(”ईश्वराकडून जे काही तुम्हाला प्राप्त झाले होते त्यावर लक्ष केंद्रित न करता, तुम्ही ते व्यर्थ जागी खर्च केलेत आणि त्यामुळे तुम्ही ते गमावून बसलात,” असे श्रीमाताजींनी एका साधकाला सांगितले. ते ऐकल्यावर तो साधक चिंतनमग्न झाला. तेव्हाचा त्याचा तो अनुभव तो साधक पुन्हा श्रीमाताजींना सांगत आहे…)

साधक : तुमचे उत्तर ऐकल्यावर मी गंभीर झालो आणि मला असे वाटले की, मी निदान आजतरी शांत, निश्चल-नीरव (silent) राहिले पाहिजे. पण निश्चल-नीरवतेचे काही क्षण गेल्यानंतर माझ्यामधीलच दुसरा एक भाग मला सांगू लागला की, “ही काही खरी निश्चल-नीरवता नाहीये, त्यामध्ये फारसा आनंद व उत्साह नाहीये. त्यामुळे ती निश्चल-नीरवता नसून, ते प्राणाचे असमाधान आहे.” आणि मग मला असे वाटले की, दुसरा भाग जे सांगत आहे ते बरोबर आहे.

श्रीमाताजी : दोन्ही गोष्टी काही अंशी बरोबर आणि काही अंशी चुकीच्या आहेत. अवतरित होणारी शक्ती निश्चल-नीरवतेमध्ये, एकाग्रतापूर्वक ग्रहण करणे कधीही योग्यच, परंतु प्राणाला त्याच्या लहरीप्रमाणे वागू न दिल्यामुळे त्याचा जो त्रागा होतो त्यातून, ती नीरवता किंवा एकाग्रता आलेली असता कामा नये. तसेच ही एकाग्रता आणि निश्चल-नीरवता फक्त शांतिमयच असणे पुरेसे नाही तर त्यामध्ये एक प्रकारचा अतिशय उत्कट आनंदही असला पाहिजे. असे असेल तर ती एकाग्रता, ती निश्चल-नीरवता ही खरी आणि विशुद्ध आहे, असे तुम्ही गृहीत धरायला हरकत नाही.

– श्रीमाताजी (CWM 17 : 54)

 

फक्त ध्यानामुळेच प्रकृतीमध्ये परिवर्तन होऊ शकते असा आमचा अनुभव नाही किंवा दैनंदिन कर्मव्यवहार आणि बाह्य व्यापार यांच्यापासून निवृत्त होऊन जे परिवर्तन घडवून आणू पाहत आहेत त्यांनाही त्यापासून फार लाभ झाला आहे असे दिसत नाही. किंबहुना अनेक उदाहरणांमध्ये तर ते हानिकारकच ठरले आहे.

प्रकृतीमध्ये परिवर्तन करण्यासाठी काही विशिष्ट प्रमाणात एकाग्रता, हृदयामध्ये आंतरिक अभीप्सा आणि श्रीमाताजींच्या उपस्थितीप्रत चेतनेचे खुलेपण आणि ऊर्ध्वस्थित शक्तीकडून होणारे अवतरण या गोष्टींची आवश्यकता असते. कर्माविना प्रकृतीचे खऱ्या अर्थाने परिवर्तन होऊ शकत नाही. परिवर्तनानंतर लोकांच्या संपर्कामध्ये आल्यावरच त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये (खरंच) परिवर्तन झाले आहे की नाही याची खरी कसोटी लागते.

व्यक्ती कोणत्याही प्रकारचे काम करत असू दे, त्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असे काहीही नसते. श्रीमाताजींना अर्पण केली जाणारी आणि त्यांच्यासाठी व त्यांच्या शक्तिनिशी केली जाणारी सर्व कर्मं एकसमान (मोलाची) असतात.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 252)

ईश्वराकडे जाण्याचा ‘ध्यान’ हा एक मार्ग आहे, तो महान मार्ग आहे; पण तो जवळचा मार्ग (short cut) आहे, असे म्हणता येणार नाही. कारण, जरी तो खूप उच्च स्तरावर घेऊन जाणारा असला, तरीही तो बहुतेकांसाठी खूप लांबचा आणि अवघड मार्ग असतो. ध्यानामुळे जोवर ईश्वरी शक्तीचे अवतरण (descent) घडून येत नाही तोवर, तो जवळचा मार्ग आहे असे कदापिही म्हणता येणार नाही; आणि तसे झाल्यानंतरही फक्त पायाच तेवढा लवकर रचला जातो; पण नंतर त्यावर ध्यानाद्वारे मोठ्या परिश्रमाने एक भव्य इमारत उभारावी लागते. ध्यान अगदी आवश्यक असते; पण ध्यान हा जवळचा मार्ग आहे असे काही म्हणता येणार नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 212)

 

(अगदी बारीकसारीक आध्यात्मिक अनुभवामुळे हुरळून जाणाऱ्या नवोदित साधकांना श्रीमाताजी सांगत आहेत…)

तुम्हाला ईश्वरी अवतरणाचा दाब (pressure) पेलायचा असेल तर तुम्ही खूप सुदृढ, शक्तिशाली असले पाहिजे, नाहीतर तुम्ही विखरून जाल. काही लोकांनी मला असे विचारले, “ईश्वर अजून अवतरित का होत नाही?” तर त्याचे कारण, “अजून तुम्ही (त्याच्या अवतरणासाठी) तयार नाही,” हे आहे. ईश्वराच्या अवतरणाचा एखादा अल्पांश जर तुम्हाला गायला, नाचायला आणि आनंदातिशयाने आरडाओरड करायला लावत असेल तर, तो पूर्णत: अवतरला तर काय होईल?

म्हणूनच आम्ही सांगत असतो की, ज्या लोकांकडे शरीर, प्राण आणि मन यांच्यामध्ये एक भक्कम, सुस्थिर आणि विशाल पाया नसेल त्यांनी ईश्वरी शक्ती खेचू नये. याचे कारण अशा व्यक्ती ते अवतरण पेलू शकणार नाहीत. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ”ईश्वरी शक्ती खाली ओढण्याचा प्रयत्न करू नका त्याऐवजी, शांती आणि स्थिरता धारण करून त्या शक्तीच्या अवतरणाची प्रतीक्षा करा.”

परंतु ज्यांच्याकडे आवश्यक असा पाया आहे, अधिष्ठान आहे त्यांना आम्ही सांगतो की, ”अभीप्सा बाळगा आणि ईश्वरी शक्ती शक्य तितकी अधिकाधिक मिळविण्याचा प्रयत्न करा.” कारण अशा व्यक्तीच विचलित न होता, ईश्वराकडून अवतरित होणाऱ्या शक्ती ग्रहण करू शकतील.

– श्रीमाताजी (CWM 03 : 11)

 

 

“तुम्ही ईश्वरी शक्तीसमोर खुले व्हा म्हणजे तुम्हाला ईश्वरी शक्ती प्राप्त होईल,” असे तुम्हाला सांगण्यात आले आहे. तुम्हाला असेसुद्धा सांगण्यात आले आहे की, “श्रद्धा आणि सद्भावना बाळगा म्हणजे मग तुम्ही सुरक्षित राहाल.” खरोखरच तुम्ही दिव्य चेतनेमध्ये, दिव्य शक्तीमध्ये, दिव्य संरक्षणामध्ये न्हाऊन निघत आहात आणि जेवढ्या प्रमाणात तुमच्या ठायी श्रद्धा असेल आणि जेवढे तुम्ही स्वतःला खुले करू शकाल तेवढ्या प्रमाणात वरील गोष्टी तुम्हाला प्राप्त होतील. छोट्याछोट्या आंतरिक क्षोभाच्या गोष्टींना नकार देण्यासाठी आणि या गोष्टी उद्भवल्याच तर पुन्हा एक सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांचे तुम्हाला साहाय्य लाभते. तुमच्याबाबतीत ज्या कोणत्या दुर्घटना घडू शकल्या असत्या किंवा जे बारीकसारीक हल्ले होऊ शकले असते त्या सगळ्यापासून तुमचे संरक्षण करण्यासाठी आणि तुम्हाला आरोग्यसंपन्न ठेवण्यासाठीसुद्धा त्यांचे तुम्हाला साहाय्य लाभते.

