कृतज्ञता – १२
(श्रीअरविंद येथे यज्ञबुद्धीने केलेल्या अर्पणाबद्दल सांगत आहेत.) हे अर्पण कोणा व्यक्तींना केलेले असेल, ‘ईश्वरी शक्तीं’ना केलेले असेल, ते ‘विश्वात्मक ईश्वरा’ला केलेले असेल किंवा विश्वातीत असणाऱ्या ‘परमेश्वरा’ला केलेले असेल. त्याचप्रमाणे अर्पण केलेली वस्तू म्हणजे एखादे पान असेल, फुल असेल, पाणी असेल, मुठभर धान्य असेल, अन्नधान्य असेल, किंवा आपल्यापाशी जे जे काही आहे त्या सर्वाचे अर्पण असेल, अगदी सर्वस्वाचे अर्पण असेल. स्वीकारणारे कोणीही असू दे, अर्पण म्हणून दिलेली वस्तू कोणतीही असू दे, अगदी नजीकच्या स्वीकारकर्त्याने जरी ती गोष्ट अव्हेरली किंवा दुर्लक्षित केली तरीही, त्या गोष्टीचे ग्रहण करणारा आणि तिचा स्वीकार करणारा, वस्तुमात्रामध्ये ‘शाश्वत’ रूपाने वसणारा ‘परमेश्वर’च असतो. विश्वाच्या अतीत असणारा जो परमेश्वर, तो येथेसुद्धा आहे, मग तो भले कितीही परिवेष्टित (veiled) का असेना, तो आपल्यामध्ये आहे, या विश्वामध्ये आहे आणि विश्वाच्या घडामोडीमध्येसुद्धा तो आहे. तो येथे सर्वसाक्षी ‘साक्षीदार’ या नात्याने उपस्थित आहे आणि तोच आपल्या सर्व कर्मांचा ‘ग्रहणकर्ता’ आणि आपल्या सर्व कर्मांचा गुप्त ‘स्वामी’ आहे. आपल्या साऱ्या कृती, आपले सारे प्रयत्न, इतकेच काय पण आपली पापं आणि आपले अडखळणे, आपले दुःखकष्ट, आपले संघर्ष या साऱ्या गोष्टी जाणते-अजाणतेपणे, ज्ञात-अज्ञातपणे, प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे, अंतिमतः त्या ‘एका ईश्वरा’कडूनच संचालित होतात. त्याच्या अगणित रूपांद्वारे सारे काही ईश्वराभिमुखच झालेले असते आणि त्या असंख्य रूपांच्या माध्यमातून सारे काही त्या ‘सर्वव्यापी’ असलेल्या एकमेवाद्वितीय परमेश्वरालाच अर्पण होत असते. आपण कोणत्याही रूपाच्या माध्यमातून, कोणत्याही भावाने त्याच्याकडे गेलो तरीही, त्या त्या रूपाच्या माध्यमातून, आणि त्या त्या भावाने तो ईश्वरच आपल्या यज्ञाचा स्वीकार करतो.
– श्रीअरविंद
(CWSA 23 : 110)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…