ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

अमर्त्यत्वाचा शोध १०

या जन्मात तुमच्या प्राणतत्त्वाचे परिवर्तन झाले आहे की नाही यावर, तुमची मरणोत्तर स्थिती काय असेल हे पुष्कळसे अवलंबून असते. तुम्ही स्वतः म्हणजे जर अस्ताव्यस्त प्रेरणांचे एक मिश्रण असाल, तर मृत्युसमयी, ज्यावेळी तुमची चेतना मागे सरून पार्श्वभूमीमध्ये जाते, त्यावेळी तुमच्यातील भिन्नभिन्न व्यक्तिमत्त्वे अलग अलग होतात आणि त्यांना साजेसे वातावरण मिळावे म्हणून ती व्यक्तिमत्त्वे घाईघाईने इकडेतिकडे तसे वातावरण शोधण्याची धडपड करतात. एखादा भाग त्याला अनुकूल मनोवृत्तीच्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीमध्ये शिरू शकतो, दुसरा एखादा भाग एखाद्या प्राण्यामध्येही शिरू शकतो. पण जो भाग ईश्वरी उपस्थितीविषयी जागृत असतो तो भाग केंद्रीय आंतरात्मिक अस्तित्वाशी संलग्न राहू शकतो. पण जर तुम्ही पूर्णतः सुसंघटित झालेले असाल; तुमचे एकजिनसी, अखंड व्यक्तित्वामध्ये परिवर्तन झालेले असेल, आणि क्रमविकासाच्या ध्येयप्राप्तीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला असाल तर तुमच्या मृत्युनंतरही तुम्ही जागृत राहाल आणि तुमच्या अस्तित्वाचे सातत्य टिकवू शकाल…

…(परंतु) बहुतांशी सर्वसामान्य माणसं ही त्यांच्या देहाशी इतकी एकजीव झालेली असतात की शारीरिक विघटनानंतर त्यांच्यातील स्वतःचे असे काहीच टिकून राहत नाही. पण अगदी काहीच टिकून राहत नाही असेही नाही – प्राणिक आणि मानसिक द्रव्य नेहमीच शिल्लक राहते पण ते शारीरिक व्यक्तिमत्त्वाशी एकरूप नसते. आणि जे शिल्लक राहते त्यावर बाह्य व्यक्तिमत्त्वाचा कोणताही स्पष्ट ठसा नसतो कारण बाह्य व्यक्तिमत्त्व हे इच्छा, आवेग यांच्या गोंधळात संतुष्ट असते; शारीरिक कार्यांच्या संलग्नतेमुळे आणि सहकार्यामुळे तयार झालेली ती एक तात्पुरती संघटनात्मक एकता असते आणि जेव्हा ती कार्ये संपून जातात तशी त्यांची ही वरकरणी-एकतादेखील साहजिकपणेच संपुष्टात येते. फक्त जर का विविध भागांना एक प्रकारची मानसिक शिस्त लावण्यात आली असेल आणि सर्वांना समान मानसिक आदर्शाचे अनुसरण करण्यास शिकविण्यात आले असेल तर तेथे एक प्रकारचे खरोखरीची व्यक्तिविशिष्टता (genuine individuality) असू शकते की ज्यामध्ये या पार्थिव जीवनाची स्मृती साठून राहते आणि मग ती स्मृती (मृत्युनंतरही) जाणीवपूर्वक टिकून राहू शकते. कलाकार, तत्त्वज्ञानी आणि इतर विकसित व्यक्ती की, ज्या सुरचित, व्यक्तित्वसंपन्न झालेल्या असतात आणि ज्यांच्या प्राणिक अस्तित्वाचे काही प्रमाणात रूपांतर झालेले असते अशी अस्तित्वं (मरणोत्तरही) टिकून राहू शकतात, कारण त्यांनी आपल्या बाह्य चेतनेमध्ये चैत्य अस्तित्वाचे थोडेफार प्रतिबिंब उमटविलेले असते; हे चैत्य अस्तित्व मूलतः अमर्त्य असते आणि केंद्रवर्ती अशा दिव्य संकल्पाभोवती अस्तित्वाची क्रमाक्रमाने घडण करत नेणे हे त्याचे उद्दिष्ट असते.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 144-146)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…

2 hours ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७

(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…

1 day ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…

2 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…

3 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…

4 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३

आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…

5 days ago