Tag Archive for: चैत्य पुरुष

आध्यात्मिकता ३२

‘आध्यात्मिकता’ या मालिकेमध्ये आजपर्यंत आपण श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या साहित्याच्या आधारे, आध्यात्मिकता म्हणजे काय नाही आणि खरी आध्यात्मिकता म्हणजे काय हे समजावून घेतले. आध्यात्मिकतेविषयीची पारंपरिक समजूत आणि त्याची ‘पूर्णयोगा’वर आधारित संकल्पना यामधील फरकही समजावून घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या अंतरंगामध्ये असणाऱ्या आध्यात्मिक पुरूषाचा (spiritual being) शोध घेणे हे मनुष्याचे केवळ कर्तव्यकर्म आहे असे नव्हे तर, ते त्याचे जीवितकार्य आहे, हेही आपण समजावून घेतले. खऱ्या आध्यात्मिकतेची कसोटी म्हणजे चेतनेचे प्रतिक्रमण (Reversal of consciousness) हेही आपण जाणून घेतले.

आता प्रश्न निर्माण होतो की, आध्यात्मिक पुरुषाचा शोध कसा घ्यायचा? त्यासाठी ध्यानधारणा करायची? की अन्य काही करायचे? का मन एकाग्र करायचे? दैनंदिन व्यावहारिक जीवनाच्या धकाधकीमध्ये, त्यातील भेडसावणाऱ्या प्रश्नांमुळे सामान्य माणसाच्या जिवाला स्वस्थता नसते, मग अशा धकाधकीच्या जीवनात अध्यात्म करायचे तरी कसे? दैनंदिन व्यवहार न सोडता, भौतिक जीवनापासून पलायन न करता, आहे त्याच जीवनाला ‘दिव्यत्वा’चे वळण कसे द्यायचे? त्यासाठी नेमके काय करायला हवे ? यासारखे अनेकानेक प्रश्न वाचकांच्या मनात निर्माण झाले असतील. हे व अशाच प्रकारचे प्रश्न त्यावेळच्या साधकांच्या मनातही निर्माण झाले होते; त्यांनी ते प्रश्न श्रीअरविंद व श्रीमाताजी यांना विचारले होते, आणि त्यांनी त्या प्रश्नांची उत्तरे दिली होती. त्यातील काही निवडक प्रश्नोत्तरे, काही पत्रे, काही लिखाण, संवाद यांच्या माध्यमातून आपण उद्यापासून त्यांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

‘पूर्णयोगा’च्या साधनेचे – अंतरंग साधना आणि बहिरंग साधना असे दोन प्रकार आहेत. चेतना अंतर्मुख करून चैत्य पुरुषाचा (Psychic being) शोध आणि चेतना ऊर्ध्वमुख करून आत्मतत्त्वाचा (Soul) शोध घेणे; चेतना विशाल करत करत, ती विश्वात्मक करत नेणे या सर्व गोष्टींचा समावेश अंतरंग साधनेमध्ये होतो; तर अंतरंग साधनेमधून प्राप्त झालेल्या शांती, स्थिरता, प्रकाश, प्रेम, समता यांसारख्या गोष्टी दैनंदिन जीवन जगत असताना प्रत्यक्षात आचरणात आणणे यांचा समावेश बहिरंग साधनेमध्ये होतो. या दोन्ही साधनापद्धतींसंबंधी काही मार्गदर्शन येथे मिळेल आणि अध्यात्म मार्गावर पहिलीवहिली पावले टाकण्यासाठी ही शिदोरी आपणा सर्वांना उपयोगी पडेल असा विश्वास वाटतो.

– संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक

आपण आपल्या चेतनेच्या पृष्ठभागावरच जीवन जगत असल्याने, आपल्याला केवळ या पृष्ठवर्ती चेतनेचेच भान असते. ही पृष्ठवर्ती चेतना (माणसामधील सर्वसाधारण जाग्रत मन) म्हणजेच आपण आहोत, समग्रत्वाने आपण आहोत असे आपल्याला वाटत असते, कारण आपण केवळ त्या पृष्ठवर्ती भागावरच जाग्रत असल्याने आपल्याला फक्त त्याचीच जाणीव असते.

