चैत्य अस्तित्वाचा श्रीमाताजींना आलेला पहिला अनुभव त्या त्यांच्या एका निकटवर्ती शिष्याला सांगत आहेत. तो अनुभव असा – मला तो अनुभव इ.स. १९१२ साली आला. पुढील सर्व वाटचालीसाठी आधारभूत असणारा हा पहिला अनुभव आहे. परंतु ह्या अनुभवापर्यंत पोहोचायला मला संपूर्ण एक वर्ष लागले. मी खाता-पिता, उठता-बसता ‘आंतरिक अस्तित्वाशी एकत्व’ हा एकच ध्यास घेतला होता. मला दुसरे तिसरे काही नको होते. मी सतत त्याचाच विचार करत असे, आणि तेव्हाच एक मजेशीर गोष्ट घडली.

ती नववर्षाच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ होती. मी संकल्प केला होता, “येत्या वर्षात हे नक्की घडलेच पाहिजे.” मी आमच्या स्टुडिओमध्ये होते. त्या स्टुडिओतून बाहेर पडल्यावर समोर अंगण होते. मी सहज म्हणून दार उघडून बाहेर आले, समोर पाहते तो मला उल्कापात होताना दिसला. असे म्हणतात की, तारा निखळून पडत असताना, तुम्ही जर मनात कोणतीही इच्छा बाळगलीत तर ती वर्षाच्या आत खरी होते, आणि मी तसेच केले. तो तारा दिसेनासा व्हायच्या आत मी म्हटले, “आंतरिक अस्तित्वाशी एकत्व..”

आणि खरोखरच, डिसेंबर महिन्याच्या आत मी आंतरिक अस्तित्वाशी एकत्व पावू शकले होते. त्या काळी, आंतरिक अस्तित्वाशी एकरूप व्हायचा मी खूप प्रयत्न करत असे. अगदी रस्त्याने चालत असतानासुद्धा तोच ध्यास असे. मी सतत एकाग्र राहण्याचा प्रयत्न करत असे..ते खूप दुःखदायक असे.. खूप त्रास होत असे. जणू काही मी बंद दरवाजापुढे बसलेली असावे असे ते भासायचे…

पण एके दिवशी मात्र, अचानक, दरवाजा उघडला गेला. आणि नंतर, ती अनुभूती काही तासच नव्हे, तर काही दिवस टिकून राहिली होती.. तो चैत्य पुरुष सर्व काही जाणतो, तोच संकल्प करतो, तोच जीवनाचे नियमन करतो…ही जाणीव झाली आणि नंतर ती जाणीव मला कधीच सोडून गेली नाही..

– श्रीमाताजी (Mothers agenda Vo13 : 0ctober 30, 1962)

एक जण मानवी एकतेचा प्रचार करण्यासाठी जगप्रवास करीत होता. मीरा जपानमध्ये असताना, तिची त्या व्यक्तीशी टोकियो येथे भेट झाली. “अमुक अमुक झाले तर किती बरे होईल? प्रत्येकजण सुखी होईल, प्रत्येक जण दुसऱ्याला समजून घेऊ शकेल, कोणीही कोणाशी भांडणार नाही.” अशा कल्पनेचा प्रचार करीत तो जगभर हिंडत असे. लोक त्याला त्याचे नाव विचारत, तेव्हा तो सांगत असे, “मी टॉलस्टॉय.”

लोक अचंबित होऊन विचारत, “ओ, तुम्हीच का ते टॉलस्टॉय?” बिचाऱ्या लोकांना माहीत नव्हते की ‘लिओ टॉलस्टॉय’ आता हयात नाहीत. लोकांना वाटत असे, व्वा ! आपण किती भाग्यवान ! आपल्याला खुद्द टॉलस्टॉय भेटले.

मीरेने त्यास विचारले, “पण ही मानवी एकता कशी साध्य करावयाची?”

तो म्हणाला, “ते तर अगदीच सोपे आहे. प्रत्येकजण एकच भाषा बोलेल, प्रत्येक जण एकाच प्रकारचा पोषाख परिधान करेल, प्रत्येक जण सारखेच जीवन जगेल, प्रत्येक जण सारख्याच प्रकारचे जेवण करेल, अगदी सोपे आहे.”

