(साधकाने कोणती वृत्ती बाळगावी याचे श्रीरामकृष्ण परमहंस यांनी दोन मार्ग सांगितले आहेत. पहिला मार्ग हा माकडाच्या पिल्लाचा आहे. हा मार्ग वैयक्तिक प्रयत्नांवर आधारित आहे. तर दुसरा मार्ग हा मांजराच्या पिल्लाचा मार्ग. हा समर्पणाचा मार्ग आहे. त्याचा संदर्भ येथे देण्यात आला आहे.)
‘मांजराच्या पिल्लाच्या वृत्तीचे अनुकरण करा,’ हे सांगणे खूप सोपे आहे परंतु ते प्रत्यक्ष कृतीत उतरवणे हे तितकेसे सोपे नाही, हे लक्षात घ्या. एकदा का मांजराच्या पिल्लाची वृत्ती धारण केली की मग कोणतेही व्यक्तिगत प्रयत्न करायला नकोत, असे तुम्ही समजता कामा नये. कारण मनुष्य हा काही मांजरीचे पिल्लू असू शकत नाही. तुमच्यामध्ये असे अगणित घटक असतात की, ज्यांना फक्त स्वतःवरच विश्वास ठेवण्याची सवय झालेली असते, त्यांना त्यांचे स्वतःचे काम करायचे असते. (मांजराच्या पिल्लाप्रमाणे) स्वतःला सर्व परिस्थितीमध्ये ‘ईश्वरा’वर सोपवून देण्याहून अधिक अवघड असते ते याच घटकांवर नियंत्रण ठेवणे! ते खूपच अवघड असते.
मानवी मनाचे अद्भुत कार्य नेहमीच चालू असते; या मनाला निरीक्षण करणे, टिका करणे, विश्लेषण करणे, शंका उपस्थित करणे, समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे, उदाहरणार्थ “हे असे केले तर बरे होईल का?” “तसे केले तर अधिक बरे होईल ना?” इ. इ. गोष्टी खूप आवडत असतात. आणि मग हे असे चालूच राहते, अशावेळी मग तो मांजराच्या पिल्लाचा दृष्टिकोन कुठे जातो? परंतु मांजराचे पिल्लू मात्र विचार करत बसत नाही. ते विचारादी गोष्टींपासून मुक्त असते आणि त्यामुळे त्याला तसे वागणे खूप सोपे असते.
तुम्ही कोणताही मार्ग अनुसरा, परंतु जोपर्यंत तुम्ही ‘ईश्वरा’शी तादात्म्य पावत नाही तोपर्यंत व्यक्तिगत प्रयत्नांची आवश्यकता असतेच असते. त्या तादात्म्याच्या क्षणी मात्र, जीर्ण वस्त्रं गळून पडावीत त्याप्रमाणे सारे प्रयास गळून पडतात, तुम्ही जणू काही एक वेगळीच व्यक्ती बनता. एकेकाळी जे तुम्हाला अशक्यप्राय वाटत असे, ते आता तुम्हाला शक्य होते आणि ते केवळ शक्यच होते असे नाही, तर ते तुमच्यासाठी अपरिहार्य बनते, कारण तुम्ही त्याविना इतर काही करूच शकत नाही. तुम्ही सतर्क, शांत राहिले पाहिजे, आणि आंतरिक प्रेरणेची प्रतीक्षा केली पाहिजे; बाह्य प्रतिक्रियांमधून तुम्ही कोणतीही कृती करता कामा नये; सातत्याने, नियमितपणे, ‘वरून येणाऱ्या’ प्रकाशाद्वारेच तुमचे संचालन झाले पाहिजे. इतर कोणत्याही प्रेरणेने कृती न करता, तुम्ही केवळ त्याच प्रकाशाच्या प्रेरणेने प्रेरित होऊन कृती केली पाहिजे. विचार करायचा नाही, प्रश्न उपस्थित करायचे नाहीत, “मी हे करू की ते करू ?” असे विचारायचे नाही, तर केवळ जाणून घ्यायचे, पाहायचे आणि ऐकायचे. कोणताही प्रतिप्रश्न न करता, कोणतीही शंका उपस्थित न करता, तुम्ही आंतरिक विश्वासाने कृती केली पाहिजे कारण, आता तो निर्णय हा तुमच्याकडून आलेला नसतो, तर तो ‘वरून आलेला’ असतो. ही गोष्ट एखाद्याच्या बाबतीत लवकर घडेल किंवा दुसऱ्या एखाद्याला मात्र यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागेल – ते त्या त्या व्यक्तीच्या पूर्वतयारीवर, तसेच इतर बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते. तोपर्यंत तुम्ही आस बाळगली पाहिजे आणि ती आस चिकाटीने बाळगली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही धीर सोडता कामा नये किंवा धैर्य खचू देता कामा नये. कदाचित हजाराव्या वेळी तुम्हाला परिणाम झालेला आढळून येईल हे जाणून, गरज पडली तर एकच गोष्ट हजार वेळादेखील पुन्हा पुन्हा केली पाहिजे.
– श्रीमाताजी [CWM 04 : 94-95]
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…