पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०३

 

आत्मविलोपन (self-annulment) नव्हे, तर आत्मपरिपूर्णत्व (self-perfection) हेच आपल्या योगाचे उद्दिष्ट आहे.

योग्याला वाटचाल करण्यासाठी दोन मार्ग योजलेले आहेत. एक मार्ग म्हणजे या विश्वापासून सुटका करून घेणे आणि दुसरा मार्ग म्हणजे या विश्वामध्येच परिपूर्णत्व प्राप्त करून घेणे. पहिला मार्ग हा वैराग्याद्वारे येतो आणि दुसरा मार्ग हा तपस्येद्वारे सिद्ध होतो. जेव्हा आपण या जीवनातून ईश्वर गमावतो तेव्हा आपल्याला पहिला मार्ग मिळतो; जेव्हा आपण ईश्वरामध्येच ह्या जीवनाचे परिपूर्णत्व प्राप्त करून घेतो, तेव्हा दुसरा मार्ग साध्य होतो… आपला मार्ग हा परिपूर्णत्वाचा मार्ग असावा, परित्यागाचा नसावा. युद्धामध्ये विजय हे आपले ध्येय असावे, सर्व संघर्षांपासून पलायन हे आपले ध्येय असता कामा नये.

हे जग मूलतः मिथ्या आहे, दुःखी आहे असे बुद्ध आणि शंकराचार्य मानत असत आणि त्यामुळे या जगापासून सुटका हाच त्यांच्या दृष्टीने एकमेव विवेक होता. परंतु हे विश्व म्हणजे ब्रह्म आहे, हे विश्व म्हणजे देव आहे, हे विश्व म्हणजे सत्य आहे, हे विश्व म्हणजे आनंद आहे. आपल्या मानसिक अहंकाराच्या माध्यमातून या विश्वाचे चुकीचे आकलन झाल्याने, आपल्याला विश्व मिथ्या वाटू लागते आणि या विश्वामध्ये देवाशी असणारे आपले नाते चुकीच्या पद्धतीने निर्माण झाल्याने, हे विश्व म्हणजे दु:खभोग आहे असे आपल्याला वाटू लागते. परंतु असे वाटणे यासारखे दुसरे कोणतेही मिथ्यत्व नाही आणि यासारखे दुःखाचे दुसरे कोणते कारणही नाही.

*

आपण भेदाच्या जागी ऐक्य, अहंकाराच्या जागी दिव्य चेतना, अज्ञानाच्या जागी दिव्य प्रज्ञा, विचारांच्या जागी दिव्य ज्ञान आणि दुर्बलता, संघर्ष आणि प्रयास यांच्या जागी आत्मतृप्त दिव्य शक्ती प्रस्थापित करायला हवी. दुःखभोग व खोटी मौजमजा यांच्या जागी दिव्य आनंद प्रस्थापित करायला हवा.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 96,101)

 

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०२

जो बंधनांपासून मोकळा असतो, तो बंधमुक्त असतो, तो मुक्त असतो. परंतु मुक्तीची आस हेच एक स्वयमेव असे अखेरचे बंधन आहे; जीव परिपूर्णतया मुक्त होण्यापूर्वी त्याने ह्या बंधनाचा देखील त्याग केला पाहिजे. कोणीच बद्ध नसतो, कोणीच मुक्तीचा इच्छुक नसतो, तर आत्मा हा कायमच आणि परिपूर्णपणे मुक्तच असतो, बंधन हा भ्रम आहे आणि बंधनापासून मुक्ती हा सुद्धा एक भ्रमच आहे, याचा साक्षात्कार होणे हेच अंतिम ज्ञान होय.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 06)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ०१