पण जर तुमच्या अस्तित्वामध्ये, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये, किंवा तुमच्या प्राणामध्ये किंवा तुमच्या मनामध्ये, अनेक घटकांमध्ये किंवा अगदी एखाद्या भागामध्येदेखील जर अवतरित होणाऱ्या शक्तीस ग्रहण करण्याची क्षमता नसेल तर, यंत्रामध्ये एखादा बारीकसा वाळूचा कण अडकला तर तो चालत्या कामात जशी खीळ घालू शकतो, तसे घडून येते. म्हणजे एखादे चांगले यंत्र अतिशय सुरळीतपणे चालू असते, सारे काही सुरळीत चालू असते आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये एखादा बारीकसा वाळूचा कण टाकलात (फार मोठा नाही, अगदी एखादा छोटासा कण) तर, अचानक त्यामध्ये काहीतरी बिघाड होतो आणि यंत्र एकाएकी बंद पडते. त्याचप्रमाणे तुमच्यामध्ये कोठेतरी ग्रहणशीलतेचा थोडासा जरी अभाव असेल, तुमच्यामधील कोणता तरी एखादा घटक ईश्वरी शक्तीचा स्वीकार करण्यास अक्षम असेल तर, म्हणजे तो पूर्णपणे मिटलेला असेल तर, त्यातून ताबडतोब एक प्रकारचा मोठा असमतोल निर्माण होतो. म्हणजे तो भाग कोठेतरी एखाद्या छोट्याशा काळ्या डागासारखा झालेला असतो. तो अगदी छोटासा असला तरी दगडासारखा कठीण असतो. ईश्वरी शक्ती ग्रहण करण्यास तो नकार देतो; म्हणजे एकतर ती शक्ती त्याला ग्रहण करता येत नाही किंवा ती त्याला ग्रहण करायची इच्छा नसते. कारण काहीही असो पण त्यामुळे ईश्वरी शक्ती त्याच्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. आणि जी गोष्ट ऊर्ध्वदिशेने प्रगत होत होती, जी अतिशय उत्कृष्ट रितीने बहरून येत होती, ती एकाएकी कोमेजून जाते. कधीकधी तर तुम्ही अगदी नेहमीप्रमाणे संतुलित स्थितीत असता, तुमची तब्येत उत्तम असते, सारे काही सुरळीत चालू असते, तक्रार करण्यास कोठे जागाच नसते अशा वेळीसुद्धा कधीकधी असे घडून येऊ शकते.

एखाद्या दिवशी तुम्हाला एखादी अभिनव कल्पना सुचलेली असते, एक नवीन उर्मी आलेली असते, तुमच्यामध्ये काहीतरी करण्याची उत्कट आस असते आणि त्यासाठी तुम्हाला महान शक्ती लाभलेली असते, एखादा उत्कृष्ट अनुभव तुम्हाला आलेला असतो, त्या सुंदर अनुभवाने तुमची आंतरिक द्वारं खुली केलेली असतात, पूर्वी नसलेले असे काही नवीनच ज्ञान तुम्हाला प्राप्त झालेले असते, जेव्हा तुम्हाला अशी खात्री असते की सारे काही व्यवस्थित चालू आहे…

मात्र अगदी पुढच्याच दिवशी, तुम्ही आजारी पडता. आणि मग तुम्ही म्हणता, “हे काय? पुन्हा तेच? अशक्य आहे हे! हे असे घडता कामा नये.” पण हे असे घडलेले असते याचे कारण मी आत्ता तुम्हाला सांगितले तेच असते – वाळूचा एक बारीकसा कण! तुमच्यामध्ये असे काहीतरी होते की जे ग्रहण करण्यास अक्षम ठरले. त्यातूनच ताबडतोब असंतुलन निर्माण झाले. ती गोष्ट अगदी आंशिक असली तरी तेवढीदेखील पुरेशी असते. परिणामतः तुम्ही आजारी पडता.

