ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश

विचारशलाका २८

 

आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश म्हणजे जणू समुद्रात उडी मारल्याप्रमाणे ‘दिव्यत्वा’मध्ये उडी घेणे. आणि तरीदेखील तो शेवट नसतो तर तो प्रारंभ असतो. कारण एकदा का तुम्ही त्यामध्ये उडी घेतली की, त्यानंतर तुम्हाला ‘दिव्यत्वा’मध्ये जीवन जगता आले पाहिजे. “मी कोठे पडणार तर नाही नां? मला काही होणार तर नाही नां?” असा कोणताही विचार न करता तुम्हाला सरळ उडी मारायची असते. तुमच्या मनामध्ये असणारी चलबिचल तुम्हाला रोखू पाहत असते. पण तुम्ही स्वत:ला झोकून दिले पाहिजे. तुम्हाला समुद्रात उडी मारायची असेल आणि तुम्ही जर सगळा वेळ असा विचार करीत बसलात की, ”अरे बापरे, पण इथे किंवा तिथे एखादा खडक असला तर…” तर मग, तुम्ही कधीच उडी मारू शकणार नाही.

अर्थातच समुद्रात उडी मारण्यापूर्वी ज्याप्रमाणे तुम्ही समुद्र पाहिलेला असला पाहिजे आणि ज्याप्रमाणे तुम्हाला त्याविषयी काही माहिती असली पाहिजे त्याप्रमाणेच, तुम्हाला ‘दिव्य सद्वस्तू’चे (Divine Reality) आधी थोडी तरी झलक दिसलेली असली पाहिजे. ती झलक म्हणजे सहसा आंतरात्मिक चेतनेची (psychic consciousness) जागृती असते. भले तो संपर्क अगदी सखोल आंतरात्मिक किंवा समग्रतया प्रस्थापित झालेला नसला तरीदेखील, तुम्हाला किमान एक सुस्पष्ट अशी मानसिक वा प्राणिक प्रचिती (mental or vital realisation) तरी आलेली असली पाहिजे. तुम्हाला तुमच्या अंतरंगामध्ये किंवा बाहेर सुस्पष्टपणे ‘ईश्वरी उपस्थिती’ची जाणीव झालेली असली पाहिजे, तुम्हाला ‘दिव्य-जगता’चा श्वास जाणवलेला असला पाहिजे. आणि त्याचवेळी त्याविरुद्ध असणाऱ्या सामान्य जगताचा घुसमटवून टाकणारा दबाव तुम्हाला जाणवलेला असला पाहिजे की जो, तुम्हाला या दडपून टाकणाऱ्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करण्यास भाग पाडतो. तुम्हाला जर तसा अनुभव आलेला असेल तर तुम्ही केवळ त्या ‘दिव्य सद्वस्तू’मध्ये नि:शेषतया आश्रय घेणे आणि त्याच्या आधाराने, त्याच्या सुरक्षेमध्ये, केवळ त्यामध्येच राहणे एवढेच करायचे असते. तुम्ही तुमच्या सामान्य जीवनामध्ये कधीतरी हे अंशत: किंवा तुमच्या अस्तित्वाच्या काही भागांनिशी वा कधीतरी, नैमित्तिकरित्या असे केले असेल तर ते आता तुम्ही पूर्णांशाने आणि सदासर्वदासाठी केले पाहिजे. ही उडी तुम्हाला मारायची आहे आणि जर तुम्ही हे केले नाहीत, तर तुम्ही वर्षानुवर्षे ‘योगसाधना’ करत राहिलात तरीही खऱ्या आध्यात्मिक जीवनाविषयी तुम्हाला काहीही माहीत होणार नाही, अशी शक्यता असते. संपूर्णतया आणि नि:शेषतया उडी मारा; तेव्हा तुम्ही या बाह्य गोंधळापासून पूर्णत: मुक्त व्हाल आणि तुम्ही आध्यात्मिक जीवनाची खरीखुरी अनुभूती प्राप्त करून घ्याल.

– श्रीमाताजी [CWM 03 : 21-22]

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

चैत्य पुरुष म्हणजे काय?

अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…

8 hours ago

तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व

ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…

16 hours ago

चैत्य पुरुष खुला होणे

जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…

2 days ago

दिव्य अस्तित्वाचा शोध

  आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…

3 days ago

आत्मनिरीक्षण कसे करावे?

  (उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…

4 days ago

अंतरात्म्याचा शोध

तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…

5 days ago