श्रीमाताजी आणि समीपता – २७
(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)
साधक : पूर्ण दिवसभर माझा प्राण आक्रंदन करत होता. श्रीमाताजी आपल्याबाबत निष्ठुर झाल्या आहेत असे त्याला वाटत होते आणि त्यांच्या प्रेमापासून तो वंचित झाला आहे असे वाटल्यामुळे, तो आकांत करत होता. त्यांच्या मौनामुळे तो कोलमडून पडतो, आणि त्यांचे त्याच्याकडे दुर्लक्ष झाले तर तो कोमेजून जातो.
श्रीअरविंद : जो प्राण अहंकाराने, इच्छा-आकांक्षांनी, अपेक्षांनी भरलेला असतो आणि त्यामुळे जो असमाधानी होतो, सारखी कुरबुर करत राहतो आणि जो भ्रांत कल्पना आणि स्वयं-निर्मित दुःखाने भरलेला असतो, अशा परिवर्तन न झालेल्या प्राणाची ही लक्षणे आहेत.
साधक : पण माझ्यामध्येच अशीही एक प्रवृत्ती आहे की जिला ही सारी सुख-दुःखं टाळावीशी वाटतात, जिला फक्त श्रीमाताजींवर विसंबून राहण्याची इच्छा असते. मात्र माताजींकडून काहीतरी प्राप्त व्हावे अशी त्या प्रवृत्तीची इच्छा नाहीये, तर आपण श्रीमाताजींप्रति स्वतःचे आत्मदान करावे असे तिला वाटत असते, श्रीमाताजींनी आपल्यामध्ये अवतरित व्हावे आणि आपल्याला वर उचलून न्यावे यासाठी ती प्रवृत्ती प्रार्थना करत असते. ती माझ्या हृदयामध्ये आहे. आणि तिचा स्थायीभाव ‘समर्पण’ हा आहे.
श्रीअरविंद : तुम्ही जे काही सांगत आहात ते चैत्य पुरुषाचे (psychic being) आणि त्याच्या श्रीमाताजींसोबत असलेल्या नात्याचे तंतोतंत वर्णन आहे. हे खरे नाते होय. ‘पूर्णयोगा’मध्ये यशस्वी व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्यामधील अहंकारी प्राणिक प्रवृत्तीला नकार दिला पाहिजे आणि तुमची साधना या आंतरात्मिक नात्यावर (psychic relation) सुस्थिर केली पाहिजे. चैत्य पुरुष अग्रभागी येणे आणि तो तेथेच स्थिरावणे ही पूर्णयोगामधील एक निर्णायक पायरी असते.
मागच्या वेळी जेव्हा तुम्ही श्रीमाताजींना भेटला होतात तेव्हा हेच घडले होते, तुमचा चैत्य पुरुष अग्रभागी आला होता. परंतु तुम्ही तो कायम तसाच पुढे ठेवला पाहिजे. मात्र जर तुमचा प्राणिक अहंकार आणि त्याचा आक्रोश यांचेच म्हणणे तुम्ही ऐकत राहिलात तर तसे करणे तुम्हाला शक्य होणार नाही. श्रद्धा, समर्पण आणि विशुद्ध आत्मदानाचा (self-giving) आनंद यामुळे, म्हणजेच या आंतरात्मिक दृष्टिकोनामुळेच व्यक्ती ‘सत्या’मध्ये उन्नत होते आणि ईश्वराशी एकात्म पावते.
– श्रीअरविंद (CWSA 32 : 464-465)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…