Posts

(श्रीमाताजींनी ‘विश्वात्मक’ प्राणाशी किंवा ‘ईश्वरी’ आनंदाशी एकात्म पावलेल्या व्यक्तिगत प्राणासंबंधी विवेचन केले आहे. एकदा का ही एकात्मता साधली की मग प्राणाचे व्यक्तिगत अस्तित्व शिल्लक राहत नाही, असे त्या म्हणतात.)

उदाहरणार्थ, क्वचितच एखाद्या मानवी वातावरणाने दूषित न झालेल्या गावाकडील निर्जन रस्त्यावरून, जेथे निसर्ग एखाद्या अभीप्सेसारखा, एखाद्या पवित्र प्रार्थनेसारखा अगदी शांत, विशाल, विशुद्ध असतो अशा ठिकाणी किंवा पर्वतराजीमध्ये, दऱ्याखोऱ्यांमध्ये, शेजारून खळाळणारे पाण्याचे प्रवाह जिथे वाहत आहेत अशा भटक्या वाटांवरून, किंवा अथांग सागरकिनाऱ्यावरून व्यक्ती जेव्हा एकटीच आपल्या नादात फिरत असते, किंवा ज्याच्याबरोबर त्या व्यक्तीचा पूर्ण सुसंवाद असतो अशा जोडीदाराच्या सहवासात विहार करत असते, तेव्हा तेथे तिला जी संवदेना जाणवत असते ती म्हणजे एक सूक्ष्मसा आनंद असतो, तो मधुर आणि अगाध असतो. जोपर्यंत प्राण व्यक्तिगत असतो, तोपर्यंत हा आनंद बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतो. जेव्हा (व्यक्तीचा) ‘प्राण’ खऱ्या अर्थाने अवैयक्तिक, विश्वात्मक झालेला असतो, तेव्हा ‘ज्यांना ज्यांना त्याची जाणीव असते त्या सर्वांमध्ये असलेला, आल्हाददायक आनंदच’ ती व्यक्ती होऊन जाते; अशा वेळी व्यक्तीला त्या गोष्टीचा आनंदोपभोग घेण्यासाठी, आजूबाजूला कोणतीही विशिष्ट भौतिक परिस्थिती असण्याची आवश्यकता नसते. नाडीगत स्तराबाबत (Nervous plane) सांगायचे तर, अशावेळी व्यक्ती सर्व प्रकारच्या परिस्थितींपासून पूर्णतः मुक्त असते. त्यावेळी व्यक्तीला मुक्ती प्राप्त झालेली असते.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 119-120)

विचार शलाका – ३८

आपण ज्या ‘योगा’चा (पूर्णयोगाचा) अभ्यास करतो आहोत तो आपण केवळ स्वतःसाठी करत नाही, तर ‘ईश्वरा’साठी करतो; ‘ईश्वरा’ची इच्छा या जगामध्ये कार्यकारी व्हावी; आध्यात्मिक परिवर्तन घडून यावे; आणि मानसिक, प्राणिक व शारीरिक प्रकृतीमध्ये तसेच मानवी जीवनामध्ये दिव्य प्रकृती आणि दिव्य जीवन उतरवावे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. ‘मुक्ती’ ही या योगाची आवश्यक अट असली तरी, वैयक्तिक ‘मुक्ती’ हे त्याचे उद्दिष्ट नाही; तर मानवाची मुक्ती आणि त्याचे रूपांतरण हे या योगाचे उद्दिष्ट आहे. वैयक्तिक ‘आनंद’ नव्हे, तर दिव्य ‘आनंद’ खाली भूतलावर उतरविणे, ‘ख्रिस्ता’चे स्वर्गसाम्राज्य आणि आपले ‘सत्ययुग’ या पृथ्वीवर अवतरविणे हे या योगाचे उद्दिष्ट आहे. मोक्षाबाबत म्हणाल तर, आपल्याला वैयक्तिकरित्या त्याची आवश्यकता नाही, कारण आत्मा हा नित्यमुक्तच असतो आणि बंधन हा भ्रम आहे. वास्तविक आपण बद्ध नाही परंतु आपण बद्ध असल्याप्रमाणे लीलेमध्ये सहभागी होतो. जेव्हा ‘देवाची’ इच्छा होईल तेव्हा आपण मुक्त होऊ शकतो. कारण तो, आपला परम ‘आत्मा’ हाच या खेळाचा स्वामी आहे आणि त्याच्या कृपेविना आणि त्याच्या अनुमतीविना कोणताही जीव हा खेळ सोडून जाऊ शकत नाही. बरेचदा आपल्यातील ‘देवाची’ इच्छाच आपल्या मनाला अज्ञानाच्या भोगामधून, द्वैतामधून, सुख आणि दुःखामधून, मौजमजा आणि वेदना यांतून, पापपुण्यामधून, भोग आणि त्यागामधून घेऊन जात असते. युगानुयुगे, अनेकानेक देशांमध्ये त्याच्या मनाला योगाचा विचार देखील शिवत नाही आणि तो शतकानुशतके हा खेळ अथकपणे खेळत राहतो. यामध्ये गैर असे काही नाही किंवा आपण ज्याचा धिक्कार करावा असेही त्यात काही नाही किंवा आपण स्वतःचा संकोच करावा असेही त्यात काही नाही, कारण ही ‘देवाची’ लीला आहे. खरा ज्ञानी मनुष्य तोच की, जो हे सत्य ओळखतो, स्वतःचे स्वातंत्र्य ज्ञात करून घेतो आणि तरीही ‘देवा’च्या या खेळामध्ये सहभागी होतो आणि या खेळाची पद्धत बदलण्यासाठी म्हणून त्याच्या आज्ञेची वाट पाहात राहतो.

आता ही आज्ञा झाली आहे. सर्व प्रकारच्या संधी आणि संकटांमधून, काही मोजक्या किंवा अनेकांच्याद्वारे, सातत्याने उच्चतर ज्ञान जतन व्हावे म्हणून देव स्वतःसाठी असा एक खास देश निवडतो आणि सद्यस्थितीत, या चतुर्युगामध्ये तरी तो देश भारत आहे. जेव्हा तो देव अज्ञानाचे, द्वैताचे, संघर्षाचे, वेदनेचे आणि अश्रूंचे, दुर्बलतेचे, स्वार्थीपणाचे, तामसिक व राजसिक सुखोपभोगांचे, थोडक्यात म्हणजे कालीच्या लीलेचे पूर्ण सौख्य उपभोगण्याचे ठरवितो तेव्हा, तो भारतातील ज्ञान मंदावतो, भारताला दुर्बलतेमध्ये आणि अवनतीमध्ये लोटतो, जेणेकरून भारताने स्वतःमध्येच विश्राम करावा आणि त्याच्या लीलेच्या गतिविधींमध्ये हस्तक्षेप करू नये. जेव्हा त्याला स्वतःला या दलदलीमधून वर उठण्याची इच्छा होते आणि मानवातील नारायण हा पुन्हा एकदा बलवान, प्रज्ञावान आणि आनंदपूर्ण बनावा असे त्याला वाटते; तेव्हा तो भारतामध्ये ज्ञानवर्षाव करतो आणि भारताची अशा रीतीने उन्नती घडवून आणतो की ज्यामुळे, भारताने ज्ञान व त्याच्या परिणामस्वरूप येणारी बलवत्ता, प्रज्ञा आणि आनंद या गोष्टी अखिल विश्वाला प्रदान कराव्यात. जेव्हा ज्ञानाचे संकोचन झाल्याची प्रवृत्ती आढळून येते, तेव्हा भारतातील योगी हे या विश्वापासून दूर होत, स्वतःच्या मुक्तीसाठी व आनंदासाठी किंवा काही मोजक्या शिष्यांच्या मुक्तीसाठी योगाभ्यास करतात; पण जेव्हा ज्ञानप्रवृत्ती पुन्हा एकदा प्रसरण पावते तेव्हा त्याबरोबर भारताचा आत्माही विस्तार पावतो, तेव्हा ते योगी पुनश्च पुढे येतात आणि या जगामध्ये, जगासाठी कार्य करत राहतात. जनक, अजातशत्रू, कार्तवीर्य यांसारखे योगी मग पुन्हा विश्वसिंहासनावर विराजमान होतात आणि राष्ट्रांवर राज्य करू लागतात.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 71-72)

