ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

‘क्रांतिकारक अरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद’

अरविंद घोष – ०५

(पाँडिचेरीला एकदा श्रीअरविंद स्वत:विषयी, आपल्याला आलेल्या अनुभवाविषयी पत्रातून एका साधकाला सांगत आहेत.)

भारतात परतल्यापासूनच, लौकिक किंवा पारलौकिक असा कोणताही भेद माझ्या जीवनामध्ये किंवा माझ्या योगामध्ये मी कधी केला नाही. मला वाटते, माणसांना ज्या गोष्टींमध्ये रस असतो, त्या साऱ्या गोष्टी बहुधा भौतिकातील असतात. आणि त्यातील बहुतेक गोष्टींचा माझ्या मानसिक क्षेत्रात प्रवेश झाला होता. उदाहरणार्थ, राजकारण. त्याचा तर माझ्या जीवनातच प्रवेश झाला होता. पण त्याच वेळी, मी मुंबईतील अपोलो बंदरावर, या भारताच्या भूमीवर जेव्हा पहिले पाऊल ठेवले तेव्हापासून मला आध्यात्मिक अनुभव यायला सुरुवात झाली; पण त्या अनुभवांची लौकिक जीवनाशी फारकत नव्हती तर त्यांचा या लौकिक जीवनाशी आंतरिक आणि जवळचा संबंध होता. भौतिक क्षेत्राला ‘अनंत’ व्यापून आहे आणि ‘अंतर्यामी’ असणारा ‘तो’ भौतिक वस्तुंमध्ये, देहांमध्ये वास्तव्यास आहे असे मला जाणवत असे. अगदी त्याच वेळी, ज्यांचा प्रभाव व परिणाम या भौतिक जगतावर घडून येतो अशा पातळ्यांवर, अशा पारलौकिक विश्वांमध्ये माझा स्वत:चा प्रवेश झालेला मला दिसत होता. त्यामुळे ‘अस्तित्वाची दोन टोकं आणि त्यामधील सर्व काही’ असे ज्याला मी संबोधतो त्यामध्ये मी कधीच परस्परविसंगत विरोध वा फारकत करू शकलो नाही. माझ्यासाठी सर्व काही ‘ब्रह्म’च होते आणि मला सर्वत्र ‘ईश्वर’च दिसत असे. पण जर कोणाला या लौकिकतेचा त्याग करून, फक्त पारलौकिकतेची निवड करायची असेल, आणि त्यात त्याला शांती लाभत असेल तर त्याने तसे खुशाल करावे. शांती लाभावी म्हणून, असे करणे मला स्वत:ला आवश्यक वाटले नाही. माझ्या परिघामध्ये मी भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही विश्वांचा समावेश करावा आणि केवळ स्वत:च्या मुक्तीसाठी नव्हे तर, येथील दिव्य जीवनासाठी, दिव्य ‘चेतना’ आणि दिव्य ‘शक्ती’ लोकांच्या अंत:करणात व या पार्थिव जीवनात स्थापित करण्याचा प्रयत्न करावा, या दिशेने मी माझ्या योगाकडे वळलो असे मला आढळून आले. हे ध्येय, इतर ध्येयांसारखेच एक आध्यात्मिक ध्येय आहे असे मला वाटते आणि या जीवनात लौकिक, पार्थिव गोष्टींचा मागोवा घेणे, त्यांचा जीवनात समावेश करणे यामुळे, आध्यात्मिकतेला काळिमा फासला जाईल किंवा त्याच्या भारतीयत्वाला काही बाधा येईल असे मला वाटत नाही. वास्तव आणि या विश्वाचे, वस्तुंचे, ईश्वराचे स्वरूप, याविषयीचा माझातरी हा अनुभव व दृष्टिकोन राहिलेला आहे. हे त्यांबाबतचे जवळजवळ संपूर्ण सत्य असल्यासारखे मला वाटते आणि म्हणूनच त्याचे अनुसरण करणे याला मी ‘पूर्णयोग’ म्हणतो. (क्रमश: …)

Latest posts by अभीप्सा मराठी मासिक (see all)
अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

स्वत:ला न फसविणे अवघड

  व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…

12 hours ago

प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन

  आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…

1 day ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४

  (भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…

2 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०३

  (भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…

3 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०२

  भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…

4 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०१

  साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…

5 days ago