(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

व्यक्तीमध्ये दिव्य शक्तीचे अवतरण हे सहसा, त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर कार्य करण्यासाठी आणि हृदयामध्ये ईश्वरी उपस्थितीची जाणीव व्हावी या दृष्टीने व्यक्तीची तयारी करून घेण्यासाठी होत असते. जे अवतरित होणार आहे ते धारण करता यावे यासाठी आधी मानवी प्रकृतीमधील बऱ्याच गोष्टींमध्ये परिवर्तन होणे आवश्यक असते. व्यक्तीचे मन अक्षम असते; ते सीमित, मर्यादित असते. व्यक्तीच्या हृदयामध्ये आणि इतर घटकांमध्ये पुरेशी विशुद्धता नसते, त्यांच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता असते. (यासारख्या अनेक गोष्टींमध्ये परिवर्तन होणे आवश्यक असते.) होणारे अवतरण धारण करण्यासाठी अविचल मन आणि विशुद्ध हृदय यांची आवश्यकता असते.

आणि म्हणूनच ‘क्ष’ या साधिकेला तिच्यामध्ये असलेली अस्वस्थता जाणवत आहे, तिला तिच्या अक्षमतेची जाणीव होत आहे. हा असा अनुभव बहुतेक सगळ्यांनाच येतो. तिला प्रगतीसाठी जर पुढची वाटचाल करायची असेल तर तिने तिच्या मानसिक व भावनिक अस्तित्वामध्ये स्थिरता, शांती, विशुद्धता इत्यादी गोष्टींची आस बाळगली पाहिजे आणि तिच्यामध्ये ज्या गोष्टींचे अवतरण होत आहे त्या गोष्टी स्थिरस्थावर होऊ दिल्या पाहिजेत.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 488)

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

विचारी मनाच्या (thinking mind) माध्यमातून ईश्वरी शक्तीचे ग्रहण करणे शक्य होणार नाही असे तुम्हाला का वाटते? व्यक्ती ज्याप्रमाणे प्राणाद्वारे, भावनिक अस्तित्वाद्वारे, शरीराद्वारे ईश्वरी शक्तीचे ग्रहण करू शकते, तशीच ती विचारी मनाच्या माध्यमातूनसुद्धा शक्तीचे ग्रहण करू शकते. विचारी मनदेखील प्राण आणि शरीराइतकेच सक्षम असते. अस्तित्वाच्या इतर घटकांप्रमाणेच विचारी मनाचेसुद्धा रूपांतरण करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी त्याला ईश्वरी शक्ती कशी ग्रहण करायची याचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असते. ते दिले गेले नाही तर विचारी मनाचे रूपांतरण शक्य होणार नाही.

शरीराची तामसिकतेने झाकोळलेली, मूढ, बाधक असणारी चेतना ही जशी आध्यात्मिक अनुभवामधील अडथळा ठरते किंवा प्राणाची सुसंस्कारित न झालेली सामान्य कृती ही जशी अडथळा ठरते; अगदी त्याचप्रमाणे बुद्धीची अज्ञानग्रस्त कृती ही देखील आध्यात्मिक अनुभवामधील अडथळा ठरते. त्यामुळे साधकाला पुढील गोष्टींची जाणीव असली पाहिजे.

• पहिली गोष्ट म्हणजे त्याने मानसिक संकल्पना किंवा संस्कार किंवा बौद्धिक निष्कर्ष या गोष्टींना साक्षात्कार समजण्याची चूक करता कामा नये.

• दुसरी गोष्ट म्हणजे मनाची चंचलता, अस्वस्थता. त्यामुळे आंतरात्मिक (psychic) आणि आध्यात्मिक (spiritual) अनुभवाच्या उत्स्फूर्त अचूकतेमध्ये बाधा निर्माण होते. आणि त्यामुळे प्रकाशित करणाऱ्या खऱ्या ज्ञानाच्या अवतरणाला वावच दिला जात नाही किंवा मग, या ज्ञानाचा मानवी मानसिक स्तराला स्पर्श झाल्याबरोबर किंवा पूर्णपणे तो स्पर्श होण्याआधीच, त्या ज्ञानामध्ये विकार निर्माण होतो. (म्हणून या गोष्टी घडू नयेत यासाठी साधकाने खबरदारी घेतली पाहिजे.)

