ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

 

प्रकृतीमध्ये पाषाणातून वनस्पतीकडे, वनस्पतीकडून प्राण्याकडे, प्राण्याकडून मानवाकडे अशा प्रकारे आरोहण करणारा क्रमविकास (evolution) आहे. आजवर ज्ञात असलेल्या या विकासक्रमानुसार, सध्यातरी मानव हा सर्वात वरच्या पायरीवर आहे असे दिसून येते. अर्थातच त्यामुळे, ‘मी या विकासाचा अंतिम टप्पा असून, माझ्यापेक्षा उच्चतर असे या पृथ्वीतलावर काही असणे शक्यच नाही‌’, असा मनुष्याचा समज झाला आहे. आणि हाच त्याचा एक फार मोठा गैरसमज आहे.

त्याच्या शारीरिक प्रकृतीच्या (physical nature) दृष्टीने तो आजही जवळजवळ पूर्णपणे पशूच आहे; विचार करणारा आणि बोलणारा पशू आहे इतकेच. त्याच्या शारीरिक सवयी आणि सहज स्वाभाविक प्रवृत्ती पाहता तो अजूनही प्राणिदशेतच आहे.

अर्थातच अशा अपूर्ण निर्मितीत प्रकृती संतुष्ट राहू शकत नाही यामध्ये शंकाच नाही. प्रकृती एक नवीन जीव निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. पशुच्या तुलनेत मानव जसा आहे तसा, मानवाच्या तुलनेत तो जीव असेल. तो जीव बाह्य आकाराने मानवसदृशच असेल; पण त्याची चेतना मनाहून कितीतरी उच्च स्तरावरची असेल आणि तो जीव अज्ञानाच्या दास्यत्वातून पूर्णपणे मुक्त झालेला असेल.

मनुष्याला हे सत्य अवगत करून देण्यासाठी श्रीअरविंद या पृथ्वीतलावर अवतरले आहेत. मानसिक चेतनेमध्ये जगणारा मनुष्य हा केवळ एक संक्रमणशील जीव आहे; परंतु एक नवी चेतना, ‘सत्य-चेतना‌’ प्राप्त करून घेण्याची क्षमता असणारा आणि एक पूर्णतया सुसंवादपूर्ण, कल्याणकारी, सुंदर, आनंदी आणि पूर्ण जाणीवसंपन्न, सचेत जीवन जगण्याची क्षमता असणारा असा तो जीव आहे, असे श्रीअरविंदांनी सांगितले आहे. ज्या चेतनेला त्यांनी अतिमानस (Supermind) असे संबोधले आहे, ती चेतना (पृथ्वीकरता म्हणून) स्वत:मध्ये प्रस्थापित करण्यासाठी आणि स्वत:भोवती जमलेल्या साधकांना देखील त्या चेतनेची अनुभूती यावी म्हणून त्यांना साहाय्य करण्यासाठी, श्रीअरविंदांनी या पृथ्वीतलावर स्वत:चे संपूर्ण आयुष्य व्यतीत केले.

– श्रीमाताजी (CWM 12 : 116)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

विश्व आणि विकासक्रम

  हे विश्व म्हणजे केवळ एक जडभौतिक वस्तू नाही तर, ते आध्यात्मिक तथ्य आहे. जीवन…

2 days ago

अस्तित्वाची सार्थकता

  भौतिक विश्वामधील सचेत जीव म्हणून आपल्या अस्तित्वाची नेमकी वास्तविकता काय आहे आणि त्याचा अर्थ…

3 days ago

विश्वाच्या अस्तित्वाचे रहस्य

  (व्यक्ती मूलत: सच्चिदानंद स्वरूप आहे, पण त्यापासून विभक्त झाल्यामुळे व्यक्तीला त्याचे विस्मरण होते आणि…

4 days ago

विभक्तीकरण अटळ…

  (पूर्वार्ध) व्यक्तीमध्ये म्हणजे व्यक्तीच्या अंतरंगामध्ये जर ईश्वरा‌चे अस्तित्व नसते तर, व्यक्तीला ईश्वरा‌ची जाणीव कधीच…

5 days ago

सृष्टीचे ध्येय

  प्रत्येक जीव हा त्या विधात्या‌प्रमाणे (Creator) सचेत झाला पाहिजे, हे या सृष्टीचे ध्येय आहे,…

6 days ago

पृथ्वीवरील जीवनाचे प्रयोजन

  साधक : पृथ्वीवरील जीवनाचे औचित्य काय आहे? श्रीमाताजी : ईश्वरा‌चा साक्षात्कार करून घेण्यासाठी व्यक्ती…

7 days ago