Tag Archive for: तत्त्वज्ञान

मी अनेकदा लोकांना असे बोलताना ऐकले आहे की, ”काय हे? मी आता चांगले वागायचा प्रयत्न करतो आहे आणि प्रत्येकजण माझ्याशी वाईटच वागतोय.” पण हे घडते ते तुम्हालाच शिकविण्यासाठी की, व्यक्तीने काहीतरी हेतू बाळगून चांगले असता कामा नये, म्हणजे इतर लोक तुमच्याशी चांगले वागावेत म्हणून तुम्ही चांगले वागायचे, असे नाही तर, व्यक्तीने चांगले असण्यासाठीच चांगले असावयास हवे.

नेहमीसाठी तोच धडा आहे : जितकं काही चांगले, जितके उत्तम करता येईल तेवढे करावे, परंतु फळाची अपेक्षा बाळगू नये, परिणाम दिसावेत म्हणून काही करू नये. अगदी ह्या दृष्टिकोनामुळेच, म्हणजे चांगल्या कृतीसाठी, सत्कार्यासाठी काहीतरी बक्षिसाची अपेक्षा बाळगायची, जीवन सुखकर बनेल असे वाटते म्हणून चांगले वागायचे, ह्या अशा गोष्टींमुळेच सत्कार्याची किंमत नाहीशी होऊन जाते. चांगुलपणाच्या प्रेमापोटी तुम्ही चांगले असला पाहिजेत, तुम्ही न्यायाच्या प्रेमापोटी न्यायी असला पाहिजेत; तुम्ही पावित्र्याच्या, शुद्धतेच्या प्रेमापोटीच पवित्र व शुद्ध असावयास हवे आणि निरपेक्षतेच्या प्रेमापोटीच निरपेक्ष असावयास हवे, तरच तुम्ही मार्गावर प्रगत होण्याची खात्री बाळगू शकता.

(CWM 03 : 264-265)

रुपांतरणाचा हा योग करणे हे सर्व गोष्टींमध्ये सर्वाधिक खडतर आहे. जर का व्यक्तीला असे वाटत असेल की, मी या पृथ्वीवर केवळ त्याचसाठी आलो आहे, मला दुसरेतिसरे काहीही करावयाचे नाही, फक्त तेच करावयाचे आहे आणि तेच माझ्या अस्तित्वाचे एकमेव कारण आहे; मग कितीही रक्ताचे पाणी करावे लागले, कितीही दुःखे सहन करावी लागली, संघर्ष करावा लागला, तरी ते तितकेसे महत्त्वाचे नाही, ”मला तेच हवे आहे, दुसरेतिसरे काहीही नको”, अशी स्थिती असेल तर मात्र गोष्ट निराळी ! अन्यथा मी म्हणेन, ”सुखी असा, चांगले वागा, तुमच्याकडून तेवढीच अपेक्षा आहे. चांगले वागा म्हणजे समजूतदार असा, तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये जगत आहात, ती अपवादात्मक अशी परिस्थिती आहे, हे जाणून असा आणि सामान्य जीवनापेक्षा अधिक उच्च, अधिक उदात्त, अधिक सत्य जीवन जगायचा प्रयत्न करा. म्हणजे मग या चेतनेचा काही अंश, त्याचा प्रकाश, त्याचा चांगुलपणा या जगामध्ये अभिव्यक्त करण्यासाठी तुम्ही संमती देऊ शकाल आणि ते खूप चांगले असेल.”

(CWM 07 : 200)

तोंडात असलेल्या गोड पदार्थापेक्षा एखाद्या सत्कृत्याची गोडी ही हृदयाला अधिक गोड वाटते. सत्कृत्याविना एखादा दिवस घालविणे म्हणजे आत्म्याविना एक दिवस घालविण्यासारखे आहे.

(CWM 15 : 225)

व्यक्तीने अंत:करणामध्ये नेहमी सद्भाव व प्रेम बाळगले पाहिजे आणि तिने समचित्ततेने, समतेने सर्वांवर त्याची पखरण केली पाहिजे.

(CWM 14 : 186)

स्वच्छ दृष्टी व सर्वसमावेशकता असणारी, कोणत्याही वैयक्तिक प्रतिक्रियांपासून मुक्त असणारी, अथक अशी परोपकारिता, हा ईश्वरावर प्रेम करण्याचा व या भूतलावर त्याची सेवा करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

(CWM 14 : 187)

कोणत्याही प्रकारे भीतीचा लवलेश नसणे म्हणजे धैर्य.

(CWM 10 : 282)

भीती ही एक अशुद्धता आहे. पृथ्वीवरील दिव्य कृती उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या अ-दिव्य शक्तींपासून अगदी थेटपणे येणाऱ्या अशुद्धतांपैकी ही सर्वात मोठी अशुद्धता आहे. आणि जे खरोखर योगसाधना करू इच्छितात त्यांचे पहिले कर्तव्य हे असले पाहिजे की, त्यांनी त्यांच्या चेतनेमधून, सर्वशक्तिनिशी, संपूर्ण प्रामाणिकतेने, त्यांच्यापाशी आहे नाही तेवढे सगळे धैर्य एकवटून, भीतीचे, किंबहुना भीतीच्या छायेचे देखील निर्मूलन केले पाहिजे. या मार्गावर वाटचाल करायची तर व्यक्तीने निर्भय असले पाहिजे आणि तिने क्षुद्र, क्षुल्लक, चंचल, ओंगळ अशा भीतीमध्ये स्वत:चे अंग चोरून घेता कामा नये.