मीरा म्हणाली, “तर मग ही अशी एकता फारच भयंकर असेल.” पण तो ऐकून घेण्याच्या मनःस्थितीतच नव्हता. मीरा मग पुढे काही बोललीच नाही. कारण मीराला काय म्हणायचे होते ते त्याला समजण्याच्या पलीकडचे होते.

वरील तथाकथित मानवी एकतेचे प्रचारक सुविख्यात रशियन साहित्यिक ‘लिओ टॉलस्टॉय’ नव्हते तर तो होता त्यांचा एक मुलगा! आणि मीरा म्हणजे ‘मीरा अल्फासा’ अर्थात श्रीमाताजी.

श्रीमाताजी तेव्हा त्याला जे सांगू इच्छित होत्या ते ‘मानवी एकते’चे श्रीमाताजींच्या मनातील चित्र आज साकारू पाहत आहे ‘ऑरोविल’च्या रूपात!

श्रीअरविंद एकांतवासात असताना, श्रीअरविंदांचे १९२६ ते १९५० या कालावधीमध्ये एकही छायाचित्र काढण्यात आले नाही. आणि नियतीची योजना कशी असते पाहा; १९५० साली म्हणजे ज्यावर्षी श्रीअरविंदांनी देह ठेवला त्यावर्षी श्री. कार्टिअन ब्रेसन हे सुप्रसिद्ध छायाचित्रकार आश्रमात आले होते. आश्रमात आल्यानंतर त्यांनी श्रीमाताजींना श्रीअरविंदांचे छायाचित्र घेण्याविषयी परवानगी मागितली. श्रीमाताजींनी मला बोलावून सांगितले, “मी श्री. ब्रेसन यांना छायाचित्र काढण्याची परवानगी दिली आहे. त्यांना काय लागेल ती मदत कर. त्यांना काय हवंनको ते बघ.”

श्री. ब्रेसन यांनी ‘दर्शना’चे छायाचित्र घेतले. श्रीमाताजींनी त्यांना सांगितले होते की, छायाचित्र घेताना फ्लॅशलाईटचा वापर करावयाचा नाही. बिचारे ब्रेसन! फ्लॅशलाईटशिवाय त्यांना छायाचित्र घेणे भाग पडले. त्या काळात कॅमेऱ्याच्या तितक्या प्रगत लेन्सेस नव्हत्या. ब्रेसन श्रीमाताजींना म्हणाले, “या इतक्या मंद प्रकाशात छायाचित्र घेण्याएवढे आपले तंत्रज्ञान अजून प्रगत झालेले नाही ह्याचे मला खरंच खूप वाईट वाटतेय. पण मी माझ्या परीने प्रयत्न करतो.”

‘दर्शना’चे छायाचित्र काढून झाल्यानंतर ‘श्रीअरविंद त्यांच्या खोलीतील नेहमीच्या खुर्चीत बसलेले आहेत’ हे छायाचित्र काढण्यासाठी आम्ही त्यांच्या खोलीत गेलो. श्रीअरविंद बसलेले आहेत, श्री.ब्रेसन छायाचित्र काढत आहेत, ते श्रीअरविंदांना सांगत आहेत, तुमची मान थोडी अशी करा, थोडे इकडे पाहा, थोडे तिकडे पाहा, इ. इ. आणि ह्या सर्व घटनेचा मी एकटाच साक्षीदार होतो, खूप छान अनुभव होता तो!

छायाचित्र काढून झाल्यानंतर श्री. ब्रेसन मला असे म्हणाले कि, “अजिबात हालचाल न करता किंवा दहा मिनिटांत एकदासुद्धा पापणी न हलवता छायाचित्रासाठी बसून राहिलेले असे मॉडेल मी उभ्या आयुष्यात कधी पाहिले नाही.”

लेखक – श्री. उदार
(One of Mother’s Children : pg.22 – लेखक श्री. उदार)

श्रीअरविंद त्यांच्या आजीआजोबांविषयीची एक गोष्ट सांगत असत.

