अहंकाराव्यतिरिक्त आणखी एका चेतनेविषयी जेव्हा तुम्हाला जाणीव होऊ लागते आणि त्या चेतनेमध्ये तुम्ही जीवन जगायला सुरूवात करता किंवा अधिकाधिक रीतीने तुम्ही त्या चेतनेच्या प्रभावात जीवन जगू लागता तेव्हा ती ‘आध्यात्मिकता’ असते.

ही चेतना व्यापक, अनंत, स्वयंभू, अहंकारविरहित अशी असते, या चेतनेला चैतन्य (‘आत्मा, ब्रह्म, ईश्वर’) या नावांनी ओळखले जाते, आणि हाच अनिवार्यपणे ‘आध्यात्मिकते’चा अर्थ असला पाहिजे.

– श्रीअरविंद [SABCL 23 : 877]

सामान्य मानवी जीवन हे सर्वसामान्य मानवी चेतनेचे असे जीवन असते की जे, स्वत:च्या खऱ्या ‘स्व’ पासून तसेच ‘ईश्वरा’ पासून विभक्त झालेले असते आणि मन, प्राण, शरीर यांच्या सामान्य सवयींद्वारे, म्हणजेच अज्ञानाच्या नियमांद्वारे या जीवनाचे नेतृत्व केले जाते.

…या उलट, आध्यात्मिक जीवन चेतनेच्या परिवर्तनाद्वारे थेटपणे वाटचाल करत असते. स्वत:च्या खऱ्या ‘स्व’ पासून आणि ‘ईश्वरा’पासून विभक्त झालेल्या, अज्ञानी अशा सामान्य चेतनेकडून एका महान चेतनेकडे ही वाटचाल होत असते. या महान चेतनेमध्ये व्यक्तीला स्वतःचे खरेखुरे अस्तित्व सापडते आणि व्यक्ती प्रथमतः ‘ईश्वरा’च्या प्रत्यक्ष व चैतन्यमय संपर्कात येते आणि नंतर त्या ईश्वराबरोबर एकत्व पावते.

आध्यात्मिक साधकाच्या दृष्टीने हे चेतनेचे परिवर्तन हीच एकमेव अशी गोष्ट असते की जी मिळविण्यासाठी व्यक्ती धडपडत असते, अन्य कोणत्याही गोष्टीची तिला मातब्बरी वाटत नसते.

– श्रीअरविंद [CWSA 28 : 419]

‘देव’भूमी असलेल्या भारतामध्ये ऋषीमुनी, योगी, संतसत्पुरूष, महात्मे यांची कधीच वानवा नव्हती. त्यांच्या तपाचरणाचा प्रभाव म्हणा किंवा सत्संगाचा प्रभाव म्हणा, पण भारतामध्ये रहिवास करणाऱ्या आबालवृद्धांना जणू आध्यात्मिकतेचे बाळकडूच मिळालेले असते. परंतु त्याच्या अतिपरिचयामुळे असेल कदाचित पण सामान्य जनांमध्ये ‘आध्यात्मिकता’ या गोष्टीबद्दल विविध समजुती असलेल्या आढळतात. त्यांची सत्यासत्यता पारखून, श्रीअरविंद आपल्याला आध्यात्मिकता म्हणजे काय आणि काय नाही, हे खुलासेवार स्पष्ट करतात.

एकदा आध्यात्मिकता म्हणजे काय हे समजले की, त्याला जोडूनच पुढचा प्रश्न येतो. आणि तो म्हणजे आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आध्यात्मिकतेचे अनुसरण कसे करायचे. याबद्दलचे मार्गदर्शनही उद्यापासून सुरु होत असलेल्या ‘आध्यात्मिकता’ या मालिकेमध्ये वाचकांना लाभेल, असा विश्वास वाटतो.

संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक

(आपल्यामधील) चेतना स्वत:ला कोठे ठेवते आणि ती स्वत:ला कोठे केंद्रित करते यावर सारे काही अवलंबून आहे. चेतना जर स्वत: अहंकाराशी संबंधित राहील किंवा अहंकारामध्ये स्वत:ला ठेवेल तर तुम्ही अहंकाराशी एकरूप होऊन जाता. चेतना जर मनाशी संबंधित राहील किंवा तेथे स्वत:ला ठेवेल तर ती मनाशी आणि त्याच्या क्रियांशी, तत्सम गोष्टींशी एकात्म पावेल. चेतना जर बाह्य गोष्टींवरच भर देईल, तर ती बहिवर्ती अस्तित्वामध्येच राहू लागेल आणि आंतरिक मन, प्राण आणि आंतरतम असणाऱ्या चैत्याची तिला विस्मृती होईल. चेतना जर आत वळली आणि तिने तिथे भर दिला तर तिथे ती स्वत:ला ‘आंतरिक पुरुष’ (Inner being) म्हणून ओळखते, किंवा अधिक खोलवर गेली तर ती स्वत:ला ‘चैत्य पुरुष’ (Psychic being) म्हणून ओळखते; जर ती देहाच्या बाहेर असलेल्या पातळ्यांवर चढून गेली तर, ज्या आत्म्याला स्वाभाविकपणेच त्याच्या विशालतेचे आणि मुक्ततेचे भान असते त्या आत्म्याशी तद्रूप होऊन, ती स्वत:ला शरीर, प्राण वा मन म्हणून नव्हे तर, ‘आत्मा’ (self) म्हणून ओळखते.

चेतनेचा भर कशावर आहे त्यावरून सर्व फरक पडतो. म्हणूनच व्यक्तीने स्वत:ची चेतना अंतरंगामध्ये नेण्यासाठी किंवा उर्ध्वगामी करण्यासाठी, ती हृदयामध्ये किंवा मनामध्ये केंद्रित केली पाहिजे.

चेतनेचा हा कल सारे काही ठरवीत असतो. तोच व्यक्तीला मनोप्रधान, प्राणप्रधान, शरीरप्रधान किंवा आत्मप्रधान अशा स्वरुपाचा बनवतो. तोच व्यक्तीला बंधनात अडकवतो किंवा बंधमुक्त करतो; ‘पुरुषा’प्रमाणे साक्षी बनवितो किंवा ‘प्रकृती’प्रमाणे गुंतवून ठेवतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 20-21)

माणसामध्ये नेहमीच दोन भिन्न प्रकारच्या चेतना असतात, एक बहिर्वर्ती चेतना – ज्यामध्ये तो जीवन जगत असतो आणि दुसरी आंतरिक, झाकलेली चेतना की ज्याविषयी त्याला काहीच माहीत नसते. जेव्हा व्यक्ती साधना करू लागते तेव्हा, ही आंतरिक चेतना खुली होऊ लागते आणि व्यक्ती अंतरंगामध्ये जाऊन, तेथे सर्व प्रकारचे अनुभव घेऊ शकते.

व्यक्तीची साधना जसजशी प्रगत होऊ लागते तसतशी व्यक्ती आता अधिकाधिक आपल्या आंतरिक अस्तित्वामध्ये राहू लागते आणि बाह्य अस्तित्व हे अधिकाधिक उथळ वाटू लागते. सुरुवातीला आंतरिक चेतना ही स्वप्नवत भासत असते आणि बाह्य जाणीव ही जाग्रत वास्तव वाटत असते. कालांतराने ही आंतरिक चेतना खरीखुरी वाटू लागते आणि बऱ्याच जणांना मग बाह्य चेतना एखादे स्वप्न किंवा आभास असल्याप्रमाणे किंवा ती काहीशी उथळ व बाह्य असल्याचे जाणवते.

ही आंतरिक चेतना गभीर शांतीचे, प्रकाशाचे, आनंदाचे, प्रेमाचे, ‘ईश्वरा’च्या जवळीकीचे किंवा ‘ईश्वरा’च्या उपस्थितीचे, ‘दिव्यमाते’चे स्थान असल्याचे जाणवू लागते. तेव्हा मग व्यक्ती आंतरिक आणि बाह्य अशा दोन चेतनांविषयी जागृत होऊ लागते.

बाह्य चेतना ही आंतरिक चेतनेच्या समकक्ष चेतनेमध्ये परिवर्तित व्हावी आणि तिचे साधन बनावी; बाह्य चेतना देखील शांती, प्रकाश, ‘ईश्वरी’ ऐक्याने परिपूर्ण व्हावी याविषयी व्यक्ती जागृत होऊ लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 89)

आपण आपल्या चेतनेच्या पृष्ठभागावरच जीवन जगत असल्याने, आपल्याला केवळ या पृष्ठवर्ती चेतनेचेच भान असते. ही पृष्ठवर्ती चेतना (माणसामधील सर्वसाधारण जाग्रत मन) म्हणजेच आपण आहोत, समग्रत्वाने आपण आहोत असे आपल्याला वाटत असते, कारण आपण केवळ त्या पृष्ठवर्ती भागावरच जाग्रत असल्याने आपल्याला फक्त त्याचीच जाणीव असते.

पण अंतरंगामध्ये, आंतरिक अस्तित्व आणि बाह्यवर्ती अस्तित्व यांच्या दरम्यान गूढतेची किंवा विस्मृतीची एक प्रकारची भिंत असते; एक आंतरिक अस्तित्व (Inner being) – आंतरिक मन, प्राण, शरीर असते आणि आंतरतम भागामध्ये चैत्य पुरुष (an Inmost or Psychic being) असतो; मात्र आपण या साऱ्यांविषयी अनभिज्ञ असतो. तेथून पृष्ठभागावर जे जे काही येते फक्त त्याचीच जाणीव आपल्याला असते; त्याचा उगम कोठे आहे किंवा ते पृष्ठभागावर कोठून, कसे आले याविषयी आपल्याला काहीच माहीत नसते.

‘योगसाधने’तून ती भिंत हळूहळू ढासळू लागते आणि आपल्याला आपल्यातील आंतरिक आणि आंतरतम अशा अस्तित्वाची जाणीव होऊ लागते. असे केल्यामुळे आपल्यामध्ये जी एक नवीन ‘योगमय’ चेतना निर्माण होते त्या चेतनेला सभोवती असलेल्या वैश्विक चेतनेशी आणि वर असलेल्या उच्चतर आध्यात्मिक चेतनेशी थेट संपर्क साधणे शक्य असते.

ज्याप्रमाणे व्यक्तीकडे स्वत:ची अशी चेतना असते, त्याचप्रमाणे वैश्विक चेतना, वैश्विक ‘अस्तित्व’, वैश्विक ‘मन’, वैश्विक ‘प्राण’, वैश्विक भौतिक जाणीवयुक्त ‘प्रकृती’ देखील असते. आपण आपल्या बाह्य शारीर अस्तित्वामध्येच कोंडून पडल्यामुळे आपण त्या साऱ्याविषयी अनभिज्ञ असतो.

आंतरिक जागृतीमुळे आणि ऊर्ध्वमुख विकसनामुळे वैश्विक चेतना, वैश्विक ‘प्रकृती’, वैश्विक ‘आत्मा’ आणि त्याच्या हालचालींविषयी आपण जागृत होतो; आपली चेतना व्यापक होऊन, आपण त्या वैश्विक चेतनेशी तद्रूप होऊ शकतो. वैश्विक ‘प्रकृती’च्या शक्ती सातत्याने आपल्यावर कार्य करत असतात. वैश्विक प्रकृतीच्या शक्ती कशा कार्य करतात याची आपल्याला कल्पनादेखील नसते किंवा आपल्यावर चालणाऱ्या त्यांच्या कार्यावर आपण नियंत्रणही ठेवू शकत नाही. विश्वप्रकृतीविषयी सचेत झाल्यानेच आपण त्यांचे कार्य ओळखू शकतो आणि त्यावर नियंत्रणही मिळवू शकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 19-20)

मांजरीचे एक छोटेसे पिल्लू होते. मांजरीने त्याला तोंडात धरलेले होते. पण अचानक त्या पिल्लाने तिच्या तोंडातून बाहेर उडी मारली आणि ते पिल्लू विंचवाबरोबर खेळू लागले. पिल्लाने त्या विंचवाबरोबर खेळण्याला मांजरीचा विरोध होता; पण त्याने तिचे काही ऐकले नाही. आणि मग विंचवाने त्याच्या स्वभावाप्रमाणे मांजरीच्या त्या पिल्लाला दंश केला. ते किंचाळले, ओरडू लागले.

ते धावतपळत आईकडे आले आणि त्याने तिला त्या विंचवाविषयी सर्वकाही सांगितले.

तेव्हा मांजरीने विचारले, ”मग तू मला सोडून का पळालास?”

विरोधी शक्ती या विंचवाप्रमाणे असतात. त्या खरोखरच अनिष्ट असतात. मात्र तुम्ही जर त्यांच्याकडे लक्ष दिले नाहीत किंवा त्यांचे ऐकले नाहीत तर, त्या विरोधी शक्तींचा नाश करता येणे शक्य असते. विरोधी शक्ती जेव्हा चुकीच्या सूचना देतात तेव्हा माणसांनी सातत्याने त्यांना नकार दिला पाहिजे. नाहीतर मग या विरोधी शक्ती सर्वच गोष्टींचा विनाश घडवून आणतील…

राग, तिटकारा, अगणित इच्छावासना आणि त्यासारख्या अनेक वायफळ गोष्टींच्या माध्यमातून, या विरोधी शक्ती माणसांच्या मेंदूपर्यंत कशा जाऊन पोहोचतात ते मला माहीत आहे. सर्वप्रथम, राग पायांना पकडतो, मग हळूहळू तो वर नाभीपर्यंत जाऊन पोहोचतो, तेथून हृदयापर्यंत आणि सरतेशेवटी मेंदूपर्यंत पोहोचतो. त्यातून माणसांचे अतोनात नुकसान होते. एकदा का राग मेंदूपर्यंत गेला की मग, माणसाला स्वत:वर ताबा ठेवणे कठीण होऊन बसते. म्हणून तो आत येण्यापासूनच त्याला अडवले पाहिजे. म्हणजे मग त्यावर मात करणे सोपे होते.

– श्रीमाताजी
(Mother you said so : 11.01.63)

साधक : आध्यात्मिक मार्ग अनुसरण्यासाठी एखाद्या व्यक्तीची तयारी झाली आहे का, हे ओळखण्याच्या काही खुणा आहेत का? विशेषेकरून, जेव्हा त्या व्यक्तीला आध्यात्मिक गुरु लाभलेला नसतो तेव्हा?

श्रीमाताजी : हो, सर्वात महत्त्वाची खूण म्हणजे, कोणत्याही परिस्थितीमध्ये जीवाची पूर्ण समता. ही शांत, स्थिर, महान शक्तीची एक प्रकारची भावना असते; आणि हा अगदी निरपवादपणे अटळ असा पाया आहे; हा शांतपणा म्हणजे जडत्वातून आलेला शांतपणा नसतो तर, एकाग्र शक्तीमुळे येणारी ती शांतीची संवेदना असते; ती तुम्हाला कायम स्थिर राहायला मदत करते. परिस्थिती कोणती का असेना, अगदी तुमच्या आयुष्यातील सर्वात भयंकर अशी परिस्थिती असली तरी, त्यावेळी देखील ती तुम्हाला अगदी स्थिर ठेवते. ही पहिली खूण आहे.

दुसरी खूण म्हणजे तुमच्या सामान्य, साधारण अशा चेतनेमध्ये तुम्ही पूर्णत: बंदिवान झालेला आहात; प्रचंड कठीण, काहीतरी गुदमरवून टाकणारे, दुःसह, अशा कशामध्ये तरी तुम्ही बंदिवान झाला आहात असे तुम्हाला वाटते; जणू काही एखादी अभेद्य भिंत तुम्हाला पाडायची आहे, असे तुम्हाला वाटते. आणि त्या यातना असह्य होतात, त्या घुसमटवणाऱ्या असतात. त्या यातना भेदून पलीकडे जाण्याचे आंतरिक प्रयत्न चालू असतात पण त्या भेदणे तुम्हाला जमत शक्य होत नाही. ही सुद्धा सुरुवातीच्या काही खुणांपैकी एक खूण आहे. याचा अर्थ असा की, तुमची आंतरिक चेतना अशा एका बिंदूपाशी येऊन पोहोचलेली असते की, आता तिचा बाह्य साचा हा तिच्यासाठी खूपच तोकडा पडू लागतो. सामान्य जीवन, सामान्य उद्योग, सामान्य नाती, या साऱ्या साऱ्या गोष्टी इतक्या लहान, इतक्या किरकोळ वाटू लागतात की, त्या तोडून टाकण्यासाठी आवश्यक असणारी एक शक्ती तुम्हाला तुमच्या आतूनच जाणवू लागते.

अजून एक खूण आहे, ती अशी की, तुमच्यामध्ये एक आस असते, आणि जेव्हा तुम्ही एकाग्र होता, तेव्हा तुम्हाला वरून काहीतरी खाली अवतरित होत आहे, तुम्हाला काही प्रतिसाद मिळत आहे असे जाणवते. एक प्रकाश, एक शांती, एक शक्ती तुमच्यामध्ये अवतरित होत आहे असे तुम्हाला जाणवते आणि तीही अगदी त्वरित – तुम्हाला त्यासाठी खूप वेळ घालवावा लागत नाही किंवा वाट पाहावी लागत नाही – आतून एक अभीप्सा उदित होते, एक हाक येते आणि लगेचच त्याला प्रतिसाद मिळतो. यावरूनही हे लक्षात येते की, (तुमचे ईश्वराबरोबरचे) ‘नाते’ चांगल्या रीतीने प्रस्थापित झाले आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 97-98)

मानव जे जे काही साध्य करू शकतो ते सर्व काही ज्यांनी साध्य केले आहे, पण तरीही जे समाधानी नाहीत कारण, या जीवनात कधीच गवसू शकणार नाहीत अशा उच्चतर गोष्टींची ते या जीवनाकडून अपेक्षा करतात; अशाच लोकांसाठी ‘पूर्णयोग’ आहे.

ज्यांनी अज्ञाताचा ध्यास घेतलेला आहे आणि जे पूर्णत्वाची आस बाळगतात, भंडावून सोडणारे प्रश्न जे स्वत:ला विचारत राहतात आणि तरीही ज्यांच्या प्रश्नांची तड लागत नाही, कोणतीही निश्चित अशी उत्तरे त्यांना गवसत नाहीत, अशा लोकांचीच ‘पूर्णयोगा’साठी तयारी झालेली असते.

मानवजातीच्या भवितव्याची ज्यांना काळजी आहे आणि विद्यमान व्यवस्थेबाबत जे समाधानी नाहीत अशा लोकांना हमखासपणे जे प्रश्न पडत राहतात, अशा मूलगामी प्रश्नांची एक मालिकाच असते. ते प्रश्न साधारणपणे असे असतात :

मरायचेच असेल तर व्यक्ती जन्मालाच का येते?

दु:खभोग सहन करण्यासाठीच का व्यक्ती जीवन जगत असते?

जर वियोग होणारच असेल तर व्यक्ती प्रेमच का करते?

चुका करण्यासाठीच व्यक्ती विचार करते का?

चुका करण्यासाठीच का व्यक्ती कृती करते?

याचे स्वीकारार्ह असे एकमेव उत्तर आहे की, गोष्टी जशा असायला हव्यात तशा त्या नाहीत. मात्र हे विरोधाभास अटळ आहेत असे नाही, तर ते सुधारता येण्यासारखे आहेत आणि एक ना एक दिवस ते विरोधाभास नाहीसे होतीलच. जग आज जसे आहे त्यावर काही उपायच नाही असेही नाही.

ही पृथ्वी अशा एका संक्रमणकाळात आहे की, जो काळ मानवाच्या तोकड्या चेतनेला खूप दीर्घ भासतो पण शाश्वत चेतनेच्या दृष्टीने तो एखाद्या परमाणु इतका अल्प असतो. एवढेच नव्हे तर, अतिमानसिक चेतनेच्या अवतरणाबरोबर हा संक्रमणकाळसुद्धा संपुष्टात येईल. त्यावेळी विरोधाभास सुसंवादामध्ये आणि विरोध हा समन्वयामध्ये परिवर्तित होईल.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 98-99)

‘पूर्णयोग’ म्हणजे भौतिक जीवनापासून पलायन नव्हे, की जे त्याला त्याच्या नशिबावर अपरिवर्तनीय रुपात, आहे तसेच सोडून देते; किंवा कोणत्याही निर्णायक बदलाची आशासुद्धा न बाळगता, भौतिक जीवनाचा ते जसे आहे तसाच स्वीकार करणे म्हणजेही ‘पूर्णयोग’ नव्हे, किंवा विश्व हे ‘ईश्वरी इच्छे’चे अंतिम आविष्करण आहे असे मानून, विश्वाचा स्वीकार करणे म्हणजेही ‘पूर्णयोग’ नव्हे.

सामान्य मानसिक चेतनेपासून, अतिमानसिक आणि दिव्य चेतनेपर्यंत असणाऱ्या चेतनेच्या सर्व श्रेणी चढत जाणे आणि जेव्हा हे आरोहण पूर्णत्वाला पोहोचेल तेव्हा या भौतिक विश्वामध्ये पुन्हा परत येणे आणि – पृथ्वी क्रमश: ईश्वरीय आणि अतिमानसिक विश्वामध्ये परिवर्तित व्हावी या हेतुने – प्राप्त करून घेतलेल्या त्या अतिमानसिक शक्तीनिशी व चेतनेनिशी, हे भौतिक विश्व प्रेरित करणे हे ‘पूर्णयोगा’चे उद्दिष्ट आहे.

 

– श्रीमाताजी
(CWM 12 : 98-99)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.