श्रीअरविंदप्रणित पूर्णयोग’ हा सर्व पारंपरिक योगांचा समन्वय आहे आणि त्याहूनही अधिक असे काही त्यामध्ये आहे. हा समन्वय करताना, पारंपरिक योगमार्गांचे स्वतः आधी अनुसरण करून, तसे प्रयोग करून, श्रीअरविंदांनी त्याआधारे प्रत्येक पारंपरिक योगामधील बलस्थानं आणि त्यांच्या मर्यादा स्वतः ज्ञात करून घेतल्या. पारंपरिक योगमार्गांच्या आधारे व्यक्ती आंशिक साक्षात्कारापर्यंत जाऊन पोहोचते, परंतु पूर्ण साक्षात्काराप्रत जाण्यासाठी त्या पारंपरिक योगमार्गांमधील क्रियाप्रकियांना जो नवीन अर्थ, जो नवीन संदर्भ प्राप्त करून द्यावा लागतो, तो नवीन अर्थ, नवीन संदर्भ नेमका कोणता, तो श्रीअरविंदांनी त्यांच्या लेखनातून स्पष्ट केला आहे. विशेषतः त्यांच्या ‘Synthesis of Yoga’ या ग्रंथामध्ये पारंपरिक योग, त्यांची बलस्थाने आणि त्यांच्या मर्यादा यांचा खूप सविस्तर धांडोळा घेण्यात आला आहे. श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या या शिकवणीतील अंशभागाचा समावेश, आजपासून सुरु होणाऱ्या ‘पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग’ या मालिकेत केला आहे.

धन्यवाद
संपादक, अभीप्सा मराठी मासिक

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो आजार दिवसेंदिवस अधिक पसरत चाललेला दिसत आहे आणि आता तर आपल्या काळात त्याने उग्र रूप धारण केले आहे; त्याला आपण ‘उपयुक्ततावाद’ म्हणतो. माणसं आणि वस्तू, परिस्थिती आणि कृती, उपक्रम या गोष्टी जणूकाही केवळ त्याच दृष्टिकोनातून बघितल्या जातात आणि जोखल्या जातात असे वाटते. जर एखादी गोष्ट उपयुक्त नसेल तर तिला काही मोलच नसते. जे अजिबात उपयुक्त नाही त्यापेक्षा काहीतरी जे उपयुक्त आहे ते निश्चितच अधिक चांगले आहे. पण यासाठी उपयुक्त म्हणजे काय यावर आधी आपले एकमत व्हावे लागेल – उपयुक्त कोणासाठी, उपयुक्त काय आणि कशासाठी ? ह्याची व्याख्या करावी लागेल.

जे मानववंश स्वत:ला सुसंस्कृत समजतात त्यांची अशी समजूत असते की, जे जे काही पैशाला आकर्षित करून घेऊ शकते, पैसा मिळवू शकते, पैसा उत्पन्न करू शकते ते ते उपयुक्त होय. प्रत्येक गोष्टीचा निर्णय व मूल्यमापन आर्थिक दृष्टिकोनातूनच केले जाते. ह्यालाच मी ‘उपयुक्ततावाद’ म्हणते. आणि हा आजार खूपच संसर्गजन्य आहे कारण या रोगापासून अगदी लहान मुलांचासुद्धा बचाव होऊ शकलेला नाही.

ज्या वयात मुलांनी सौंदर्य, महानता, पूर्णत्व यांची स्वप्ने पाहावयास हवीत, त्या वयात आजची मुले केवळ पैशाची स्वप्ने पाहू लागली आहेत आणि त्यांना चिंता आहे ती हा पैसा मिळवायचा कसा ह्याची.

म्हणून जेव्हा ती मुले अभ्यासाचा विचार करीत असतात, तेव्हा सर्वात जास्त ती ह्याच गोष्टीचा विचार करीत असतात की त्यांना काय उपयोगी पडू शकेल. काय केले असता, मोठे झाल्यावर त्यांना त्यातून भरपूर पैसा कमावता येतील.

त्यांच्या लेखी एकच गोष्टी सर्वाधिक महत्त्वाची ठरते ती म्हणजे परीक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण होण्यासाठी स्वत:ची तयारी करणे; कारण पदविका, प्रमाणपत्र, विविध पदव्या यांच्या साहाय्यानेच केवळ त्यांना चांगले हुद्दे प्राप्त होऊ शकतील आणि ते त्यातूनच भरपूर पैसा कमावू शकतील.

