राजयोग
पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – १७
आंतरात्मिक कारणांसाठी, हठयोगाप्रमाणेच राजयोगदेखील प्राणायामाचा अवलंब करतो; परंतु संपूर्णतः एक आंतरात्मिक प्रणाली म्हणून तिचा उपयोग न करता, अनेक साधन-मालिकांमधील एक साधनापद्धती म्हणून तो प्राणायामाचा अवलंब करतो आणि अगदी मर्यादित अर्थाने, तीन चार मोठ्या उपयोगांसाठी तो त्याचा वापर करतो. राजयोगाचा आरंभ आसन आणि प्राणायामापासून होत नाही, राजयोग मनाच्या नैतिक शुद्धीकरणावर प्रथम भर देतो. आणि ही गोष्ट सर्वांत महत्त्वाची आहे. कारण त्याच्याशिवाय राजयोगाचा क्रम अनुसरू पाहाणे म्हणजे त्यामध्ये अडथळे उत्त्पन्न होण्याची, त्याचा मार्ग अवरूद्ध होण्याची, अनपेक्षित मानसिक, नैतिक आणि शारीरिक संकटांचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता असते. प्रस्थापित प्रणालीमध्ये या नैतिक शुद्धीकरणाची दोन गटांमध्ये विभागणी केलेली आहे. पाच यम आणि पाच नियम असे हे दोन गट आहेत. यम या सदराखाली सत्य-बोलणे, अहिंसा, चोरी न करणे इ. गोष्टींसारख्या वर्तणुकीबाबतीतील नैतिक स्व-संयमनाच्या गोष्टींचा समावेश होतो. परंतु वस्तुतः या गोष्टी म्हणजे एकंदरच नैतिक स्वनियंत्रणाची आणि शुद्धतेची जी सर्वसाधारण आवश्यकता आहे त्याच्याकडे निर्देश करणाऱ्या गोष्टी आहेत, असे समजले पाहिजे. ज्या योगे, राजसिक अहंकार आणि त्याचे आवेग, मानवामध्ये असणाऱ्या इच्छाआकांक्षा यावर विजय प्राप्त करून, त्या शांत होत होत, त्यांचे परिपूर्ण शमन होईल, अशी कोणतीही स्वयंशिस्त ही अधिक व्यापक अर्थाने, ‘यम’ या सदरात मोडण्यासारखी आहे. राजसिक मानवामध्ये एक नैतिक स्थिरता, आवेगशून्यता निर्माण व्हावी, आणि त्यातून अहंकाराचा अंत घडून यावा, हे याचे उद्दिष्ट असते. नियमित सरावाची एक मानसिक शिस्त, ज्यामध्ये ईश्वरी अस्तित्वावर ध्यान ही सर्वोच्च साधना गणली जाते, अशा साधनापद्धतींचा समावेश ‘नियमा’मध्ये केला जातो. ज्याच्या आधारावर उर्वरित सर्व योगाची पायाभरणी होऊ शकेल अशी सात्विक स्थिरता, शुद्धता आणि एकाग्रतेची तयारी करणे, हे या नियमांचे उद्दिष्ट असते.
यमनियमांच्या आधारे जेव्हा पाया भक्कम झालेला असतो तेव्हाच आसन आणि प्राणायामाची साधना येते आणि तेव्हाच त्यांना परिपूर्ण फले लागू शकतात. मनाच्या नियंत्रणाद्वारे आणि नैतिक अस्तित्वाद्वारे, केवळ आपली सामान्य जाणीव ही अगदी योग्य अशा प्राथमिक स्थितीत येऊ शकते; परंतु योगाच्या अधिक महान उद्दिष्टांसाठी आवश्यक असणारे उच्चतम अशा चैत्य पुरुषाचे आविष्करण किंवा उत्क्रांती त्याद्वारे घडून येत नाही.
– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 538-539)
व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…
आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…
(भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…
(भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…
भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…
साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…