त्रिमुखी सुमेळ
भविष्यात होणाऱ्या बदलांमध्ये हिंदु समाजाने नवीन विश्वात्मक मानदंडाच्या प्रस्थापनेसाठी पुढाकार घ्यावयास हवा. हिंदु असल्यामुळे आपल्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या माध्यमातूनच आपण तो शोध घेण्याचा प्रयत्न करावयास हवा.
आपला स्वत:चा असा एक मानदंड आहे की, जो एकाचवेळी विश्वात्मक आहे आणि व्यक्तिगत असाही आहे. शाश्वत धर्म, हा नेहमीच भारताचा आधार राहिलेला आहे; तो चिरस्थायी असून भारतामध्ये अंगभूत आहे; अशा परिवर्तनशील आणि बहुरूप धारण करणाऱ्या गोष्टीला आपण हिंदुधर्म म्हणतो.
जिथे तुम्ही एखाद्या खडकामध्ये रुतून बसणाऱ्या शिंपल्यासारखे चिकटून राहता, तो धर्म असत नाही; धर्म म्हणजे काय हे समजून न घेता, न पाहता त्यात उडी मारणे हाही धर्म असू शकत नाही.
शाश्वत धर्म म्हणजे आपल्या आंतरिक जीवनामध्ये आणि आपल्या बाह्य अस्तित्वामध्ये, तसेच व्यक्तीप्रमाणेच समाजातदेखील ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे होय. ‘एशा धर्म: सनातन:।’
…..ईश्वर जो मूलतः सच्चिदानंद आहे, त्याचे आविष्करण म्हणजे सत्य, प्रेम, शक्ती होय. जे काही सत्याला आणि वस्तुतत्त्वाला धरून आहे, सुसंगत आहे, ज्या कोणत्या गोष्टीमुळे माणसांमधील प्रेम वाढीस लागते, ज्या कोणत्या गोष्टीमुळे व्यक्तीमध्ये, राष्ट्रामध्ये, वंशामध्ये सामर्थ्य निर्माण होते त्या गोष्टी दैवी होत, हा आहे शाश्वत धर्म आणि हे हिंदु शास्त्र आहे.
एवढे मात्र लक्षात घ्यायला हवे की, ईश्वर हा त्रिमुखी सुमेळ आहे, तो एकमुखी नाही. आपल्या प्रेमाने आपल्याला दुबळे, अंध वा अविवेकी बनविता उपयोगी नाही; आपल्या शक्तिसामर्थ्याने आपल्याला कठोर व कोपिष्ट बनविता कामा नये; आपल्या तत्त्वांनी आपल्याला धर्मांध वा भावविवश बनविता कामा नये.
आपण शांतपणे, धीराने, नि:पक्षपातीपणे विचार करूया; आपण पूर्णपणे, तीव्रतेने पण विवेकीपणे प्रेम करूया; आपण सामर्थ्य, उमदेपणा आणि शक्तीनिशी कार्य करूया. असे करूनसुद्धा जर का आपल्याकडून चुका घडल्याच, तरीही ईश्वर मात्र चूक करत नाही. आपण ठरवितो आणि कृती करतो; ईश्वर त्याचे फळ ठरवितो आणि तो जे काही ठरवितो ते कल्याणकारीच असते.
– श्रीअरविंद
(CWSA 12 : 53-54)
- प्रामाणिकपणा आणि चिकाटी - April 30, 2026
- ईश्वराच्या निवासाचे दरवाजे - April 29, 2026
- अप्रामाणिकपणाचा अडथळा - April 28, 2026