पण अंतरंगामध्ये, आंतरिक अस्तित्व आणि बाह्यवर्ती अस्तित्व यांच्या दरम्यान गूढतेची किंवा विस्मृतीची एक प्रकारची भिंत असते; एक आंतरिक अस्तित्व (Inner being) – आंतरिक मन, प्राण, शरीर असते आणि आंतरतम भागामध्ये चैत्य पुरुष (an Inmost or Psychic being) असतो; मात्र आपण या साऱ्यांविषयी अनभिज्ञ असतो. तेथून पृष्ठभागावर जे जे काही येते फक्त त्याचीच जाणीव आपल्याला असते; त्याचा उगम कोठे आहे किंवा ते पृष्ठभागावर कोठून, कसे आले याविषयी आपल्याला काहीच माहीत नसते.

‘योगसाधने’तून ती भिंत हळूहळू ढासळू लागते आणि आपल्याला आपल्यातील आंतरिक आणि आंतरतम अशा अस्तित्वाची जाणीव होऊ लागते. असे केल्यामुळे आपल्यामध्ये जी एक नवीन ‘योगमय’ चेतना निर्माण होते त्या चेतनेला सभोवती असलेल्या वैश्विक चेतनेशी आणि वर असलेल्या उच्चतर आध्यात्मिक चेतनेशी थेट संपर्क साधणे शक्य असते.

ज्याप्रमाणे व्यक्तीकडे स्वत:ची अशी चेतना असते, त्याचप्रमाणे वैश्विक चेतना, वैश्विक ‘अस्तित्व’, वैश्विक ‘मन’, वैश्विक ‘प्राण’, वैश्विक भौतिक जाणीवयुक्त ‘प्रकृती’ देखील असते. आपण आपल्या बाह्य शारीर अस्तित्वामध्येच कोंडून पडल्यामुळे आपण त्या साऱ्याविषयी अनभिज्ञ असतो.

आंतरिक जागृतीमुळे आणि ऊर्ध्वमुख विकसनामुळे वैश्विक चेतना, वैश्विक ‘प्रकृती’, वैश्विक ‘आत्मा’ आणि त्याच्या हालचालींविषयी आपण जागृत होतो; आपली चेतना व्यापक होऊन, आपण त्या वैश्विक चेतनेशी तद्रूप होऊ शकतो. वैश्विक ‘प्रकृती’च्या शक्ती सातत्याने आपल्यावर कार्य करत असतात. वैश्विक प्रकृतीच्या शक्ती कशा कार्य करतात याची आपल्याला कल्पनादेखील नसते किंवा आपल्यावर चालणाऱ्या त्यांच्या कार्यावर आपण नियंत्रणही ठेवू शकत नाही. विश्वप्रकृतीविषयी सचेत झाल्यानेच आपण त्यांचे कार्य ओळखू शकतो आणि त्यावर नियंत्रणही मिळवू शकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 19-20)

साधक : एखाद्या प्रौढ व्यक्तीप्रमाणे लहान बालकदेखील त्याच्या आंतरिक सत्याविषयी सजग होऊ शकते का?

श्रीमाताजी : लहान मुलामध्ये ही जाणीव अगदी सुस्पष्ट असते, कारण सत्य हे त्यांना कोणत्याही विचारांच्या वा शब्दांच्या गुंतागुंतीविना थेट संवेदित होते – हे तेच असते ज्यामुळे त्याला अगदी स्वस्थ वाटते किंवा ज्यामुळे त्याला अस्वस्थ वाटते. आणि हे सगळे प्रौढ माणसांपेक्षा लहान मुलामध्ये अधिक सुस्पष्ट असते कारण प्रौढ व्यक्तीमध्ये या आंतरिक सत्याविषयीची संवेदना मनाच्या कार्यामुळे झाकोळली जाते. मुलांमध्ये एक छोटेसे सत्य दडलेले असते ते म्हणजे त्यांच्या अंतरात्म्यामध्ये (psychic) असणारी दिव्यत्वाची ‘उपस्थिती’. वनस्पती व प्राण्यांमध्येदेखील हे अस्तित्व असते. वनस्पतींमध्ये हे अस्तित्व जागृत नसते, प्राण्यांमध्ये ते जागृत व्हायला सुरुवात झालेली असते आणि लहान मुलांमध्ये ते खूपच जागृत असते. मला अशी मुले माहीत आहेत की, जी त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या वयाच्या चौदाव्या वर्षीपेक्षा आणि चौदाव्या वर्षी पंचविसाव्या वर्षापेक्षा या आंतरात्मिक अस्तित्वाविषयी, चैत्यपुरुषाविषयी (Psychic being) अधिक जागृत होती. आणि आश्चर्य म्हणजे, ज्या क्षणापासून ती शाळेत जायला सुरुवात करतात, जेथे अस्तित्वाच्या बौद्धिक भागाकडे त्यांचे लक्ष वेधून घेईल असे गहन मानसिक शिक्षण ती घेऊ लागतात, तेव्हापासून या चैत्य पुरुषाबरोबरचा असलेला त्यांचा संपर्क बहुधा ती नेहमीच व जवळजवळ पूर्णपणे हरवून बसतात. तुम्ही जर अनुभवी निरीक्षक असाल, तर तुम्ही व्यक्तीच्या डोळ्यांत पाहूनच त्या व्यक्तीच्या अंतरंगामध्ये काय चालू आहे याविषयी सांगू शकाल…

डोळे हा आत्म्याचा आरसा असतो असे म्हटले जाते. पण जर डोळ्यांमधून अंतरात्मा अभिव्यक्त होत नसेल, तर त्याचे कारण असे असते की, तो खूप मागे गेलेला असतो, बऱ्याच गोष्टींनी झाकला गेलेला असतो. काळजीपूर्वकपणे लहान मुलांच्या डोळ्यांत पाहा, तुम्हाला त्यांच्या डोळ्यांत एक प्रकारचा प्रकाश दिसेल – काही जण त्याला निरागसता असे म्हणतात – लहान मुले इतकी खरी असतात, ती जगाकडे कुतूहलाने टुकूटुकू पाहत असतात. हा कुतूहलाचा भाव चैत्यपुरुषाचा असतो, तो सत्य पाहत असतो पण त्याला या जगाविषयी फारशी काही माहिती नसते; कारण तो त्याच्यापासून फार दूर असतो. लहान मुलांमध्ये हे सारे असते पण जसजशी ती अधिकाधिक शिकत जातात, अधिकाधिक बुद्धिमान, अधिक शिक्षित होतात, तसतसे हे सारे पुसले जाते; आणि मग तुम्हाला त्यांच्या डोळ्यांमध्ये विचार, इच्छा, आवेग, दुष्टपणा – सारे काही दिसू लागते पण ती छोटीशी ज्योत, अत्यंत पवित्र, शुद्ध अशी ज्योत मात्र हरवलेली असते. तेव्हा तुम्ही खात्रीने सांगू शकता की, तेथे मनाचा प्रवेश झाला आहे आणि अंतरात्मा दूर, खूप दूरवर निघून गेलेला आहे.

ज्याचा मेंदू अजून पुरेसा विकसित झालेला नाही अशा मुलाकडे तुम्ही संरक्षणाचे किंवा प्रेमाचे, किंवा तळमळीचे किंवा सांत्वनाचे स्पंदन संक्रमित केलेत तर ते त्याला प्रतिसाद देते, असे तुम्हाला आढळेल. पण जर तुम्ही एखाद्या शाळेत जाणाऱ्या चौदा वर्षाच्या मुलाचे उदाहरण घेतलेत की, ज्याचे आईवडील सामान्य आहेत आणि ज्यांनी त्याला सामान्य पद्धतीने वाढविले आहे, अशा मुलाबाबत त्याचे मन हे खूपच वर, पृष्ठस्तरावर आलेले आढळते; काहीतरी कठीण असे त्याच्या ठिकाणी असते, अंतरात्मा खूप दूर निघून गेलेला असतो. अशी मुले त्या कोणत्याच स्पंदनांना प्रतिसाद देत नाहीत. जणू काही ती प्लास्टर वा लाकडी ओंडक्याची बनलेली असावीत.