त्यांची आजी एकदा म्हणाली, “देवाने हे इतके वाईट जग का बनविले आहे? मी जर त्याला भेटू शकले तर तो भेटल्यावर त्याच्याविषयी मला काय वाटते ते मी त्याला सांगणार आहे.”

त्यावर आजोबा म्हणाले, “हो बरोबर आहे. पण देवाने अशी नामी व्यवस्था करून ठेवली आहे की, जोवर तुमच्यामध्ये अशा व इतर प्रकारच्या कोणत्याही इच्छा शिल्लक आहेत तोवर तुम्ही त्याच्याजवळ जाऊच शकत नाही.”

– श्रीअरविंद
(Evening talks with Sri Aurobindo)

श्रीमाताजी एक आठवण सांगत आहेत : जेव्हा मी पॅरिसमध्ये राहत असे तेव्हा मी सर्व प्रकारच्या स्नेहमेळाव्यांना जात असे; लोक वेगवेगळी संशोधने करत असत; आध्यात्मिक (तथाकथित आध्यात्मिक), गूढवादी संशोधनं इ. जिथे चालत असत तिथे मी जात असे.

एका तरुण स्त्रीला भेटण्यासाठी मला निमंत्रित करण्यात आले होते. मला वाटते ती स्वीडिश तरुणी होती; तिला ज्ञानप्राप्तीची, नेमके सांगावयाचे तर शिकण्याची एक पद्धत सापडली होती. ती तिने आम्हाला समजावून सांगितली. आम्ही तिघीचौघी जणी होतो. तिचे फ्रेंच काही तितकेसे बरे नव्हते; पण ती जे काही सांगत होती त्याविषयी तिला बऱ्यापैकी खात्री होती.

ती म्हणाली, “हे बघा, तुम्ही कोणतीही एक वस्तु घ्या; किंवा फळ्यावर कोणतेही एक चिन्ह काढा किंवा एखादे चित्र काढा. – ते काही तितकेसे महत्त्वाचे नाही – तुम्हाला जे काही सोयीचे आहे ते घ्या. समजा, उदाहरणादाखल मी तुमच्यासाठी हे चित्र काढते.. (तिच्यापाशी फळा होता.) हं तर मी चित्र काढले आहे.”

तिने एक अर्धभौमितिक असे चित्र काढले. ”आता, तुम्ही या चित्रासमोर बसा आणि तुमचे सर्व लक्ष या चित्रावर एकवटा – हे जे चित्र तुमच्यासमोर आहे त्यावर तुमचे लक्ष एकवटा. तुमच्या जाणिवेमध्ये त्या चित्राशिवाय दुसरे काहीही येऊ देऊ नका – केवळ तेच तुमच्या जाणिवेमध्ये असू दे.”

तुमचे डोळे त्या चित्रावरच खिळलेले असतात आणि तुम्ही तुमची नजर अजिबात हटवत नाही. तुम्ही जणू काही त्या चित्राने संमोहित झाल्यासारखे असता. तुम्ही पाहता, तुम्ही पाहता, पाहता, पाहता… काहींना कमी अधिक वेळ लागतो, पण ज्याला त्याची सवय आहे त्याच्याबाबतीत हे काहीसे लगेच घडून येते. तुम्ही पाहत राहता, पाहता, पाहता आणि एकाएकी तुम्ही ज्या चित्राकडे पाहत असता ते चित्रच तुम्ही बनून जाता. त्या चित्राविना या जगामध्ये दुसरे काही जणू शिल्लकच राहात नाही आणि तेव्हा एकाएकी तुम्ही दुसऱ्या बाजूला जाता; आणि जेव्हा तुम्ही त्या दुसऱ्या बाजूला जाता तेव्हा तुमचा एका नवीनच चेतनेमध्ये प्रवेश झालेला असतो आणि तुम्हाला ज्ञान होते. हे सारे अद्भुत होते, त्यामुळे आम्ही खूप हसलो. पण हे काहीसे खरे आहे. सराव करण्याजोगी ही एक चांगली पद्धत आहे.