…बुद्धी जर समर्पित झाली; ती जर खुली, अविचल, ग्रहणशील झाली तर, ती प्रकाश ग्रहण करण्याचे माध्यम किंवा आध्यात्मिक अवस्थेच्या अनुभवाला व आंतरिक परिवर्तनाच्या पूर्णतेला साहाय्यक का बरे होऊ शकणार नाही?

– श्रीअरविंद (CWSA 31 : 13-14)

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

तुम्ही आध्यात्मिक साधनेच्या बाबतीत फक्त स्व-बळावर विसंबून राहायचे ठरविले तर तुम्ही काहीच करू शकणार नाही, हे अगदी खरे आहे. आणि म्हणूनच, तुम्ही स्वतःसाठी जे करू शकत नाही ते तुमच्यासाठी केले जावे यासाठी, तुम्ही ऊर्ध्वस्थित असणाऱ्या ईश्वरी शक्तीच्या संपर्कात आले पाहिजे. तुम्ही एकच गोष्ट केली पाहिजे आणि ती म्हणजे त्या ईश्वरी शक्तीला तुमच्यामध्ये कार्य करण्यास वाव दिला पाहिजे तसेच तुम्ही (विरोधी शक्तीची बाजू न घेता) ईश्वरी शक्तीच्या पक्षात राहिले पाहिजे. याचा अर्थ असा की, तुमची तिच्यावर श्रद्धा असली पाहिजे, तुम्ही तिच्यावर विसंबून राहिले पाहिजे. स्वतःला उगाचच कष्टविता कामा नये. तिचे अविचलपणे स्मरण करत राहिले पाहिजे, अविचलपणे तिला आवाहन केले पाहिजे आणि कोणत्याही प्रकारे विचलित न होता, तिला तुमच्यामध्ये तिचे कार्य करू दिले पाहिजे. तुम्ही जर असे केलेत तर, बाकी साऱ्या गोष्टी तुमच्यासाठी केल्या जातील. अर्थात सर्व गोष्टी एकदमच केल्या जातील असे नाही, कारण त्यापूर्वी मार्गातील बऱ्याच अडचणी दूर करणे आवश्यक असते; पण तरीही आवश्यक ते सारे काही सुस्थिरपणाने आणि चढत्या वाढत्या प्रमाणात केले जाईल, (याची खात्री बाळगा.)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 188)

(श्रीमाताजींनी माणसाच्या चिंताग्रस्ततेवरील जो उपाय सांगितला तो आपण कालच्या भागात विचारात घेतला. त्या विवेचनाचा हा पुढचा भाग…)

स्वतःवर अवलंबून राहण्याची जाणीव ही मनुष्याच्या जन्माबरोबर उदयास आली आहे; मात्र त्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान त्याच्यापाशी नसल्यामुळे, कायमचेच क्लेश, त्रास त्याच्या वाट्याला आलेले आहेत. मनुष्य जर त्याच्या स्वतःच्या चेतनेपेक्षा अधिक उच्च असणाऱ्या चेतनेप्रत पूर्णपणे समर्पित होऊ शकला, म्हणजे त्याने स्वतःला जर त्या चेतनेच्या हाती सोपविले आणि त्याच्या काळज्या, चिंता त्या चेतनेच्या हाती सोपविल्या, तसेच स्वतःच्या जीवनाचे मार्गदर्शन करण्याची व सर्व गोष्टींची सुव्यवस्था लावण्याची जबाबदारी त्याने जर त्या चेतनेच्या हाती सोपविली तरच त्याचे सर्व क्लेश, त्रास संपुष्टात येऊ शकतील.

एखादा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञानच जर एखाद्या व्यक्तीकडे नसेल तर, ती व्यक्ती तो प्रश्न सोडवणार तरी कसा? आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की, मनुष्याला वाटते की, त्याच्या जीवनाचे सर्व प्रश्न त्याने स्वतःच सोडविले पाहिजेत. मात्र तसे करण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञान त्याच्यापाशी नसते. ‘मी काय केले पाहिजे?’ हा एक प्रश्न त्याला कायम भेडसावत असतो; त्याच्या पाठोपाठ त्याला जोडून येणारा दुसरा अधिकच गंभीर प्रश्न म्हणजे, ‘उद्या काय होईल कोण जाणे?’ मात्र या प्रश्नांचे उत्तर देण्याची क्षमता त्याच्यापाशी नसते. आणि इथेच सर्व अडचणींचे मूळ आहे. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 304)