– श्रीमाताजी [CWM 04 : 26-27]

बालकसदृश विश्वास ही सर्वात महत्त्वाची अट असते. बालकाला असा प्रांजळ विश्वास असतो की, त्याला हवी असलेली गोष्ट त्याला मिळेलच, ते बालक त्या गोष्टीची स्वतःहून मागणीसुद्धा करत नाही; त्याला खात्री असते की, जेव्हा त्याला एखाद्या गोष्टीची आवश्यकता असेल तेव्हा ती त्याला मिळेलच. असा अगदी बालकसदृश विश्वास, हीच खरोखर सर्वात महत्त्वाची अट असते. मात्र त्यासाठी आस बाळगणे अत्यंत आवश्यक असते. पण काही माणसांच्या अंतरंगातच श्रद्धा आणि अश्रद्धा, विश्वास आणि अविश्वास यांच्यामध्ये एक प्रकारचा संघर्ष चालू असतो; विजयाची खात्री असलेला आशावाद आणि मोठी आपत्ती आली तर काय होईल असा विचार करणारा निराशावाद यांच्यामध्ये संघर्ष चालू असतो….

मुले स्वाभाविकपणे जशी असतात तशीच असतील म्हणजे मोठ्या माणसांनी मुलांना बिघडवले नसेल तर, त्यांना ‘सारे काही चांगलेच घडेल’ असा दुर्दम्य विश्वास असतो. उदाहरणार्थ, जेव्हा जेव्हा त्यांच्याबाबतीत एखादी छोटीशी दुर्घटना घडते तेव्हा याचे पुढे जाऊन काही गंभीर परिणाम होतील का, असला विचार त्यांच्या मनाला कधी शिवतही नाही. सारे काही लवकरच सुरळीत होईल अशी त्यांना अगदी स्वाभाविकपणे खात्री असते आणि ही खात्री इतकी जबरदस्त असते की त्यामुळे तो दुष्परिणामच नाहीसा झालेला असतो.

कोणी एखादा जेव्हा ‘शक्ती’ची आस बाळगतो, ‘ईश्वरा’कडे मदतीची याचना करतो, आणि ती मिळेलच असा ज्याचा अढळ विश्वास असतो तेव्हा, ती मदत मिळणार नाही असे शक्यच नाही, ती खात्रीने मिळणारच. हा विश्वास, हेच खरेखुरे ‘आंतरिक खुलेपण’ (inner opening) असते. काही माणसं सतत याच स्थितीमध्ये असतात. स्वीकारण्याजोगे असे जेव्हा काहीतरी असते तेव्हा, ते स्वीकारण्यास अशी माणसं नेहमी तत्पर असतात. पण असेही काही जण असतात की, जेव्हा काही मिळण्याची वेळ येते, जेव्हा शक्ती अवतरते तेव्हा, ते नेहमीच अनुपस्थित असतात, ते त्या घडीला मिटलेले असतात (ग्रहणशील नसतात.) त्याउलट ज्यांच्यापाशी बालकसदृश विश्वास असतो ते मात्र योग्य वेळी तेथे उपस्थित असतात. आणि आश्चर्य म्हणजे, बाह्यत: दोघांमध्ये कोणताही फरक नसतो. त्या दोघांकडेही समान सदिच्छा असते, समान अभीप्सा असते, काहीतरी कल्याणकारी करण्याची समान इच्छा असते, परंतु ज्यांच्या अंत:करणात सुहास्य विश्वास असतो, ते प्रश्न उपस्थित करत बसत नाहीत, ते आपल्याला काही प्राप्त होईल किंवा नाही, ‘ईश्वर’ आपल्याला प्रतिसाद देईल की नाही अशा शंकाकुशंका मनात आणत नाहीत; त्यांच्या मनात तसा प्रश्नच निर्माण होत नाही… “जे माझ्यासाठी गरजेचे आहे ते मला दिले जाईल; मी जर प्रार्थना केली तर मला प्रतिसाद मिळेल; जेव्हा मी अडचणीत असेन आणि मदतीची याचना करेन तेव्हा मला मदत मिळेल आणि केवळ मदत मिळेल इतकेच नाही तर सर्व गोष्टींची योग्य ती व्यवस्था लावली जाईल.” असा त्यांना विश्वास असतो. असा जर हा उत्स्फूर्त, विनम्र, निःशंक विश्वास असेल तर, त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा कार्य अधिक चांगल्या रीतीने घडून येते आणि त्याचे परिणामदेखील अद्भुत असतात. मनाच्या शंका आणि विरोधाभास यामुळेच व्यक्ती सर्व गोष्टी बिघडवून टाकते. अशी व्यक्ती जेव्हा संकटामध्ये असते तेव्हा तिची, एक प्रकारे अशी धारणा तयार होते की, “हे अशक्य आहे! मला हे जमणार नाही. मी आत्ता ज्या परिस्थितीमध्ये आहे, जी मला नको आहे, ती जर का अजून खालावली, आणि जर तसेच घडले तर, सारे काही अधिकच बिघडून जाईल. मी अशा रीतीने अधिकाधिकच खालावत गेलो तर…” अशा विचारांमुळे, व्यक्ती स्वतःमध्ये आणि जी शक्ती तिने स्वीकारायला हवी त्या शक्तीमध्ये एक प्रकारची भिंत निर्माण करते.