– श्रीमाताजी (CWM 05 : 176)

(एका साधकाला स्वप्नामध्ये जे दिसले आहे त्यावरून दिव्य प्रकाश स्वीकारण्यासाठी तो सक्षम आहे असे दिसते, असे श्रीअरविंदांनी येथे म्हटले आहे. त्या साधकाला उद्देशून पत्रामध्ये काय मजकूर लिहावा ते श्रीअरविंद साहाय्यकाला सांगत आहेत.)

तुम्ही ‘क्ष’ ला असे सांगू शकता की, योगसाधनेमध्ये मुख्यत्वे करून दोन पायऱ्या असतात. एक असते पूर्वतयारीची पायरी आणि दुसरी पायरी म्हणजे प्रत्यक्ष तीव्र, उत्कट साधना. त्याने पहिल्या पायरीपासून सुरुवात करण्यास हरकत नाही असे त्याला कळवावे.

पहिल्या पायरीवर असताना, हृदयामध्ये प्रार्थनेसह अभीप्सा, भक्ती, ध्यान, जीवन ईश्वरार्पण करण्याचा संकल्प या गोष्टी महत्त्वाच्या असतात. प्रकृतीचे शुद्धीकरण हे पहिले उद्दिष्ट असले पाहिजे. आध्यात्मिक अनुभव यावेत यासाठी अति-आतुरता, उतावीळपणा असता कामा नये. मात्र जे अनुभव येतील त्यांचे निरीक्षण केले पाहिजे. योग्य दृष्टिकोनासाठी आणि खऱ्या उन्नतीसाठी जर ते अनुभव उपयोगी पडणारे असतील तर त्यांचा स्वीकार केला पाहिजे. पण ज्यामुळे अहंकार कुरवाळला जाईल किंवा पोसला जाईला अशा सर्व गोष्टींना (जाणीवपूर्वक) नकार दिला पाहिजे.

प्रगती संथगतीने होत असली किंवा मार्गामध्ये अनेक अडचणी आल्या तरीसुद्धा (साधकामध्ये) अधीरता असता कामा नये. त्याने सर्व गोष्टी ‘दिव्य मातेवर’ पूर्ण भरवसा ठेवून आणि स्थिरचित्ताने व धीराने केल्या पाहिजेत. हा कालावधी साधकाच्या क्षमतेची आणि ईश्वराप्रति असलेल्या त्याच्या अभीप्सेच्या प्रामाणिकपणाची कसोटी घेणारा असतो.

– श्रीअरविंद (CWSA 35 : 551)

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

तुमच्या अडचणींना हाताळण्यात आणि तुमच्यावर अपप्रवृत्तींचा जो हल्ला होत आहे त्यांना हाताळण्यात तुमची काहीतरी चूक होत आहे. त्या वृत्ती म्हणजे तुम्ही आहात किंवा त्या वृत्ती तुमच्या स्वत:च्या प्रकृतीचा एक (अविभाज्य) भाग आहेत असे समजण्याची चूक कदाचित तुम्ही करत आहात. खरेतर तुम्ही त्यांच्यापासून स्वतःला दूर केले पाहिजे, वेगळे केले पाहिजे आणि त्यांच्याशी असलेले संबंध तोडून टाकले पाहिजेत. (तुमचा ताबा घेऊ पाहणाऱ्या) या गोष्टी म्हणजे वैश्विक कनिष्ठ, अपूर्ण आणि अशुद्ध प्रकृतीच्या, शक्तींच्या गतिविधी आहेत आणि तुमच्यामध्ये प्रवेश करून, त्या त्यांच्या अभिव्यक्तीसाठी तुम्हाला त्यांच्या हातचे बाहुले बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, या दृष्टीने तुम्ही त्यांच्याकडे पाहिले पाहिजे.

अशा रितीने तुम्ही स्वतःला त्यांच्यापासून वेगळे केल्यामुळे, त्यांच्याशी असलेला संबंध तोडून टाकल्यामुळे, तुम्हाला तुमच्यामधील एका घटकाचा, म्हणजे तुमच्या आंतरिक अस्तित्वाचा किंवा चैत्य पुरुषाचा (psychic being) शोध लागू शकेल आणि त्याच्या अधिकाधिक सान्निध्यात राहून जीवन जगणे तुम्हाला शक्य होईल. हा जो तुमच्यामधील घटक असतो त्याच्यावर अपप्रवृत्तींचा पगडा पडू शकत नाही किंवा त्याच्यावर त्यांचा हल्लादेखील होऊ शकत नाही. त्या बाहेरून आल्या आहेत असे त्याच्या लक्षात येते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांना संमती देण्यास तो नकार देतो. हा चैत्य पुरुष नेहमीच ईश्वरी शक्तींच्या आणि उच्चतर चेतनेच्या प्रतलांच्या दिशेने वळलेला असतो किंवा त्यांच्या संपर्कात असतो. तुमच्या अस्तित्वामधील तो घटक शोधून काढा आणि त्यामध्ये राहून जीवन जगण्याचा प्रयत्न करा. तसे करता येणे हा योगाचा खरा पाया आहे.

अशा रितीने अंतरंगात राहिल्यामुळे, पृष्ठवर्ती संघर्षापासून मागे होऊन, तुम्हाला एक अविचल स्थिती लाभणे सोपे जाईल. हल्ला करणाऱ्या त्या वृत्तींपासून तुमची सुटका करावी म्हणून तुम्ही तेथून, आमच्या साहाय्यासाठी अधिक प्रभावी रितीने आवाहन करू शकाल.

ईश्वरी उपस्थिती, स्थिरता, शांती, विशुद्धता, शक्ती, प्रकाश, हर्ष, व्यापकता या सर्व गोष्टी ऊर्ध्वस्थित आहेत आणि त्या तुमच्यामध्ये अवतरित होण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत. अंतरंगात असणारी ही अविचलता शोधून काढा. तसे केल्यास तुमचे मनदेखील अधिक अविचल, शांत होईल आणि अशा अविचल मनाच्या माध्यमातून तुम्ही प्रथम विशुद्धता व शांती आणि त्यानंतर ईश्वरी शक्तीला अवतरणासाठी आवाहन करू शकाल.

ही शांती व विशुद्धता तुमच्यामध्ये अवतरित होत आहे असे जर तुम्हाला जाणवले तर, या गोष्टी सुस्थिर होईपर्यंत तुम्ही त्यांना पुन्हा पुन्हा आवाहन करू शकता. त्यानंतर, तुमच्या वृत्तींमध्ये परिवर्तन घडविण्यासाठी आणि तुमच्या चेतनेचे रूपांतरण घडविण्यासाठी, ईश्वरी शक्ती तुमच्यामध्ये कार्यरत आहे याची जाणीव तुम्हाला होईल. या कार्यामध्ये तुम्हाला श्रीमाताजींच्या उपस्थितीची आणि त्यांच्या शक्तीची जाणीव होईल. एकदा का हे असे घडून आले की, उर्वरित सगळ्या गोष्टी या काळावर आणि तुमच्या खऱ्या व दिव्य प्रकृतीच्या तुमच्यामधील प्रगतिशील उत्क्रांतीवर अवलंबून असतात.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 741)

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

‘शक्तीला प्रवेश करू द्या,’ असे मी जेव्हा तुम्हाला लिहिले तेव्हा त्याचा अर्थ असा होता की, तुम्ही ती शक्ती खेचण्याची आवश्यकता नाही, मात्र तुमच्या संपूर्ण अभीप्सेद्वारे आणि सहमतीद्वारे तुम्ही तिच्या प्रवेशाला हातभार लावला पाहिजे.

*

अतिमानसिक प्रकाश ‘हटातटाने’ खाली आणणे, खाली खेचणे हे निश्चितच चुकीचे आहे. अतिमानस ही बलपूर्वक मिळविण्याची गोष्ट नाही. योग्य वेळ येईल तेव्हा ते स्वतःहून आपोआप उमलून येईल. पण हे घडून येण्यापूर्वी, बरेच काही करावे लागेल आणि ते धीराने, कोणतीही घाईगडबड न करता करावे लागेल.

*

चक्कर येणे, दुर्बलता किंवा अस्वस्थता या गोष्टी असता कामा नयेत. तुमच्यामध्ये अशी लक्षणे आढळत आहेत याचा अर्थ असा की, शरीराकडून आत्मसात केल्या जाणाऱ्या शक्तीपेक्षा, अधिक शक्ती (Force) शरीरामध्ये खेचली जात आहे. अशा वेळी, अडथळा निघून जाईपर्यंत आणि योग्य संतुलन निर्माण होईपर्यंत, तुम्ही विश्रांती घेतली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 480-481)

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून…)

‘क्ष’ हा अवाजवी तामसिक, अक्रिय झाला आहे. तो प्रत्येक गोष्टीलाच खुला झाला आहे आणि त्यामुळे त्याच्यातील शक्ती खर्च होत आहे. व्यक्तीने फक्त ईश्वरी शक्तीप्रत अक्रिय (passive) राहिले पाहिजे. (म्हणजे व्यक्तीने ईश्वरी शक्तीच्या तिच्यामध्ये चालू असलेल्या कार्यास कोणताही विरोध करता कामा नये.) परंतु हे करत असताना, आपण (नकळतपणाने बऱ्यावाईट अशा) सर्वच शक्तींच्या दयेवर तर विसंबून राहत नाही ना, याबाबतही तिने दक्ष राहिले पाहिजे.

दुसऱ्या व्यक्तीमध्ये ईश्वर पाहण्याचा प्रयत्न करत असताना जेव्हा ‘क्ष’ अक्रिय होतो तेव्हा, त्या व्यक्तीच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या कोणत्यातरी अन्य (निम्न) शक्तीच्या तो अधीन झाला असण्याची आणि परिणामतः त्याची स्वतःची शक्ती त्या दुसऱ्या व्यक्तीमध्ये खर्ची पडली असण्याची शक्यता आहे. ‘क्ष’ ने असा प्रयत्न करू नये हे अधिक बरे! त्याने वरून येणाऱ्या दिव्य शांतीसाठी व दिव्य सामर्थ्यासाठी तसेच संपूर्ण विशुद्धतेसाठी आस बाळगावी आणि स्वतःला केवळ ईश्वरी शक्तीप्रतच खुले करावे. मग, कोणत्यातरी अमुक एखाद्या व्यक्तीमध्येच नव्हे तर, सर्वत्रच ईश्वराची जाणीव होत आहे, अशा प्रकारचे अनुभव त्याला आपोआप येऊ लागतील.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 492-493)

 

आपल्यामधील अहंपुरुष (ego person) हा स्वतःच्या ताकदीने किंवा इच्छाशक्तीने किंवा ज्ञानाने स्वतःचे रूपांतरण करू शकत नाही किंवा स्वतःच्या एखाद्या गुणाद्वारेसुद्धा तो स्वतःच्या प्रकृतीचे दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतरण करू शकत नाही. तो एकच गोष्ट करू शकतो आणि ती म्हणजे तो स्वतःला रूपांतरणासाठी सुपात्र बनवू शकतो आणि तो जे बनण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच्याप्रत तो स्वतःचे अधिकाधिक समर्पण करू शकतो.

जोपर्यंत आपल्यामध्ये अहं सक्रिय असतो, तोपर्यंत आपली वैयक्तिक कृती ही नेहमीच प्रकृतीच्या दृष्टीने, अस्तित्वाच्या कनिष्ठ पातळीवरील श्रेणीचा एक भाग म्हणूनच राहणार आणि ती कृती नेहमी अंधकारयुक्त किंवा अर्ध-प्रकाशित, तिच्या क्षेत्रापुरतीच सीमित आणि ऊर्जेच्या दृष्टीने फक्त आंशिकरित्याच परिणामकारक ठरणार.

आपल्या प्रकृतीमध्ये फक्त प्रकाशमान सुधारणा नव्हे तर, खरेखुरे आध्यात्मिक रूपांतरण करून घ्यायचे असेल तर, हे अद्भुत कार्य घडून यावे यासाठी आपण दिव्य शक्तीस आवाहन केलेच पाहिजे. कारण रूपांतरणासाठी आवश्यक असणारे निर्णायक, सर्व-प्रज्ञावान आणि असीम असे बल फक्त त्या ‘दिव्य शक्ती’कडेच असते.

– श्रीअरविंद (CWSA 23 : 86)