पाश्चिमात्य बुद्धीला परिचित असलेल्या कोणत्याही व्याख्येने ‘भारतीय धर्मा’चे वर्णन करता येत नाही. समग्रतेने विचार केला तर, भारतीय धर्म हा सर्व प्रकारच्या आध्यात्मिक पूजाअर्चा व अनुभूतींचा सहिष्णू व मुक्त असा समन्वय आहे. एकमेव सत्याकडे हा धर्म सर्व बाजूंनी पाहतो आणि सत्याची कोणतीच बाजू तो त्याज्य मानीत नाही.

या धर्माने स्वतःला कोणतेच विशेष नाव दिले नाही, कोणत्याच मर्यादा घालणाऱ्या वैशिष्ट्याने स्वतःला बांधून घेतले नाही. या धर्मामध्ये जे घटक पंथ, विभाग आहेत त्यांना विभिन्न नावे धारण करावयास त्याने संमती दिली पण ज्या ब्रह्माचा युगानुयुगे तो शोध लावू पाहत आहे त्या ब्रह्माप्रमाणेच तो स्वत: मात्र अनाम, निराकार, विश्वव्यापी व अनंत राहिला आहे.

इतर संप्रदायांपासून वेगळेपणाने ओळखू येतील असे ह्या धर्माला पारंपरिक धर्मग्रंथ आहेत, संस्कार आहेत, प्रतीके आहेत, पण मूलत: त्याच्या अवश्यभावी गुणधर्मानुसार तो एक सांप्रदायिक धर्म नसून, ती एक व्यापक, बहुआयामी, नित्य संघटनशील, नित्य प्रगतिशील, आत्मसंवर्धक अशी आध्यात्मिक संस्कृतीची व्यवस्था आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 20 : 193-195)

श्रीअरविंद