विचारशलाका ३८
(श्रीमाताजी येथे ‘विचार’ व्यापक करण्याच्या एका मार्गाबद्दल सांगत आहेत.)
समजा, तुमच्याबरोबर कोणी दुसरी एखादी व्यक्ती आहे. ती व्यक्ती तुम्हाला काहीतरी सांगते, तेव्हा तुम्ही त्याच्या अगदी विरुद्ध असे काहीतरी त्या व्यक्तीला सांगता (विरोध करण्याच्या हिरिरीतून हे बहुधा नेहमीच घडते) आणि तुम्ही वादविवाद करायला सुरुवात करता. साहजिकच आहे की, तुम्ही कोणत्याच मुद्यापाशी येऊन पोहोचणार नाही; हो, तुम्ही जर भांडकुदळ असाल तर त्यातून भांडणं मात्र होतील.
पण तसे करण्याऐवजी, म्हणजे स्वत:च्या शब्दांमध्येच किंवा स्वत:च्या कल्पनांमध्येच बंदिस्त होऊन राहण्याऐवजी तुम्ही जर स्वत:ला सांगितलेत, “एक मिनिट थांब, मी प्रयत्न करून पाहातो आणि तो मला असे का म्हणाला ते समजावून घेतो. हो, तो मला तसे का बरे म्हणाला असेल?” तुम्ही चिंतन करता, “का? का? का?” तुम्ही प्रयत्न करत तिथेच थांबून राहता.
दुसरा माणूस मात्र बोलतच असतो, नाही का? – परंतु आता तो खूष होतो कारण तुम्ही आता त्याला विरोध करत नसता. तो तावातावाने बोलत राहतो; त्याला वाटते की, त्याने तुम्हाला त्याचे म्हणणे पटवून दिले आहे.
तो काय म्हणतो आहे त्यावर तुम्ही अधिकाधिक लक्ष एकवटू लागता; हळूहळू त्याच्या भावनेच्या आणि शब्दांच्या माध्यमातून जणू काही तुम्ही त्याच्या मनात प्रवेश करता. जेव्हा तुम्ही त्याच्या डोक्यात प्रवेश करता, तेव्हा एकदम तुम्ही त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये प्रवेश करता. आणि मग, तुमच्याशी तो तसा का बोलत आहे, याचे तुम्हाला आकलन होते.
आणि जर तुमच्याकडे पुरेसे बुद्धिचापल्य असेल आणि जर तुम्ही, तुम्हाला आधी जे माहीत होते ते आणि आत्ता जे समजले ते या दोन्ही गोष्टी जर शेजारी शेजारी ठेवल्यात तर आता तुमच्याकडे एकत्रितपणे दोन विचारसरणी असतील आणि त्या दोन्हींचा समेट घडविणारे असे सत्य तुम्ही शोधून काढू शकाल. आणि इथेच तुम्ही खरीखुरी प्रगती केलेली असेल.
स्वत:चे विचार व्यापक करण्याचा हा एक सर्वोत्तम मार्ग आहे.
तुम्ही जर एखाद्या युक्तिवादाला सुरुवात करणार असाल, तर ताबडतोब शांत व्हा. तुम्ही शांत राहिले पाहिजे, काहीही बोलू नका आणि ती दुसरी व्यक्ती गोष्टींकडे ज्या पद्धतीने पाहत आहे त्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे, तुम्ही तुमची पाहण्याची पद्धतच विसरून जाल, असे होणार नाही. त्याउलट, तुम्ही त्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे ठेवू शकाल. तेव्हा तुम्ही खरंच प्रगती केलेली असेल, एक खरीखुरी प्रगती!
– श्रीमाताजी [CWM 05 : 218-220]
अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल,…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१ (मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० (उत्तरार्ध) एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली…