ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

पूर्णयोग आणि बौद्धमत – २२

(कालचे वचन हे, दु:खभोगापासून मुक्तता ज्यामुळे घडून येईल त्या चार तत्त्वांशी आणि अष्टपदी मार्गाशी संबंधित होते. काल आपण ती चार उदात्त तत्त्वे विचारात घेतली. आता, श्रीमाताजींनी अष्टपदी मार्गाविषयी – अष्टांग मार्गाविषयी – जे विवेचन केले आहे ते पाहू.)

श्रीमाताजी : उदात्त मार्गामध्ये पुढील आठ पायऱ्यांच्या प्रशिक्षणाचा समावेश होतो.

१) सम्यक दृष्टी : गोष्टी जशा आहेत तशा पाहणे, ह्याला म्हणायचे शुद्ध व अचूक दृष्टी, सर्वोत्तम दृष्टी. वेदना, अशाश्वतता आणि सघन अशा स्व-जाणिवेचा (fixed ego) अभाव, ही अस्तित्वाची तीन वैशिष्ट्ये आहेत, असे धम्मपदात म्हटले आहे. पण ते खरेतर तसे नसून, मनोभावनांच्या समुच्चयामध्ये सघन, टिकाऊ, स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा अभाव, वैयक्तिक चेतनेतील खऱ्या सातत्याचा अभाव असा त्याचा अर्थ आहे. आणि यामुळेच माणसाला सर्वसामान्यपणे त्याचे गतजन्म आठवत नाहीत किंवा व्यक्तीच्या सर्व जीवनांमध्ये काही प्रयोजनात्मक सातत्य असल्याचेही त्याला जाणवत नाही.

पहिला मुद्दा म्हणजे योग्य रीतीने पाहणे. योग्य रीतीने पाहणे म्हणजे, सर्वसामान्य जीवनाशी दुःखभोग, वेदना सहसंबंधित झालेल्या आहेत हे पाहणे, सर्व गोष्टी अस्थायी आहेत आणि वैयक्तिक जाणिवेमध्ये कोणतेही सातत्य नाही, हे पाहणे.

२) सम्यक प्रयोजन वा इच्छा : येथे इच्छा ह्या शब्दाचा उपयोग करायला नको होता कारण आत्ताच आपणांस सांगण्यात आले आहे की, आपल्यामध्ये इच्छावासना असता कामा नयेत. खरेतर येथे ‘योग्य अभीप्सा’ अशी शब्दरचना हवी होती. ‘इच्छा’ या शब्दाच्या जागी ‘अभीप्सा’ हा शब्द पाहिजे.

”सर्व प्रकारच्या आसक्तीपासून मुक्त असणे आणि अस्तित्वात असलेल्या सर्वांविषयी प्रेमळ विचार असणे.” सातत्याने दयाळूपणाच्या स्थितीमध्ये असणे. सर्वांविषयी नेहमीच सदिच्छा बाळगणे.

३) सम्यक वाणी – कोणालाच न दुखविणारी वाणी : कधीही निरर्थकपणे बोलू नये, आणि द्वेषपूर्ण, आकसयुक्त बोलणे कटाक्षाने टाळावे.

४) सम्यक वर्तन – शांतिपूर्ण व प्रामाणिक वर्तन : केवळ भौतिक दृष्ट्याच नव्हे तर नैतिकदृष्ट्याही, तसेच मानसिकदृष्ट्यादेखील शांतिपूर्ण व प्रामाणिक वर्तन असले पाहिजे. मानसिक सचोटी ही साध्य करून घेण्यास सर्वात अवघड असलेल्या गोष्टींपैकी एक गोष्ट आहे.

५) जगण्याची सम्यक पद्धत – कोणत्याही जीवाला इजा वा धोका न पोहोचविणे : ही गोष्ट समजून घेणे तुलनेने सोपे आहे. काही लोक असेही असतात की जे ह्या तत्त्वाचे अगदी टोकाचे पालन करतात. ते लोक जीवजंतू पोटात जाऊ नयेत म्हणून तोंडाला रूमाल बांधतात, रस्त्यामध्ये एखाद्या किड्यावर आपला पाय पडायला नको म्हणून चालायच्या आधी रस्ता झाडून घेतात. मला हे काहीसे अतिरेकी वाटते, कारण तसेही सद्यस्थितीमध्ये समग्र जीवनच विध्वंसक वृत्तीने भरलेले आहे. पण जर तुम्ही या वचनाचा अर्थ नीट समजून घेतलात तर, ज्यामुळे कोणासही इजा होईल अशा सर्व शक्यता टाळायचा प्रयत्न करावयाचा, व्यक्तीने जाणूनबुजून कोणत्याही जीवाला त्रास द्यावयाचा नाही असा त्याचा अर्थ आहे. तुम्ही येथे सर्व जीवजंतूंचा समावेश करू शकता आणि पुढे जाऊन तुम्ही ही काळजी व दयाळुता, अस्तित्वात असणाऱ्या सर्वच गोष्टींसाठी बाळगलीत तर, आंतरिक विकासाच्या दृष्टीने ते खूपच उपयुक्त ठरेल.

६) सम्यक प्रयत्न : निरुपयोगी गोष्टींसाठी व्यर्थ प्रयत्न करू नका; किंबहुना, या अज्ञानावर मात करण्यासाठी आणि स्वत:ची मिथ्यत्वापासून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नांसाठी, तुमची सर्व शक्ती राखून ठेवा.

७) सम्यक जागरूकता (VIGILANCE) : आधीच्या सहाव्या तत्त्वाची पुष्टी करण्यासाठी हे सातवे तत्त्व आले आहे. तुमच्याकडे सक्रिय आणि सावध मन असले पाहिजे. अर्धवट झोपेत, अर्धवट अचेतनेमध्ये जगू नका – सहसा, तुम्ही जीवन जसे समोर येईल तसे, तुमच्या तुमच्या पद्धतीने नुसते जगत राहता. प्रत्येकजण हे असेच करत असतो. जेव्हा जेव्हा तुम्ही भानावर येता तेव्हा तुमच्या असे लक्षात येते की, तुम्ही वेळ वाया घालविला आहे. मग तुम्ही खूप धडपड करता, ती जणूकाही पुन्हा होतात तिथेच जाऊन पडण्यासाठी. लगेच पुढच्याच क्षणी तुमचा उत्साह मावळून जातो. त्यापेक्षा, कमी जोशाचे पण अधिक सातत्यपूर्ण प्रयत्न असणे, हे अधिक बरे.

८) सम्यक चिंतन : वस्तुंच्या सारतत्त्वावर, अगदी सखोल सत्यावर आणि साध्य करून घ्यावयाच्या लक्ष्यावर केंद्रित केलेला अहंविरहित विचार म्हणजे सम्यक चिंतन होय.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 248-250)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

17 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago