सद्भावना – ०९
तुमच्यामध्ये समजा एखादा दोष असेल, जो तुम्ही दूर करू इच्छित असाल आणि जर का तो तरीही टिकून राहिला आणि जर तुम्ही म्हणाल की, “मला जेवढे करता येणे शक्य होते तेवढे सगळे मी केले आहे,” तेव्हा तुम्ही निश्चितपणे असे समजा की, जे जे करणे आवश्यक होते ते सारे तुम्ही केलेले नाही. तुम्ही जर तसा प्रयत्न केला असता तर, तुम्हाला नक्कीच विजय प्राप्त झाला असता; कारण तुमच्या वाट्याला ज्या अडचणी येतात त्या अगदी तुमच्या सामर्थ्याच्या प्रमाणातच असतात – तुमच्या चेतनेचा भाग नसलेले असे काहीच तुमच्या बाबतीत घडू शकत नाही आणि जे जे काही तुमच्या चेतनेशी संबंधित असते त्यावर तुम्ही प्रभुत्व मिळवू शकता. ज्या गोष्टी किंवा सूचना बाहेरून येतात, त्यासुद्धा तुमच्या चेतनेने ज्याला संमती दिलेली असते अगदी तेवढ्या प्रमाणातच असतात आणि तुम्ही तुमच्या चेतनेचे स्वामी व्हावे यासाठीच तुमची निर्मिती झालेली असते. तुम्ही जर असे म्हणाल की, ”मला जे करणे शक्य होते ते सारे मी केले आहे आणि सगळ्या गोष्टी करून सुद्धा तो दोष तसाच कायम राहिला, आणि म्हणून मी प्रयत्न करणे सोडून दिले,” तर तुम्ही हे निश्चित समजा की, तुम्हाला जे जे काही करणे शक्य होते ते तुम्ही केलेले नाही. सगळे करून सुद्धा, जेव्हा कोणतीही त्रुटी शिल्लक राहते तेव्हा त्याचा अर्थ असा की, तुमच्या अस्तित्वात दडी मारून बसलेली एखादी गोष्ट (जॅक इन द बॉक्स) या खेळण्यातल्याप्रमाणे अचानक उसळून वर येते आणि तुमच्या जीवनाचा ताबा घेते. म्हणून, करण्यासारखी एकमात्र गोष्ट म्हणजे, तुमच्या आतमध्ये दडी मारून बसलेले सर्व छोटे कोपरे वेचून वेचून काढायचे आणि जर का त्या अंधाऱ्या भागावर सद्भावनेचा एक छोटासा कवडसा जरी तुम्ही टाकलात तर, तो अंधारा कोपरा शरण येईल, तो नाहीसा होऊन जाईल आणि एके काळी जी गोष्ट तुम्हाला अशक्य वाटली होती ती नुसती शक्यच होईल असे नाही, ती केवळ व्यवहारातच उतरेल असे नाही, तर ती पूर्ण झालेली असेल. तुम्हाला अनेक वर्षे सतावणारी अशी एखादी अडचण तुम्ही अशा रीतीने एका क्षणात दूर करू शकता. मी तुम्हाला अगदी खात्री देते. ते फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून असते आणि ती गोष्ट म्हणजे, तुम्हाला त्या दोषापासून, त्या त्रुटीपासून अगदी खरोखर, प्रामाणिकपणे सुटका करून घ्यायची इच्छा असली पाहिजे. आणि हे सर्व बाबतीत सारखेच असते, शारीरिक आजारपणापासून ते सर्वोच्च मानसिक अडचणींपर्यंत ही गोष्ट सारखीच लागू पडते.
– श्रीमाताजी
(CWM 04 : 74-75)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…