विचार शलाका – ३७

पूर्ण ज्ञान, पूर्ण कर्म आणि पूर्ण भक्ती यांचे एकत्रीकरण करणे, त्यांचा समन्वय करणे आणि त्यांना मनोमय पातळीवरून ‘विज्ञाना’च्या अतिमानसिक पातळीवर उन्नत करून, त्यांना परिपूर्ण असे पूर्णत्व प्रदान करणे, हे ‘पूर्णयोगा’चे मूलतत्त्व आहे. जुन्या योगमार्गांध्ये अशी त्रुटी होती की, मन आणि बुद्धी ज्ञात असूनही, ‘आत्मा’ ज्ञात असूनही, ते योग केवळ मनाच्या स्तरावरील आध्यात्मिक अनुभव घेण्यावरच समाधानी राहिले. परंतु मन हे अनंताचे, अ-भंगाचे केवळ आंशिकच आकलन करून घेऊ शकते; ते अनंत, अ-भंगाला पूर्णांशाने कवळू शकत नाही. त्याला कवळून घेण्याचा मनाचा मार्ग म्हणजे एकतर भावसमाधीद्वारे, मोक्षाच्या मुक्तीद्वारे किंवा निर्वाणाच्या विलयाद्वारे किंवा तत्सम गोष्टींद्वारे त्याला जाणून घेणे हा असतो. त्याच्यापाशी अन्य कोणताच मार्ग नाही. कोठे तरी कोणीतरी एखादाच खरोखरी ही अ-लक्षण मुक्ती मिळविण्यामध्ये यशस्वी होतो, पण त्याचा काय उपयोग? ‘चैतन्य’, ‘आत्मा’, ‘ईश्वर’ कायम आहेतच की! परंतु मनुष्य या इथेच मूर्तिमंत ‘ईश्वर’ व्हावा, व्यक्तिगतरित्या आणि सामूहिकरित्याही तो ‘ईश्वर’च व्हावा, त्याने या जीवनामध्येच ‘देवा’चा साक्षात्कार करून घ्यावा, अशी ‘ईश्वरा’ची अपेक्षा आहे. योगाच्या जुन्या पद्धती, आत्मा आणि जीवन यांचे ऐक्य घडवून आणू शकल्या नाहीत किंवा त्या त्यांचा समन्वयही घडवून आणू शकल्या नाहीत. एकतर माया म्हणून किंवा ‘देवा’ची ही अनित्य लीला आहे असे समजून त्यांनी ऐहिकाची उपेक्षा केली. त्याचा परिणाम म्हणून जीवनशक्तीचा ऱ्हास झाला आणि ‘भारता’ची अवनती झाली. ‘भगवद्गीते’मध्ये सांगितले आहे की, ‘उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम्’ म्हणजे, ”मी जर कार्य केले नाही तर हे लोक छिन्नविछिन्न होऊन जातील.” आणि खरोखर भारतातील अशी माणसं दुर्दशेला जाऊन पोहोचली आहेत. काही मोजक्या तपस्व्यांना, संन्याशांना, पुण्यात्म्यांना आणि साक्षात्कारी जीवांना मुक्ती मिळाली; काही थोडे भक्त हे देवधुंद होऊन, त्याच्या आनंदाने, देवाविषयीच्या प्रेमावेशाने नाचूबागडू लागले पण दुसरीकडे मात्र एक संपूर्ण मानववंश प्राण आणि बुद्धी यांच्या अभावी, जर अंधकाराच्या आणि निष्क्रियतेच्या खाईत जात असेल तर, ही कोणत्या प्रकारची आध्यात्मिक सिद्धी म्हणायची?

– श्रीअरविंद
(CWSA 09 : 360-361)

विचार शलाका – ०५

पूर्वीच्या योगांच्या तुलनेत ‘पूर्णयोग’ नवीन आहे : व्यक्तीने केवळ स्वतःसाठी, स्वतःपुरता ईश्वराचा साक्षात्कार करून व्यक्तिगत सिद्धी प्राप्त करून घ्यावी हे येथे उद्दिष्ट नाही. व्यक्तीने केवळ अति-वैश्विक उपलब्धीच नव्हे तर येथील पृथ्वीचेतनेसाठी, वैश्विक अशी काही प्राप्ती करून घ्यावी हेही येथे अपेक्षित आहे. आजवर या पृथ्वी-चेतनेमध्ये, अगदी आध्यात्मिक जीवनामध्येसुद्धा सक्रिय नसलेली किंवा सुसंघटित नसलेली अतिमानसिक (supramental) चेतनेची शक्ती आणणे आणि ती शक्ती सुसंघटित करणे आणि ती थेटपणे सक्रिय होईल हे पाहणे, ही गोष्टसुद्धा साध्य करून घ्यायची आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 400)

विचार शलाका – १८

अतिमानसिक अवतरण शक्य होण्यासाठी, साधकाने त्याआधी बरीच पावले टाकली असली पाहिजेत. माणूस हा बरेचदा त्याच्या पृष्ठीय मन, प्राण आणि देहामध्येच जगत असतो पण त्याच्या आतमध्ये महत्तर शक्यता असणारे एक आंतरिक अस्तित्व असते, ज्याविषयी त्याने जागृत होणे गरजेचे असते. कारण सद्यपरिस्थितीत, मानवाला त्यातील अगदी मर्यादित प्रभावच प्राप्त होऊ शकतो. आणि तो प्रभावच त्याला एका महान सौंदर्याच्या, सुसंगतीच्या, शक्तीच्या आणि ज्ञानाच्या सातत्यपूर्ण अनुसरणासाठी प्रवृत्त करतो. म्हणून ह्या आंतरिक अस्तित्वाचे टप्पे खुले करणे आणि बाह्य जीवनात जगत असतानाही अंतरंगात राहणे, त्याचे बाह्य जीवन या आंतरिक प्रकाशाने आणि ऊर्जेने प्रशासित करणे ही योगाची पहिली प्रक्रिया होय. हे करीत असताना त्याला स्वत:मध्ये त्याच्या खऱ्या आत्म्याचा शोध लागतो, की जो मानसिक, प्राणिक आणि शारीरिक घटकांचे कोणतेही वरवरचे मिश्रण असत नाही पण त्यांच्यामागे असणाऱ्या वास्तविकतेचा (Reality) काही अंश असतो, त्या एकमेवाद्वितीय ‘दिव्य अग्नी’चा तो स्फुल्लिंग असतो. त्याने त्याच्या अंतरात्म्यात निवास करणे, शुद्धीकरण करणे आणि त्याची उर्वरित सर्व प्रकृती ही ‘सत्या’कडे असलेल्या त्याच्या प्रेरणेने अभिमुख करणे शिकायला हवे. त्याच्या पाठोपाठ उर्ध्वामुखी खुलेपण आणि ‘अस्तित्वा’च्या उच्चतर तत्त्वाचे अवतरण घडून येणे शक्य आहे. पण असे असले तरीसुद्धा ती एकदम संपूर्ण अतिमानसिक ‘प्रकाश’ किंवा ‘ऊर्जा’ असणार नाही. कारण सामान्य मानवी मन आणि अतिमानसिक ‘सत्य-चेतना’ यांच्या दरम्यान चेतनेच्या अनेक पातळ्या असतात. ह्या आंतरवर्ती पातळ्या खुल्या करून त्यांची शक्ती मन, प्राण आणि शरीरात उतरवणे आवश्यक असते. केवळ त्यानंतरच ‘सत्य-चेतने’ची पूर्ण शक्ती प्रकृतीमध्ये कार्य करू शकेल. म्हणून स्वयंशिस्तीची किंवा ‘साधने’ची ही प्रक्रिया प्रदीर्घ आणि अवघड आहे पण त्यातील थोडेच असले तरीदेखील खूप प्राप्त केल्यासारखे आहे कारण त्यामुळे अंतिम मुक्ती आणि पूर्णत्व हे अधिक शक्य होते.