चैत्य पुरुषाकडे मात्र कोणताही विरोधाभास नसलेला, कोणताही तर्कवितर्क नसलेला, कोणतीही छाया नसलेला अद्भुत विश्वास असतो. आणि जेव्हा हा विश्वास असतो तेव्हा, जिला प्रतिसाद मिळणार नाही अशी कोणतीच प्रार्थना असत नाही, आणि प्रत्यक्षात साकार होणार नाही अशी कोणतीच ‘अभीप्सा’ असत नाही.

– श्रीमाताजी [CWM 06 : 403-404]

जेव्हा मानववंश प्रथमत: निर्माण करण्यात आला तेव्हा अहम् हा एकीकरण करणारा घटक होता. या अहंभोवतीच अस्तित्वाच्या विविध अवस्थांचे वर्गीकरण करण्यात आले होते; परंतु आता जेव्हा ‘अतिमानवा’च्या जन्माची तयारी चालू आहे, तेव्हा अहंला नाहीसे व्हावेच लागेल, त्याने चैत्य पुरुषाला (psychic being) वाट मोकळी करून देणे आवश्यक आहे; मानवामध्ये ‘दिव्यत्वा’चे आविष्करण व्हावे म्हणून हळूहळू ईश्वराच्या मध्यस्थीने त्याची घडण व्हायला सुरुवात झाली आहे.

‘दिव्यत्वा’चे मनुष्यामध्ये आविष्करण होते ते चैत्य प्रभावाखालीच होते आणि त्याद्वारे अतिमानवतेच्या आगमनाची तयारी होते. चैत्य पुरुष हा अमर्त्य असतो आणि त्याच्याद्वारेच पृथ्वीवर अमर्त्यत्वाचे (immortality) आविष्करण होऊ शकते. त्यामुळे महत्त्वाची गोष्ट अशी की, व्यक्तीने स्वतःच्या चैत्य पुरुषाचा शोध घेतला पाहिजे, त्याच्याशी एकत्व पावले पाहिजे. आणि अहंची जागा त्या चैत्य पुरुषाला घेऊ दिली पाहिजे; ज्यामुळे अहंला एकतर रूपांतरित व्हावे लागेल अन्यथा नाहीसे होणे भाग पडेल.

– श्रीमाताजी [CWM 16 : 434]

कर्म आराधना – ०८

संकल्प दृढ ठेवा. तुमच्यातील अडेलतट्टू घटकांना, ज्याप्रमाणे आज्ञापालन न करणाऱ्या मुलांना वागवतात त्याप्रमाणे वागणूक द्या. त्यांच्यावर सातत्यपूर्वक, सहनशीलतेने काम करा. त्यांना त्यांच्या चुका समजावून सांगा.

