ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना, योग आणि रूपांतरण – १४२

साधना, योग आणि रूपांतरण – १४२

मानवी प्रकृतीत आणि मानवी जीवनात संकल्पशक्ती, ज्ञानशक्ती आणि प्रेमशक्ती या तीन दिव्यशक्ती आहेत. मानवाचा आत्मा ईश्वराप्रत ज्या तीन मार्गांनी उन्नत होत जातो त्या मार्गांचा निर्देश वरील तीन शक्ती करतात. म्हणून या तीन मार्गांचा समुच्चय, तीनही मार्गांनी मनुष्याचे ईश्वराशी सायुज्य होणे, एकत्व पावणे हाच ‘पूर्णयोगाचा आधार’ असणे आवश्यक असते.

कर्म ही जीवनातील पहिली शक्ती आहे. प्रकृती ही या कर्मशक्तीपासून आणि तिच्या कार्यापासून सुरुवात करते; आणि जेव्हा ही शक्ती आणि तिची कार्यं मनुष्यामध्ये सचेत (conscious) होतात, तेव्हा त्यांना संकल्पशक्ती व संकल्पशक्तीची उपलब्धी हे स्वरूप येते. म्हणून मनुष्याने आपले कर्म ईश्वरोन्मुख केले, की त्याचे जीवन उत्तम प्रकारे आणि निश्चितपणे दिव्य होऊ लागते. कर्म ईश्वरोन्मुख करणे हे दिव्य जीवनाचे पहिले प्रवेशद्वार आहे; तो आरंभ-बिंदू आहे.

मनुष्यातील संकल्पशक्ती जेव्हा ईश्वरी संकल्पशक्तीशी मेळविली जाते आणि जिवाची समग्र कर्मं एका ‘ईश्वरा’तूनच उदित होऊ लागतात, तसेच ती ‘ईश्वरा’भिमुख झालेली असतात तेव्हा, ‘कर्मातून एकत्व’ पूर्णतया साध्य होते. परंतु, कर्माची परिपूर्ती ज्ञानामध्ये होते. भगवद्गीता सांगते त्याप्रमाणे, सर्व कर्मांची समग्रता ही, चक्राकार फिरून ज्ञानामध्ये परिसमाप्त होते. ‘सर्वं कर्माखिलं ज्ञाने परिसमाप्यते.’

आपल्या कर्मामध्ये आणि संकल्पामध्ये आपण ‘ईश्वरा’शी ऐक्य पावलो की, आपण त्या सर्वान्तर्यामी वसणाऱ्या आत्म्याशी एकत्व पावतो. ज्याच्यापासून आपली सर्व कर्म व संकल्प उदयास आलेले असतात; आणि जेथून ते स्वत: शक्ती घेत असतात आणि ज्यांच्या उर्जेची परिसमाप्ती परत त्याच्यामध्येच होत असते अशा सर्वान्तर्यामी वसणाऱ्या आत्म्याशी आपण एकत्व पावतो. या ऐक्याचा कळस म्हणजे प्रेम व भक्ती होय. ज्या ‘ईश्वरा’च्या उदरात आपण राहतो, जीवनव्यवहार करतो, हिंडतोफिरतो, त्या ‘ईश्वरा’शी असलेल्या जाणीवयुक्त ऐक्याचा आनंद हे त्या प्रेमाचे स्वरूप असते. त्या ‘ईश्वरा’मुळे आपले अस्तित्व आहे, आणि त्याच्यासाठीच केवळ आपण कर्म करायची असतात, त्याच्यासाठीच जगायचे असते हे सरतेशेवटी आपल्याला उमगते.

आपल्या शक्तींची त्रिमूर्ती ती हीच. ईश्वराप्रत पोहोचण्याचा प्रवेशमार्ग म्हणून आणि त्याच्याशी असलेल्या आपल्या संपर्काची दिशा म्हणून जेव्हा आपण कर्मापासून प्रारंभ करतो तेव्हा, आपण या तीन दैवतांच्या ऐक्यापाशीच येऊन पोहोचतो.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 545)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

स्वत:ला न फसविणे अवघड

  व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…

8 hours ago

प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन

  आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…

1 day ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४

  (भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…

2 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०३

  (भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…

3 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०२

  भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…

4 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०१

  साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…

5 days ago