ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

Categories: जीवनऋतू

विजयाची खात्री

जीवनऋतू – १७

(मुलांचे संगोपन कसे केले पाहिजे हे श्रीमाताजींनी सांगितले आहे आणि ते आपण कालच्या भागात विचारात घेतले.)

तुम्ही स्वतःला असे सांगितले पाहिजे की, “माझ्यामध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी मला अवास्तव, अशक्यप्राय, भ्रमरूप आहेत असे वाटत आहे त्याच खऱ्या आहेत आणि मला त्यांची जोपासना केलीच पाहिजे.” (येथे शरीराच्या दिव्यत्वाचा संदर्भ आहे, सामान्य जाणिवेला ती दिव्यता भ्रमरूप वाटत असते.) आणि मुलांनाही तीच शिकवण तुम्ही दिली पाहिजे. नेहमी कोणत्या ना कोणत्या अक्षमतेने तुम्ही मर्यादाबद्ध होता कामा नये किंवा सदानकदा कोणत्या तरी दुरिच्छेमुळे आपले पाय मागे खेचले जाऊ नयेत असे जर तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही तुमच्या अंतरंगामध्ये एक प्रकारची अशी खात्री रुजविली पाहिजे की, तीच गोष्ट मूलतः खरी आहे आणि तीच गोष्ट प्रत्यक्षात उतरविली पाहिजे. तसे झाले तर मग तुमच्या शरीराच्या पेशींमध्ये एक श्रद्धा जागी होते. तुमच्या शरीरामध्येसुद्धा त्याला एक प्रतिसाद मिळताना तुम्हाला आढळतो. जर त्याला आंतरिक इच्छेची जोड मिळाली, बळकटी मिळाली, तिचे मार्गदर्शन लाभले तर, साऱ्या मर्यादा हळूहळू नाहीशा होऊन जातील आणि खुद्द शरीरालाच तसे जाणवू लागेल.

…परंतु अगदी लहानपणापासूनच जर तुम्हाला सर्व तऱ्हेच्या नाउमेद करणाऱ्या, निराशाजनक गोष्टी शिकविल्या गेल्या असतील, म्हणजे ज्या गोष्टींमुळे विभाजन होते, विघटन होते अशा गोष्टी शिकविल्या गेल्या असतीत तर, हे बिचारे शरीर त्याच्या परीने उत्कृष्ट तेच करत असते पण ते त्या गोष्टींमुळे विकृत, दूषित झालेले असते, ते आता सुस्थितीत राहिलेले नसते आणि मग त्याच्या अंगी त्याच्या आंतरिक सामर्थ्याची, त्याच्या आंतरिक शक्तीची किंवा परिस्थितीला तोंड देण्याच्या शक्तीची जाणीव शिल्लक राहिलेली नसते. शरीर असे दूषित होऊ नये म्हणून योग्य ती काळजी जर घेतली गेली असेल तर त्यामध्ये विजयाबद्दलची एक स्वाभाविक खात्री असते. आपण आपल्या विचारांचा चुकीचा वापर करतो आणि त्याचा शरीरावर जो पगडा असतो त्यामुळे शरीर विजयाची खात्री गमावून बसते.

विजयाबद्दलची ही खात्री नाहीशी न करता उलट, ती जोपासली पाहिजे. आणि जेव्हा अशी खात्री असते तेव्हा अभीप्सा बाळगण्यासाठी कोणतेही प्रयत्न करावे लागत नाहीत, तर विजयावरचा हा आंतरिक विश्वास सहजतेने उमलून येतो. शरीर स्वतःमध्ये स्वतःच्या दिव्यत्वाची जाणीव बाळगून असते. पण ही जाणीव जर तुमचे शरीर हरवून बसले असेल तर ती जाणीव तुम्ही पुन्हा तुमच्या अंतरंगामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

एखादे मूल जेव्हा तुम्हाला त्याचे सुंदरसे स्वप्न सांगत असते; म्हणजे त्याच्या त्या स्वप्नामध्ये त्याच्याकडे बऱ्याचशा शक्ती होत्या, सर्व गोष्टी खूप सुंदर होत्या, असे जेव्हा ते मूल तुम्हाला सांगत असते तेव्हा त्याला, “हे असं काही खरं नसतं, जीवन असं नसतं,’’ असे सांगण्याची चूक कधीही करू नका. त्याउलट तुम्ही त्याला असे सांगा की, “हो, जीवन तसेच असले पाहिजे आणि ते नक्की तसे होईल.”

– श्रीमाताजी (CWM 09 : 163 & 165)

 

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

सकारात्मक वृत्तीचा परिणाम

  (लहान मुलांच्या स्वप्नवत कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यावे, हे श्रीमाताजींनी सांगितले आहे.…

1 day ago

स्वप्नांवर विश्वास ठेवा

उत्तम स्थितीत जन्माला आलेल्या मुलाच्या म्हणजे ज्याच्या अंतरंगामध्ये एक सचेत चैत्य पुरुष (psychic being) असतो…

2 days ago

उपयुक्ततावादाचा आजार

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो…

3 days ago

शिक्षण आणि संस्कृती

व्यक्तीने कायम बौद्धिकरित्या नव्हे तर, मानसशास्त्रीय दृष्टीने देखील शिक्षण घेतले पाहिजे. व्यक्तीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने…

4 days ago

शिक्षणाचे ध्येय

(‘श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन’ या श्रीअरविंद आश्रमाच्या शाळेमध्ये मुलांच्या आंतरात्मिक आणि आध्यात्मिक विकासाला पोषक…

5 days ago

ईश्वराचे साधन होण्यासाठी प्रार्थना

(पाँडिचेरी येथील श्रीअरविंद आश्रमात आबालवृद्ध, शाळेचे विद्यार्थी रोज नियमितपणे आश्रमाच्या मैदानावर जातात आणि शारीरिक शिक्षण…

6 days ago