एक दुर्दम्य धैर्य, अगदी परिपूर्ण अशी प्रामाणिकता, प्रांजळ आत्मदान म्हणजे, ज्यामध्ये व्यक्ती कोणतेही आडाखे बांधत नाही, गणिते करत बसत नाही, किंवा घासाघीसही करत नाही, काहीतरी परत मिळेल या अपेक्षेने काही देऊ करत नाही. विश्वास ठेवते तेदेखील स्वत:ला संरक्षण मिळावे म्हणून नव्हे ! तसेच ही श्रद्धा अशीही नसते की, जी पुरावे मागत बसेल ! ही गोष्ट या मार्गावरील वाटचालीसाठी अत्यावश्यक आहे आणि केवळ ही गोष्टच तुमचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून खऱ्या अर्थाने संरक्षण करते.

(CWM 08 : 260-261)

समग्र धैर्य : क्षेत्र कोणतेही असू दे, धोका कोणताही असू दे, दृष्टिकोन एकच असला पाहिजे – शांत आणि खात्रीचा !

(CWM 14 : 169)

जशी मेणबत्तीची ज्योत इतर अनेक ज्योती प्रज्वलित करू शकते त्याप्रमाणे, ज्या व्यक्तीकडे धैर्य आहे तीच व्यक्ती इतरांना धीर देऊ शकते.

(CWM 14 : 170)

मला आठवते की, आपण एकदा परिपूर्णतेच्या अनेक अंगांपैकी एक अंग या दृष्टीने धैर्याचा विचार केला होता. पण येथे धैर्याचा अर्थ, ‘परमोच्च साहसाची चव चाखणे’ असा आहे. आणि या परमोच्च साहसाची चव तुमचा पूर्णपणे ताबा घेते आणि कोणतेही मोजमाप न करता, काहीही हातचे राखून न ठेवता, आणि परतीचे सारे दोर कापलेले असावेत अशा प्रकारे, तुम्हाला ईश्वरी शोधाच्या परम साहसामध्ये झेप घेण्यास प्रवृत्त करते; ईश्वराच्या भेटीच्या महान साहसासाठी, किंबहुना त्याहूनही अधिक महान अशा, ईश्वरी साक्षात्काराच्या साहसासाठी प्रवृत्त करते. मागचा पुढचा विचार न करता, किंवा ‘पुढे काय होणार आहे?’ ह्याचा क्षणभरही विचार न करता, तुम्ही स्वत:ला त्या साहसामध्ये झोकून देता. कारण पुढे काय होणार आहे, असा जर तुम्ही विचार करत बसलात तर, तुम्ही कधीच प्रारंभ करू शकणार नाही, तुम्ही तिथेच कायमस्वरूपी खिळून राहाल, त्याच जागी चिकटून राहाल, काहीतरी गमावण्याच्या, तुमचा तोल जाण्याच्या भीतीने तिथेच खिळून राहाल.

(CWM 08 : 40-41)

कदाचित प्रगती मंदही असेल, कदाचित वारंवार परागतीही होत असेल, परंतु जर का धीरयुक्त इच्छा कायम राखली तर, व्यक्ती एक ना दिवस विजयी होईल, सत्य-चेतनेच्या प्रभेपुढे तिच्या अडीअडचणी विरघळून नाहीशा झालेल्या असतील हे निश्चित.

(CWM 12 : 07)

स्वत:चे दोष जाणण्यामध्ये उदात्त धैर्य असते.

(CWM 14 : 170)

पृथ्वीवरील जीवनाचे प्रयोजनच प्रगती हे आहे. जर तुम्ही प्रगत होत राहणे थांबविलेत तर तुम्ही मरून जाल. प्रगत न होता जो कोणता क्षण तुम्ही व्यतीत करता, तो तुम्हाला स्मशानाच्या एक पाऊल जवळ घेऊन जाणारा असतो.

*

ज्या क्षणी तुम्ही समाधानी होता आणि अभीप्सा बाळगेनाशी होता, तत्क्षणी तुम्ही मरु लागता. जीवन ही एक वाटचाल आहे, जीवन हा एक प्रयास आहे आहे; जीवन म्हणजे पुढे चालत राहणे आहे, भावी प्रकटीकरण आणि साक्षात्काराप्रत उन्नत होणे आहे.

विश्रांती घेण्याची इच्छा बाळगणे याइतकी दुसरी कोणतीच भयानक गोष्ट नाही.

*

शिकायला हवे आणि प्रगती करायला हवी असे नेहमीच काहीतरी व्यक्तीकडे असते. आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये ज्यामधून काही धडा घेता येईल असे आणि ज्याद्वारे प्रगती करता येईल असे प्रसंग आपण शोधू शकतो.

*

मार्गावर प्रगत होण्यासाठी म्हणून, व्यक्ती स्वत: जशी आहे आणि जे काही तिच्याकडे आहे ते सारे त्यागण्यासाठी, व्यक्तीने प्रत्येक क्षणी सिद्ध असणे म्हणजे प्रगती होय.

*

ईश्वराच्या नेहमी अधिकाधिक समीप जाणे म्हणजे खरी प्रगती.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 75 & 77)

माझे प्रेम सततच तुझ्या बरोबर आहे. पण जर तुला ते जाणवत नसेल तर त्याचे कारण हेच की, तू ते स्वीकारण्यास सक्षम नाहीस. तुझी ग्रहणशीलता उणी पडत आहे, ती वाढविली पाहिजे. आणि त्यासाठी तुला स्वत:ला खुले केले पाहिजे आणि व्यक्ती स्वत:ला तेव्हाच खुली करू शकते, जेव्हा ती स्वत:चे आत्मदान करते.

तू नक्कीच कळत वा नकळतपणे, शक्ती आणि ईश्वरी प्रेम तुझ्याकडे खेचू पाहत आहेस. ही पद्धत चुकीची आहे. कोणतेही आडाखे न बांधता, कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न बाळगता, स्वत:चे आत्मदान कर म्हणजे मग तू ग्रहणक्षम होऊ शकशील.

(CWM 14 : 148)

प्रश्न : ग्रहणशीलता कशावर अवलंबून असते?

श्रीमाताजी : ती मूलत: प्रामाणिकपणावर अवलंबून असते. खरोखरच व्यक्तीला ईश्वरी शक्ती ग्रहण करण्याची इच्छा आहे का ह्यावर ती अवलंबून असते. मला असे वाटते की, ह्यासाठी प्रामाणिकपणा आणि विनम्रता हे मुख्य घटक आहेत.

आत्मप्रौढीइतकी दुसरी कोणतीच गोष्ट तुम्हाला एव्हढी बंधनात अडकवत नाही. जेव्हा तुम्ही स्व-संतुष्ट असता, तेव्हा तुमच्यामध्ये अशा प्रकारची एक आढ्यता असते की, जी तुमच्यामध्ये काही कमतरता आहे हे मान्य करण्यास तयारच नसते, तुमच्याकडून काही चुका झाल्या आहेत, तुम्ही अपूर्ण आहात, तुम्ही परिपूर्ण नाही. …अशा कोणत्याही गोष्टी मान्य करण्यास ती तयार नसते. तुमच्या स्वभावामध्ये, प्रकृतीमध्ये असे काहीतरी असते की, जे अशाप्रकारे आडमुठे बनते, त्याला हे मान्यच करावयाचे नसते – आणि तीच गोष्ट तुमच्या ग्रहणशीलतेमध्ये बाधा उत्पन्न करते. वास्तविक, तुम्हीच हा प्रयत्न करून पाहा, अनुभव घ्या.

जर इच्छाशक्तीच्या प्रयत्नाद्वारे, तुमच्या अस्तित्वाच्या अगदी अंशभागाद्वारे जरी तुम्ही हे मान्य करू शकलात की, “अं, हो, मी चुकलो खरा, मी असे करायला नको होते आणि मी असे वागायला नको होते, मला असे वाटायला नको होते, हो, ती चूकच आहे.”

जर का तुम्ही ते मान्य करू शकलात, तर सुरुवाती सुरुवातीला, तुम्हाला वाईट वाटते पण जेव्हा तुम्ही त्यावर ठाम राहता, तेव्हा अगदी ताबडतोब तुमच्यातील आजवर बंदिस्त असलेला तो भाग खुला होतो. तो खुला होतो आणि अगदी विलक्षण रीतीने प्रकाशाचा ओघच जणू आत प्रवेश करतो आणि मग नंतर मात्र तुम्हाला खूप आनंदी वाटते. इतके आनंदी वाटते की, तुम्ही स्वत:लाच प्रश्न करू लागता, ‘हा ओघ थोपविण्याचा वेडेपणा मी इतका काळ का केला होता?”

– श्रीमाताजी
(CWM 06 : 117)

ग्रहणशीलता म्हणजे ईश्वरी शक्तीचा स्वीकार करण्याची आणि तिचे अस्तित्व अनुभवण्याची शक्ती होय. त्यामध्ये श्रीमाताजींची उपस्थिती अनुभवणे हेही अनुस्यूत आहे. व्यक्तीने स्वत:च्या दृष्टीला, इच्छेला आणि कृतीला मार्गदर्शन करण्याचे कार्य श्रीमाताजींना करू देणे म्हणजे ग्रहणशीलता होय.

(CWSA 29:266)

मर्त्य अर्धजागृत अस्तित्वाला कवेत घेणाऱ्या आणि मर्त्य अस्तित्वाच्या आधीपासूनच वर व मागेही अस्तित्वात असणाऱ्या अशा महान दिव्य चेतनेला, स्वत:च्या सर्व अंगांनिशी आणि सर्व स्तरांवर, कोणतीही मर्यादा येऊ न देता, स्वीकारता येणे शक्य व्हावे म्हणून, प्रकृतीने स्वत:ला व्यापकतेने खुले करणे म्हणजे उन्मुखता (opening) होय.

