विचार शलाका – २४
व्यक्तीने आपले एक पाऊल एकीकडे आणि दुसरे पाऊल दुसरीकडेच तर पडत नाही ना, आपापल्या मार्गाने जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या बोटींमध्ये तर आपण उभे नाही ना, याची काळजी घ्यावयास हवी. श्रीअरविंदांचे हेच सांगणे आहे की, व्यक्तीने ‘दुहेरी जीवन’ (‘double life’) जगता कामा नये. तिने एक तर ही गोष्ट सोडावयास हवी किंवा ती – एकाच वेळी दोन्हींचे अनुसरण करता येत नाही….
अर्थात त्यासाठी व्यक्तीने तिच्या जीवनात असलेल्या परिस्थितीतून बाहेर पडलेच पाहिजे असे काही आवश्यक नाही; व्यक्तीने तिचा आंतरिक दृष्टिकोन मात्र पूर्णपणे बदलणे आवश्यक असते. जे करणे व्यक्तीच्या सवयीचे झाले आहे ते तिने करावयास हरकत नाही पण ते करताना दृष्टिकोन मात्र निराळा असावा. योगसाधना करण्यासाठी जीवनातील सर्व गोष्टींचा परित्याग करून एकांतवासात जाणे, एखाद्या आश्रमातच जाऊन राहणे गरजेचे आहे, असे मी म्हणत नाही. पण, एक मात्र खरे आहे की, एखादी व्यक्ती जर प्रपंचात व प्रापंचिक परिस्थितीमध्ये राहून योगाचरण करीत असेल तर ते अधिक अवघड असते, परंतु ते अधिक परिपूर्ण सुद्धा असते. कारण प्रत्येक क्षणी त्या व्यक्तीला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते त्या समस्या, सर्वसंगपरित्याग करून एकांतवासात गेलेल्या व्यक्तीसमोर उभ्या ठाकत नाहीत; कारण अशा व्यक्तीच्या बाबतीत समस्यांचे प्रमाण अगदीच कमी झालेले असते. प्रापंचिक व्यक्तीला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते; त्याच्या भोवती असणाऱ्या, आणि ज्यांच्याशी तिचा सतत संबंध येतो त्या व्यक्तींच्या वागण्याचे आकलन न होण्यापासून याची सुरुवात होते; व्यक्तीने त्यासाठी तयार असले पाहिजे, सहनशीलता आणि अतीव अलिप्तता यांसह सुसज्ज असले पाहिजे. लोक तुमच्याविषयी काय विचार करतात व काय बोलतात याची योगमार्गाची वाटचाल करणाऱ्या व्यक्तीने पर्वा करू नये; हा पूर्णपणे अपरिहार्य असा आरंभबिंदू असतो. तुमच्याबद्दल जग काय बोलते अथवा विचार करते, तुम्हाला ते कसे वागवते याबाबत तुम्ही पूर्णपणे निर्लिप्त असले पाहिजे. लोक तुमच्याविषयी काय समजूत करून घेतात हे तुमच्यालेखी गौण असले पाहिजे आणि त्याचा तुम्हाला यत्किंचितही स्पर्श होता कामा नये. याच कारणामुळे, सर्वसंगपरित्याग करून एकांतवासात जाऊन योगसाधना करण्यापेक्षा, व्यक्तीला तिच्या सभोवताली असलेल्या नेहमीच्या परिस्थितीमध्ये राहून योगसाधना करणे हे सहसा अधिक अवघड असते. हे खरोखरच जास्त अवघड असते, पण आपण येथे (आश्रमात) सोप्या गोष्टी करण्यासाठी आलेलोच नाही.
– श्रीमाताजी
(CWM 04 : 377-378)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…