साधना, योग आणि रूपांतरण – २४६

मनाचे रूपांतरण

(आध्यात्मिक) अनुभव येत असतो तेव्हा त्याचा विचार करणे किंवा शंका घेणे, प्रश्न उपस्थित करणे हे चुकीचे असते. (कारण) त्यामुळे तो अनुभव थांबून जातो किंवा तो अनुभव क्षीण होतो. (तुम्ही वर्णन केलेत त्याप्रमाणे जर) ती ‘नवी प्राणशक्ती’ असेल किंवा शांती असेल किंवा ‘शक्ती’ असेल किंवा अन्य एखादी उपयुक्त गोष्ट असेल तर तो अनुभव पूर्णपणे येऊ दिला पाहिजे. एकदा का ती अनुभव-प्रक्रिया संपली की, मग तुम्ही त्याचा विचार करण्यास हरकत नाही, परंतु तो अनुभव येत असताना मात्र त्याचा विचार करता कामा नये. कारण अशा प्रकारचे अनुभव हे आध्यात्मिक असतात, ते मानसिक स्तरावरचे नसतात आणि म्हणून येथे मनाने कोणतीही लुडबूड न करता शांत, अविचल राहणेच आवश्यक असते.
*
मनाच्या अधीरतेवर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. ज्ञान हे प्रगमनशील असते. एकाएकी त्याने झेपावून शिखरावर जायचा प्रयत्न केला तर, त्याच्याकडून घाईघाईने काहीतरी अशा रचना होण्याची शक्यता असते की ज्या त्याला नंतर रद्दबादल कराव्या लागतात. ज्ञान व अनुभव हे टप्याटप्प्याने आणि कलेकलेनेच येणे आवश्यक असते.
*
सर्वोच्च ‘सत्य’ म्हणून जे मनासमोर सादर करण्यात आलेले असते ते चपळाईने पकडावे अशी एक विशिष्ट प्रकारची घाई मनामध्ये नेहमीच आढळून येते. ती टाळता येण्यासारखी नसते, परंतु व्यक्ती मनामध्ये जितकी अधिक स्थिरशांत झालेली असेल तेवढे त्या घाईमुळे गोष्टी बिघडण्याचे प्रमाण कमी होईल.
*
आलेल्या अनुभवावर अट्टहासाने ताबा मिळविण्याचा प्रयत्न करणे हा नेहमीच मनाच्या आणि प्राणाच्या अडथळ्यांपैकी एक मुख्य अडथळा असतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 47-48), (CWSA 31 : 24,23,23)

साधना, योग आणि रूपांतरण – २४५

मनाचे रूपांतरण

जेव्हा वैयक्तिक मन नि:स्तरंग होते तेव्हा, जी कोणती मानसिक कृती करणे आवश्यक असते ती स्वयमेव (दिव्य) ‘शक्ती’कडूनच हाती घेतली जाते आणि केली जाते. ती ‘शक्ती’ आवश्यक तो सर्व विचार करते आणि विचार-प्रक्रियेमध्ये उच्च आणि उच्चतर पातळ्यांवरील बोध व ज्ञान खाली उतरवून, त्याद्वारे त्या प्रक्रियेमध्ये उत्तरोत्तर रूपांतरण घडवून आणते.
*
अति बौद्धिकतेकडे कल असणाऱ्या व्यक्तींमध्ये असणारे सक्रिय मन हा अधिक सखोल अशा अधिक निश्चल-नीरव आध्यात्मिक गतिविधींसाठी एक अडथळा ठरू शकतो. नंतर तेच मन जेव्हा उच्चतर विचाराकडे (अंतःस्फूर्त मनाकडे किंवा अधिमानसाकडे) वळते तेव्हा मात्र ते एक महान शक्ती बनते.
*
विचार-तरंग आणि इतर स्पंदने थांबणे ही आंतरिक निश्चल-नीरवतेची परमावधी असते. एकदा का व्यक्तीला ती अवस्था प्राप्त झाली की मग, मानसिक विचारांच्या जागी, वरून खऱ्या ज्ञानाचे येणे सुकर होते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 55, 06, 55)