अर्थात, एखादे चित्र किंवा एखादी वस्तु घेण्याऐवजी तुम्ही एखादी कल्पना, काही शब्द घेऊ शकता. तुम्हाला भेडसावणारी एखादी समस्या असते, आणि तुम्हाला त्या समस्येचे उत्तर माहीत नसते. तुम्ही ती समस्या वस्तुनिष्ठपणे मांडा, ती अगदी नेमकी, अचूक मांडा. शक्य असेल तितक्या संक्षिप्त शब्दांमध्ये मांडा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा, प्रयत्न करा. तुम्ही केवळ शब्दांवर लक्ष केंद्रित करता पण शक्य असेल तर ते शब्द ज्याचे प्रतिनिधित्व करतात त्या कल्पनेवर लक्ष केंद्रित करा, म्हणजे त्या समस्येवर लक्ष केंद्रित करा. जोवर दुसरे काही शिल्लकच उरणार नाही तोवर त्यावर लक्ष केंद्रित करा. आणि हे खरे आहे, एकाएकी, तुमच्यामध्ये काहीतरी खुलेपणाची भावना निर्माण होईल आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला असाल. दुसरी बाजू पण कशाची?

ह्याचा अर्थ असा की, तुम्ही तुमच्या जाणिवेचे एक द्वार उघडलेले असते. आणि तुम्हाला ताबडतोब तुमच्या समस्येची उकल होते.

‘व्यक्तीने स्वत:शी एकात्म कसे पावावे’ हे शिकण्याची ही एक उत्तम पद्धत आहे.

– श्रीमाताजी
(CWM 05 : 218-219)

मी जेव्हा प्रथमच भारतात जपानच्या बोटीतून आले, त्या बोटीवर दोन पाद्री होते. ते दोघेही भिन्न पंथांचे होते. रविवारचा धार्मिक कार्यक्रम कोणी करावयाचा ह्यावरून त्या दोघांमध्ये भांडणे सुरु झाली. बऱ्याच वेळाने त्यापैकी एकाने माघार घेतली, दुसऱ्याने कार्यक्रमाला सुरुवात केली. बोटीवर हा कार्यक्रम जिथे होणार होता तिथे जाण्यासाठी खाली उतरून जावयाचे होते. मला वाटते, तेव्हा आम्ही लाल समुद्रातून प्रवास करीत होतो. त्या दिवशी खूप उकाडा होता, पण सर्वांनी जाकीटे घातली होती, टाय लावले होते, चामडी बूट घातले होते, डोक्यावर टोप्या घातल्या होत्या, हातामध्ये बायबल ग्रंथ धरलेला होता. सगळे जण तयार होऊन रांगेने जणू काही मिरवणूकच निघाली असावी अशा रीतीने त्या ठिकाणी गोळा झाले. बोटीवरचे जवळपास सर्व लोक त्यामध्ये मोठ्या धार्मिकतेने सहभागी झाले. प्रार्थना संपली आणि लगेचच कोणी बारमध्ये, कोणी पत्ते खेळण्यामध्ये, कोणी काही तर कोणी काही करण्यामध्ये गुंगून गेले.

नंतर ते पाद्री माझ्यापाशी आले आणि म्हणाले, “तुम्ही प्रार्थनेला आला नाहीत?”

मी म्हटले, “माझा धर्मावर विश्वास नाही.”

ते म्हणाले,”अच्छा! म्हणजे तुम्ही जडवादी आहात तर!”

मी म्हटले,”नाही, अजिबात नाही. मी तुम्हाला काही सांगितले तर तुम्ही नाराज व्हाल, त्यापेक्षा न बोलणेच बरे.”

त्यांनी खूप आग्रह केल्यावर मी त्यांना सांगितले,”तुम्ही आणि इतर लोकही प्रामाणिक आहेत असे मला वाटत नाही. तुम्ही केवळ एक सामाजिक कर्तव्य व सामाजिक प्रथा म्हणून प्रार्थना केलीत, त्यामध्ये ईश्वराशी संपर्क साधण्याचा कोणताही भाव नव्हता.”

ते म्हणाले, “पण ते तर आम्हाला जमत नाही.”

मी म्हणाले, “म्हणूनच तर मी तेथे आले नाही. कारण मला त्यात स्वारस्य वाटत नाही.”