(CWSA 12 : 169)

– श्रीअरविंद

मानवामध्ये उपजतच आध्यात्मिक आस असते; कारण पशुंमध्ये नसणारी अपूर्णतेची आणि मर्यादांची जाणीव त्याच्यामध्ये असते आणि तो आज जे काही आहे त्याच्या पलीकडे प्राप्त करण्याजोगे काहीतरी आहे, हे ही त्याला जाणवत असते. स्वत:च्या पलीकडे जाण्याची ही उर्मी मानववंशामधून पूर्णपणे कधीही नाहीशी होत नाही.

जडामधून, विकसित अशा विचारी मनाचा उदय होण्याची आजवर झालेली वाटचाल ही आत्मभान असणाऱ्या अभीप्सेमुळे, हेतुपूर्वक, संकल्पपूर्वक किंवा जिवंत व्यक्तीच्या धडपडीतून घडून आलेली नसून, ती अर्धजागृतपणे किंवा नकळतपणे, प्रकृतीच्या यांत्रिक कार्याचा भाग म्हणून घडून आली आहे.

हे असे घडले कारण, अचेतनेपासून उत्क्रांतीला सुरुवात झाली आणि त्या अचेतनेपासून गुप्त चेतना अजूनपर्यंत पुरेशी उदयास आली नव्हती. जिवंत प्राणिमात्राची आत्म-जागृत वैयक्तिक इच्छेचा सहभाग होऊन, त्या माध्यमातून काही कार्य घडून यावे इतपत ती उदयास आली नव्हती. परंतु मानवामध्ये मात्र आवश्यक तो बदल घडून आलेला आहे – मानव जागृत झाला आहे आणि त्याला स्वत:विषयीची जाणीव निर्माण झालेली आहे. ज्यायोगे इच्छाशक्ती विकसित होईल, ज्ञान वृद्धिंगत होईल व आंतरिक अस्तित्व अधिक सखोल होईल, बाह्य अस्तित्व अधिक व्यापक होईल, प्रकृतीच्या क्षमता वाढीस लागतील अशा प्रकारच्या शक्ती मनामध्ये आविष्कृत करण्यात आल्या आहेत.

आपल्यापेक्षा अधिक उच्च अशी जाणिवेची एक अवस्था आहे हे मानवाला दिसले आहे. त्याच्या मनामध्ये, त्याच्या प्राणामध्ये उत्क्रांतीची प्रेरणा वसलेली आहे, स्वत:ला ओलांडून पलीकडे जाण्याची आस त्याच्यामध्ये वसली आहे. त्याला त्याच्या आत्म्याची जाणीव झाली आहे, त्याला स्व आणि चेतनेचा शोध लागला आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 21 : 875-76)

*

जर तुम्ही जागरूक अभीप्सेच्या स्थितीमध्ये असाल आणि अगदी प्रामाणिक असाल तर, तुमच्या सभोवताली असणाऱ्या साऱ्या गोष्टी या तुमच्या अभीप्सेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे साहाय्यक होतील, अशा रीतीनेच रचल्या जातील. एकतर त्या तुमची प्रगती व्हावी म्हणून, एखाद्या नवीनच गोष्टीशी तुमचा संपर्क साधून देतील किंवा जी गोष्ट नाहीशी होणे गरजेचे होते अशी तुमच्या प्रकृतीमधील एखादी गोष्ट काढून टाकतील. ही काहीतरी लक्षणीय गोष्ट आहे.

जर तुम्ही खरोखर अभीप्सेच्या उत्कट स्थितीमध्ये असाल, तर अशी कोणतीच परिस्थिती नसते की, जी तुमची अभीप्सा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी मदत करत नाही. प्रत्येक गोष्ट, अगदी प्रत्येक गोष्ट जणु काही एका अतिशय परिपूर्ण व निपुण चेतनेने तुमच्याभोवती गुंफली जाते. आणि तुमच्या बहिर्वर्ती चेतनेला कदाचित ते जाणवणारही नाही आणि परिस्थिती जे रूप धारण करून तुमच्या समोर उभी ठाकते ती पाहून, तुम्ही कदाचित तिला विरोध करता, तक्रार करता, ती बदलविण्याचा प्रयत्न करता; परंतु काही काळाने, जेव्हा तुम्ही काहीसे अधिक प्रगल्भ होता आणि तुम्ही व ती घटना यांमध्ये काहीसे अंतर निर्माण होते, तेव्हा तुम्हाला कळून चुकते की, तुम्हाला आवश्यक असणारी प्रगती घडविण्यासाठी ती परिस्थिती अगदी तशीच असणे भाग होते.

तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की, एक संकल्प, परम सद्भाव हाच तुमच्या सभोवार साऱ्या गोष्टींची रचना करत आहे आणि तुम्ही अगदी कितीही तक्रार केलीत, ती स्वीकारण्याऐवजी त्याचा विरोध करत राहिलात तरीही, अगदी त्याच घडीला तो सद्भाव सर्वाधिक परिणामकारक रीतीने कार्य करत असतो.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 176)