साधना, योग आणि रूपांतरण – २४४

मनाचे रूपांतरण

मनाच्या निश्चल-नीरव अशा अवस्थेमध्ये अतिशय प्रभावी आणि मुक्त कृती घडून येऊ शकते. उदाहरणार्थ, एखाद्या ग्रंथाचे लेखन, काव्य, अंतःप्रेरणेतून दिलेले एखादे व्याख्यान इत्यादी. मन सक्रिय झाले की ते अंतःस्फूर्तीमध्ये ढवळाढवळ करते, स्वतःच्या किरकोळ कल्पनांची त्यात भर घालते आणि त्यामुळे अंतःस्फूर्तीमधून स्फुरलेल्या गोष्टीमध्ये त्या कल्पनांची सरमिसळ होते. अन्यथा मग ती स्फूर्ती निम्न पातळीवरून काम करू लागते किंवा मग निव्वळ मनाकडून आलेल्या सूचनांच्या बुडबुड्यांमुळे ती अंतःस्फूर्ती पूर्णपणे थांबून जाण्याची शक्यता असते. अगदी त्याप्रमाणे, जेव्हा मनाच्या सामान्य कनिष्ठ स्तरावरील गतिविधी सक्रिय नसतात तेव्हा अंतःसूचना किंवा (आंतरिक किंवा उच्चस्तरीय) कृती या अधिक सहजपणे घडून येऊ शकतात. त्याचप्रमाणे मनाच्या निश्चल-नीरव अवस्थेमध्ये असताना अंतरंगामधून किंवा वरून येणारे, म्हणजे आंतरात्मिक किंवा उच्चतर चेतनेकडून येणारे ज्ञानदेखील सर्वाधिक सहजतेने येऊ शकते.

*

अविरत चालणारी कृती ही मनाची एक नेहमीचीच अडचण असते. त्याने निश्चल-नीरव होण्यास शिकण्याची आवश्यकता असते आणि स्वतःच्या उपयोगासाठी ज्ञानावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न न करता, त्याने ज्ञानोदय होण्यास वाव दिला पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 55-56, 54)

साधना, योग आणि रूपांतरण – २४३

मनाचे रूपांतरण

मनाची ग्रहणशील निश्चल-नीरवता (silence), मानसिक अहंकाराचा निरास आणि मनोमय पुरुष साक्षीभावाच्या भूमिकेत उतरणे, ‘दिव्य शक्ती’बरोबर असलेला घनिष्ठ संपर्क आणि अन्य कोणाप्रत नव्हे तर, त्या दिव्य शक्तीच्या ‘प्रभावा’प्रत खुलेपणा या गोष्टी ‘ईश्वरा’चे साधन बनण्यासाठी, आणि केवळ आणि केवळ ‘ईश्वरा’द्वारेच संचालित होण्यासाठी आवश्यक अटी असतात. केवळ मनाच्या निश्चल-नीरवतेमुळे अतिमानसिक चेतना अवतरित होते असे नाही. मानवी मन आणि अतिमानस (supermind) यांच्या दरम्यान चेतनेच्या बऱ्याच अवस्था, बऱ्याच पातळ्या, बरेच स्तर असतात.

निश्चल-नीरवतेमुळे मन आणि उर्वरित अस्तित्व हे महत्तर गोष्टींप्रत खुले होते, कधीकधी ते ब्रह्मांडगत चेतनेप्रत खुले होते, कधीकधी शांत ‘आत्म्या’च्या अनुभवाप्रत खुले होते. तर कधी ते ‘ईश्वरा’च्या शक्तीप्रत किंवा उपस्थितीप्रत खुले होते; कधीकधी ते मानवी मनापेक्षा अधिक उच्च असणाऱ्या चेतनेप्रत खुले होते. या पैकी कोणतीही गोष्ट घडण्यासाठी मनाची निश्चल-नीरवता ही सर्वाधिक अनुकूल परिस्थिती असते.

