‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’
(बडोद्यात राहत असताना आपल्याला आलेल्या आध्यात्मिक अनुभवांविषयी व त्यांनी केलेल्या साधनेविषयी उत्तरायुष्यात एके ठिकाणी श्रीअरविंद सांगत आहेत…)
मी बडोद्यात राहत असताना, दिवसभरात सकाळी तीन तास आणि संध्याकाळी दोन तास असा साधारणपणे पाच तास प्राणायामाचा अभ्यास करीत असे. माझे मन महान अशा प्रकाश आणि शक्तीने कार्य करू लागले आहे असे मला आढळून आले. त्या काळात मी काव्यलेखन करीत असे. प्राणायामाच्या अभ्यासापूर्वी, मी दिवसाकाठी साधारणपणे पाच ते आठ ओळी, म्हणजे महिन्याभरात साधारण दोनशे ओळी लिहित असे; प्राणायामाच्या अभ्यासानंतर मात्र मी अर्ध्या तासात दोनशे ओळी लिहू शकत असे. केवळ हा एकच परिणाम झाला असे नाही. आधी माझी स्मरणशक्ती कमी होती. पण या अभ्यासानंतर मला असे आढळून आले की, जेव्हा मला स्फूर्ती येत असे तेव्हा मला सर्व ओळी क्रमाने आठवत असत आणि मी त्या कधीही क्रमाने लिहून काढू शकत असे. या प्रगत अशा कार्यांबरोबरच मी माझ्या मेंदूच्या सभोवार चालणाऱ्या विद्युतप्रभावित हालचाली पाहू शकत असे, आणि त्या सर्व गोष्टी सूक्ष्म द्रव्याने बनलेल्या आहेत व हे सर्व सूक्ष्म द्रव्याचेच कार्य आहे हे मला जाणवत असे.
याच काळात अरविंदांचा भारतीय संस्कृती, साहित्य यांचा अभ्यास सुरु होता, त्या काळात ते प्रचंड वाचन करत असत. त्यासंबंधीची एक हकिकत त्यांच्या एका मित्राने सांगितली आहे – “एकदा अरविंद कॉलेजमधून परतले आणि आल्या आल्या लगेच तेथे पडलेले एक पुस्तक उघडून त्यांनी ते वाचायला सुरुवात केली. तेव्हा तेथे आम्ही सर्व मित्र बुद्धिबळाचा डाव मांडून जोरजोराने हसतखिदळत बसलो होतो. सुमारे अर्ध्या तासाने अरविंदांनी पुस्तक वाचून संपविले. आम्ही त्यांना असे करताना बरेचदा बघितले होते. ते पुस्तक अथपासून इतिपर्यंत वाचून काढतात की केवळ वरवर चाळतात हे आम्हाला बरेच दिवसांपासून जाणून घ्यायचे होते. आता ती कसोटी घेण्याची वेळ आली. आमच्यातील एकाने पुस्तकातील एक ओळ वाचून दाखविली आणि नंतर त्यापुढची ओळ कोणती असे अरविंदांना विचारले. त्यांनी क्षणभर मन एकाग्र केले आणि नंतर ती ओळ ज्या पानावर होती त्या पानावरील संपूर्ण मजकूर, एकही चूक न करता जसाच्या तसा म्हणून दाखविला. जर ते अशा प्रकारे अर्ध्या तासात शंभरेक पाने वाचू शकत असतील तर त्यांनी अल्पावधीतच त्या पेटाऱ्यातील सगळी पुस्तके वाचून संपवली यात नवल ते काय?”
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…