– श्रीअरविंद
(CWSA 36 : 548-549)

विचार शलाका – १७

देहरूपी आवरणापासून आत्म्याची सुटका हेच जर उद्दिष्ट असेल, तर अतिमानसिकीकरणाची (Supramentalisation) आवश्यकता नाही. त्यासाठी ‘आध्यात्मिक मुक्ती’ किंवा ‘निर्वाण’देखील पुरेसे आहे. भौतिकातीत पातळ्यांपर्यंत जाऊन पोहोचणे हे जरी उद्दिष्ट असेल तरीसुद्धा अतिमानस अवतरणाची आवश्यकता नाही. एखाद्या स्वर्गातील देवाची भक्ती करून व्यक्तीला त्या स्वर्गात प्रवेश मिळू शकतो. पण त्याला प्रगती म्हणता येणार नाही. अन्य जगतं (लोक, worlds) ही नमुनेबद्ध, नमुनेदार आहेत. ती त्यांच्या स्वत:च्या पद्धतीने, प्रकाराने आणि कायद्याने, नियमांनी बद्ध झालेले असतात. उत्क्रांती ही पृथ्वीवरच होऊ शकते आणि म्हणून योग्य असे प्रगतीचे खरे क्षेत्र, पृथ्वी हेच आहे. अन्य जगतातील अस्तित्व एका जगतातून दुसऱ्या जगतामध्ये प्रगत होऊ शकत नाहीत. ती त्यांच्या स्वत:च्या वर्गामध्येच बंदिस्त होऊन राहतात.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 288)

विचार शलाका – ०३

प्राचीन भारतीय सभ्यता चार मानवी हितसंबंधाच्या पायावर स्पष्टपणे उभी केलेली होती – १) वासना आणि भोग २) मन व शरीर यांची भौतिक व आर्थिक उद्दिष्टे व गरजा ३) नैतिक वर्तन व वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाचा योग्य नियम ४) आध्यात्मिक मुक्ती; म्हणजेच काम, अर्थ, धर्म, मोक्ष.

संस्कृतीचे व समाजसंघटनेचे हे कार्य होते की, त्यांनी नेतृत्व करून, मानवाच्या या हितसंबंधांना आधार देऊन, मानवाचे समाधान करावे आणि या हितसंबंधांची रूपे व हेतु यांचा शक्यतो समन्वय करावा. क्वचित काही अपवाद सोडता, मानवाच्या वरील तीन ऐहिक हेतूंचे समाधान अगोदर, आणि इतर हेतूचा विचार नंतर, अशी व्यवस्था अभिप्रेत होती; अगोदर जीवनाची पूर्णता आणि नंतर जीवनाला मागे टाकून पलीकडे जाणे, अशी व्यवस्था अभिप्रेत होती.

कुटुंबाचे ऋण, समाजाचे ऋण व देवांचे ऋण ही तीन ऋणे फेडण्यात कसूर न व्हावी असा संस्कृतीचा आदेश होता. पृथ्वीचे देणे पृथ्वीला दिले पाहिजे, सापेक्ष जीवनाला त्याची लीला करू दिली पाहिजे. या जीवनाच्या पलीकडे निरपेक्ष केवलाची शांती आहे, पृथ्वीच्या पलीकडे स्वर्गाचे वैभव आहे, म्हणून पृथ्वी व सापेक्ष जीवन यांजकडे दुर्लक्ष होता कामा नये, असा संस्कृतीचा आदेश होता. सर्वांनी गुहेत, मठात जावे असा प्रचार या संस्कृतीत मुळीच नव्हता.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 125)

 

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०२

जो बंधनांपासून मोकळा असतो, तो बंधमुक्त असतो, तो मुक्त असतो. परंतु मुक्तीची आस हेच एक स्वयमेव असे अखेरचे बंधन आहे; जीव परिपूर्णतया मुक्त होण्यापूर्वी त्याने ह्या बंधनाचा देखील त्याग केला पाहिजे. कोणीच बद्ध नसतो, कोणीच मुक्तीचा इच्छुक नसतो, तर आत्मा हा कायमच आणि परिपूर्णपणे मुक्तच असतो, बंधन हा भ्रम आहे आणि बंधनापासून मुक्ती हा सुद्धा एक भ्रमच आहे, याचा साक्षात्कार होणे हेच अंतिम ज्ञान होय.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 06)

प्रश्न : चैत्य पुरुष मुक्त होतो म्हणजे नेमके काय घडते?

श्रीमाताजी : बरेचदा साधनेच्या सुरुवातीच्या काळात व्यक्तीच्या मनामध्ये एक प्रकारची भावना निर्माण होते. ती भावना अशी असते की, जणु चैत्य पुरुष हा एखाद्या कठीण अशा कवचामध्ये, तुरुंगामध्ये बंदिस्त झालेला आहे आणि हीच गोष्ट त्याच्यातील चैत्य पुरुषाला बाह्यत: आविष्कृत होण्यापासून आणि बाह्यवर्ती चेतनेशी, बाह्य व्यक्तित्वाशी जागृत आणि सातत्यपूर्ण संबंध जोडण्याला प्रतिबंध करते.