श्रद्धेच्या जोडीला एक प्रकारचे स्पंदनही असावयास हवे. एक अशी कृतज्ञतेची भावना हवी की, ईश्वर अस्तित्वात आहे. ईश्वर अस्तित्वात आहे, ही एक प्रकारची अद्भुत कृतज्ञतेची भावना तुम्हाला एक प्रकारच्या उत्कट आनंदाने भरून टाकते. ह्या विश्वामध्ये दिसणारा भयानकपणाच फक्त अस्तित्वात आहे असे नाही तर, या विश्वामध्ये ईश्वर म्हणूनही काहीतरी अस्तित्वात आहे, हो, तेथे ईश्वर आहे, ईश्वरी अस्तित्व आहे. जेव्हा कधी, अगदी एखादी छोटीशीही गोष्ट, प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे तुमचा ईश्वरीय अस्तित्वाच्या त्या उदात्त वास्तवाशी संपर्क घडविते तेव्हा तेव्हा, त्या प्रत्येक वेळी, तुमचे हृदय अगदी उत्कट, अगदी अद्भुत आनंदाने, कृतज्ञतेने भरून जाते. बाकी सर्व गोष्टींच्या तुलनेत अशी कृतज्ञता म्हणजे सर्वाधिक आनंददायी गोष्ट असते.

दुसरी कोणतीच गोष्ट तुम्हाला कृतज्ञतेइतका आनंद देऊ शकत नाही. व्यक्ती एखाद्या पक्षाचे गाणे ऐकते, एखादे सुंदरसे फूल पाहते, एखाद्या लहानग्या बालकाकडे पाहते, उदारतेची एखादी कृती पाहते, एखादे चांगलेसे वाक्य वाचते, मावळत्या सूर्याकडे पाहते, असे काहीही असू शकते, अवचितपणे ते तुमच्या समोर येते आणि मग, हे विश्व ईश्वराची अभिव्यक्ती करत आहे, या विश्वापाठीमागे असे काहीतरी आहे, की जे ईश्वरी आहे ह्यासारखी उत्कट, गाढ, तीव्र अशी भावना मनात दाटून येते.

तेव्हा कृतज्ञतेविना भक्ती ही अपूर्ण आहे; भक्तीसोबत कृतज्ञताही असावयास हवी.

(CWM 08 : 40)

खऱ्याखुऱ्या धार्मिक भावनेने चर्चमध्ये किंवा देवळामध्ये जाणाऱ्या माणसांचे प्रमाण अगदीच कमी असते. म्हणजे असे की, देवाकडून काहीतरी मागण्यासाठी, काहीतरी याचना करण्यासाठी नाही तर, स्वत:ला समर्पित करण्यासाठी, त्याचे आभार मानण्यासाठी, त्याच्याविषयी अभीप्सा बाळगून, आत्मदान करण्यासाठी जाणारी माणसं अगदीच अल्प असतात. असे करणारी व्यक्ती लाखामध्ये अगदी एखादीच असते.

(CWM 06 : 194-195)

परमेश्वराची ही अद्भुत कृपा होय की, तो प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या ईश्वरी ध्येयाप्रत अगदी सर्वात जवळच्या मार्गाने घेऊन जात असतो. ती व्यक्ती कशी का असेना, तिच्यामध्ये कितीही अज्ञान, कितीही गैरसमजुती का असेनात, अहंकार, विरोधाची, बंडाची भावना का असेना तरीही, परमेश्वर त्या व्यक्तीला ईश्वरी ध्येयाप्रत घेऊन जात असतो, ही गोष्ट कधीही विसरता कामा नये, ह्या गोष्टीविषयी नेहमीच कृतज्ञ असले पाहिजे.

कृतज्ञतेची विशुद्ध ज्योती तुमच्या हृदयामध्ये कायम तेवत असली पाहिजे. ती अशी उबदार, मधुर, तेजस्वी, ज्योत असेल की, जिच्यामध्ये सर्व अहंकाराचा, सर्व अंधकाराचा विलय होऊन जाईल. साधकाला त्याच्या ध्येयाप्रत घेऊन जाणाऱ्या ईश्वरी कृपेविषयीच्या कृतज्ञतेची ज्योत तुमच्या हृदयामध्ये तेवत असली पाहिजे आणि व्यक्ती जितकी अधिक कृतज्ञ असेल, ही ईश्वरी कृपेची कृती व्यक्तीला जितकी अधिक उमगेल आणि त्याविषयी ती व्यक्ती जेवढी अधिक कृतज्ञता बाळगेल, तेवढा तो मार्ग अधिकच जवळचा असेल.

(Bulletine 1964-08 : 100)

विनम्रतेची आवश्यकता ही एक अशी गोष्ट आहे की जिच्याविषयी नेहमी बोलले जाते पण तिचा अर्थ समजण्यात नेहमीच चूक होते. ती चुकीच्या पद्धतीने घेतली जाते, तिचा अर्थ चुकीचा घेतला जातो आणि तिचा वापरही चुकीचा केला जातो. जर तुम्हाला शक्य असेल तर योग्य रीतीने विनम्र व्हा, परंतु चुकीच्या रीतीने विनम्र होण्यात काही अर्थ नाही, कारण त्यातून तुम्हाला काहीच साध्य होणार नाही. परंतु एक गोष्ट मात्र आहे, जर तुम्ही तुमच्या मधून घमेंड नावाचे तण उपटून फेकून देऊ शकाल तर, खरोखरच तुम्ही काहीतरी साध्य केल्यासारखे होईल. परंतु तुम्हाला माहीत आहे का, की ही गोष्ट किती कठीण आहे ते? तुमच्या लक्षात येईल की, एक प्रकारच्या आत्मप्रौढीयुक्त आत्म-समाधानाने फुलून गेलेले असल्याशिवाय तुम्ही कोणतीच गोष्ट नीट करू शकत नाही, तुम्हाला चांगले काही सुचत नाही, तुम्ही योग्य अशी कृती करत नाही किंवा त्या समाधानाने आतून फुललेले नसाल (भले तुम्हाला त्याची जाणीवही नसेल) तर तुम्ही किंचितही प्रगती करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला घणाचे घाव घालूनच, आत्मप्रौढी मोडून काढावी लागते. तरीदेखील काही अवशेष शिल्लक राहतातच आणि मग त्यांना मोड यायला सुरुवात होते.