त्यांच्या लेखी अभ्यासाचा इतर कोणताच हेतू नसतो, त्याव्यतिरिक्त त्यांना अभ्यासात काही स्वारस्यही नसते.

ज्ञानासाठी ज्ञान मिळविणे, प्रकृती आणि जीवनाचे रहस्य जाणून घेण्यासाठी अभ्यास करणे, जाणिवेचा विकास घडविण्यासाठी स्वतः शिकणे, स्वत:च स्वत:चा स्वामी बनण्यासाठी स्वयंशिस्त लावणे, स्वत:च्या दुर्बलता, अक्षमता व अज्ञान यांवर मात करणे, अधिक उदात्त व विशाल, अधिक उदार व अधिक सच्च्या अशा ध्येयाच्या दिशेने मार्गप्रवण होणे…. या साऱ्याचा आजची मुले क्वचितच विचार करतात आणि या साऱ्या गोष्टींना ते फार आदर्शवादी, कल्पनारम्य असे मानतात. व्यावहारिक बनणे, पैसा कसा कमवावयाचा हे शिकणे आणि त्यासाठी स्वत:ला तयार करणे फक्त ह्याच गोष्टी त्यांच्या लेखी महत्त्वाच्या असतात.

…जे अधिक उन्नत आणि चांगल्या जीवनाची आकांक्षा बाळगतात, जे ज्ञान व पूर्णत्वासाठी तहानलेले असतात, येणाऱ्या अधिक पूर्ण सत्य अशा भविष्यकाळाची जे आतुरतेने वाट पाहतात केवळ अशाच व्यक्ती येथे आम्हाला हव्या आहेत.

इतरांसाठी बाहेरील जगामध्ये भरपूर जागा आहे.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 351-352)

मी आंतरिक सत्य, प्रकाश, सुमेळ आणि शांती यांचे काहीएक तत्त्व, पृथ्वीचेतनेमध्ये आणू पाहत आहे. उर्ध्वस्थित असलेले ते मला दिसत आहे आणि ते काय आहे हे मला माहीत आहे. जाणिवेमध्ये उतरू पाहणारी त्याची तेज:प्रभा मी सातत्याने अनुभवत आहे.

आज मानवाची प्रकृती अर्धप्रकाश, अर्धअंधकार अशा दशेत आहे; त्याने त्याच दशेमध्ये राहण्यापेक्षा, मानवाने समग्र अस्तित्वच, त्या सत्य-तत्त्वाने स्वत:च्या अंगभूत शक्तीमध्ये सामावून घ्यावे आणि त्या सत्य-तत्त्वाला हे शक्य व्हावे म्हणून मी झटत आहे. या पृथ्वीवरील अंतिम उत्क्रांती असे जिला म्हणता येईल, अशी उत्क्रांती म्हणजे दिव्य चेतनेचा विकास; आणि तो विकास घडून येण्यासाठीचा मार्ग या सत्य-तत्त्वाच्या अवतरणाने खुला होईल, अशी मला खात्री आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 35 : 281)