‘दिव्य-शक्ती’ सर्वप्रथम व्यक्तिगत चेतनेवर आणि नंतर त्या चेतनेमध्ये अवतरित होण्यासाठी आणि ती चेतना रूपांतरित करण्याचे तिचे कार्य करण्यासाठी, तसेच आवश्यक असे अनुभव प्रदान करण्यासाठी, आणि व्यक्तीचा दृष्टिकोन व तिच्या वृत्तीप्रवृत्ती पूर्णतः बदलून टाकण्यासाठी आणि व्यक्ती जोवर अंतिम अतिमानसिक परिवर्तनसाठी तयार होत नाही तोपर्यंत तिला टप्प्याटप्याने पुढे घेऊन जाण्यासाठी, मनाची निश्चल-नीरवता ही पूर्णयोगामधील सर्वात अनुकूल परिस्थिती असते. अर्थात हीच केवळ एकमेव अनुकूल परिस्थिती असते असे नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 266-267)

साधना, योग आणि रूपांतरण – २४२

नमस्कार वाचकहो,

मानवी प्रकृतीचे रूपांतरण हे पूर्णयोगाचे एक वैशिष्ट्य आहे.

‘रूपांतरण कोणत्या शक्तीद्वारे घडून येणार’ या निकषावर आधारित असलेले, आंतरात्मिक रूपांतरण, आध्यात्मिक रूपांतरण आणि अतिमानसिक रूपांतरण हे तीन प्रकार आपण आजवर पाहिले. अगदी सारांशरूपाने सांगायचे तर, चैत्य पुरुषाद्वारे होणारे रूपांतरण हे आंतरात्मिक रूपांतरण, उच्चतर चेतनेद्वारे होणारे रूपांतरण हे आध्यात्मिक रूपांतरण आणि अतिमानसिक शक्तीद्वारे होणारे रूपांतरण हे अतिमानसिक रूपांतरण असते हे आता आपल्याला ज्ञात झाले आहे.

आता ‘रूपांतरण कोणाचे’ या निकषावर आधारित असलेले मानसिक, प्राणिक व शारीरिक रूपांतरण हे तीन प्रकार आपल्याला समजावून घ्यायचे आहेत. या रूपांतरणामध्ये मन, प्राण आणि शरीर यांच्या रूपांतरणाचा समावेश होतो. तसेच पुढे जाऊन, आपल्यामधील अवचेतन, आणि अचेतनाचे रूपांतरणही पूर्णयोगामध्ये अभिप्रेत असते.

मनुष्य देहरूपात आला तेव्हा त्याला स्वत:च्या मूळ स्वरूपाचे, आणि स्वत:च्या अंतरीच्या दिव्यत्वाचे विस्मरण झाले. आणि त्याच्या मन, प्राण व शरीर या साधनांमध्ये विकार निर्माण झाले. आणि त्यामुळेच दिव्य जीवनाकडे चालणाऱ्या मार्गक्रमणामध्ये, साधनेमध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे त्यांच्यावर मात करून पुढे जाणे हे साधकासाठी आवश्यक ठरते. त्यावर मात करायची झाली तर त्याचे नेमके स्वरूप, त्याची लक्षणे, त्याची गुणवैशिष्ट्ये व मर्यादा माहीत असणे आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींचा म्हणजे, मन, प्राण, शरीर यांचे स्वरूप काय आहे, त्यांची बलस्थानं कोणती व त्यांच्या मर्यादा कोणत्या याचा सारासार आणि सांगोपांग विचार श्रीअरविंद व श्रीमाताजी यांनी केला आहे. हा विचार इतका विस्तृत व सखोल आहे की, त्या सगळ्याचा येथे समावेश करायचा ठरवले तर एक स्वतंत्र ग्रंथच तयार होईल. त्यामुळे इतक्या तपशिलात न जाता, परंतु तरीही त्यातील गाभाभूत विचार वाचकांच्या हाती लागावा, असा आमचा प्रयत्न आहे. आता आपण क्रमशः मन, प्राण व शरीर यांच्या रूपांतरणासाठी साहाय्यक होतील असे विचार समजावून घेण्याचा प्रयत्न करू या. उद्यापासून ‘मानसिक रूपांतरण’ हा भाग सुरू करत आहोत.

