Posts

श्रीमाताजी आणि समीपता – १६

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुम्हाला श्रीमाताजींबद्दल जे एवढे प्रगाढ प्रेम वाटते ते प्रेम आणि तुम्ही ज्यांच्या समवेत राहता किंवा काम करता त्यांच्याविषयी वाटणारी आत्मीयता व सौहार्दाची भावना या दोन्ही गोष्टी चैत्य पुरुषाकडून (psychic being) येतात. जेव्हा चैत्य पुरुषाचा प्रभाव वाढू लागतो तेव्हा ‘श्रीमाताजीं’बद्दलचे हे प्रेम अधिक उत्कट होते आणि ते प्रेमच तुमच्या प्रकृतीचे मुख्य सारथी बनते. आणि त्याचबरोबर इतरांविषयी एक प्रकारची सद्भावना, सुसंवाद, दयाळूपणा किंवा आत्मीयता या भावनासुद्धा उदयाला येतात.

श्रीमाताजींची बालके असणाऱ्या सर्वच जिवांशी आपल्या आत्म्याचे जे आंतरिक नाते असते त्याचा हा परिणाम असतो आणि त्यामुळे त्यामध्ये (व्यक्तीचे) वैयक्तिक असे काही नसते. या आंतरात्मिक भावनेमध्ये काही अपाय नाही, उलट ती भावना संतोष आणि सुसंवाद निर्माण करते. आंतरात्मिक भावनेमुळे अंतरात्म्याचे श्रीमाताजींच्या चेतनेमध्ये विकसन होण्यास साहाय्य लाभते आणि त्यामुळे कार्यालाही हातभार लागतो तसेच आंतरिक जीवन वृद्धिंगत होण्यासदेखील मदत होते.

व्यक्ती-व्यक्तींमध्ये असणारे प्राणिक प्रेम (vital love) तेवढे नाकारले पाहिजे कारण ते प्रेम ‘ईश्वरा’प्रति करायच्या पूर्ण आत्म-निवेदनापासून (consecration) व्यक्तीला दूर नेते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 463)

साधना, योग आणि रूपांतरण – २६२

प्राणाचे रूपांतरण

तुमच्यामध्ये जर निष्काळजीपणा असेल तर येथून पुढे तुम्ही तुमच्या सर्व कृतींमध्ये सचेत (conscious) होण्यास शिकलेच पाहिजे. तसे केलेत तर मग प्राणिक वृत्तीप्रवृत्ती तुम्हाला फसवू शकणार नाहीत किंवा कोणते फसवे रूप घेऊन तुमच्या समोर येऊ शकणार नाहीत. या प्राणिक वृत्तीप्रवृत्तींचे निरीक्षण करण्यासाठी आणि त्या जशा आहेत तशा त्या तुम्हाला पाहता याव्यात यासाठी, तुम्ही अगदी पूर्णपणे प्रामाणिक असले पाहिजे.

तुम्ही एकदा जर चैत्य पुरुष (psychic being) खुला करू शकलात आणि तो तसाच खुला ठेवू शकलात तर, तुमच्या अंतरंगामधूनच तुम्हाला प्रत्येक पावलागणिक वास्तविक सत्य काय आहे हे दाखविणारा बोध सातत्याने मिळत राहील आणि कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीपासून तो तुमचे रक्षण करत राहील. तुम्ही जर सतत आस बाळगलीत आणि शांती वृद्धिंगत होण्यास आणि ‘दिव्य शक्ती’ला तुमच्यामध्ये कार्य करू देण्यास वाव दिलात तर अशी उन्मुखता, असे खुलेपण येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 105)

साधना, योग आणि रूपांतरण – २५६

प्राणाचे रूपांतरण

आंतरात्मिक प्राणशक्ती म्हणजे अशी प्राणशक्ती की जी अंतरंगामधून उदित झालेली असते आणि जी चैत्य पुरुषाशी (psychic being) सुसंवादी असते. ती शुद्ध प्राणमय पुरुषाची (vital being) ऊर्जा असते, परंतु सर्वसामान्य अज्ञानी प्राणामध्ये ती इच्छावासनांच्या रूपात विकारित झालेली असते.