– श्रीमाताजी

(CWM 08:149)

(एका आश्रमवासी साधकाने सांगितलेली ही आठवण.)

मी तेव्हा आश्रमात नुकताच राहिला आलो होतो. दुपारी एका आश्रमवासी साधकाने संभाषणाच्या ओघात मला सांगितले की, “काही लोकांना वाटते की मोठमोठे ग्रंथ वाचणे, प्रवचने ऐकणे, तासनतास ध्यानधारणा करणे म्हणजे साधना. परंतु मी म्हणतो की, जर तुम्हाला श्रीमाताजी काय आहेत हे खरोखरी जाणून घ्यावयाचे असेल, तर त्यांच्यासाठी तुम्ही काम केले पाहिजे, तरच तुम्हाला त्यांच्या शक्तिस्रोताचा प्रत्यय येईल.” त्याच्या या शब्दांचा माझ्या मनावर फारच परिणाम झाला आणि श्रीमाताजींसाठी काम करावयाचे असे मी मनोमन ठरवून टाकले.

नंतर सुमारे एका वर्षानंतरची गोष्ट. माझ्या सोबत एक पगारी कामगार आणि एक मुलगा होता. कामगार होता, तो होता तंत्रज्ञ. आणि मी होतो अगदीच नवीन, मदतनीस मुलाचे काम असावयाचे ते शिडी इकडून तिकडे हलविण्याचे, तो मुलगा बरेच दिवस गैरहजर असायचा. त्याच्या गैरहजेरीत ‘शिडी हलविण्यासारखे क्षुल्लक काम मी का करावे’ या भावनेने तंत्रज्ञ त्याला हातदेखील लावत नसे. अशाने कामाचा खोळंबा होऊ लागला, तेव्हा मी श्रीमाताजींना सुचविले, “आम्हाला दुसरा एक मदतनीस मुलगा देता का?”

त्या म्हणाल्या, “शिडी उचलायला अजून कोणाची मदत कशास पाहिजे? तुम्ही दोघे मिळून एक शिडी उचलू शकत नाही?” नाही म्हटले तरी ‘मी त्यांचा वरिष्ठ आहे’ असा एक भाव माझ्याही मनात होताच. पण श्रीमाताजींचे म्हणणे मान्य करावयाचे मी ठरविले.

दुसऱ्या दिवशी मदतनीसाची वाट न पाहता मी एकटाच शिडी हलवू लागलो. हे पाहून नाईलाजाने का होईना, पण त्या कामगारानेही शिडी उचलण्यास हातभार लावला. अशाप्रकारे, आपल्या सहकाऱ्यांकडून काम कसे करवून घ्यावयाचे ह्याचा धडाच श्रीमाताजींनी मला दिला होता.

श्रीअरविंदांच्या राजकीय कार्याने प्रभावित होऊन, क्रांतिकारक कार्य करण्याची परवानगी घेण्याच्या हेतूने, त्यांना पाँँडिचेरी येथे प्रथमच भेटावयास गेलेल्या श्री.अंबालाल पुराणी यांनी सांगितलेली ही हकिकत :

श्रीअरविंदांनी मला माझ्या साधनेविषयी विचारले.

मी म्हणालो, “साधना वगैरे ठीक आहे पण जोवर भारताला स्वातंत्र्य प्राप्त होत नाही तोवर मला इतर कशावरही लक्ष केंद्रित करणे अवघड आहे.”

तेव्हा श्रीअरविंद म्हणाले, “कदाचित भारताला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी क्रांतिकार्याची आवश्यकता भासणार नाही. जर भारत त्याशिवायच स्वतंत्र होणार असेल तर तुम्ही साधनेवर, योगावर लक्ष का केंद्रित करत नाही? भारताचा स्वातंत्र्य मिळविण्याचा निर्धार पक्का झाला आहे आणि त्यामुळे त्या उद्दिष्टपूर्तीसाठी झटणारे पुष्कळ जण मिळतील पण योगाची हाक सर्वांनाच येत नाही. आणि जर तुम्हाला ती हाक आली आहे तर तुम्ही योगसाधनेवर लक्ष केंद्रित करणे योग्य नाही का?”

तेव्हा मी म्हणालो, “पण गेली दोन वर्षे माझे सारे लक्ष स्वातंत्र्यप्राप्तीकडे लागलेले आहे. ते मिळाल्याशिवाय मला सुखाची झोपदेखील लागणार नाही.”

माझ्या मन:चक्षूसमोर होते, एकेकाळी ज्यांनी भारतामध्ये प्रथमच संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होते ते श्री. अरविंद घोष. आणि तेच श्रीअरविंद आता पाँडिचेरीला योगसाधनेमध्ये निमग्न होते. श्रीअरविंद दोनतीन मिनिटांसाठी स्तब्ध झाले होते, मग त्यांनी विचारले, ”भारत स्वतंत्र होणार आहे अशी खात्री तुम्हाला देऊ केली तर?”

तेव्हा मी म्हणालो, “पण मला अशी खात्री कोण देऊ शकेल?”

श्रीअरविंद माझ्याकडे पहात म्हणाले, “समजा मी दिली तर?”

मी म्हणालो, “जर तुम्ही मला खात्री दिलीत तर मी मान्य करेन.”

तेव्हा ते गंभीरपणे म्हणाले, “मग मी तुम्हाला खात्री देतो की, भारत स्वतंत्र झालेला असेल.”

दोन दिवसांनंतर पुन्हा एकदा मी त्यांना विचारले, “खरंच तुम्हाला खात्री आहे?”

तेव्हा श्रीअरविंद गंभीर झाले आणि खिडकीतून पलीकडच्या अवकाशात पहात राहिले. नंतर माझ्याकडे पाहून समोरील टेबलावर आपली मूठ आपटत ते म्हणाले, “उद्याच्या उगवणाऱ्या सूर्याइतकेच हे निश्चित आहे. निर्णय केव्हाच झाला आहे, तो प्रत्यक्षात उतरायला आता फार काळ लागणार नाही.”

आमची ही भेट झाली ते साल होते इ.स. १९१८. मी त्यांना वंदन करून शांतपणे बाहेर पडलो. दोन वर्षांनंतर प्रथमच मला सुखाची झोप लागली होती. *

श्रीअरविंदांनी जेव्हा बडोद्यामधील प्राध्यापकपदाची नोकरी सोडून दिली तेव्हा साहजिकच त्यांच्या विद्यार्थ्यांना खूप वाईट वाटले. पण एक आनंदही होता की, त्यांचे आवडते शिक्षक हे आता देश पातळीवरील नेते बनलेले होते. श्री. कन्हैयालाल मुन्शी हे या विद्यार्थ्यांमधील एक होते. भारतीय संस्कृतीची पुनस्थापना करण्याच्या हेतूने त्यांनी पुढील काळात भारतीय विद्या भवन’ची स्थापना केली.

मुन्शी विद्यार्थिदशेत असताना त्यांनी, प्राध्यापक श्रीअरविंद घोष यांना एक प्रश्न विचारला होता, “राष्ट्रवादाची भावना कशी विकसित करता येईल?”

श्रीअरविंदांनी भिंतीवरील भारताच्या नकाशाकडे निर्देश करीत म्हटले, “या नकाशाकडे पाहा. यामध्ये भारतमातेचे रूप पाहण्याचा प्रयत्न करा. शहरं, पर्वतराजी, नद्या, जंगले यासाऱ्यांनी मिळून तिचा देह तयार होतो. या देशामध्ये राहणारी माणसं म्हणजे या देहातील जिवंत पेशी आहेत. आपले साहित्य म्हणजे तिची स्मृती व वाणी आहे. तिच्या संस्कृतीचा गाभा हा तिचा आत्मा आहे. मुलांच्या आनंदामध्ये आणि स्वातंत्र्यामध्ये तिची मुक्ती आहे. भारत ही एक जितीजागती माता आहे या भावाने तिच्याकडे पाहा, तिचे ध्यान करा आणि नवविधा भक्तीच्या योगाने तिचे पूजन करा.”