व्यक्तीने त्यावर आयुष्यभर काम करत राहिले पाहिजे आणि या पुन्हा पुन्हा डोके वर काढणाऱ्या तणाला मुळापासून उपटून काढण्यासाठी काम करत राहणे कधीही विसरता कामा नये. कारण ते तण इतक्या बेमालूमपणे तुमच्यामध्ये असते की, तुम्हाला असे वाटते की, ती घमेंड, आत्मप्रौढी तुमच्यामधून निघून गेली आहे आणि तुम्ही स्वत:ला अगदी विनम्र, विनयशील समजत असता आणि म्हणता, “हे मी केलेले नाही, मला जाणवते आहे की, हे ईश्वरी आहे, जर तो ईश्वर नसेल तर मी कोणीच नाही.” आणि लगेचच पुढच्या क्षणी हा असा विचार केल्याबद्दल तुम्ही स्वत:वरच खूप खुष होऊन जाता.

*

प्रश्न : जेव्हा आम्ही एखादा प्रयत्न करतो, तेव्हा आमच्यामध्ये असे काहीतरी असते की, ते लगेचच स्वत:वर खूष होऊन जाते, बढाया मारु लागते आणि त्या तेवढ्या प्रयत्नांनीच संतुष्ट होऊन जाते आणि त्यातूनच सारे काही बिघडून जाते. तेव्हा यापासून सोडवणूक कशी करून घ्यायची?

श्रीमाताजी : आपण जेव्हा काहीतरी करत असतो तेव्हा आपल्यातीलच कोणीतरी त्यावर सदोदित लक्ष ठेवत असते, निरीक्षण करत असते. आणि मग कधीकधी तो गर्विष्ठ होतो. मग साहजिकच आपल्या प्रयत्नांमधील बरेचसे सामर्थ्य तो काढून घेतो. ही एक अशी सवय आहे की, काम करत असताना, जीवन जगत असताना व्यक्ती स्वत:कडे पाहत असते.

स्वत:चे निरीक्षण करणे आवश्यकच आहे; परंतु मला वाटते, पूर्णपणे प्रामाणिक असण्याचा, सहजस्वाभाविक असण्याचा प्रयत्न करणे हे त्यापेक्षाही अधिक आवश्यक आहे. व्यक्ती जे काही करत असते त्याबाबत ती अगदी स्वाभाविक असली पाहिजे म्हणजे व्यक्तीने सततच स्वत:चे निरीक्षण करणे, स्वत:ला जोखत राहणे, स्वत:चे मूल्यमापन करणे, कधीकधी तर खूपच कठोरपणे मूल्यमापन करणे, असे करू नये. खरेतर, समाधानाने स्वत:चीच पाठ थोपटून घेणे जितके वाईट तितकीच ही गोष्टही वाईट आहे; ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच घातक आहेत. व्यक्ती अभीप्सेबाबत (aspiration) इतकी प्रामाणिक असली पाहिजे की, तिला आपण अभीप्सा बाळगत आहोत हेदेखील कळता कामा नये, इतकी ती स्वत:च अभीप्सा बनून राहिली पाहिजे. जेव्हा हे खरोखर प्रत्यक्षात उतरेल तेव्हा व्यक्तीने खऱ्या अर्थाने काही असामान्य शक्ती प्राप्त केलेली असेल.

जेव्हा व्यक्ती ही स्व-केंद्रित राहत नाही, काम करत असताना स्वत:कडे पाहणारा अहंकार राहत नाही, तर व्यक्ती स्वत: ती कृतीच बनून जाते, त्याही पलीकडे जात ती स्वत:च एक आस बनून जाते तेव्हा ते खरोखर चांगले असते. म्हणजे जेव्हा आस बाळगणारी व्यक्ती शिल्लक राहत नाही, तर जेव्हा ती व्यक्ती म्हणजे स्वयमेव आसच बनून राहते आणि ती पूर्ण एकाग्र आवेगाने झेपावते तेव्हा अशी व्यक्ती खरोखर खूप प्रगत होऊ शकते.

अन्यथा, नेहमीच त्यामध्ये एक प्रकारची क्षुद्र आत्मप्रौढी, एक प्रकारची क्षुद्र स्व-संतुष्टता, आणि एक प्रकारची स्वत:बद्दलची कीव अशा सर्व प्रकारच्या गोष्टी आत शिरकाव करतात आणि सारे काही बिघडवून टाकतात. कठीण असते ते सारे !