एखाद्या पेटीमध्ये आपण बंदिस्त झालो आहोत किंवा ज्याच्या भिंती फोडून बाहेर पडावयास हवे, अशा एखाद्या तुरुंगात आहोत किंवा असे एखादे दार असावे की, ज्याच्या आत प्रवेश करावयाचा तर बलप्रयोग करावा लागेल, अशी काहीशी ही भावना असते. तेव्हा साहजिकच, जर एखादा कोणी ती भिंत पाडू शकला, ते दार उघडू शकला, तर आत बंदिस्त असलेला चैत्य पुरुष मुक्त होतो आणि आता तो बाह्यत: देखील आविष्कृत होऊ शकतो. ह्या सगळ्या प्रतिमा आहेत.

प्रत्येक व्यक्तीची, स्वभावत:, स्वत:ची अशी वैयक्तिक प्रतिमा असते, कमीअधिक फरकाने, तिची स्वत:ची एक वैयक्तिक पद्धत असते. ज्यांनी ज्यांनी ह्याची अनुभूती घेतलेली आहे अशा व्यक्तींच्या बाबतीत, काही प्रतिमा सर्वांनाच समानतेने अनुभवास आलेल्या असतात.

उदाहरणार्थ, जेव्हा एखादी व्यक्ती चैत्य पुरुषाचा शोध घेण्यासाठी, स्वत:च्या चेतनेच्या तळाशी खोल जाऊन पोहोचते, तेव्हा ती जणू काही विहिरीमध्ये खूप खाली, खाली, खाली उतरत आहे आणि जणू काही ती आता त्या विहिरीमध्ये अगदी तळाशी जाणार अशी भावना असते, प्रतिमा असते. हे तर उघडच आहे की या उपमा आहेत; परंतु अनुभवाचा मनावर जो ठसा उमटतो त्याच्याशी साधर्म्य राखणाऱ्या ह्या उपमा आहेत आणि त्यातून त्या अनुभवाची सघन अशी प्रचिती येते आणि त्यातून फार मोठी ताकद मिळते.

उदाहरणार्थ, व्यक्ती जेव्हा स्वत:च्या आंतरिक अस्तित्वाच्या शोधास सुरुवात करते किंवा ती स्वत:च्या विविध अंगांच्या शोधास सुरुवात करते, तेव्हा तिची बरेचदा अशी भावना होते की, ती जणू काही एका हॉलमध्ये किंवा खोलीमध्ये आतवर प्रवेश करते आहे. तेथील रंग, तेथील वातावरण, त्या खोलीमध्ये असणाऱ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टींच्या आधारे व्यक्ती अस्तित्वाच्या कोणत्या अंगाला भेट देत आहे ह्याचे स्पष्ट आकलन होऊ शकते. आणि मग, व्यक्ती एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाते, दरवाजे उघडते आणि अधिकाधिक आतल्या आतल्या खोल्यांमध्ये प्रवेश करत जाते, त्यातील प्रत्येक खोलीचे स्वत:चे असे एक स्वरूप असते. आणि बऱ्याचदा, हा आंतरिक प्रवास, ह्या आंतरिक भेटी रात्रीच्या वेळी घडून येतात. तेव्हा त्याला स्वप्नासारखे, अधिक सघन असे रूप प्राप्त होते आणि व्यक्तीला असे जाणवते की, जणू ती एखाद्या घरामध्ये प्रवेश करत आहे आणि ते घर तिच्या खूप परिचयाचे आहे.