तुम्ही तुमचा प्राण अविचल आणि शुद्ध केला पाहिजे, आणि खरा, शुद्ध प्राण उदयास येऊ दिला पाहिजे. किंवा तुमच्यामधील चैत्य पुरुष अग्रभागी आणला पाहिजे, म्हणजे तो चैत्य पुरुष तुमच्या प्राणाचे शुद्धीकरण करेल आणि त्याचे आंतरात्मिकीकरण (psychicise) करेल आणि मग तुम्हाला शुद्ध प्राणिक ऊर्जा मिळेल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 112)

साधना, योग आणि रूपांतरण – २३९

(आपल्या व्यक्तित्वामध्ये दोन प्रणाली कार्यरत असतात. एक अध-ऊर्ध्व म्हणजे जडभौतिकापासून ते सच्चिदानंदापर्यंत असणारी प्रणाली आणि दुसरी बाहेरून आत जाणारी म्हणजे बाह्य व्यक्तित्व ते चैत्य पुरुष अशी असणारी केंद्रानुगामी प्रणाली. या दोन्ही प्रणालींचा येथे संदर्भ आहे.)

रूपांतरणासाठी ‘संपूर्ण’ आणि ‘समग्र’ ईश्वराधीनतेची (consecration) आवश्य कता असते. सर्वच प्रामाणिक साधकांची तीच आस असते, नाही का?

‘संपूर्ण’ ईश्वराधीनता म्हणजे ऊर्ध्व-अधर (vertically) अशा पद्धतीने ईश्वराधीन होणे. येथे व्यक्ती सर्व अवस्थांमध्ये, म्हणजे अगदी जडभौतिक अवस्थांपासून ते अगदी सूक्ष्म अशा सर्व अवस्थांपर्यंत, सर्वत्र ईश्वराधीन असते.

आणि ‘समग्र’ ईश्वराधीनता म्हणजे क्षितिजसमांतर (horizontally) पद्धतीने ईश्वराधीन होणे. शरीर, प्राण, मन यांनी मिळून ज्या बाह्यवर्ती व्यक्तित्वाची घडण झालेली असते त्या व्यक्तित्वाच्या विभिन्न आणि बरेचदा परस्परविरोधी असणाऱ्या सर्व घटकांमध्ये ईश्वराधीनता असणे म्हणजे समग्र ईश्वराधीन असणे.

– श्रीमाताजी (CWM 15 : 88)

साधना, योग आणि रूपांतरण – २२९

इच्छा, राजसिकता आणि अहंकार यांना दिलेल्या नकारामुळे व्यक्तीला अशी अचंचलता आणि शुद्धता प्राप्त होते की, ज्यामध्ये अनिर्वचनीय ‘शांती’ अवतरू शकते. व्यक्तीने स्वतःची इच्छा ‘ईश्वरा’प्रत अर्पण केली, तिने स्वतःची इच्छा ही ‘ईश्वरी ‘संकल्पा’मध्ये मेळविली (merging) तर व्यक्तीच्या अहंकाराचा अंत होतो आणि व्यक्तीला वैश्विक चेतनेमध्ये व्यापकता प्राप्त होते किंवा विश्वातीत असलेल्या गोष्टीमध्ये तिचे उन्नयन होते. व्यक्तीला ‘प्रकृती’पासून ‘पुरुषा’चे विलगीकरण अनुभवास येते आणि बाह्य प्रकृतीच्या बेड्यांपासून व्यक्तीची सुटका होते. व्यक्तीला तिच्या आंतरिक अस्तित्वाची जाणीव होते आणि बाह्यवर्ती अस्तित्व हे साधन असल्याचे जाणवते; ‘विश्वशक्ती’च व्यक्तीचे कार्य करत असल्याची आणि ‘आत्मा’ किंवा ‘पुरुष’ त्याकडे पाहात असल्याची किंवा तो साक्षी असून, मुक्त असल्याचे व्यक्तीला जाणवते. आपले कर्म हाती घेऊन, विश्व‘माता’ किंवा परम‘माता’च ते करत असल्याचे, किंवा हृदयापाठीमागून एक ‘दिव्य शक्ती’ त्या कर्माचे नियंत्रण करत आहे, किंवा ते कर्म करत आहे, असे व्यक्तीला जाणवते.

व्यक्तीने स्वतःची इच्छा आणि कर्म अशा रीतीने सतत ‘ईश्वरा’प्रत निवेदित केली तर, प्रेम आणि भक्ती वृद्धिंगत होते, चैत्य पुरुष पुढे येतो. ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘शक्ती’प्रत निवेदन केल्यामुळे, ती शक्ती आपल्या ऊर्ध्वस्थित असल्याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो. आणि तिच्या अवतरणाची आणि उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या चेतनेप्रत व ज्ञानाप्रत आपण उन्मुख होत आहोत अशी जाणीव आपल्याला होऊ शकते.

सरतेशेवटी कर्म, भक्ती आणि ज्ञान एकत्रित येतात आणि आत्मपरिपूर्णत्व शक्य होते; त्यालाच आम्ही ‘प्रकृतीचे रूपांतरण’ असे संबोधतो. अर्थातच हे परिणाम काही एकाएकी होत नाहीत, व्यक्तीची परिस्थिती आणि तिचा विकास यांनुसार, ते कमीअधिक धीमेपणाने, कमीअधिक समग्रतेने दिसून येतात.

ईश्वरी साक्षात्कारासाठी कोणताही सोपा राजमार्ग नाही. सर्वंकष आध्यात्मिक जीवनासाठी ‘गीता’प्रणीत ‘कर्मयोग’ मी अशा रीतीने विकसित केला आहे. तो कोणत्याही अनुमानावर आणि तर्कावर आधारलेला नाही तर, तो अनुभूतीवर आधारलेला आहे. त्यामधून ध्यान वगळण्यात आलेले नाही आणि त्यातून भक्तीदेखील नक्कीच वगळण्यात आलेली नाही. कारण ‘ईश्वरा’प्रत आत्मार्पण, ‘ईश्वरा’प्रत स्वतःच्या सर्वस्वाचे निवेदन हा जो ‘कर्मयोगा’चा गाभा आहे, तोच मूलतः भक्तीचा देखील एक मार्ग आहे.

एवढेच की, जीवनापासून पलायन करू पाहणाऱ्या एकांतिक अशा ध्यानाला तसेच, स्वतःच्याच आंतरिक स्वप्नामध्ये बंदिस्त होऊन राहणाऱ्या भावनाप्रधान भक्तीला मात्र पूर्णयोगाची समग्र प्रक्रिया म्हणून स्वीकारण्यात आलेले नाही. एखादी व्यक्ती तास न् तास ध्यानामध्ये पूर्णपणे गढून जात असेल किंवा आंतरिक अविचल आराधना आणि परमानंदामध्ये तास न् तास निमग्न होत असेल, तरीसुद्धा या गोष्टी म्हणजे समग्र पूर्णयोग नव्हे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 216-218)

साधना, योग आणि रूपांतरण – २१९

चेतना ईश्वराप्रत खुली करणे, अधिकाधिकरित्या आंतरिक चेतनेमध्ये राहून, तेथून बाह्य जीवनावर कार्य करणे, आंतरतम असणाऱ्या चैत्य पुरुषाला (psychic) पुढे आणणे आणि त्याच्या शक्तीने अस्तित्वाचे अशा रीतीने शुद्धीकरण आणि परिवर्तन घडविणे की ज्यामुळे ते अस्तित्व रूपांतरणासाठी सज्ज होऊ शकेल आणि ‘दिव्य ज्ञान’, ‘दिव्य संकल्प’ आणि ‘दिव्य प्रेम’ यांच्याशी एकत्व पावू शकेल, हे पूर्णयोगाचे पहिले ध्येय आहे.

योगिक चेतना विकसित करणे म्हणजे, अस्तित्वाचे त्याच्या सर्व स्तरांवर वैश्विकीकरण करणे, ब्रह्मांड-पुरुषाविषयी आणि ब्रह्मांड-शक्तींविषयी (cosmic being and cosmic forces) जागृत होणे, आणि ‘अधिमानसा’पर्यंतच्या (Overmind) सर्व स्तरांवर ‘ईश्वरा’शी एकत्व पावणे, हे पूर्णयोगाचे दुसरे ध्येय आहे.

‘अधिमानसा’च्या पलीकडे असणाऱ्या, अतिमानसिक चेतनेद्वारे (supramental consciousness), परात्पर ‘ईश्वरा’च्या (transcendent Divine) संपर्कात येणे, चेतनेचे व प्रकृतीचे अतिमानसिकीकरण घडविणे आणि गतिशील अशा ‘दिव्य सत्या’च्या साक्षात्कारासाठी तसेच त्या सत्याच्या पार्थिव-प्रकृतीमधील रूपांतरकारी अवतरणासाठी स्वतःला त्याचे एक साधन बनविणे, हे पूर्णयोगाचे तिसरे ध्येय आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 20)

साधना, योग आणि रूपांतरण – २१७

चैत्य पुरुष (psychic being) अग्रस्थानी आणा आणि मन, प्राण व शरीरावर त्याची सत्ता चालवीत त्याला तिथे सुस्थिर करा. ज्यामुळे चैत्यपुरुष त्याच्या एकाग्र अभीप्सेची, विश्वासाची, श्रद्धेची आणि समर्पणाची शक्ती त्या तिघांपर्यंत पोहोचवू शकेल. आणि प्रकृतीमधील अनुचित असे जे काही आहे, जे ‘प्रकाश’ आणि ‘सत्य’ यांपासून दूर जाऊन, अहं व प्रमादाकडे वळले आहे त्याचा थेट आणि तात्काळ बोध तो चैत्यपुरुष मन, प्राण व शरीराला करून देऊ शकेल.

सर्व प्रकारचे अहंकार काढून टाका; तुमच्या चेतनेच्या प्रत्येक गतिविधीमधून ते अहंकार काढून टाका. वैश्विक चेतनेचा विकास करा. अहं-केंद्रित दृष्टिकोन विशालतेत, निर्व्यक्तिकतेत (impersonality), वैश्विक ‘ईश्वरा’च्या जाणिवेत, वैश्विक शक्तींच्या बोधात, वैश्विक आविष्काराच्या, (ईश्वरी) लीलेच्या आकलनात आणि साक्षात्कारात लीन होऊ द्या.

जीवात्मा हा ‘ईश्वरी’ अंश असतो, ‘जगन्माते’पासून त्याची उत्त्पत्ती झालेली असते आणि तो आविष्करणाचे साधन असतो. (तुमच्या) अहंने ज्याची जागा घेतली आहे तो जीवात्मा शोधून काढा. ‘ईश्वरा’चा अंश असल्याची आणि त्याचे एक साधन असल्याची जाणीव ही सर्व अभिमानांपासून, अहंच्या जाणिवेपासून किंवा त्याच्या हक्कापासून, श्रेष्ठतेच्या आग्रहीपणापासून, मागणी वा इच्छावासानांपासून मुक्त असली पाहिजे. कारण हे सर्व घटक जर तिथे असतील तर, ती खरी गोष्ट नाही असे समजावे. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 333)

साधना, योग आणि रूपांतरण – २१६

चैत्य पुरुष (psychic being) हा हृदयकेंद्राच्या मागे स्थित राहून मन, प्राण आणि शरीराला आधार पुरवत असतो. चैत्य किंवा आंतरात्मिक रूपांतरणामध्ये (psychic transformation) तीन मुख्य घटक असतात.
१) निगूढ अशा आंतरिक मन, आंतरिक प्राण आणि आंतरिक शरीराच्या खुलेपणामुळे (opening), पृष्ठवर्ती मन, प्राण आणि शरीर यांच्या पाठीमागे असलेल्या साऱ्याची व्यक्तीला जाणीव होते.
२) चैत्य पुरुषाच्या किंवा आत्म्याच्या खुलेपणामुळे, चैत्य पुरुष अग्रस्थानी येऊन मन, प्राण आणि शरीर यांचे शासन करतो आणि त्यांना ‘ईश्वरा’कडे वळवितो.
३) समग्र कनिष्ठ अस्तित्व आध्यात्मिक सत्याप्रत उन्मुख होते, या शेवटच्या गोष्टीला परिवर्तनाचा आंतर-आध्यात्मिक भाग (The psycho-spiritual part) असे म्हणता येईल.

आंतरात्मिक रूपांतरण हे व्यक्तीला तिच्या व्यक्तिगततेच्या अतीत, वैश्विकतेमध्ये घेऊन जाऊ शकते. एवढेच काय पण, गुह्य (occult) उन्मुखतासुद्धा वैश्विक मन, वैश्विक प्राण आणि वैश्विक जडभौतिकाशी व्यक्तीचा संबंध प्रस्थापित करते. अंतरात्म्याला सर्व जीवनाशी, सृष्टीशी (all existence) असलेल्या संपर्काची जाणीव असते. त्याला ‘आत्म्या’ची एकात्मता सर्वत्र अनुभवास येते, त्याला वैश्विक प्रेम आणि इतर साक्षात्कारांची प्रचिती येते आणि ती त्या अंतरात्म्यास वैश्विक चेतनेकडे घेऊन जाते.

परंतु हा सर्व ऊर्ध्वस्थित असणाऱ्या आध्यात्मिकतेस उन्मुख झाल्याचा परिणाम असतो. आणि तो परिणाम मन, प्राण व शरीरामध्ये आध्यात्मिक प्रकाशाचे आणि सत्याचे प्रतिबिंब पडल्यामुळे किंवा त्या प्रकाशाचा आणि सत्याचा मन, प्राण व शरीरामध्ये अंतःप्रवेश झाल्यामुळे घडून येतो. जेव्हा व्यक्ती मनाच्या पलीकडे चढून जाते आणि तेथे राहून, वरून सर्वांचा कारभार चालवू लागते तेव्हा मूलभूत आध्यात्मिक रूपांतरणास (spiritual transformation) सुरुवात होते किंवा ते रूपांतरण शक्य होते.

आंतरात्मिक रूपांतरणामध्येसुद्धा व्यक्ती एक प्रकारे मन, प्राण आणि शरीर यांच्या अतीत जाऊ शकते आणि परत येऊ शकते परंतु शिखरस्थानी असलेल्या चेतनेमध्ये म्हणजे जेथे ‘अधिमानसा’चे स्थान असते तेथे, मानवी मनाच्या वर असणाऱ्या इतर स्तरांमध्ये, व्यक्ती अजूनपर्यंत स्थित झालेली नसते. जेव्हा सृष्टीच्या दोन गोलार्धांमध्ये असणारे किंवा कनिष्ठ आणि ऊर्ध्व गोलार्ध यांच्यामध्ये असणारे झाकण, आच्छादन दूर केले जाते आणि ‘अधिमानसा’च्या ऐवजी ‘अतिमानस’ जेव्हा सृष्टीची चालकशक्ती बनते तेव्हा अतिमानसिक रूपांतरण (supramental transformation) घडून येणे शक्य असते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 332-333)

साधना, योग आणि रूपांतरण – २१२

आंतरात्मिकीकरण (psychisation) आणि आध्यात्मिकीकरण (spiritualisation) या दोन्हींमध्ये फरक आहे. आध्यात्मिकीकरणामध्ये होणारे परिवर्तन हे वरून अवतरित होते, तर आंतरात्मिकीकरणामध्ये होणारे परिवर्तन हे अंतरंगामधून घडून येते. आंतरात्मिकीकरणामध्ये मन, प्राण आणि शरीर यांच्यावर अंतरात्म्याचे वर्चस्व निर्माण होते आणि त्यातून हे परिवर्तन घडून येते.

*

तुम्ही पत्रामध्ये वर्णन केलेल्या दोन्ही भावना योग्य आहेत. त्यातून साधनेमधील दोन आवश्यकतांचे सूचन होते.

त्यातील एक आवश्यकता म्हणजे अंतरंगात प्रवेश करायचा आणि चैत्य पुरुष (psychic being) व बाह्यवर्ती प्रकृती यांच्यामधील अनुबंध पूर्णत: खुला करायचा.

दुसरी आवश्यकता म्हणजे ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ‘दिव्य शांती, शक्ती, प्रकाश, आनंद’ यांच्याप्रत उन्मुख व्हायचे आणि त्यांच्यामध्ये आरोहण करायचे आणि प्रकृतीमध्ये व शरीरामध्ये त्यांचे अवतरण घडवून आणायचे.

वरील दोन्ही प्रक्रियांपैकी, म्हणजे आंतरात्मिक किंवा आध्यात्मिक प्रक्रियांपैकी कोणतीच प्रक्रिया एकमेकींशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही. आध्यात्मिक आरोहण आणि अवतरण घडून आले नाही तर प्रकृतीचे आध्यात्मिक रूपांतरण होऊ शकणार नाही. आणि संपूर्ण आंतरात्मिक खुलेपण आले नाही आणि चैत्य पुरुष व बाह्यवर्ती प्रकृती यांच्यामध्ये अनुबंध निर्माण करण्यात आला नाही तर ‘रूपांतरण’ परिपूर्ण होऊ शकणार नाही.

या दोन प्रक्रियांमध्ये विसंगती नाही. काही जण आंतरात्मिक (चैत्य) रूपांतरणापासून सुरुवात करतात तर काहीजण आध्यात्मिक रूपांतरणापासून सुरुवात करतात. तर काही जण दोन्ही रूपांतरणास एकत्रितपणे सुरुवात करतात. दोन्हीसाठी आस बाळगायची आणि गरजेनुसार आणि प्रकृतीच्या कलानुसार श्रीमाताजींच्या शक्तीला कार्य करू द्यायचे हा सर्वोत्तम मार्ग आहे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 380, 383)

साधना, योग आणि रूपांतरण – २११

मी ‘चैत्य पुरुषाच्या रूपांतरणा’विषयी कधीही काही सांगितलेले नाही तर मी नेहमीच, ‘प्रकृतीच्या आंतरात्मिक रूपांतरणा’विषयी (psychic transformation) लिहिले आहे की जी अगदी भिन्न गोष्ट आहे. मी कधीकधी प्रकृतीच्या आंतरात्मिकीकरणाविषयी (psychisation) लिहिले आहे. चैत्य अस्तित्व हा उत्क्रांतीमधील, मनुष्यामध्ये असणारा ‘ईश्वरा’चा अंश असतो. आणि म्हणून चैत्य अस्तित्वाचे आंतरात्मिकीकरण (psychisation) हे व्यक्तीला सद्यकालीन उत्क्रांतीच्या अतीत घेऊन जाणार नाही मात्र ‘ईश्वरा’कडून किंवा ‘उच्चतर प्रकृती’कडून जे काही येते त्याला प्रतिसाद देण्यास ते व्यक्तीला सक्षम बनवेल. आणि असुर, राक्षस, पिशाच्च किंवा व्यक्तीमधील पशुता किंवा दिव्य परिवर्तनाच्या मार्गामध्ये अडथळा बनून उभ्या ठाकणाऱ्या कनिष्ठ प्रकृतीच्या कोणत्याही अट्टहासाला प्रतिसाद देण्यापासून ते व्यक्तीला परावृत्त करेल.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 380-381)