विचार शलाका – २८
आपण ‘देवा’ची प्रतिमूर्तीच बनावे, त्याच्यामध्येच आपण निवास करावा, त्याच्या सन्निध राहावे आणि त्याच्या आनंदाचे व शक्तीचे आपण एक माध्यम बनावे, त्याच्या कार्याचे आपण एक साधन बनावे यासाठीची हाक आपल्याला आलेली आहे. सर्व अशुभापासून शुद्धीकरण करतकरत, ईश्वराच्या स्पर्शाने जीवाचे रूपांतरण होत, आपल्याला दिव्य विद्युत-जनित्राप्रमाणे (dynamos) या जगामध्ये कार्य करायचे आहे आणि ती दिव्य ऊर्जा सर्व मानवजातीमध्ये वितरित करायची आहे. तिच्या प्रकाशाने मानवजात रोमांचित होत, प्रकाशमान होईल अशा रीतीने ती वितरित करायची आहे. त्यामुळे आपल्यापैकी कोणीही एखादा जिथे कोठे उभा असेल, त्याच्या अवतीभोवती असणारे शेकडो लोक ‘देवा’च्या प्रकाशाने, त्याच्या शक्तीने भारले जातील, ते ‘देवा’ने परिपूर्ण आणि आनंदाने परिपूर्ण होऊन जातील.
चर्च, परंपरा, धर्मविद्या, तत्त्वज्ञानं मानवजातीला वाचविण्यामध्ये अपयशी ठरली कारण त्यांनी स्वतःला बौद्धिक पंथ, सिद्धान्त, कर्मकांड, संस्था यांमध्ये, तसेच आचारशुद्धी, दर्शने यांमध्ये स्वतःला गुंतवून ठेवले, जणू काही यामुळे मानवजातीचे रक्षण होणार होते. हे करत असताना, जी गोष्ट करणे गरजेचे होते, त्याकडे मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. त्यांनी आत्म्याच्या शक्तीकडे आणि तिच्या शुद्धीकरणाकडे लक्ष पुरविले नाही. आपण त्या आवश्यक गोष्टीकडे परतले पाहिजे. ‘ख्रिस्ता’ची पावित्र्याची आणि मानवजातीच्या परिपूर्णतेची शिकवण, ‘महंमद’च्या (पैगंबर) परिपूर्ण शरणागतीची, आत्मसमर्पणाची आणि ईश्वरसेवेची शिकवण, मानवातील ईश्वराच्या आनंदाची व प्रेमाची ‘चैतन्यां’नी (महाप्रभू) दिलेली शिकवण, सर्व धर्मांच्या एकत्वाची आणि मानवातील ‘देवा’च्या दिव्यत्वाची रामकृष्णांनी (परमहंस) दिलेली शिकवण अंगीकारत, या साऱ्या प्रवाहांचे एका मोठ्या नदीमध्ये एकत्रीकरण करत, ‘गंगे’प्रमाणे विशुद्ध करून घेत, त्यांना उद्धारून घेत आपणही, ‘भगीरथा’ने ज्याप्रमाणे ‘गंगे’चे अवतरण करून घेतले आणि आपल्या पूर्वजांच्या अस्थी त्यामध्ये विसर्जित केल्या, त्याप्रमाणे या भौतिकतावादी मानवतेच्या मृतवत झालेल्या जीवनावर, त्याचा वर्षाव करायला हवा. ज्यामुळे, या मानवजातीमधील आत्मतत्त्वाचे पुनरुत्थान होईल आणि पुन्हा एकदा काही काळासाठी या विश्वामध्ये ‘सत्ययुग’ अवतरेल.
– श्रीअरविंद
(CWSA 13 : 90)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…