*

प्रश्न : विनम्र असण्याची योग्य रीत आणि अयोग्य रीत कोणती?

श्रीमाताजी : ते ओळखणे अगदीच सोपे आहे. जेव्हा माणसांना सांगितले जाते की, ‘विनम्र व्हा’ तेव्हा ती ताबडतोब, ‘दुसऱ्या व्यक्तींसमोर विनम्र व्हायचे’ असा विचार करतात आणि इथेच विनम्रता चुकीची असते. खरी विनम्रता म्हणजे ईश्वरासमोर असणारी विनम्रता ! ही एक अगदी नेमकी अशी, अचूक, एक जिवंत अशी संवेदना असते की, आपण कोणीच नाही, आपण त्या ईश्वराशिवाय काहीच करू शकत नाही, आपल्याला त्या ईश्वराविना काहीच समजू शकत नाही. म्हणजे अगदी एखादा असामान्यपणे बुद्धिमान किंवा सक्षम असला तरीही, दिव्य चेतनेच्या तुलनेत ते काहीच नसते आणि ही जाण व्यक्तीने कायम बाळगली पाहिजे, कारण त्यामुळेच व्यक्ती खऱ्या अर्थाने ग्रहणशील होऊ शकते – ही अशी विनम्रता ईश्वरासमोर कोणताही आव आणत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 44-45), (CWM 06 : 402), (CWM 05 : 44-45)

पहिली गोष्ट म्हणजे स्वत:ला न फसविणे. आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे आपल्याला कळते. अत्यंत हुशार असा असुर सुद्धा ईश्वराला फसवू शकत नाही. पण सारे समजत असूनदेखील, आपण पाहतो की, जीवनात बरेचदा – दिवसाच्या धावपळीत आपण स्वत:लाच फसविण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्याला त्याची जाणीवसुद्धा नसते, अगदी सहजपणे, अगदी आपोआप आपण अशी फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असतो. व्यक्ती नेहमीच स्वत:च्या कृतींचे समर्पक समर्थन करते, स्वत:च्या शब्दांबद्दल व कृतींबद्दल समर्थन देते.

पहिल्यांदा नेहमी हेच घडते. भांडणांसारख्या गोष्टींविषयी मी येथे बोलत नाहीये; मी दैनंदिन जीवनातील बारकाव्याच्या गोष्टी सांगत आहे. नेहमी चुकतो तो दुसराच व चूक दुसऱ्यानेच केलेली असते, असे प्रत्येक जण समजत असतो. अगदी बाल्यावस्था पार केल्यावर जराशी समज आल्यावर देखील तुम्ही स्वत:चे समर्थन करताना अगदी मूर्खपणाच करता आणि म्हणता, “त्याने जर तसे केले नसते तर, मी पण असा वागलो नसतो.” पण वास्तविक, हे बरोबर याच्या उलट असायला पाहिजे. समजा तुमच्या बरोबर कोणी आहे, आणि जर तुम्ही प्रामाणिक असाल तर, तुमची अगदी स्वाभाविक प्रतिक्रिया जे योग्य आहे तेच करण्याची हवी, भले मग ती सोबत असणारी व्यक्ती, तसे करो वा न करो. ह्याला मी ‘प्रामाणिक असणे’ म्हणते.

एक अगदी साधेसे उदाहरण घेऊ या. समजा एखाद्याला तुमचा राग आला तर, उलटून परत त्याला दुखावणाऱ्या, बोचणाऱ्या गोष्टी न बोलता, तुम्ही काहीच न बोलता, शांत राहिलात, तर, तुम्हाला त्याच्या रागाचा संसर्ग होत नाही. आणि तुम्ही स्वत:चेच निरीक्षण करून पाहिलेत तर, तुमच्या लक्षात येईल की, असे करणे किती अवघड आहे.

ही बाब तशी अगदी प्राथमिक स्वरूपाची आहे, आपण प्रामाणिक आहोत किंवा नाही हे जाणण्यासाठीची ही एक छोटीशी सुरुवात आहे. आणि ज्या कोणाला प्रत्येक गोष्टीचा लगेचच संसर्ग होतो, जे अगदी हलक्या प्रतीचे विनोद करतात किंवा इतरांसारखाच मूर्खपणा करतात त्यांच्या विषयी तर मी बोलतच नाहीये.

तुम्ही तुमची वृत्ती भले कितीही प्रामाणिक राखण्याचा प्रयत्न करत असाल तरीसुद्धा जर तुम्ही तीक्ष्णपणे स्वत:चे निरिक्षण कराल तर, तुम्हाला शेकडो वेळा तरी स्वत:मधील अप्रामाणिकपणा आढळून येईल. प्रामाणिकपणा हा किती कठीण असतो हे तेव्हा तुमच्या लक्षात येईल.

*

जेव्हा प्रामाणिकपणा असतो तेव्हा तुम्हाला असे आढळेल की, तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी साहाय्य, मार्गदर्शन आणि ईश्वरी कृपा नेहमीच तेथे असते आणि मग पुढे फार काळ तुमच्याकडून चुका घडत नाहीत.