……ह्याच मुन्शीजींनी आपल्या साहित्यातून, वेदकाळातील सरस्वती नदीच्या किनारी वसणाऱ्या आर्यांचे जीवन चित्रित केले आहे. चाळीस वर्षांनंतर मुन्शीर्जीची श्रीअरविंदांशी पुन्हा भेट झाली. तेव्हा मुन्शीर्जीना श्रीअरविंदांचे पूर्णत: वेगळे रूप दिसून आले. ते रूप कसे होते ह्याचे वर्णन त्यांनी केले आहे, ” मी ज्यांचा मनोमन दूरून आदर करत असे ते माझे शिक्षक आता माझ्या समोर नव्हते, किंवा ज्यांच्या शिकवणुकीचा जीवनामध्ये मला वेळोवेळी उपयोग झाला होता ते मुनीवर्यही माझ्या दृष्टीसमोर नव्हते तर समोर एक एकसंध, परिपूर्ण व्यक्तिमत्त्व होते. आसक्ती, प्रकोप, आणि भीती यांचे परिवर्तन शक्ती, सौंदर्य आणि शांतीमध्ये झाले होते. आर्य संस्कृतीची सारभूत कल्पनाच जणू मानवी रूपात मूर्त झाली होती.”

(Mother’s Chronicles, Book Five by Sujata Nahar)

(आश्रमातील एक साधक श्री.पूजालाल यांच्या आठवणींमधून…)

पहाटेचे पाच वाजले होते. नेहमीप्रमाणे, मी त्या पवित्र वास्तुत गेलो, जेथे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी रहात. मला त्या घराच्या काही भागाच्या साफसफाईचे काम करण्याची मुभा देण्यात आली होती. मी जेव्हा तेथे कामाला जात असे तेव्हा श्रीमाताजी स्वत: दार उघडायला येत असत आणि माझ्या आनंददायी कामाची सुरुवात होत असे. पण एके दिवशी दार उघडल्यावर, श्रीमाताजी तेथेच उभ्या राहिल्या आणि श्रीअरविंदांचा संदर्भ देत, मला त्यांनी दिवसभर अतिशय काळजीपूर्वक आणि शांतपणे काम करण्यास सांगितले; जेणेकरून मधल्या मोठ्या दरवाजाच्या वरच्या बाजूला विसावलेल्या चिमणीला त्रास होऊ नये.

हा जणु परमेश्वरी आदेशच आहे असे समजून, मी सावधगिरीने वागेन अशी त्यांना हमी दिली. मी आत प्रवेश केला आणि मग श्रीमाताजी निघून गेल्या. कोणताही आवाज न करता, अगदी हलक्या पावलाने मी त्या दरवाजासमोरून गेलो आणि आश्चर्याची व आनंदाची बाब म्हणजे ती चिमणी सर्वात वरच्या बाजूला अगदी शांतपणे, निस्तब्ध बसलेली होती. मी थक्क झालो.

आमचे दिव्य गुरु किती करुणामय आहेत ! ते रात्री त्या हॉलमध्ये फेऱ्या मारीत असत. तेव्हा त्यांनी त्या छोट्या पाखराला नेहमीच शांततामय असणाऱ्या त्या वातावरणात, रात्रीची विश्रांती घेत असलेले पाहिले.
त्यांच्या करुणार्द्र दृष्टीचा लाभ केवळ आम्हा मनुष्यप्राण्यांनाच होत होता असे नव्हे, तर त्यांच्या वैश्विक हृदयामध्ये लहान आणि मोठे अशा साऱ्यांनाच प्रेमाचे स्थान होते. खरोखरीच, आपण सारे भाग्यवान आणि ही पृथ्वीही भाग्यवान की, जिच्यामध्ये दिव्य गुरु, विश्वाचा स्वामी मूर्त रूपात वास करीत आहे; आपल्या उच्च स्थानावरून त्याने आमच्यासाठी कायमस्वरूपी कृपाछत्र धरले आहे आणि आपल्या प्रेममयी हृदयाच्या खोलीमध्ये त्यांनी आम्हाला आसरा दिला आहे.

– श्री.पूजालाल
(Reminiscences of Pujalal : Pg 80)