ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना, योग आणि रूपांतरण – १४

साधक : ‘ध्यान’ म्हणजे नक्की काय?

श्रीअरविंद : ‘ध्याना’ची भारतीय संकल्पना स्पष्ट करण्यासाठी इंग्रजीमध्ये meditation आणि contemplation हे दोन शब्द उपयोगात आणले जातात.

एकाच विषयाचा वेध घेण्यासाठी म्हणून विचारांच्या एका सलग मालिकेवर मनाचे लक्ष केंद्रित करणे म्हणजे ‘ध्यान’ (Meditation)

एकाग्रता-शक्तीच्या आधारे, वस्तुचे, प्रतिमेचे किंवा संकल्पनेचे ज्ञान, मनामध्ये स्वाभाविकरित्या उदित व्हावे म्हणून, एकाच वस्तुकडे, प्रतिमेकडे किंवा संकल्पनेकडे मनाने पाहत राहणे, म्हणजे ‘निदिध्यास’ (Contemplation).

हे दोन्ही प्रकार ही ‘ध्याना’चीच दोन रूपं आहेत. कारण, विचारावर असू दे, दृश्यावर असू दे किंवा ज्ञानावर असू दे, पण मनाची एकाग्रता करणे हे ‘ध्याना’चे तत्त्व आहे. ‘ध्याना’चे इतरही काही प्रकार आहेत.

आत्म-निरीक्षणात्मक एकाग्रता
एके ठिकाणी विवेकानंदांनी, तुम्हाला तुमच्या विचारांपासून अलग होऊन मागे उभे राहायला सांगितले आहे: मनात विचार जसे येत आहेत तसे येत राहू देत, तुम्ही नुसते त्याचे निरीक्षण करायचे आणि ते काय आहेत हे जाणून घ्यायचे. याला ‘आत्म-निरीक्षणात्मक एकाग्रता’ (Concentration in self-observation) असे म्हणता येईल.

मुक्तिप्रद ध्यान
आत्म-निरीक्षणात्मक एकाग्रता ध्यानाच्या दुसऱ्या एका प्रकाराकडे घेऊन जाते. मनामधून सर्व विचार काढून टाकणे; ज्यायोगे, ते मन एकप्रकारची विशुद्ध सावध अशी पोकळी बनले पाहिजे म्हणजे त्यामध्ये दिव्य ज्ञान अवतरू शकेल आणि स्वतःचा ठसा उमटवू शकेल; त्यामध्ये सामान्य मानवी मनाच्या कनिष्ठ विचारांची लुडबूड असणार नाही आणि काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूने लिहावे तितकी स्पष्टता त्यामध्ये असेल. अशा प्रकारे, सर्व मानसिक विचारांचा निरास (rejection) करणे ही योगाची एक पद्धत असल्याचे ‘भगवद्गीते’मध्ये सांगितले आहे असे तुम्हाला आढळून येईल आणि या पद्धतीला ‘गीते’ने पसंती दिलेली दिसते. याला ‘मुक्तिप्रद ध्यान’ (Dhyana of liberation) असे म्हणता येईल. कारण या ध्यानामुळे विचारांच्या यांत्रिक पद्धतीच्या गुलामीमधून मनाची मुक्तता होते. या ध्यानामुळे, विचार करायचा की करायचा नाही, हे ठरविण्यासाठी मनाला मुभा मिळते. तसेच, स्वतःच्या विचारांची निवड करण्यास मुभा मिळते किंवा वाटले तर, विचारांच्या अतीत होऊन, आपल्या तत्त्वज्ञानामध्ये ज्याला ‘विज्ञान’ असे म्हटले जाते त्या ‘सत्या’च्या शुद्ध बोधाप्रत जाण्याची मनाला मुभा मिळते.

ध्यान (Meditation) ही मानवी मनाला सर्वाधिक सोपी असणारी प्रक्रिया आहे पण त्याचे परिणाम सर्वात अल्प असतात. निदिध्यासन (Contemplation) ही अधिक कठीण पण परिणामांच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. आत्म-निरीक्षण आणि विचारमालिकांपासून मुक्ती (मुक्तिप्रद ध्यान) या गोष्टी सर्वाधिक कठीण आहेत परंतु त्याचे फळ मात्र सर्वात विशाल आणि महान असे असते. तुम्ही तुमच्या कलानुसार आणि क्षमतेनुसार यापैकी कोणत्याही प्रकाराची निवड करू शकता.

योग्य पद्धती म्हणायची झाली तर, ध्यानाच्या या सर्वच प्रकारांचा उपयोग करावा, प्रत्येक पद्धत तिच्या तिच्या स्थानी आणि तिच्या तिच्या उद्दिष्टांसाठीच वापरण्यात यावी. परंतु यासाठी एका दृढ श्रद्धेची, स्थिर धैर्याची आवश्यकता असते तसेच ‘योगा’साठी त्या त्या पद्धतीचा स्वतःहून अवलंबून करण्यासाठी म्हणून महान ‘संकल्प’ शक्तीची आवश्यकता असते.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 293-294)

Latest posts by श्रीअरविंद (see all)
श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

चैत्य पुरुष म्हणजे काय?

अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…

7 hours ago

तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व

ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…

15 hours ago

चैत्य पुरुष खुला होणे

जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…

2 days ago

दिव्य अस्तित्वाचा शोध

  आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…

3 days ago

आत्मनिरीक्षण कसे करावे?

  (उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…

4 days ago

अंतरात्म्याचा शोध

तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…

5 days ago