*

पूर्णपणे प्रामाणिक राहावयाचे झाले तर, पसंती-नापसंती, वासना, आकर्षण-प्रतिकर्षण, सहानुभूती किंवा द्वेषभावना, आसक्ती वा तिटकारा नसणे ही अनिवार्यपणे आवश्यक अशी गोष्ट आहे. व्यक्तीने वस्तूंविषयी समग्र दृष्टिकोन बाळगला पाहिजे, त्या दृष्टिकोनामध्ये प्रत्येक गोष्ट आपापल्या योग्य स्थानी असते आणि सर्व गोष्टींकडे पाहण्याचा व्यक्तीचा दृष्टिकोन समानच म्हणजे, सत्यदर्शनाचा दृष्टिकोन असतो.

*

आधी साध्य झालेल्या उच्चतम चेतनेच्या आणि साक्षात्काराच्या पातळीपर्यंत, अस्तित्वाच्या सर्व हालचाली उन्नत करत नेणे म्हणजे प्रामाणिकता ! प्रामाणिकपणा हा केंद्रीय दिव्य संकल्पाच्या सभोवार संपूर्ण अस्तित्वाचे, त्याच्या अंगप्रत्यंगासह, सर्व गतिविधींसह एकसूत्रीकरण आणि सुसंवादीकरण घडवितो.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 06), (CWM 03 : 192), (CWM 08 : 398), (CWM 14 : 65)

सर्वात महत्त्वाचा एक गुण म्हणजे दीर्घोद्योग, प्रयत्न-सातत्य, चिकाटी. एक प्रकारची आंतरिक खिलाडूवृत्ती, जी तुम्हाला नाऊमेद होऊ देत नाही, दुःखी होऊ देत नाही आणि हसतहसत साऱ्या अडीअडचणींना सामोरे जाण्यास मदत करते. इंग्लिशमध्ये ह्याला एक छान शब्द आहे – Cheerfulness. जर तुम्ही अशा प्रकारची आनंदी वृत्ती किंवा खेळकरपणा तुमच्यामध्ये बाळगलात तर तुम्ही, तुम्हाला प्रगत होण्यापासून रोखणाऱ्या वाईट प्रभावांशी चांगल्या रीतीने दोन हात करता, तुम्ही त्यांचा चांगल्या रीतीने प्रतिकार करता.

*

(CWM 08 : 23)

गरज पडली तर, एखादी गोष्ट हजार वेळा सुरु करण्याची जरी वेळ आली तरी, ती करण्याचा निश्चय करावयास हवा. माणसं अगदी निराश होऊन माझ्याकडे येतात आणि म्हणतात, ”मला वाटलं होते की, आता सगळं काही झालं आहे; पण आता मला पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार. ”परंतु जर त्यांना असे सांगितले की, ”हे तर काहीच नाही. तुम्हाला कदाचित तीच गोष्ट शंभर नाही, दोनशे वेळा, कदाचित हजार वेळासुद्धा करावी लागेल. तुम्ही कुठे एक पाऊल पुढे टाकता आणि असे समजायला लागता की, तुम्ही सुरक्षित आहात, परंतु नेहमीच असे काहीतरी असते की, तुम्ही थोडेसे पुढे गेल्यावर तीच अडचण फिरुन परत येते.”

तुम्हाला असे वाटते की, तुम्ही प्रश्न सोडवला आहे, समस्या सोडविली आहे. पण तुम्हाला पुन्हा एकदा तोच प्रश्न, तीच समस्या सोडवायला लागते. ती दिसायला कदाचित काहीशी भिन्न दिसते पण समस्या तीच असते. अशावेळी “ती समस्या अगदी लाखो वेळा जरी आली तरी मी ती लाख वेळा सोडवेन, परंतु मी त्यातून पार पडेनच,” असा निश्चय जर तुम्ही केलेला नसेल, तर तुम्ही योग करूच शकणार नाही. ही अगदी अनिवार्य अशी गोष्ट आहे.

(CWM 08 : 41-42)

*

व्यक्तीला स्वत:मध्येच एक प्रकारची आश्वासकता वाटली पाहिजे, कोणत्याही परिस्थितीमध्ये, काहीही करावे लागले तरीही ती आश्वासकता व्यक्तीने शेवटपर्यंत कायम राखली पाहिजे. जे चिकाटीने प्रयत्नशील राहतात, त्यांना विजय प्राप्त होतो.

सर्व प्रकारच्या विरोधांमध्येसुद्धा ही चिकाटी टिकवून ठेवण्यासाठी एक अविचल असा आधार आवश्यक असतो आणि असा एकमेव अविचल आधार म्हणजे ती सद्वस्तु, ते परम सत्य होय. दुसरीकडे कोठेही असा आधार शोधणे हे व्यर्थ आहे. ज्याबाबत कधीही निराश व्हावे लागणार नाही असा हा एकमेव आधार आहे.

(CWM 09 : 255)

*

प्रयत्नसातत्याद्वारेच व्यक्ती अडचणींवर मात करू शकते, त्यांच्यापासून पळ काढून नव्हे. जो चिकाटी राखतो, प्रयत्नशील राहतो त्याचा विजय निश्चित असतो. जो प्रयत्नसातत्य राखतो त्याचा जय होतो. नेहमीच सर्वोत्तम करत राहा, त्याच्या फलांची काळजी परमेश्वर करेल.

(CWM 14 : 163)