ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना, योग आणि रूपांतरण – १०

(ध्यानामध्ये, निद्रेमध्ये किंवा जागेपणी जी सूक्ष्म पातळीवरील दृश्यं दिसतात, विविध देवदेवतादींची दर्शनं होतात ती खरी असतात की खोटी असा प्रश्न कोणी साधकाने विचारलेला दिसतो, त्यासंबंधी श्रीअरविंद येथे खुलासेवार लिहीत आहेत….)

वस्तुनिष्ठ (objective) दृश्यांइतकीच व्यक्तिनिष्ठ (Subjective) अंतर्दर्शनेदेखील खरी असू शकतात – फरक इतकाच की, वस्तुनिष्ठ दृश्य हे स्थूल, भौतिक अवकाशातील वास्तव गोष्टींबाबतचे असते, तर अंतर्दर्शने ही अन्य स्तरांवरील वास्तव गोष्टींची असतात; जे स्तर सूक्ष्म भौतिक पातळीपर्यंत उतरत आलेले असतात. अगदी प्रतीकात्मक दर्शनंसुद्धा, जर ती वास्तविकतेची (reality) प्रतीकं असतील तर ती खरी असतात. एवढेच काय तर, स्वप्नांनासुद्धा सूक्ष्म क्षेत्रामध्ये एक वास्तविकता असू शकते. जे सत्य आहे किंवा सत्य होते किंवा जे सत्य असणार आहे अशा गोष्टींचे प्रतिनिधित्व जर ही दर्शनं करत नसतील आणि ती दर्शनं म्हणजे नुसत्या काल्पनिक मनोमय रचना असतील तर मात्र ती दर्शनं अ-सत्य, मिथ्या असतात. तुम्हाला ‘कृष्णा’चे जे दर्शन झाले आहे (चंदेरी निळसर रंगातील, बासरी वाजविणारा आणि नृत्यमुद्रेमध्ये उभा असणारा ‘कृष्ण’ हे जे दर्शन झाले आहे) ते खरे असू शकते….

कधीकधी विकसनासाठी कोणतेही प्रयत्न न करतादेखील ही सूक्ष्मदृष्टी जन्मजात आणि सवयीची अशी असू शकते; काहीवेळा ती स्वतःहून जागृत होते आणि मग तिचा अनुभव पुष्कळ वेळा येतो किंवा तिच्या विकसनासाठी अगदी थोडीशी साधनादेखील पुरेशी असते. (अर्थात) अशी दृश्यं दिसणे हे अनिवार्यपणे आध्यात्मिक उपलब्धीचे लक्षण असतेच असे नाही; परंतु सहसा व्यक्ती ‘योगसाधने’च्या माध्यमातून जसजशी अंतरंगात प्रवेश करू लागते, ती अंतरंगात राहून जीवन जगू लागते तसतशी ही सूक्ष्मदृष्टीची शक्ती कमीअधिक प्रमाणात जागृत होऊ लागते. परंतु ही गोष्ट नेहमीच अगदी सहजपणे घडते असेही नाही, विशेषतः व्यक्तीला जर प्रामुख्याने बुद्धिप्रधान जीवन जगण्याची सवय असेल किंवा तिला बाह्यवर्ती प्राणिक चेतनेमध्येच जीवन जगण्याची सवय असेल तर ही गोष्ट तितकीशी सहजपणे घडत नाही.

मला वाटते, तुम्ही ‘दर्शना’चा, म्हणजे ‘देवतेने आपल्या भक्तासमोर स्वतःला प्रकट करणे’ या गोष्टीचा विचार करत आहात, परंतु ती गोष्ट निराळी असते. तिथे त्या ‘देवते’च्या अस्तित्वावरील आवरण दूर होते, मग ते अनावरण तात्पुरते असेल किंवा स्थायी स्वरूपाचे असेल, आणि मग ते दर्शन म्हणून घडेल किंवा त्या देवतेच्या सान्निध्याची अगदी आत्मीय भावना या स्वरूपात अनुभवास येईल. ही अस्तित्वाची जाणीव दृश्यापेक्षा अधिक सघन असते आणि त्या देवतेबरोबर वारंवार किंवा नित्य होणाऱ्या संवादाच्या स्वरूपात ती अनुभवास येते. व्यक्ती जेव्हा आपल्या अंतरात्म्यामध्ये खोलखोल जाऊ लागते आणि चेतनेचा विकास घडू लागतो किंवा भक्तीच्या उत्कटतेमध्ये वाढ होते तेव्हा त्या देवतेच्या अस्तित्वाची जाणीव होते. चढत्यावाढत्या आणि तल्लीन भक्तीच्या भारामुळे (pressure) जेव्हा बाह्यवर्ती चेतनेचे कवच पुरेसे मोडून पडते, तेव्हा अशा प्रकारचा संपर्क अनुभवास येतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 103-104)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

ईश्वरी अवतरणाचा दाब

  (अगदी बारीकसारीक आध्यात्मिक अनुभवामुळे हुरळून जाणाऱ्या नवोदित साधकांना श्रीमाताजी सांगत आहेत...) तुम्हाला ईश्वरी अवतरणाचा…

13 hours ago

चालत्या गाड्याला खीळ…

  “तुम्ही ईश्वरी शक्तीसमोर खुले व्हा म्हणजे तुम्हाला ईश्वरी शक्ती प्राप्त होईल,” असे तुम्हाला सांगण्यात…

2 days ago

प्रकृतीचे शुद्धीकरण

(एका साधकाला स्वप्नामध्ये जे दिसले आहे त्यावरून दिव्य प्रकाश स्वीकारण्यासाठी तो सक्षम आहे असे दिसते,…

3 days ago

अडचणींना कसे हाताळावे?

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुमच्या अडचणींना हाताळण्यात आणि तुमच्यावर अपप्रवृत्तींचा जो हल्ला होत आहे…

4 days ago

उच्चतर शक्तीचे अवतरण

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) ‘शक्तीला प्रवेश करू द्या,’ असे मी जेव्हा तुम्हाला लिहिले तेव्हा त्याचा अर्थ…

5 days ago

केवळ ईश्वरी शक्तीप्रतच खुले व्हावे

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून...) ‘क्ष’ हा अवाजवी तामसिक, अक्रिय झाला आहे. तो प्रत्येक गोष्टीलाच खुला…

6 days ago