आणि काळ, वेळेनुसार आंतरिक गोष्टी भिन्न भिन्न असतात. कधीकधी तेथे एक प्रकारची अत्यंत अव्यवस्था असते, सावळा गोंधळच असतो म्हणा ना, जेथे सर्व काही एकमेकांत मिसळून गेलेले असते, कधीकधी तोडक्यामोडक्या गोष्टीपण असतात, एकूणातच एक प्रकारचा गोंधळ असतो. तर कधी कधी, सर्व गोष्टी व्यवस्थित असतात, त्यांच्या त्यांच्या जागी ठेवलेल्या असतात, जणू काही कोणीतरी घर नीट आवरलेले असावे, घरातील गोष्टी स्वच्छ केलेल्या असाव्यात, व्यवस्थितपणे ठेवलेल्या असाव्यात. आणि गंमत म्हणजे, घर मात्र नेहमी तेच असते. घर ही तुमच्या आंतरिक अस्तित्वाची एक प्रकारची वस्तुनिष्ठ प्रतिमा आहे. आणि तेथे तुम्ही जे पाहता, तेथे जे काही करता, ते तुमच्या मानसिक कार्याचे प्रतीकात्मक रूप असते. मूर्त रूप येण्यासाठी ह्या गोष्टी उपयुक्त असतात. पण हे माणसामाणसांवर अवलंबून असते.

काही माणसं फक्त बुद्धिवादी असतात आणि त्यांच्या बाबतीत मग प्रत्येक गोष्ट ही संकल्पनांमध्ये व्यक्त होते, प्रतिमांमध्ये नाही. परंतु ते जर जडभौतिक प्रांतामध्ये अधिकाधिक खोलवर जात राहिले तर हा धोका असतो की, ते मूर्त वास्तवाला स्पर्श करू शकत नाहीत आणि केवळ संकल्पनांच्या प्रांतातच राहतात, मनाच्या प्रांतातच वावरतात आणि तेथेच अनंतकाळपर्यंत राहू शकतात. आणि जरी ती काहीशी अनिश्चित, अपरिमित अशी गोष्ट असली तरी त्यांना असे वाटू लागते की, ते प्रगती करत आहेत, मानसिकरित्या त्यांची प्रगती झाली आहे इ. इ. मन हे असे एक अतिविशाल, आणि अपरिमित असे क्षेत्र आहे की, जे सातत्याने नवीकृत (renewed) होत राहते. परंतु जर का एखाद्याला प्राणिक आणि शारीरिक अस्तित्वामध्ये प्रगती करावयाची इच्छा असेल तर, ज्याविषयी आपण आधी बोललो ते प्रतिमात्मक प्रतिनिधित्व कृती निश्चित करण्यासाठी, ती कृती अधिक सघन बनविण्यासाठी खूप उपयोगी ठरते.

अर्थातच ही गोष्ट काही पूर्णत: व्यक्तीच्या इच्छेबरहुकूम होत नाही, ती प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून असते. परंतु ज्या कोणाकडे प्रतिमांवर लक्ष केंद्रित करण्याची शक्ती असते त्यांना अजून एक सुविधा उपलब्ध असते.

ध्यानामध्ये, एका बंद दरवाजासमोर बसावयाचे. जणू काही ते पोलादी भरभक्कम दार असावे – आणि ते दार उघडावे आणि दाराच्या दुसऱ्या बाजूला जावे अशी इच्छा बाळगून त्या दारासमोर बसावयाचे. आणि संपूर्ण लक्ष, संपूर्ण अभीप्सा ही जणू काही एका घणामध्ये एकत्रित होते आणि त्याने दारावर घाव घातले जाताहेत, जाताहेत, आणि अधिकाधिक चढत्या वाढत्या शक्तीने व्यक्ती ते घाव घालत राहते.. जोपर्यंत ते दार एकदम उघडले जात नाही आणि व्यक्तीचा आत प्रवेश होत नाही तोपर्यंत हे चालू राहते. ह्याचा खूप जोरदार ठसा उमटतो.

जणू काही व्यक्ती प्रकाशामध्येच झेप घेते, ती व्यक्ती त्या प्रकाशाने पूर्ण उजळून निघते आणि तिला अचानक, एकाएकी जाणिवेमध्ये परिवर्तन झाल्याचा आनंद लाभतो; आपण कोणी निराळीच व्यक्ती बनलो असल्याचे तिला जाणवू लागते.

स्वत:च्या चैत्य अस्तित्वाशी संबंध प्रस्थापित करण्याचा हा एक अतिशय सघन आणि शक्तिशाली मार्ग आहे.

– श्रीमाताजी
(CWM 07 : 266-268)

(श्रीअरविंदांना त्यांच्या पूर्वजीवनाविषयी एका शिष्याने प्रश्न विचारला होता, त्याला उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रातील हा मजकूर.)

