ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

अरविंद घोष – ०५

(पाँडिचेरीला एकदा श्रीअरविंद स्वत:विषयी, आपल्याला आलेल्या अनुभवाविषयी पत्रातून एका साधकाला सांगत आहेत.)

भारतात परतल्यापासूनच, लौकिक किंवा पारलौकिक असा कोणताही भेद माझ्या जीवनामध्ये किंवा माझ्या योगामध्ये मी कधी केला नाही. मला वाटते, माणसांना ज्या गोष्टींमध्ये रस असतो, त्या साऱ्या गोष्टी बहुधा भौतिकातील असतात. आणि त्यातील बहुतेक गोष्टींचा माझ्या मानसिक क्षेत्रात प्रवेश झाला होता. उदाहरणार्थ, राजकारण. त्याचा तर माझ्या जीवनातच प्रवेश झाला होता. पण त्याच वेळी, मी मुंबईतील अपोलो बंदरावर, या भारताच्या भूमीवर जेव्हा पहिले पाऊल ठेवले तेव्हापासून मला आध्यात्मिक अनुभव यायला सुरुवात झाली; पण त्या अनुभवांची लौकिक जीवनाशी फारकत नव्हती तर त्यांचा या लौकिक जीवनाशी आंतरिक आणि जवळचा संबंध होता. भौतिक क्षेत्राला ‘अनंत’ व्यापून आहे आणि ‘अंतर्यामी’ असणारा ‘तो’ भौतिक वस्तुंमध्ये, देहांमध्ये वास्तव्यास आहे असे मला जाणवत असे. अगदी त्याच वेळी, ज्यांचा प्रभाव व परिणाम या भौतिक जगतावर घडून येतो अशा पातळ्यांवर, अशा पारलौकिक विश्वांमध्ये माझा स्वत:चा प्रवेश झालेला मला दिसत होता. त्यामुळे ‘अस्तित्वाची दोन टोकं आणि त्यामधील सर्व काही’ असे ज्याला मी संबोधतो त्यामध्ये मी कधीच परस्परविसंगत विरोध वा फारकत करू शकलो नाही. माझ्यासाठी सर्व काही ‘ब्रह्म’च होते आणि मला सर्वत्र ‘ईश्वर’च दिसत असे. पण जर कोणाला या लौकिकतेचा त्याग करून, फक्त पारलौकिकतेची निवड करायची असेल, आणि त्यात त्याला शांती लाभत असेल तर त्याने तसे खुशाल करावे. शांती लाभावी म्हणून, असे करणे मला स्वत:ला आवश्यक वाटले नाही. माझ्या परिघामध्ये मी भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही विश्वांचा समावेश करावा आणि केवळ स्वत:च्या मुक्तीसाठी नव्हे तर, येथील दिव्य जीवनासाठी, दिव्य ‘चेतना’ आणि दिव्य ‘शक्ती’ लोकांच्या अंत:करणात व या पार्थिव जीवनात स्थापित करण्याचा प्रयत्न करावा, या दिशेने मी माझ्या योगाकडे वळलो असे मला आढळून आले. हे ध्येय, इतर ध्येयांसारखेच एक आध्यात्मिक ध्येय आहे असे मला वाटते आणि या जीवनात लौकिक, पार्थिव गोष्टींचा मागोवा घेणे, त्यांचा जीवनात समावेश करणे यामुळे, आध्यात्मिकतेला काळिमा फासला जाईल किंवा त्याच्या भारतीयत्वाला काही बाधा येईल असे मला वाटत नाही. वास्तव आणि या विश्वाचे, वस्तुंचे, ईश्वराचे स्वरूप, याविषयीचा माझातरी हा अनुभव व दृष्टिकोन राहिलेला आहे. हे त्यांबाबतचे जवळजवळ संपूर्ण सत्य असल्यासारखे मला वाटते आणि म्हणूनच त्याचे अनुसरण करणे याला मी ‘पूर्णयोग’ म्हणतो. (क्रमश: …)

अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…

8 hours ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७

(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…

1 day ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…

2 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…

3 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…

4 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३

आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…

5 days ago