प्रकृतीमध्ये खडकाकडून वनस्पतीकडे, वनस्पतीकडून पशुकडे, पशूकडून मानवाकडे, अशाप्रकारे आरोहण करणारा क्रमविकास आहे. आजवर ज्ञात असलेल्या या विकासक्रमानुसार, सध्यातरी मानव हा सर्वात वरच्या पायरीवर आहे असे दिसून येते. अर्थातच, त्यामुळे आपण या विश्वातील विकासाचा अंतिम टप्पा असून, आपल्यापेक्षा उच्चतर असे या पृथ्वीतलावर काहीही असणे शक्य नाही, असा मनुष्याचा समज झाला आहे. आणि हाच त्याचा फार मोठा गैरसमज आहे. त्याच्या भौतिक प्रकृतीच्या दृष्टीने तो आजही जवळजवळ पूर्णपणे पशुच आहे; विचार करणारा आणि बोलणारा पशू आहे इतकेच. परंतु त्याच्या भौतिक सवयी आणि सहज स्वाभाविक प्रवृत्ती पाहता तो अजूनही प्राणिदशेतच आहे. अर्थातच अशा अपूर्ण निर्मितीत प्रकृती संतुष्ट असू शकत नाही हे निश्चित. प्रकृती एक नवीन प्रजाती बनविण्याच्या प्रयत्नांत आहे. पशूच्या दृष्टीने जसा मानव,त्याप्रमाणे मानवाच्या दृष्टीने ती प्रजाती असेल. ती प्रजाती बाह्य आकाराने मानवसदृशच असेल; तरीपण तिची जाणीव मनाहून कितीतरी उच्च स्तरावरची असेल आणि ती प्रजाती अज्ञानाच्या दास्यत्वातून पूर्णपणे मुक्त झालेली असेल.

मानवाला हे सत्य अवगत करून देण्यासाठी श्रीअरविंद या पृथ्वीतलावर आले. मानसिक जाणिवेमध्ये जगणारा मानव हा केवळ एक संक्रमणशील जीव आहे; परंतु एक नवी चेतना, सत्य-चेतना प्राप्त करून घेण्याची क्षमता असणारा आणि एक पूर्णतया सुसंवादपूर्ण, कल्याणकारी, सुंदर, आनंदी आणि पूर्ण जाणीवयुक्त जीवन जगण्याची क्षमता असणारा असा तो जीव आहे, असे त्यांनी मानवाला सांगितले. ही सत्यचेतना, जिला ते ‘अतिमानस’ (SupraMental consciousness) असे संबोधत असत, ती चेतना स्वत:मध्ये प्रस्थापित करण्यासाठी, आणि त्यांच्या भोवती जमलेल्या साधकांना देखील त्या चेतनेची अनुभूती यावी म्हणून साहाय्य करण्यासाठी, श्रीअरविंदांनी या पृथ्वीतलावर त्यांचा संपूर्ण आयुष्यभराचा वेळ देऊ केला.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 116)

जीवनाकडे आणि योगाकडे योग्य दृष्टिकोनातून पाहिल्यास असे आढळून येते की, सर्व जीवन हे योगच आहे. मग ते पूर्ण जाणीवपुर:सर असो किंवा अर्ध-जाणिवेचे असो. “व्यक्तीमध्ये सुप्त असलेल्या क्षमतांच्या आविष्करणाद्वारे, आत्मपूर्णत्वाच्या दिशेने चाललेला पद्धतशीर प्रयत्न” असा ‘योग’ या संकल्पनेचा आमचा अर्थ आहे.

या प्रयत्नांमध्ये विजय प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक असलेली उच्चतम अट म्हणजे, मानवामध्ये आणि विश्वामध्ये अंशतः आविष्कृत झालेल्या विश्वात्मक आणि विश्वातीत अस्तित्वाशी मानवी व्यक्तीचे ऐक्य, ही होय. जीवनाच्या सर्व दृश्य रुपांच्या पाठीमागे आपण नजर टाकली तर असे दिसून येईल की, हे जीवन म्हणजे प्रकृतीचा एक व्यापक योग आहे. स्वत:मधील विविध शक्ती सतत वाढत्या प्रमाणात प्रकट करत, स्वत:चे पूर्णत्व गाठण्यासाठी आणि स्वत:च्या दिव्य सत्य स्वरूपाशी एकत्व पावण्यासाठी, प्रकृती चेतन आणि अर्ध-चेतनामध्ये हा जीवनरूपी योग अभ्यासत आहे.