जर कोणाला लौकिकतेचा त्याग करून, फक्त पारलौकिकतेची निवड करावयाची असेल, आणि त्यात त्याला शांती लाभत असेल तर त्याने तसे खुशाल करावे. शांती लाभावी म्हणून, लौकिकतेचा त्याग करणे मला स्वत:ला आवश्यक वाटले नाही. माझ्या परिघामध्ये मी भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही विश्वांचा समावेश करावा आणि केवळ स्वत:च्या मुक्तीसाठी नव्हे तर, येथील दिव्य जीवनासाठी, दिव्य चेतना आणि दिव्य शक्ती लोकांच्या अंत:करणात व या पार्थिव जीवनात स्थापित करण्याचा प्रयत्न करावा, या दिशेने मी माझ्या योगाकडे वळलो असे मला आढळून आले.

हे ध्येय, इतर ध्येयांसारखेच एक आध्यात्मिक ध्येय आहे असे मला वाटते आणि या जीवनात लौकिक, पार्थिव गोष्टींचा मागोवा घेणे, त्यांचा जीवनात समावेश करणे यामुळे, आध्यात्मिकतेला काळिमा फासला जाईल किंवा त्याच्या भारतीयत्वाला काही बाधा येईल असे मला वाटत नाही. माझा तरी वास्तवाचा आणि या विश्वाचे, वस्तुंचे, ईश्वराचे स्वरूप, याविषयीचा हा अनुभव व दृष्टिकोन राहिलेला आहे. हे त्यांबाबतचे जवळजवळ संपूर्ण सत्य असल्यासारखे मला वाटते आणि म्हणूनच त्याचे अनुचरण करणे ह्याला मी पूर्णयोग म्हणतो.

अर्थातच, एखाद्याला पूर्णतेची ही संकल्पना मान्य नसेल आणि ती तो नाकारत असेल किंवा या लौकिक जीवनाचा संपूर्णतया परित्याग करून, पारलौकिक जीवनावर भर देणाऱ्या आध्यात्मिकतेवर तो विश्वास ठेवत असेल तर तसे करण्यास तो मोकळा आहे, पण तसे असेल तर माझा योग करणे त्याला अशक्य होईल.

माझ्या योगामध्ये, परमात्मलोकाचा, आपल्या भूलोकाचा आणि या दरम्यानच्या सर्व जगतांचा आणि त्यांच्या आपल्या जीवनावरील व भौतिक जगतावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा आणि त्यांच्या पूर्ण अनुभवांचा समावेश होतो.

पण हेही शक्य आहे की, आधी केवळ परमपुरुषाच्या साक्षात्कारावर भर द्यायचा किंवा त्याच्या एखाद्या अंगावर भर द्यायचा, जसे की, आपला आणि आपल्या कर्मांचा स्वामी असलेल्या विश्वाधिपती कृष्ण, शिव यांच्या साक्षात्कारावर भर द्यायचा आणि या योगासाठी आवश्यक असे परिणाम साध्य करून घ्यावयाचे आणि नंतर (दिव्य जीवनाकडे वाटचाल आणि आत्म्याचा भौतिक जीवनावर विजय हे ध्येय जर एखाद्याने स्वीकारलेले असेल तर) त्याच्या पूर्ण परिणामांकडे वळणे शक्य आहे. वस्तुविषयक हा अनुभव, अस्तित्वविषयक हे सत्य आणि हा दृष्टिकोन यामुळेच ‘दिव्य जीवन’ आणि ‘सावित्री’ लिहिणे मला शक्य झाले.

ईश्वराचा, पुरुषोत्तमाचा साक्षात्कार ही निश्चितच आवश्यक गोष्ट आहे. पण प्रेम, श्रद्धा, भक्ती यांतून त्या ईश्वराकडे वळणे, स्वत:च्या कर्मांच्या द्वारे त्याची सेवा करणे आणि केवळ बौद्धिक जाणिवेने नव्हे तर, आध्यात्मिक अनुभूतीच्या माध्यमातून त्याला जाणणे ह्यादेखील पूर्णयोगाच्या मार्गावरील आवश्यक गोष्टी आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 35 : 234-235)