जीवन जगण्याचे शास्त्र – ३०
साधक : अभीप्सेचा अग्नी कधीही विझू नये यासाठी मी काय केले पाहिजे?
श्रीमाताजी : व्यक्ती जेव्हा तिच्या सर्व अडीअडचणी, तिच्या इच्छावासना, तिच्या सर्व अपूर्णता यांचे त्या अग्नीमध्ये हवन करत राहते तेव्हा त्यामुळे, तो अग्नी तेवत राहतो. अभीप्सेचा हा अग्नी प्रज्वलित राहावा म्हणून सकाळ-संध्याकाळ मला अंतःकरणपूर्वक प्रार्थना करा आणि त्या अग्निमधील समिधा म्हणून त्या सर्व गोष्टी मला अर्पण करत जा.
साधक : अभीप्सारूपी या अग्नीची तीव्रता वाढीस लागावी म्हणून मला एकांतवासात जावे असे वाटत आहे. मी एकांतवासात जाऊ का?
श्रीमाताजी : दैनंदिन जीवनाच्या धुमश्चक्रीमध्येच हा अग्नी प्रज्वलित होत राहिला पाहिजे जेणेकरून, तो तुमच्या सर्व गतिविधी सुयोग्य करू शकेल.
साधक : मी माझ्या सर्व गतिविधी तुम्हाला अर्पण करत आहे आणि “माझा अभीप्सा-अग्नी प्रज्वलित राहू दे,’’ अशी प्रार्थना मी तुम्हाला करत आहे.
श्रीमाताजी : जोपर्यंत तुम्ही अभीप्सारूपी ज्योत तेवत ठेवण्याची आस बाळगत आहात तोपर्यंत ती मालवू नये याची काळजी मी घेईन.
साधक : मी त्या ज्योतीवर एकाग्रता करण्याचा खूप प्रयत्न केला, पण, ती ज्योत प्रज्वलित करण्याइतपत माझी अभीप्सा उत्कट नाही.
श्रीमाताजी : अभीप्सेचा अग्नी प्रज्वलित करणे हे तुमचे काम नाही. मी तुम्हाला म्हटले त्याप्रमाणे, तो अग्नी नेहमी मी प्रज्वलित करत असते. तो ग्रहण करण्यासाठी तुम्ही फक्त स्वतःला उन्मुख केले पाहिजे आणि तो अग्नी सद्भावनेने सांभाळला पाहिजे.
श्रीमाताजी (CWM 17 : 126)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…