‘आध्यात्मिकता’ म्हणजे उच्च दर्जाची बुद्धिमत्ता नव्हे, आदर्शवादही नव्हे, मनाचा तो नैतिक कलही नव्हे किंवा नैतिक शुद्धता आणि तपस्यादेखील नव्हे; आध्यात्मिकता म्हणजे धार्मिकता नव्हे किंवा एक आवेशयुक्त आणि उदात्त भावनिक उत्कटताही नव्हे, किंवा वरील सर्व उत्तम गोष्टींचा समुच्चयही नव्हे. आध्यात्मिक उपलब्धी आणि अनुभूती म्हणजे एक मानसिक विश्वास, पंथ किंवा श्रद्धा, एक भावनिक आस, धार्मिक किंवा नैतिक सूत्रांना अनुसरून केलेले वर्तनाचे नियमन देखील नव्हे. या सर्व गोष्टींना मनाच्या आणि जीवनाच्या दृष्टीने मोठेच मोल असते. त्यांना आध्यात्मिक विकासाच्या दृष्टीनेही थोडेफार मोल असते. शिस्त लावणाऱ्या, शुद्धीकरण घडविणाऱ्या किंवा प्रकृतीला सुयोग्य आकार देणाऱ्या, पूर्वतयारी घडविणाऱ्या प्रक्रिया म्हणून त्यांचे काही विशिष्ट मोल असते; परंतु तरीसुद्धा त्या प्रक्रियांची गणना ‘मानसिक विकासा’च्या या प्रकारामध्येच होते. तेथे अजूनपर्यंत आध्यात्मिक साक्षात्कार, अनुभूती किंवा परिवर्तन या गोष्टींची सुरूवात झालेली नसते.
साररूपाने सांगायचे तर, आपल्या अस्तित्वाच्या आंतरिक वास्तवाबद्दल जाग येणे; आपल्या मन, प्राण आणि शरीर या सगळ्यांहून भिन्न असणाऱ्या चैतन्याविषयी, ‘स्व’ विषयी, आत्म्याविषयी जाग येणे; ते जाणण्याची, ते अनुभवण्याची आणि तेच बनण्याची एक आंतरिक अभीप्सा निर्माण होणे म्हणजे ‘आध्यात्मिकता’! या विश्वाला व्यापून असणाऱ्या आणि त्याच्याही अतीत असणाऱ्या तसेच, खुद्द आपल्या अंतर्यामी निवास करणाऱ्या एका महत्तर ‘सत्या’च्या (Reality) संपर्कात येणे, ‘त्या’च्याशी भावैक्य होणे, ‘त्या’च्याशी एकात्म पावणे आणि त्या ऐक्याचा, त्या संपर्काचा आणि त्या अभीप्सेचा परिणाम म्हणून आपले समग्र अस्तित्व त्याच्याकडे वळणे, आपल्या अस्तित्वाचे परिर्वतन घडणे आणि रूपांतरण घडणे; एका नवीन संभूतीमध्ये (becoming), एका नवीन अस्तित्वामध्ये, एका नवीन आत्मत्वामध्ये, एका नवीन प्रकृतीमध्ये जागृत होणे किंवा वृद्धिंगत होणे म्हणजे ‘आध्यात्मिकता’!
– श्रीअरविंद [CWSA 21-22 : 889-890]
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…