(माणसाची चिंताग्रस्तता आणि त्यावरील उपाय याविषयी श्रीमाताजी मार्गदर्शन करत आहेत. त्यातील हा पुढचा भाग…)

आता यापुढे, मनुष्याचे पतन होऊन तो पुन्हा प्राण्याच्या पातळीवर खाली घसरेल आणि त्याने संपादन केलेली चेतना तो गमावून बसेल हे शक्य नाही. आणि म्हणून, त्याच्यापाशी एकच उपाय शिल्लक राहतो. तो ज्या दयनीय परिस्थितीत जीवन जगत आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा आणि जेथे चिंतेची जागा विश्वासपूर्ण समर्पणाने घेतलेली असते व जेथे प्रकाशमान परिणतीची खात्री असते अशा एका उच्चतर स्थितीमध्ये उन्नत होण्याचा एकच मार्ग त्याच्यापाशी उरतो. चेतनेमध्ये (consciousness) परिवर्तन घडवून आणणे हाच तो मार्ग आहे.

खरे सांगायचे तर, ज्याची किल्लीच आपल्यापाशी नाही अशा गोष्टीसाठी आपण जबाबदार असणे, यासारखी दुसरी दयनीय अवस्था नाही. (तशी मनुष्याची अवस्था झाली आहे कारण चिंताग्रस्ततेचा) हा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक असणारे असे एखादे मार्गदर्शक सूत्र मनुष्याच्या हाती नाही. प्राण्यांना कोणतेही प्रश्न पडत नाहीत, ते नुसते जगत असतात. ते उपजत प्रेरणेनुसार जीवन जगत असतात. ते त्यांच्या सामूहिक चेतनेवर विसंबून असतात, या चेतनेकडे उपजत ज्ञान असते. आणि ही सामूहिक चेतना प्राण्यांच्या व्यक्तिगत चेतनेपेक्षा अधिक उन्नत असते. पण ती स्वयंचलित, सहजस्वाभाविक असते. प्राण्याला कोणता एखादा संकल्प करण्याची किंवा तो प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते. प्राणी सहजस्वाभाविकपणे वागत असतात आणि ते कोणतीही काळजी करत बसत नाहीत. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 304)

 

 

(मनुष्यप्राणी या सृष्टीमधील सर्वात दु:खी जीव असला तरी, त्याच्याकडे असलेल्या एका विशेष क्षमतेमुळे तो चिंतामुक्त होऊ शकतो, ती क्षमता कोणती ते श्रीमाताजी येथे सांगत आहेत…)

मनुष्यामध्ये उच्चतर स्तरावर आरोहण करण्याची आध्यात्मिक क्षमता आहे; त्यामुळे तो त्याच्यामध्ये असलेल्या प्राण्याच्या अचेतनेच्या जागी आध्यात्मिक अतिचेतना (super-consciousness) स्थापित करू शकतो. आणि या क्षमतेमुळे, स्वतःच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय आहे आणि त्याने केलेल्या प्रयत्नांची परिणती कशामध्ये होणार आहे हे भविष्यवेधी दृष्टीने पाहण्याची क्षमता त्याच्यामध्ये आली आहे.

एवढेच नव्हे तर, त्याच्यामध्ये उच्चतर आध्यात्मिक शक्तीवर विचक्षण, स्वच्छ दृष्टीने (clear-sighted) विश्वास ठेवण्याची क्षमतादेखील निर्माण झाली आहे. त्या आध्यात्मिक शक्तीप्रत तो स्वतःच्या समग्र अस्तित्वानिशी समर्पित होऊ शकतो. तो स्वतःच्या जीवनाची आणि भविष्याची सर्व जबाबदारी त्या शक्तीवर सोपवून सर्व प्रकारच्या काळज्या, चिंता यांपासून मुक्त होऊ शकतो. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 303-304)

 

(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट करत आहेत. हा भाग काहीसा विस्तृत असल्याने तो क्रमश: देत आहोत.)

