(आपण कालच्या भागात अन्नाव्यतिरिक्त उपलब्ध असणाऱ्या एका ऊर्जास्रोताचा विचार केला. आज आता अविनाशी असणाऱ्या दुसऱ्या ऊर्जास्रोताचा विचार करू या.)
आणखी एक अशा प्रकारचा ऊर्जास्रोत असतो की, ज्याचा एकदा शोध लागला की मग बाह्य परिस्थिती किंवा जीवनाची भौतिक परिस्थिती कशीही असली तरी तो स्रोत कधीच संपुष्टात येत नाही. ही ऊर्जा आध्यात्मिक ऊर्जा असते आणि ती अचेतनेच्या (inconscient) गर्तेमधून, निम्न स्तरावरून प्राप्त केली जात नाही तर, ती वरून म्हणजे मनुष्यमात्रांचे आणि या विश्वाचे परमोच्च उगमस्थान असलेल्या स्थानापासून, म्हणजे अतिचेतनाच्या (superconscient) सर्व-शक्तिमान आणि शाश्वत वैभवाकडून प्राप्त होते. ती आपल्या अवतीभोवती सर्वत्र असते, ती प्रत्येक वस्तुमध्ये झिरपत असते. तिच्या संपर्कात येण्यासाठी व ती ग्रहण करण्यासाठी तिच्याविषयी अगदी प्रामाणिकपणे आस बाळगणे आणि श्रद्धेने व विश्वासाने तिच्याप्रत खुले होणे, तसेच स्वतःची चेतना विशाल करणे आणि वैश्विक चेतनेशी तादात्म्य पावणे, एवढेच पुरेसे असते.
सुरुवातीला, ही गोष्ट अगदी अशक्यप्राय नाही, पण अतिशय अवघड वाटू शकते. परंतु बारकाईने या गोष्टीचा विचार केला तर व्यक्तीला असे आढळते की, ही गोष्ट वाटते तेवढी अशक्य नाही, किंवा सामान्यत: विकसित असलेल्या मानवी चेतनेपासून ती फार दूरही नाही. आपण सद्यस्थितीत जिथे आहोत त्यापेक्षा काहीसे वर उचलले गेलो आहोत आणि एक प्रकारची अनपेक्षित व असाधारण शक्ती आपल्यामध्ये आली आहे, आपण अशक्यप्राय गोष्टसुद्धा करू शकत आहोत, असा अनुभव बहुधा सर्वांनाच कधी ना कधी तरी आयुष्यात आलेला असतो, किमान एकदा तरी असा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असतो. खरोखर, ज्यांना असा अनुभव कधीच आलेला नाही अशा फारच थोड्या व्यक्ती असतील. आयुष्यातील अशा ज्या घटिका असतात त्या वेळी व्यक्तीला कोणतीच गोष्ट अवघड वाटत नाही; त्यावेळी ‘अशक्य’ या शब्दाला जणू काही अर्थच उरलेला नसतो. हा अनुभव अगदी कितीही क्षणिक असला तरी त्यामधून, योगसाधनेद्वारे व्यक्ती कोणत्या प्रकारच्या उच्चतर शक्तीच्या संपर्कात येऊ शकते याची झलक व्यक्तीला मिळते.
अर्थात, हा संपर्क कसा साधायचा याची पद्धती येथे सांगत बसणे कठीण आहे. शिवाय, ही गोष्ट व्यक्तिगत असते आणि ती प्रत्येक व्यक्तिगणिक भिन्न असते. व्यक्ती सद्यस्थितीत जेथे असते तेथपासून त्या पद्धतीची सुरुवात होते आणि ती पद्धती त्या व्यक्तीच्या वैयक्तिक गरजांनुसार स्वतःमध्ये बदल करते आणि व्यक्तीचे एक पाऊल पुढे पडावे यासाठी तिला साहाय्य करते. कधीकधी हा मार्ग काहीसा दीर्घ आणि संथ असतो परंतु या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी व्यक्तीने जे कष्ट घेतले होते ते मोलाचे होते हे, त्याच्या परिणामांवरून व्यक्तीच्या लक्षात येते.
प्रकाशमान विशुद्धतेमध्ये सर्व-शक्तिमान असणाऱ्या, ऊर्जेच्या या अमर्याद स्रोताकडून, सर्व परिस्थितीमध्ये, स्वतःच्या इच्छेनुसार ऊर्जा संपादन करणाऱ्या या शक्तीच्या परिणामांची आपण अगदी सहजतेने कल्पना करू शकतो. काळजी, थकवा, आजारपण, वार्धक्य आणि एवढेच काय पण, अगदी मृत्युसुद्धा या मार्गावरचा केवळ एक अडथळा असतो आणि सातत्यपूर्ण संकल्पशक्तीद्वारे त्यावर निश्चितपणे मात केली जाऊ शकते.
• श्रीमाताजी (CWM 12 : 262)
(पूर्वार्ध) जोपर्यंत माणसं आणि हे जग आत्ता जसं आहे तसंच राहील तोपर्यंत, ऊर्जा मिळविण्यासाठी…
तारुण्य हे, व्यक्ती किती वयाची आहे यावर अवलंबून नसते, तर ते प्रगती करण्याच्या आणि…
श्रीअरविंद हे भूतकाळाशी किंवा इतिहासाशीदेखील संबंधित नाहीत. श्रीअरविंद म्हणजे प्रत्यक्षात येणारा भविष्यकाळ आहेत. तुम्हाला…
भावी काळ हा तरुणांचा आहे. सद्यस्थितीत, एक नूतन व युवा जग आकाराला येत आहे…
प्रामाणिकपणा, विनम्रता, चिकाटी आणि प्रगतीसाठी असणारी दुर्दम्य तृष्णा या गोष्टी आनंदी व सफल जीवनासाठी…
तुम्ही तरुण मुलं म्हणजे देशाची आशा आहात आणि या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतःला…