जीवन जगण्याचे शास्त्र – ०९
मनुष्य आणि ईश्वर यांच्या भेटीचा अर्थ नेहमीच, मनुष्यामध्ये ईश्वरत्वाचा प्रवेश आणि समावेश तसेच मनुष्याचा दिव्यत्वामध्ये आत्मोदय असा होतो. परंतु हा उदय विलयनाच्या स्वरूपाचा नसतो. (या जगामध्ये ज्या सगळ्या घडामोडी घडत असतात) त्या शोधाची, धडपडीची, दुःखभोगाची, परमानंदाची परिपूर्ती निर्वाण ही असूच शकत नाही. निर्वाण हाच जर या लीलेचा अंत असता, तर या लीलेचा आरंभच कधी झाला नसता. परमानंद हे रहस्य आहे. विशुद्ध आनंद अनुभवण्यास शिका म्हणजे तुम्ही ईश्वर जाणून घ्याल.” – श्रीअरविंद (CWSA 13 : 203-204)
*
(श्रीअरविंद लिखित वरील उताऱ्यावर एका साधकाने प्रश्न विचारला आहे.)
साधक : काय केल्यास व्यक्ती ‘विशुद्ध आनंद घेण्यास’ शिकू शकेल?
श्रीमाताजी : सर्वप्रथम, सुरुवात करायची झाली तर, तुम्ही सतर्कपणे निरीक्षण करून जाणिवसंपन्न झाले पाहिजे. इच्छावासना आणि त्यांच्या उपभोगातून जे सुख मिळते ते अस्पष्ट, अनिश्चित, मिश्रित, क्षणभंगुर आणि पूर्णपणे असमाधानकारक असे सुख असते, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. सहसा ही जाणीव हा आरंभबिंदू असतो.
तुम्ही जर बुद्धिनिष्ठ असाल तर, इच्छावासना काय असतात हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे आणि तुमच्या इच्छावासनांची पूर्ती करणाऱ्या कोणत्याही गोष्टीपासून तुम्ही स्वतःला रोखले पाहिजे. त्यांचा उपभोग घेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, तुम्ही त्यांना नकार दिला पाहिजे.
…‘इच्छावासनांची तृप्ती करण्यामधील आनंदापेक्षा, त्यांचा निरास करण्यामध्ये आणि त्यांच्यावर विजय संपादन करण्यात अनंतपटीने अधिक आनंद सामावलेला असतो.’ आणि हे निरपवाद सत्य आहे, असे प्रत्येक प्रामाणिक आणि निष्ठावान साधकाला आज ना उद्या, कधी कधी अगदी त्वरेने तर कधी कालांतराने, अनुभवास येते. जे सुख अगदीच चंचल आणि भेसळयुक्त असते, त्या वासनापूर्तीच्या सुखापेक्षा, इच्छावासनांवर मात करण्याचा आनंद हा अतुलनीय उच्चकोटीचा असतो. ही दुसरी पायरी असते.
आणि मग स्वाभाविकपणे, अशा प्रकारे सातत्याने केलेल्या अभ्यासामुळे, अगदी थोड्या अवधीतच तुमच्या वासना तुमच्यापासून दूर जातील आणि नंतर त्या तुम्हाला त्रास देणार नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या अस्तित्वामध्ये थोडे अधिक खोलवर जाण्यासाठी मोकळे होऊ शकाल आणि आनंदाचे निधान असणाऱ्या, ईश्वराप्रति, ईश्वरी तत्त्वाप्रति, ईश्वरी कृपेप्रति अभीप्सा बाळगत खुले होऊ शकाल. आणि तुम्ही जर हे अगदी प्रामाणिकपणे आत्मदानाच्या (self-giving) भूमिकेतून केलेत, म्हणजे जणू काही तुम्ही स्वतःला पूर्णपणे देऊ केलेत, स्वतःला अर्पण केलेत आणि त्या अर्पणाच्या मोबदल्यात कोणत्याच गोष्टीची अपेक्षा बाळगली नाहीत तर, तुम्हाला एक प्रकारची आल्हाददायक ऊब जाणवेल; आणि ज्याने तुमचे हृदय भरून जाईल असे, संतोषजनक, आत्मीय, प्रकाशमान असे काहीतरी तुम्हाला जाणवेल, आणि ती गोष्ट आनंदाची अग्रदूत असेल. यानंतरचा मार्ग सोपा असतो… (क्रमश:)
– श्रीमाताजी (CWM 09 : 21)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…