ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना, योग आणि रूपांतरण – १४२

साधना, योग आणि रूपांतरण – १४२

मानवी प्रकृतीत आणि मानवी जीवनात संकल्पशक्ती, ज्ञानशक्ती आणि प्रेमशक्ती या तीन दिव्यशक्ती आहेत. मानवाचा आत्मा ईश्वराप्रत ज्या तीन मार्गांनी उन्नत होत जातो त्या मार्गांचा निर्देश वरील तीन शक्ती करतात. म्हणून या तीन मार्गांचा समुच्चय, तीनही मार्गांनी मनुष्याचे ईश्वराशी सायुज्य होणे, एकत्व पावणे हाच ‘पूर्णयोगाचा आधार’ असणे आवश्यक असते.

कर्म ही जीवनातील पहिली शक्ती आहे. प्रकृती ही या कर्मशक्तीपासून आणि तिच्या कार्यापासून सुरुवात करते; आणि जेव्हा ही शक्ती आणि तिची कार्यं मनुष्यामध्ये सचेत (conscious) होतात, तेव्हा त्यांना संकल्पशक्ती व संकल्पशक्तीची उपलब्धी हे स्वरूप येते. म्हणून मनुष्याने आपले कर्म ईश्वरोन्मुख केले, की त्याचे जीवन उत्तम प्रकारे आणि निश्चितपणे दिव्य होऊ लागते. कर्म ईश्वरोन्मुख करणे हे दिव्य जीवनाचे पहिले प्रवेशद्वार आहे; तो आरंभ-बिंदू आहे.

मनुष्यातील संकल्पशक्ती जेव्हा ईश्वरी संकल्पशक्तीशी मेळविली जाते आणि जिवाची समग्र कर्मं एका ‘ईश्वरा’तूनच उदित होऊ लागतात, तसेच ती ‘ईश्वरा’भिमुख झालेली असतात तेव्हा, ‘कर्मातून एकत्व’ पूर्णतया साध्य होते. परंतु, कर्माची परिपूर्ती ज्ञानामध्ये होते. भगवद्गीता सांगते त्याप्रमाणे, सर्व कर्मांची समग्रता ही, चक्राकार फिरून ज्ञानामध्ये परिसमाप्त होते. ‘सर्वं कर्माखिलं ज्ञाने परिसमाप्यते.’

आपल्या कर्मामध्ये आणि संकल्पामध्ये आपण ‘ईश्वरा’शी ऐक्य पावलो की, आपण त्या सर्वान्तर्यामी वसणाऱ्या आत्म्याशी एकत्व पावतो. ज्याच्यापासून आपली सर्व कर्म व संकल्प उदयास आलेले असतात; आणि जेथून ते स्वत: शक्ती घेत असतात आणि ज्यांच्या उर्जेची परिसमाप्ती परत त्याच्यामध्येच होत असते अशा सर्वान्तर्यामी वसणाऱ्या आत्म्याशी आपण एकत्व पावतो. या ऐक्याचा कळस म्हणजे प्रेम व भक्ती होय. ज्या ‘ईश्वरा’च्या उदरात आपण राहतो, जीवनव्यवहार करतो, हिंडतोफिरतो, त्या ‘ईश्वरा’शी असलेल्या जाणीवयुक्त ऐक्याचा आनंद हे त्या प्रेमाचे स्वरूप असते. त्या ‘ईश्वरा’मुळे आपले अस्तित्व आहे, आणि त्याच्यासाठीच केवळ आपण कर्म करायची असतात, त्याच्यासाठीच जगायचे असते हे सरतेशेवटी आपल्याला उमगते.

आपल्या शक्तींची त्रिमूर्ती ती हीच. ईश्वराप्रत पोहोचण्याचा प्रवेशमार्ग म्हणून आणि त्याच्याशी असलेल्या आपल्या संपर्काची दिशा म्हणून जेव्हा आपण कर्मापासून प्रारंभ करतो तेव्हा, आपण या तीन दैवतांच्या ऐक्यापाशीच येऊन पोहोचतो.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 545)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…

15 hours ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा‌ या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…

2 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…

3 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…

4 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…

5 days ago

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४

पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…

6 days ago