ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

आत्मसाक्षात्कार ही इतिकर्तव्यता?

 

बरेचदा असे होते की, व्यक्ती आत्मशोधासाठी, आत्म्याशी ऐक्य पावण्यासाठी आवश्यक असणारे सर्व आंतरिक प्रयत्न करते आणि आत्म्याने आपल्या जीवनाचे संचालन करावे यासाठी त्याला वावदेखील देते. प्रत्यक्षात व्यक्तीला जेव्हा त्या आत्म्याचा शोध लागतो तेव्हा त्यामुळे एक प्रकारची अद्भुत मोहिनी निर्माण होते. त्याचा परिणाम म्हणून, व्यक्ती अगदी सहज-स्वाभाविकपणे पहिली गोष्ट स्वतःला सागंते ती अशी की, “मला जे हवे होते ते आता मला मिळाले आहे, मला अपरिमित आनंद गवसला आहे.” आणि त्यानंतर आपला कशाशीच काही संबंध नाही अशा प्रकारची एक वृत्ती तिच्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता असते.

वास्तविक, आजवर ज्यांना ज्यांना आत्मशोध लागलेला आहे त्या सर्वांच्या बाबतीत बहुतांशी असेच काहीसे झालेले आहे. एवढेच नव्हे तर, काहींनी या अनुभवावर आधारित साक्षात्काराचे जणू एक तत्त्वज्ञानच तयार केले आणि त्यांनी सांगून ठेवले आहे की, “एकदा का तुम्हाला आत्मशोध लागला की मग सारे काही साध्य झाले. मग करण्यासारखे अन्य काही शिल्लक राहत नाही, तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचलेले असता आणि तोच मार्गाचा अंतिम टप्पा असतो.”

खरंतर, आत्म-साक्षात्कारानंतरची, पुढील वाटचाल करण्यासाठी अपार धैर्याची आवश्यकता असते. एकदा का व्यक्तीला आत्मशोध लागला की मग त्याचा आत्मा निर्भय योद्धा झाला पाहिजे. आपल्या स्वतःच्या आंतरिक हर्षाने आत्मतृप्त होऊन, व्यक्तीने विश्राम घेता कामा नये. इतरांचे दुःख पाहिल्यावर – मी जे प्रयत्न केले आहेत तेच प्रयत्न इतरांनीदेखील केले पाहिजेत, त्यांनी तसे प्रयत्न केले तर एक ना एक दिवस ते सुद्धा (मी प्राप्त करून घेतलेल्या) या अवस्थेला जाऊन पोहोचतील, त्यांनासुद्धा माझ्यासारखाच आंतरिक हर्ष लाभेल, अशी समजूत करून घेऊन – त्या व्यक्तीने स्वसंतुष्ट राहता कामा नये. फार फार तर अशी व्यक्ती स्वतःच्या आंतरिक ज्ञानाच्या अवस्थेमध्ये राहून, ‘महान परोपकारी‌’ वृत्तीने आणि ‘प्रगाढ करुणे‌’ने इतरांना तेथपर्यंत पोहोचण्यासाठी साहाय्य करू शकते. आणि मग जेव्हा प्रत्येकालाच आत्मसाक्षात्कार होईल तेव्हा या जगाचा अंत होईल आणि तसे झाले की, ज्यांना दुःखभोग नकोसे वाटतात त्यांचे दुःखभोग संपतील असे म्हणून, ती व्यक्ती स्वतःची समजूत करून घेऊ शकते. मात्र… येथेच खरी मेख आहे. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 09 : 425-426)

 

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

जीवनाचे खरे उद्दिष्ट

  जीवनाचे खरे उद्दिष्ट काय हे जर व्यक्तीला जाणून घ्यायचे असेल तर, त्या व्यक्तीने अहंकारी…

3 hours ago

आत्मसाक्षात्काराकडून अधिक उच्चतर ध्येयाकडे…

(आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे इतिकर्तव्यता झाली असे मानण्याची एक सहज-प्रवृत्ती आढळून येते, ही गोष्ट श्रीमाताजींनी निदर्शनास…

1 day ago

अभीप्सारूपी अग्नी

  निश्चल-नीरव हृदयामध्ये एक असा दीप तेवत असतो की, जो कधीच विझू शकणार नाही. ईश्वराला…

3 days ago

ईश्वरा‌चे अपयश?

  जे जीव ईश्वरप्राप्तीची अभीप्सा बाळगत नाहीत ते जीव हे ईश्वरा‌चे अपयश असते. परंतु त्यामुळे…

4 days ago

उच्चतर सत्यासाठी कनिष्ठ सत्याचा परित्याग

  जो मनुष्य सत्याच्या शोधासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि सातत्याने परिपूर्ण सत्याच्या अधिकाधिक निकट जावे…

5 days ago

मानवी अस्तित्वाचा संपूर्ण अर्थ

  मनुष्यप्राणी, सामान्यतः जसे जीवन जगतो त्या त्याच्या जीवनाची घडण अर्ध-स्थिर, अर्ध-तरल अशा अतिशय अपरिपूर्णतेने…

6 days ago