या जाळ्याहून निराळ्या जाळ्यात राहावे लागल्यास परकेपणा वाटतो, त्याप्रमाणे अहंकारी मन नव्या दृष्टिकोनाकडे नव्या रचनांकडे, नव्या स्वप्नांकडे नेले गेले की, त्याला परकेपणा वाटतो, त्याला दु:ख होते. ही आसक्ती मनातून अजिबात काढून टाकली पाहिजे.

जगासंबंधाने व जीवनासंबंधाने असलेली आपली सामान्य वृत्ती आपण टाकून दिली पाहिजे; जागृत न झालेले मन या सामान्य वृत्तीला स्वभावधर्म असे समजून चिकटून राहते; परंतु आपण येथेच थांबता उपयोगी नाही; आपण निर्माण केलेल्या कोणत्याही मानसिक रचनेला, बुद्धिप्रधान विचारपंथाला, धार्मिक मतवादाला किंवा तार्किक सिद्धांताला आपण बांधलेले राहता कामा नये; मनाचे व इंद्रियांचे जाळे आपण तोडूनच टाकले पाहिजे. पण तेथेही आपण थांबता कामा नये; विचारकाचे जाळे, धर्मवाद्यांचे जाळे, धर्मसंस्थापकांचे जाळे थोडक्यात ‘शब्दांचे’ व ‘कल्पनांचे’ जाळे यापासून आपण स्वत:ला दूर केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 329)

तंत्रमार्गातील समन्वय

तंत्रशास्त्र जी साधना उपयोगात आणते ती स्वरूपतः समन्वयात्मक साधना आहे. हे एक महान विश्वव्यापी सत्य आहे की, अस्तित्वाला दोन ध्रुवटोके आहेत आणि या ध्रुवटोकांची मौलिक एकता, हे अस्तित्वाचे रहस्य आहे.

ब्रह्म आणि शक्ति, आत्मा आणि प्रकृति ही ती दोन ध्रुवटोके होत; प्रकृति ही आत्म्याची शक्ति आहे, किंवा असे म्हणणे अधिक सयुक्तिक होईल की, आत्मा शक्तिदृष्टीने प्रकृति हे नाव धारण करतो, प्रकृति या नावाने ओळखला जातो; हे महान सत्य तंत्रशास्त्राने उपयोगात आणले आहे.

तांत्रिक पद्धतीत मानवाच्या प्रकृतीला उन्नत करून, तिला आत्म्याच्या व्यक्त शक्तीचे रूप देणे हे साध्य असते; तंत्र हे मानवाची संपूर्ण प्रकृति हातात घेऊन तिचे आध्यात्मिक रूपान्तरण करू पाहते.

तंत्राच्या साधन-संभारात हठयोगाची जोरदार प्रक्रिया आहे; नाडीचक्रे उघडणे, कुंडलिनी शक्ति जागृत करून ब्रह्माच्या दिशेने या चक्रांतून तिची यात्रा घडवणे ही हठयोगाची प्रक्रिया विशेषेकरून आहे; त्यात राजयोगाची सूक्ष्म शुद्धीकरण, ध्यान, एकाग्रता ही प्रक्रिया आहे; तसेच इच्छाशक्तीचा आधार, भक्तीची प्रेरकशक्ति, ज्ञानसाधनेची गुरुकिल्ली यांचा आपल्या कार्याला गति देण्यासाठी तंत्रशास्त्र उपयोग करते. याप्रमाणे तंत्र-साधना हठादि सर्व योगांच्या भिन्न भिन्न शक्ति आपल्या कार्यासाठी एकत्र करते, परिणामकारक रीतीने एकत्र करते;

परंतु येथेच ती थांबत नाहीं; आणखी दोन दिशांनी तंत्र आपली समन्वयी प्रवृत्ति प्रकट करते; ते सामान्य योगपद्धतीत दोन गोष्टींची भर घालते; मानवी व्यवहाराच्या प्रेरक हेतूंना, मानवी गुणांना व वासनांना तंत्र हातांत घेते व त्यांना कठोर शिस्त लावून, आत्म्याच्या शासनाखाली त्यांनी वागावे अशी व्यवस्था ते प्रथम करते व नंतर ते दिव्य आध्यात्मिक पातळीवर त्यांना घेऊन जाते, त्यांना दिव्य, आध्यात्मिक रूप देते, ही एक गोष्ट.

दुसरी गोष्ट ही की, आपल्या योगसाध्यांत केवळ मुक्तीचा अंतर्भाव न करता भुक्तीचाहि अंतर्भाव ते करते; तंत्रेतर योगपद्धती मुक्ति हे आपले एकमेव साध्य मानतात; भुक्ति म्हणजे आत्मशक्तीने जगाचा उपभोग घेणे हे तंत्रेतर योगांना साध्य म्हणून मान्य नाही. त्यांना साध्याकडे जाताजाता मार्गात उपभोग घेणे, अंशत: प्रसंगाने उपभोग घेणे मान्य आहे. एकंदरीने तंत्राची योग-पद्धति इतर पद्धतींहून व्यापक आहे, धैर्यशाली आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 611-612)

यानंतर आपण अगदी स्वाभाविकपणे चार मुक्तींकडे वळतो की ज्या ह्या सिद्धीची सघन अशी रूपे असतात. अतिमानसिक एकत्वाचा पूर्ण साक्षात्कार झाल्याने, भावनांची मुक्ती म्हणजे त्याच वेळी दुःखभोगापासूनही मुक्ती असेल.

मानसिक मुक्ती किंवा अज्ञानापासून मुक्तता झाली म्हणजे ज्योतिर्मन (Mind of light) किंवा विज्ञानमय चेतनेची (Gnostic consciousness) आपल्या अस्तित्वामध्ये प्रस्थापना होईल, जिच्या अभिव्यक्तीमध्ये शब्दाचे सृजनशील सामर्थ्य असेल.

प्राणिक मुक्ती किंवा वासनामुक्ती प्राप्त झाल्याने, व्यक्तीला स्वत:ची इच्छा दिव्य इच्छेमध्ये संपूर्णत: आणि जाणीवपूर्वक एकरूप करण्याची क्षमता येईल आणि त्यामुळे नित्य शांती, प्रसन्नता आणि त्यांच्यापासून निर्माण होणारी शक्ती यांची प्राप्ती होईल.

अखेरचे शिखर म्हणजे शारीरिक मुक्ती; म्हणजेच भौतिक जगामध्ये असणाऱ्या कार्यकारणभावाच्या नियमापासूनही मुक्ती. संपूर्ण आत्मप्रभुत्वाचा परिणाम म्हणून, व्यक्ती आता प्राकृतिक नियमांची दास बनून राहत नाही. माणसांना अवचेतन वा अर्धचेतन भावावेगांच्या द्वारा कृती करावयास भाग पाडणा-या आणि सामान्य जीवनाच्या चाकोरीत बांधून ठेवणाच्या प्राकृतिक नियमांच्या आधीन आता अशी व्यक्ती राहत नाही. या मुक्तीच्या साहाय्याने मग, व्यक्ती कोणता मार्ग निवडावयाचा, कोणते कार्य पूर्ण करावयाचे हे पूर्ण जाणीवेने ठरवू शकते. आणि अंध नियतीच्या सर्व पाशांमधून ती व्यक्ती स्वत:ला मोकळे करते; की ज्यायोगे, व्यक्तीच्या जीवनक्रमामध्ये उच्चतम संकल्पशक्ती, सर्वोच्च सत्यमय ज्ञान, अतिमानसिक जाणीव यांखेरीज दुसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप करू दिला जात नाही.

 

– श्री माताजी
(CWM 12 : 71)