धन्यवाद.
संपादक, अभीप्सा मराठी मासिक

साधना, योग आणि रूपांतरण – २४१

‘अंतरात्म्या’ची प्राप्ती किंवा ‘ईश्वर’ प्राप्ती हा पूर्णयोगाचा पाया असला आणि त्याविना रूपांतरण शक्य नसले तरी, पूर्णयोग म्हणजे केवळ ‘अंतरात्म्या’च्या प्राप्तीचा किंवा ‘ईश्वर’ प्राप्तीचा योग नाही. तर तो व्यक्तीच्या रूपांतरणाचा योग आहे.

या रूपांतरणामध्ये चार घटक असतात. आंतरात्मिक खुलेपणा, अज्ञेय प्रांत ओलांडून जाणे किंवा अज्ञेय प्रांतामधून संक्रमण करणे, आध्यात्मिक मुक्ती, आणि अतिमानसिक परिपूर्णत्व. या चार घटकांपैकी कोणताही एक घटक जरी साध्य झाला नाही तरी हा योग अपूर्ण राहतो.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 367-368)

साधना, योग आणि रूपांतरण – २४०

दिव्य जीवनासाठी फक्त उच्चतर मानसिक चेतनेच्या संपर्कात येणे पुरेसे नसते. ती फक्त एक अनिवार्य अशी अवस्था असते. दिव्य जीवनासाठी अधिक उच्च आणि अधिक शक्तिशाली स्थानावरून ‘दिव्य शक्ती’चे अवतरण होणे आवश्यक असते.

पुढील सर्व गोष्टी सद्यस्थितीत अदृश्य असलेल्या शिखरावरून अवतरित होणाऱ्या ‘शक्ती’विना अशक्यप्राय आहेत :
१) उच्चतर चेतनेचे अतिमानसिक प्रकाश आणि शक्तीमध्ये रूपांतरण,
२) प्राण आणि त्याच्या जीवनशक्तीचे विशुद्ध, विस्तृत, स्थिरशांत, दिव्य ऊर्जेच्या शक्तिशाली आणि उत्कट साधनामध्ये रूपांतरण,
३) तसेच स्वयमेव शरीराचे दिव्य प्रकाश, दिव्य कृती, सामर्थ्य, सौंदर्य आणि हर्ष यांच्यामध्ये रूपांतरण

‘ईश्वरा’प्रत आरोहण या एका गोष्टीबाबत इतर योग आणि पूर्णयोग यांमध्ये साधर्म्य आढळते परंतु पूर्णयोगामध्ये केवळ आरोहण पुरेसे नसते तर मन, प्राण, शरीर यांच्या सर्व ऊर्जा रूपांतरित करण्यासाठी ‘ईश्वरा’चे अवतरण होणेदेखील आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 118-119)

साधना, योग आणि रूपांतरण – २४२

नमस्कार वाचकहो,

मानवी प्रकृतीचे रूपांतरण हे पूर्णयोगाचे एक वैशिष्ट्य आहे.

‘रूपांतरण कोणत्या शक्तीद्वारे घडून येणार’ या निकषावर आधारित असलेले, आंतरात्मिक रूपांतरण, आध्यात्मिक रूपांतरण आणि अतिमानसिक रूपांतरण हे तीन प्रकार आपण आजवर पाहिले. अगदी सारांशरूपाने सांगायचे तर, चैत्य पुरुषाद्वारे होणारे रूपांतरण हे आंतरात्मिक रूपांतरण, उच्चतर चेतनेद्वारे होणारे रूपांतरण हे आध्यात्मिक रूपांतरण आणि अतिमानसिक शक्तीद्वारे होणारे रूपांतरण हे अतिमानसिक रूपांतरण असते हे आता आपल्याला ज्ञात झाले आहे.

आता ‘रूपांतरण कोणाचे’ या निकषावर आधारित असलेले मानसिक, प्राणिक व शारीरिक रूपांतरण हे तीन प्रकार आपल्याला समजावून घ्यायचे आहेत. या रूपांतरणामध्ये मन, प्राण आणि शरीर यांच्या रूपांतरणाचा समावेश होतो. तसेच पुढे जाऊन, आपल्यामधील अवचेतन, आणि अचेतनाचे रूपांतरणही पूर्णयोगामध्ये अभिप्रेत असते.

मनुष्य देहरूपात आला तेव्हा त्याला स्वत:च्या मूळ स्वरूपाचे, आणि स्वत:च्या अंतरीच्या दिव्यत्वाचे विस्मरण झाले. आणि त्याच्या मन, प्राण व शरीर या साधनांमध्ये विकार निर्माण झाले. आणि त्यामुळेच दिव्य जीवनाकडे चालणाऱ्या मार्गक्रमणामध्ये, साधनेमध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे त्यांच्यावर मात करून पुढे जाणे हे साधकासाठी आवश्यक ठरते. त्यावर मात करायची झाली तर त्याचे नेमके स्वरूप, त्याची लक्षणे, त्याची गुणवैशिष्ट्ये व मर्यादा माहीत असणे आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींचा म्हणजे, मन, प्राण, शरीर यांचे स्वरूप काय आहे, त्यांची बलस्थानं कोणती व त्यांच्या मर्यादा कोणत्या याचा सारासार आणि सांगोपांग विचार श्रीअरविंद व श्रीमाताजी यांनी केला आहे. हा विचार इतका विस्तृत व सखोल आहे की, त्या सगळ्याचा येथे समावेश करायचा ठरवले तर एक स्वतंत्र ग्रंथच तयार होईल. त्यामुळे इतक्या तपशिलात न जाता, परंतु तरीही त्यातील गाभाभूत विचार वाचकांच्या हाती लागावा, असा आमचा प्रयत्न आहे. आता आपण क्रमशः मन, प्राण व शरीर यांच्या रूपांतरणासाठी साहाय्यक होतील असे विचार समजावून घेण्याचा प्रयत्न करू या. उद्यापासून ‘मानसिक रूपांतरण’ हा भाग सुरू करत आहोत.

धन्यवाद.
संपादक, अभीप्सा मराठी मासिक

साधना, योग आणि रूपांतरण – २३९

(आपल्या व्यक्तित्वामध्ये दोन प्रणाली कार्यरत असतात. एक अध-ऊर्ध्व म्हणजे जडभौतिकापासून ते सच्चिदानंदापर्यंत असणारी प्रणाली आणि दुसरी बाहेरून आत जाणारी म्हणजे बाह्य व्यक्तित्व ते चैत्य पुरुष अशी असणारी केंद्रानुगामी प्रणाली. या दोन्ही प्रणालींचा येथे संदर्भ आहे.)

रूपांतरणासाठी ‘संपूर्ण’ आणि ‘समग्र’ ईश्वराधीनतेची (consecration) आवश्य कता असते. सर्वच प्रामाणिक साधकांची तीच आस असते, नाही का?

‘संपूर्ण’ ईश्वराधीनता म्हणजे ऊर्ध्व-अधर (vertically) अशा पद्धतीने ईश्वराधीन होणे. येथे व्यक्ती सर्व अवस्थांमध्ये, म्हणजे अगदी जडभौतिक अवस्थांपासून ते अगदी सूक्ष्म अशा सर्व अवस्थांपर्यंत, सर्वत्र ईश्वराधीन असते.

आणि ‘समग्र’ ईश्वराधीनता म्हणजे क्षितिजसमांतर (horizontally) पद्धतीने ईश्वराधीन होणे. शरीर, प्राण, मन यांनी मिळून ज्या बाह्यवर्ती व्यक्तित्वाची घडण झालेली असते त्या व्यक्तित्वाच्या विभिन्न आणि बरेचदा परस्परविरोधी असणाऱ्या सर्व घटकांमध्ये ईश्वराधीनता असणे म्हणजे समग्र ईश्वराधीन असणे.

– श्रीमाताजी (CWM 15 : 88)