भारताचे पुनरुत्थान – ०४
(भारत मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचे सध्या १५० वे जयंतीवर्ष सुरू आहे. मुळात बंगाली भाषेत असलेल्या या गीताचा पूर्वाश्रमीच्या श्री. अरविंद घोष यांनी इंग्रजीमध्ये गद्यानुवाद केला आहे. त्याचा मराठी भावानुवाद आज प्रस्तुत करत आहोत….)
हे माते, मी तुला वंदन करत आहे.
जलसमृद्ध आणि धनधान्यसमृद्ध असणाऱ्या हे माते,
दक्षिणवाऱ्यांमुळे तू शीतलतनू झाली आहेस;
सुगीच्या पिकांनी घनगर्द झालेल्या हे माते,
मी तुला वंदन करत आहे.
चंद्रप्रकाशाच्या वैभवामध्ये तुझ्या रात्री न्हाऊन निघाल्या आहेत,
विविध फुलांनी बहरलेले वृक्षरूपी सुंदर वस्त्र
तुझ्या भूमीने परिधान केले आहे,
तुझे हास्य मंजुळ आहे आणि तुझी वाणी मधुर आहे,
परमानंदप्रदायिनी, वरदायिनी असणाऱ्या हे माते,
मी तुला वंदन करत आहे.
सप्त कोटी मुखांमधून उठणाऱ्या गर्जनांनी
आणि सप्त कोटी प्रजाजनांच्या दोन्ही हातांमध्ये उगारलेल्या शस्त्रांमुळे
तू रुद्रभीषण दिसत आहेस, तेव्हा हे माते,
तू दुर्बल आहेस असे म्हणण्याचे धारिष्ट्य कोण बरे करेल?
अपरिमित शक्ती धारण करणाऱ्या रक्षणकर्त्या मातेसमोर,
आणि शत्रूंच्या पलटणी पळवून लावणाऱ्या मातेसमोर
मी नतमस्तक आहे. हे माते, मी तुला वंदन करत आहे.
तूच ज्ञान आहेस आणि तूच आमचा स्वधर्म आहेस,
तूच आमच्या हृदयांमध्ये निवास करत आहेस.
तूच आमचा आत्मा आहेस आणि आमच्या देहामधील प्राणही तूच आहेस.
आमच्या बाहुंमधील शक्तिसामर्थ्य तूच आहेस,
आमच्या हृदयामधील प्रेम आणि श्रद्धादेखील तूच आहेस,
आम्ही सर्व मंदिरांमध्ये तुझ्याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत असतो.
कारण तू युद्ध-शस्त्रे धारण केलेली दशभुजा दुर्गा आहेस,
आणि कमलपुष्पांमध्ये विहरणारी सौंदर्यदेवतादेखील तूच आहेस.
परावाणीरूप असणाऱ्या, वेदप्रदायिनी देवते,
मी तुला वंदन करत आहे.
हे ऐश्वर्यदेवते,
विशुद्ध व अनुपम जलप्रवाहांनी आणि
फुलाफळांनी समृद्ध असणाऱ्या हे माते,
मी तुला वंदन करत आहे.
श्यामलवर्णी, ऋजुस्वभावी, सुहास्यवदन असणाऱ्या,
आभूषणं परिधान केलेल्या, शृंगाराने विनटलेल्या,
वैभवधारिणी हे माते,
वैविध्यसंपन्न हे माते, मी तुला वंदन करत आहे.
– श्रीअरविंद (CWSA 05 : 467-468)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…