ईश्वरी कृपा – ०१
संपूर्ण आविष्करणामध्ये, जग ज्या दुःखामध्ये, अंधकारामध्ये आणि ज्या मूर्खतेमध्ये पहुडले आहे त्यातून या जगाला बाहेर काढण्याचे काम ती अनंत ‘कृपा’ सातत्याने करत असते. अनंत काळापासून ही ‘ईश्वरी कृपा’ कार्यरत आहे, तिचे प्रयत्न अविरत चालू आहेत आणि असे असूनदेखील, अधिक महान, अधिक सत्य, अधिक सुंदर अशा गोष्टींच्या आवश्यकतेची जाणीव होण्यासाठी या जगाला हजारो वर्षे लागली !
आपल्या स्वतःच्याच अस्तित्वामध्ये आपल्याला विरोधाचा जो सामना करावा लागतो त्यावरून, ‘ईश्वरी कृपे’च्या कार्याला या जगाचा किती प्रचंड विरोध होत असेल याचे अनुमान, प्रत्येकजण लावू शकतो.
आणि तेव्हाच मग ऊर्ध्वस्थित असलेल्या ‘प्रकाशा’प्रत आणि ‘शक्ती’प्रत आणि जे ‘सत्य’ स्वतःला अभिव्यक्त करण्याच्या प्रयत्नात आहे त्या ‘सत्या’प्रत, जर सर्व गोष्टी संपूर्णपणे अर्पण केल्या नाहीत, तर सगळ्या बाह्य गोष्टी, सगळ्या मानसिक रचना, सगळे भौतिक प्रयत्न हे व्यर्थ आहेत, फोल आहेत हे व्यक्तिला उमगते; तेव्हा अशी व्यक्ती निणार्यक प्रगती करण्यासाठी सिद्ध होते. आणि मग ज्याच्यामध्येच सर्वकाही परिवर्तन करण्याची शक्ती आहे अशा, ऊर्ध्वस्थित असणाऱ्या त्या ‘ईश्वरा’ला आपल्या अस्तित्वाचे परिपूर्ण, समग्र आणि उत्कट असे आत्मदान करणे, हाच व्यक्तिचा एकमेव खरा प्रभावी दृष्टिकोन असतो.
जेव्हा तुमच्या अंतरंगात असणाऱ्या आत्म्याप्रत तुम्ही खुले होता तेव्हा, जे जीवन खरोखरच जगण्याजोगे आहे, अशा उच्चतर जीवनाची तुम्हाला गोडी चाखायला मिळते आणि त्यानंतर तुमच्यामध्ये त्या जीवनाप्रत उन्नत होण्याची, तेथवर जाऊन पोहोचण्याची इच्छा उदयाला येते, आणि मग ‘हे शक्य आहे’ असा विश्वास निर्माण होतो आणि अंतिमतः त्यासाठी लागणारे प्रयत्न करण्याचे सामर्थ्य निर्माण होते आणि अगदी ध्येयाच्या अंतिम टप्प्यापर्यंत जाण्याचा संकल्प उदयास येतो.
सर्वप्रथम व्यक्तिने जागे झाले पाहिजे, तेव्हाच व्यक्ती विजय प्राप्त करून घेऊ शकते.
– श्रीमाताजी
(CWM 09 : 419-420)
अधीरता नेहमीच चुकीची असते. ती साधनेला साहाय्य करत नाही तर, ती अडथळे निर्माण करते. अविचल,…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४४ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) कोणतीही अडचण आली किंवा कितीही त्रास सहन करावा…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४३ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) साधनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यावर नेहमीच अडचणी येतात आणि त्यामुळे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४२ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) नामस्मरणाच्या शक्तीचा आणि संरक्षणाचा तुम्हाला अनुभव आला आहे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४१ (मला फक्त ईश्वर दर्शनाचीच आस आहे, पण तरीही तो मला दर्शन…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ४० (उत्तरार्ध) एखादी अशी गोष्ट की, जी अद्यापि आविष्कृत किंवा साध्य झालेली…