मानव हा प्रकृतीचा विचारशील घटक आहे; त्याच्याद्वारे प्रकृतीने, आत्मजाणीवयुक्त साधनांचा आणि कृतींच्या संकल्पयुक्त व योजनाबद्ध व्यवस्थेचा, या पृथ्वीवर प्रथमच वापर केला आहे, जेणेकरून तिचा हा महान हेतू अधिक वेगाने आणि प्रभावीपणे साध्य व्हावा. स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे, व्यक्तीने आपल्या पार्थिव जीवनामध्ये, स्वत:ची विकासप्रक्रिया शीघ्रतेने एकाच जन्मात, किंबहुना काही वर्षांमध्येच, वा काही महिन्यांमध्येच साध्य करून घेण्याचे एक साधन म्हणजे ‘योग’ होय. प्रकृती तिच्या ऊर्ध्वगामी दिशेने चाललेल्या या प्रयासामध्ये ज्या साधारण पद्धती अगदी सैलपणे, विपुलपणे आणि आरामशीर पद्धतीने, रमतगमत, सढळपणे उपयोगात आणत असते, त्यामध्ये वरकरणी पाहता, द्रव्याचा आणि ऊर्जेचा अपव्यय दिसत असला तरी त्यातून ती अधिक परिपूर्ण अशी संगती लावत जात असते, त्याच पद्धती योगामध्ये अधिक आटोपशीरपणे, अधिक तीव्रतेने, अधिक ऊर्जापूर्ण रीतीने उपयोगात आणल्या जातात. योगाची एखादी विशिष्ट प्रणाली म्हणजे त्या पद्धतींपैकी एका पद्धतीची निवड वा दाबयुक्त संकोचन (compression) याशिवाय दुसरे तिसरे काही असत नाही. योगाविषयी हा दृष्टिकोन बाळगला तर आणि तरच, विविध योगपद्धतींच्या तर्कशुद्ध समन्वयास बळकट अधिष्ठान लाभू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 06)

एक गोष्ट महत्त्वाची आहे; ती अशी की, एक असे म्हातारपण आहे की, जे नुसत्या वाढत जाणाऱ्या वयापेक्षादेखील जास्त भयानक आणि जास्त खरे आहे ते म्हणजे : विकसित होण्याची व प्रगती करण्याची अक्षमता.

ज्या क्षणी तुम्ही वाटचाल करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही प्रगत होणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही स्वत:ला अधिक चांगले बनविणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही शिकणे वा वाढणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही तुमच्यामध्ये रुपांतर घडविणे थांबविता, तेव्हा तुम्ही खरोखरच वृद्ध बनता म्हणजे असे म्हणता येईल, की विघटनाच्या दिशेने तुमचा प्रवास सुरु होतो.

अशी काही तरुण माणसे असतात, की जी वृद्ध असतात आणि असे काही वृद्ध असतात की, जे तरुण असतात. जर तुम्ही तुमच्यामध्ये प्रगतीची आणि रूपांतरणाची ज्वाला सोबत बाळगलीत, जर तुम्ही जागरुकपणे पुढे वाटचाल करण्यासाठी म्हणून, तुम्हाकडे असलेल्या सर्वाचा त्याग करण्याची तयारी ठेवलीत, जर तुम्ही नवीन प्रगतीसाठी, नवीन सुधारणेसाठी, नवीन रुपांतरणासाठी नेहमीच खुले असाल, तर तुम्ही चिरंतन तरुण आहात. पण तुम्ही आजवर जे काही मिळविलेले आहे, त्यामध्ये समाधानी होऊन आरामशीर बसलात तर; आपण ध्येयाप्रत जाऊन पोहोचलो आहोत आणि आता करण्यासारखे काहीही उरले नाही, आता फक्त केलेल्या प्रयत्नांची, कष्टांची फळे चाखावयाची अशी तुमची भावना झाली असेल तर… तर तुमच्या निम्म्याहून अधिक गोवऱ्या स्मशानात जाऊन पोहोचल्या आहेत असे समजावे. खरेतर, हीच आहे जर्जरता आणि हाच आहे मृत्यू.

जे करावयाचे शिल्लक राहिले आहे त्याच्या तुलनेत आजवर जे केले आहे, ते नेहमीच अपुरे असते.

मागे पाहू नका. पुढे, नेहमीच पुढे पाहा आणि नेहमीच पुढे चालत राहा.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 238)