तुमच्या जाणिवांच्या आत खोलवर चैत्य पुरुष (psychic being) असतो. हा चैत्य पुरुष म्हणजे तुमच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’चे मंदिर असते. हे असे केंद्र असते की, ज्याच्या भोवती तुमच्यातील विभिन्न असणाऱ्या सर्व घटकांचे, तुमच्या अस्तित्वामधील सगळ्या परस्परविरोधी हालचालींचे एकीकरण झाले पाहिजे. एकदा का तुम्हाला त्या चैत्य पुरुषाची चेतना व त्याची अभीप्सा आत्मसात झाली की, सगळ्या शंका, अडचणी नाहीशा होऊ शकतात. त्याला कमी-अधिक वेळ लागेल, परंतु अंतत: तुम्ही यशस्वी होणार हे निश्चित! एकदा जरी तुम्ही ‘ईश्वरोन्मुख’ झाला असाल आणि म्हणाला असाल की, ”मला तुझा होऊन राहायचे आहे.” आणि ईश्वर “हो” असे म्हणाला असेल, तर जगातील कोणतीच शक्ती तुम्हाला त्यापासून रोखू शकत नाही. जेव्हा जीवात्मा (central being) स्वत:चे समर्पण करतो तेव्हा मुख्य अडचणच नाहीशी होते. बाह्य अस्तित्व हे केवळ एखाद्या कवचाप्रमाणे असते. सामान्य माणसांमध्ये हे कवच इतके कठीण आणि जाड असते की, त्यामुळे ते त्यांच्या अंतरंगामध्ये असणाऱ्या ‘ईश्वरा’बाबत यत्किंचितही जागरूक नसतात. एकदा, अगदी एका क्षणासाठी जरी, अंतरात्मा (inner being) म्हणाला असेल की, ”मी इथे आहे आणि मी तुझाच आहे’’; तर एक प्रकारचा सेतू निर्माण होतो आणि मग ते बाह्य कवच हळूहळू पातळ पातळ होत जाते. जोपर्यंत आंतरिक अस्तित्व आणि बाह्य अस्तित्व हे दोन्ही भाग पूर्णपणे जोडले जाऊन, एकच होऊन जात नाहीत तोपर्यंत ही प्रक्रिया चालू राहते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 07)

साधनेची मुळाक्षरे – १०

चैत्य रूपांतरणामध्ये तीन मुख्य घटक असतात.

१) निगूढ अशा आंतरिक मन, आंतरिक प्राण आणि आंतरिक शरीराच्या खुलेपणामुळे, पृष्ठवर्ती मन, प्राण आणि शरीर यांच्या पाठीमागे असलेल्या साऱ्याची व्यक्तीला जाणीव होते.

२) चैत्य पुरुषाचे किंवा आत्म्याचे खुलेपण, ज्यामुळे ते पुढे येऊन मन, प्राण आणि शरीर यांचे अनुशासन करतात आणि त्या सर्वांना ‘ईश्वरा’कडे वळवितात.

३) समग्र कनिष्ठ अस्तित्वाचे आध्यात्मिक सत्याप्रत खुले होणे – या अंतिम गोष्टीला परिवर्तनाचा आंतर-आध्यात्मिक भाग (the psycho-spiritual part) असे म्हणता येईल.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 332)

साधनेची मुळाक्षरे – ०८

आपल्यामधील चैत्य घटक (psychic part) हा असा भाग असतो की, जो थेट ‘ईश्वरा’कडून आलेला असतो आणि ‘ईश्वरा’च्या संपर्कामध्ये असतो. मूलत: चैत्य घटक म्हणजे दिव्य शक्यतांनी गर्भित असलेले असे एक केंद्र असते की जे, मन, प्राण व शरीर या कनिष्ठ आविष्कारत्रयीला आधार पुरविते. हे ईश्वरी वा दिव्य तत्त्व सर्व सजीवांमध्ये असते पण ते सामान्य चेतनेच्या मागे लपलेले असते; ते प्रथमत: विकसित झालेले नसते… मन, प्राण व शरीर या साधनांच्या अपूर्णतांकडून जेवढी मुभा मिळेल तेवढ्यामध्येच आणि, त्यांच्या माध्यमातूनच व त्यांच्या मर्यादांमध्ये राहूनच, हे तत्त्व स्वत:ला अभिव्यक्त करते. ‘ईश्वरानुगामी’ अनुभूतींच्या योगे, या तत्त्वाची चेतनेमध्ये वृद्धी होत असते; आपल्यामध्ये जेव्हा उच्चतर अशी क्रिया घडते त्या प्रत्येक वेळी या तत्त्वाला सामर्थ्य प्राप्त होत जाते आणि सरतेशेवटी, या सखोल आणि उच्चतर अशा गतिविधींच्या संचयामधून चैत्य व्यक्तित्वाची घडण होते आणि त्यालाच आपण सर्वसाधारणत: ‘चैत्य पुरुष’ (Psychic being) असे संबोधतो. माणूस आध्यात्मिक जीवनाकडे वळण्याचे निमित्त-कारण खरंतर हाच चैत्य पुरुष असतो; ह्या चैत्यपुरुषाचीच त्याला सर्वात अधिक मदत होत असते पण बरेचदा हे निमित्त-कारण अनभिज्ञच राहते. आणि म्हणूनच आपल्याला ‘पूर्णयोगा’मध्ये त्या चैत्यपुरुषाला अग्रभागी आणावे लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 103)

साधनेची मुळाक्षरे – ०७

शुद्ध आत्मा (The pure self) हा अजन्मा असतो, तो जन्म वा मृत्युमधून प्रवास करीत नाही, तो जनननिरपेक्ष असतो किंवा तो देह, प्राण वा मन यांपासून वा या आविष्कृत झालेल्या प्रकृतीपासूनदेखील स्वतंत्र असतो. त्या सर्व गोष्टींचा तो अंगीकार करीत असला आणि त्यांना आधार देत असला तरीसुद्धा तो त्या गोष्टींनी बांधला गेलेला नसतो, सीमित झालेला नसतो, प्रभावित झालेला नसतो. याउलट, चैत्य पुरुष (Psychic being) मात्र, जन्माबरोबर खाली अवतरतो आणि मृत्युद्वारे निघून जातो – (तो स्वत: मृत्यू पावत नाही कारण तो अमर्त्य असतो.) तो एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत, भूलोकावरून इतर लोकांमध्ये आणि परत पुन्हा या पृथ्वीवरील जीवनात प्रवास करत असतो. जन्मजन्मांतरी उत्क्रांतीच्या माध्यमातून त्याची मनुष्यदशेकडे वाटचाल होत राहते… हा चैत्य पुरुष उत्क्रांतीला आधार देतो आणि विश्वानुभव घेण्यासाठीची साधने म्हणून शारीरिक, प्राणिक व मानसिक अशी मानवी चेतना विकसित करतो. ही साधने प्रच्छन्न (disguised), अपूर्ण पण चढतीवाढती आत्मअभिव्यक्ती करणारी असतात. हे सारे तो पडद्यामागे राहून करत असतो, आणि साधनभूत अस्तित्वाच्या अपूर्णतेमुळे जितपत शक्य आहे तेवढेच स्वत:मधील दिव्यत्व दाखवून देतो. पण एक वेळ अशी येते, जेव्हा तो चैत्य पुरुष या पडद्यामागून बाहेर येण्यास, साधनभूत प्रकृतीचा ताबा घेऊन तिला दिव्य पूर्णत्वाकडे वळविण्यासाठी सिद्ध होतो; खऱ्या अध्यात्मजीवनाची ही सुरुवात असते. असा चैत्य पुरुष मग आता मानसिक मानवी पातळीवरून आविष्कृत तयार होतो; तो आता मानसिक चेतनेकडून आध्यात्मिक चेतनेकडे आणि आध्यात्मिकतेच्या विविध पातळ्यांमधून हळूहळू अतिमानसिक अवस्थेकडे वाटचाल करू लागतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 536-537)

विचार शलाका – ०४

प्रश्न : चैत्य अग्नी (psychic fire) प्रज्वलित कसा करावा?

श्रीमाताजी : अभीप्सेच्या द्वारे.

प्रगतीसाठीच्या संकल्पाद्वारे आणि आत्मशुद्धीकरणाने हा चैत्य अग्नी चेतवला जातो.

जेव्हा प्रगतीची इच्छा तीव्र असते, व ती इच्छा आध्यात्मिक प्रगती आणि शुद्धीकरण या दिशेने वळविली जाते तेव्हा आपोआप त्या व्यक्तीमधील हा अग्नी प्रदिप्त होतो.

एखाद्याला जर स्वत:मधील एखादा दोष, एखादी त्रुटी दूर करावयाची असेल, त्याच्या प्रकृतीमधील काहीतरी त्याला प्रगत होण्यापासून रोखत असेल, त्याची जर त्याने या चैत्य अग्नी मध्ये आहुती दिला तर तो अग्नी अधिक तीव्रतेने प्रज्वलित होतो. आणि ही केवळ प्रतिमा नाही, ती सूक्ष्म भौतिक पातळीवरील वस्तुस्थिती आहे. कोणी त्या ज्योतीची ऊब अनुभवू शकतो, तर कोणी एखादा सूक्ष्म भौतिक स्तरावर त्या ज्योतीचा प्रकाशदेखील पाहू शकतो.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 251)