मनुष्याकडे जीवन जगत असतानाच स्वतःचे निरीक्षण करण्याची मानसिक क्षमता असल्यामुळे तो इतर प्राण्यांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण ठरतो, हे अगदी उघड आहे. प्राणी सहजस्वाभाविकपणे, आपोआप जीवन जगत असतात. एखाद्या प्राण्याला अपघातामुळे किंवा आजारपणामुळे जरी वेदना सहन कराव्या लागल्या तरी, त्या वेदना तुलनेने कमी असतात. कारण तो प्राणी त्या दुःखाचे निरीक्षण करू शकत नाही किंवा तो स्वतःच्या चेतनेमध्ये त्या वेदनांचे प्रक्षेपण करू शकत नाही किंवा त्यामुळे पुढे काय होईल याची चिंता तो करत बसत नाही. झालेल्या अपघाताविषयी किंवा आलेल्या आजारपणाविषयी तो कोणतेही तर्कवितर्क करत नाही. क्वचित एखाद्या प्राण्याने जीवन जगत असताना समजा स्वतःचे निरीक्षण केलेच तरी, ते नक्कीच अगदी एखाद-दुसरा क्षण इतके किंवा अगदी नगण्य प्रमाणात असणार. म्हणूनच प्राण्यांना कोणतीही चिंता भेडसावत नाही आणि ते शांतपणे जीवन जगू शकतात.

पण मनुष्याच्या जन्माबरोबरच ‘उद्या काय होणार आहे,’ याची एक अखंड चिंता उदयास आली आहे. ही चिंता हे त्याच्या दुःखकष्टाचे एकमेव कारण नसले तरी ते एक मुख्य कारण आहे. स्वतःकडे वेगळे होऊन पाहता येण्याच्या या चेतनेमुळे मनुष्यामध्ये हुरहुर, दुःखदायक कल्पना, चिंता, त्रास, भविष्यातील संकटांची चाहूल या गोष्टी सुरू झाल्या आहेत. आणि त्याचा परिणाम म्हणून बहुतांशी माणसं, – म्हणजे कमी सचेत, सजग (conscious) असणारी माणसंच नव्हेत तर अतिशय सचेत, सजग असणारी माणसंदेखील – कायमच चिंताग्रस्त होऊन जीवन जगत असतात.

मनुष्य एकीकडे इतका सचेत आहे की, तो या सगळ्यापासून अलिप्त राहू शकत नाही आणि दुसरीकडे, उद्या काय घडून येणार आहे हे त्याला निश्चितपणे ज्ञात होईल, एवढाही तो सचेत नाही. खरोखर, पृथ्वीवरच्या सर्व प्राणिमात्रांमध्ये मनुष्य हा सर्वात दुःखीकष्टी प्राणी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मनुष्याला त्याच्या अशा असण्याची सवय झाली आहे; कारण त्याची ही जी अवस्था आहे ती त्याला त्याच्या पूर्वजांकडूनच वारसारूपाने मिळालेली आहे. खरोखरच ही अत्यंत दयनीय अवस्था आहे. (परंतु मनुष्याला आणखी एक क्षमता प्रदान करण्यात आलेली आहे, त्याचा विचार आपण उद्याच्या भागात करू.) (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 303)

 

मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा या सृष्टीच्या निर्मितीमधील शेवटचा टप्पा नाही किंवा मानवी शक्यतेचा देखील तो शेवटचा टप्पा नाही. मानवी मन आज बौद्धिक, वैचारिक मनाच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचले आहे. परंतु या मनाच्या पलीकडे जात मनुष्य हा, उच्च मन (Higher Mind), प्रकाशित मन (Illumined Mind), अंतःस्फूर्त मन (Intuitive Mind), अधिमानस (Overmind) येथपर्यंत जाऊन पोहोचू शकतो,’ असे श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांनी आपल्याला सांगितले आहे. या प्रत्येक स्तरावरील बारकावे त्यांनी उलगडून दाखविले आहेत.

श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या भगीरथ प्रयत्नामुळे अतिमानस-चेतनेचे (Supremental Consciousness) आविष्करण घडून आले. पण व्यापक जनसमूहाला त्याचा लाभ व्हायचा असेल तर, व्यापक जनसमूहाने उच्चतर चेतनेच्या (Higher Consciousness) पातळ्यांवर चढून जाणे आवश्यक आहे.

उच्चतर चेतनेचे मानवी चेतनेवर जे कार्य चालते त्यातील काही पैलूंना आपण उद्यापासून सुरू होणाऱ्या ‘उच्चतर चेतना’ या मालिकेमध्ये स्पर्श करणार आहोत.

संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक