माणसामध्ये नेहमीच दोन भिन्न प्रकारच्या चेतना असतात, एक बहिर्वर्ती चेतना – ज्यामध्ये तो जीवन जगत असतो आणि दुसरी आंतरिक, झाकलेली चेतना की ज्याविषयी त्याला काहीच माहीत नसते. जेव्हा व्यक्ती साधना करू लागते तेव्हा, ही आंतरिक चेतना खुली होऊ लागते आणि व्यक्ती अंतरंगामध्ये जाऊन, तेथे सर्व प्रकारचे अनुभव घेऊ शकते.

व्यक्तीची साधना जसजशी प्रगत होऊ लागते तसतशी व्यक्ती आता अधिकाधिक आपल्या आंतरिक अस्तित्वामध्ये राहू लागते आणि बाह्य अस्तित्व हे अधिकाधिक उथळ वाटू लागते. सुरुवातीला आंतरिक चेतना ही स्वप्नवत भासत असते आणि बाह्य जाणीव ही जाग्रत वास्तव वाटत असते. कालांतराने ही आंतरिक चेतना खरीखुरी वाटू लागते आणि बऱ्याच जणांना मग बाह्य चेतना एखादे स्वप्न किंवा आभास असल्याप्रमाणे किंवा ती काहीशी उथळ व बाह्य असल्याचे जाणवते.

ही आंतरिक चेतना गभीर शांतीचे, प्रकाशाचे, आनंदाचे, प्रेमाचे, ‘ईश्वरा’च्या जवळीकीचे किंवा ‘ईश्वरा’च्या उपस्थितीचे, ‘दिव्यमाते’चे स्थान असल्याचे जाणवू लागते. तेव्हा मग व्यक्ती आंतरिक आणि बाह्य अशा दोन चेतनांविषयी जागृत होऊ लागते.

बाह्य चेतना ही आंतरिक चेतनेच्या समकक्ष चेतनेमध्ये परिवर्तित व्हावी आणि तिचे साधन बनावी; बाह्य चेतना देखील शांती, प्रकाश, ‘ईश्वरी’ ऐक्याने परिपूर्ण व्हावी याविषयी व्यक्ती जागृत होऊ लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 89)

श्रीअरविंद