ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

शारीरिक कमतरतेवर उपाय

विचारशलाका १७

साधक : ज्याला स्वत:ची शारीरिक अवस्था सुधारण्याची इच्छा आहे, ज्याला उपचाराचा परिणाम दिसून यावा असे वाटते किंवा जो स्वत:च्या शारीरिक कमतरतेवर उपाय करू पाहतो त्याने काय केले पाहिजे? जो बदल घडून येणे अपेक्षित आहे त्याच्या अंतिम टप्प्यावर लक्ष केंद्रित करून, त्याने स्वत:ची इच्छाशक्ती उपयोगात आणावी की, केवळ ते घडून येईलच अशा खात्रीने जगत राहावे की, ‘ईश्वरी शक्ती’ योग्य वेळ आली की, योग्य मार्गाने अपेक्षित तो परिणाम घडवून आणेलच असा विश्वास बाळगावा?

श्रीमाताजी : एकच गोष्ट करण्याचे हे भिन्न भिन्न मार्ग आहेत आणि त्यातील प्रत्येक मार्ग हे भिन्नभिन्न परिस्थितीमध्ये परिणामकारक ठरतात. यापैकी कोणती पद्धत तुम्हाला लागू पडेल, हे तुमच्यामध्ये विकसित झालेल्या चेतनेवर आणि कोणत्या स्वरूपाच्या शक्ती तुम्ही कार्यरत करू शकता यावर अवलंबून आहे.

तुम्ही पूर्णपणे बरे झाला आहात किंवा तुमच्यामध्ये अपेक्षित बदल घडून आला आहे अशा चेतनेमध्ये तुम्ही राहू शकता आणि तुमच्या आंतरिक रचनाशक्तीद्वारे बाह्य अवस्थेमध्ये देखील हळूहळू तो बदल घडवून आणू शकता. किंवा त्या गोष्टींवर परिणाम करू शकतील अशा शक्ती कोणत्या याची दृष्टी जर तुम्हाला असेल, तुम्ही जर ते जाणून घेऊ शकलात आणि त्या हाताळण्याचे कौशल्य जर तुमच्यापाशी असेल तर तुम्ही त्यांना खाली बोलावू शकता आणि ज्या भागांमध्ये कार्य होणे आवश्यक आहे तेथे त्या शक्ती उपयोगात आणू शकता; असे केलेत तर त्या शक्तीद्वारे तो बदल घडवून आणला जाईल. किंवा तुम्ही तुमची समस्या ‘ईश्वरा’समोर मांडलीत आणि त्यावर उपाय करावा म्हणून ‘ईश्वरी शक्ती’वर पूर्णपणे भरवसा ठेवून विनवणी केलीत तर, तेव्हाही तो बदल घडवून आणला जाईल.

पण जरी तुम्ही यांपैकी काहीही केलेत, कोणतीही प्रक्रिया अवलंबलीत आणि त्याबाबतचे आत्यंतिक कौशल्य व शक्तीदेखील तुम्हाला प्राप्त झालेली असली तरीदेखील, त्याचे फळ मात्र तुम्ही त्या ‘ईश्वरा’च्या हाती सोपविले पाहिजे. तुम्ही नेहमीच प्रयत्न केले पाहिजेत परंतु तुमचे ते प्रयत्न सफल होणार का निष्फळ होणार हे ‘ईश्वरा’च्या हाती असते. तेथे तुमची वैयक्तिक शक्ती खुंटलेली असते; जर परिणाम दिसून आला तर तो परिणाम तुमच्यामुळे नसून, ‘ईश्वरी शक्ती’मुळे घडून आलेला असतो.

तुम्ही असे विचारले आहे की, ‘ईश्वरा’कडे अशा प्रकारच्या गोष्टींची मागणी करणे योग्य आहे का? नैतिक दोषांचे निराकरण करण्यासाठी ‘ईश्वरा’ची विनवणी करण्याच्या तुलनेत, शारीरिक अपूर्णतेचे निराकरण करण्यासाठी ‘ईश्वरा’कडे वळणे अधिक बरे. अर्थात, तुम्ही कशाचीही मागणी करत असाल, तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी, अगदी तुम्ही शर्थीचे प्रयत्न करत असतानादेखील, किंवा तुमचे ज्ञान उपयोगात आणतानादेखील किंवा शक्तीचा वापर करत असतानादेखील तुम्हाला ही जाणीव असली पाहिजे की, त्याचा परिणाम दिसून येणे ही गोष्ट ‘ईश्वरी कृपे’वर अवलंबून असते.

एकदा तुम्ही ‘योगमार्ग’ स्वीकारलात की, मग तुम्ही जे काही कराल ते पूर्णपणे समर्पण वृत्तीने केले पाहिजे. “मी माझ्यामधील अपूर्णता घालविण्याचे यथाशक्य सर्व प्रयत्न करत आहे, मी माझ्यापरीने सर्वाधिक प्रयत्न करत आहे, मी माझ्यामध्ये सुधारणा व्हावी अशी आस बाळगत आहे पण त्याच्या फलनिष्पत्तीसाठी मी स्वत:ला पूर्णत: त्या ईश्वराच्या हाती सोपवत आहे;” असा तुमचा भाव असला पाहिजे.

– श्रीमाताजी [CWM 03 : 96-97]

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…

3 hours ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७

(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…

1 day ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…

2 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…

3 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…

4 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३

आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…

5 days ago