पूर्णयोग आणि बौद्धमत – ०८
धम्मपद : सावधानता हा अमरत्वाकडे वा निर्वाणाकडे नेणारा मार्ग आहे, बेसावधपणा हा मृत्यूकडे नेणारा मार्ग आहे. सावध मनुष्य कधीही मृत्यू पावत नाही, बेसावध मनुष्य हा मृतवतच असतो.
श्रीमाताजी : सावधानता म्हणजे नित्य जागृत असणे, दक्ष असणे, प्रामाणिक असणे – कोणत्याच गोष्टीने आश्चर्याचा धक्का बसता कामा नये. जेव्हा तुम्हाला साधना करावयाची असते, तेव्हा जीवनात प्रत्येक क्षणाला तुम्हाला निवड करावयाची असते – ध्येयाप्रत जाणाऱ्या मार्गावर पाऊल टाकावयाचे की गाढ झोपी जायचे, “आत्ताच नको, नंतर पाहू” असे म्हणत, मार्गात मध्येच बसून राहावयाचे, यांपैकी एकाची हरक्षणी निवड करावयाची असते.
तुम्हाला खाली खेचणाऱ्या गोष्टींना प्रतिकार करावयाचा एवढाच सावधानतेचा अर्थ नाही, तर प्रगतीकडे घेऊन जाणारी कोणतीही संधी तुम्ही गमावणार नाही यासाठी जागरुक राहावयाचे हाही त्याचा अर्थ आहे. एखाद्या दुर्बलतेवर मात करण्याची संधी, प्रलोभनाला बळी पडण्यापासून रोखणे, काही नवीन शिकण्याची, काही दुरुस्त करण्याची, कशावर तरी प्रभुत्व मिळविण्याची संधी न गमावणे म्हणजे सावधानता होय. तुम्ही जर का सावध असाल, जागरुक असाल तर तुम्हाला जे करावयास काही वर्ष लागली असती, ते तुम्ही काही दिवसांतच साध्य करून घेऊ शकता. तुम्ही जर सावध असाल, दक्ष असाल तर तुमच्या जीवनातील प्रत्येक परिस्थितीला, प्रत्येक कृतीला, प्रत्येक हालचालीला, तुमच्या ध्येयाप्रत घेऊन जाणाऱ्या संधीमध्ये तुम्ही बदलवून टाकू शकता.
सावधानता दोन प्रकारची असते, सक्रिय आणि निष्क्रिय. तुमच्या हातून एखादी चूक घडणार असेल, जर तुम्ही एखादा चुकीचा निर्णय घेणार असाल, जर तुम्ही दुबळे ठरण्याचा वा तुम्ही मोहात पडण्याचा क्षण असेल तर अशा वेळी सावधनता तुम्हाला धोक्याचा इशारा देते. तर प्रगतीच्या संधीच्या शोधात असणारी सक्रिय सावधानता ही प्रत्येक परिस्थितीचा उपयोग करून घेऊन त्वरेने प्रगती करण्यासाठी धडपडत असते.
तुम्हाला पडण्यापासून वाचविणे आणि प्रगतिपथावरून वेगाने वाटचाल करणे या दोहोंमध्ये पुष्कळच फरक आहे. आणि या दोन्ही गोष्टी आवश्यकच आहेत.
जो सावधान, दक्ष नाही तो जणू काही आधीच मरण पावलेला असतो. जीवनाच्या आणि अस्तित्वाच्या खऱ्या हेतूशी त्याचा असणारा संपर्क तो केव्हाच गमावून बसलेला असतो.
अशा रीतीने, घटिका जातात, वेळ, परिस्थिती निघून गेलेली असते, जीवन निरर्थकपणे सरून जाते, हाती काहीही गवसत नाही आणि मग तुम्ही कधीतरी झोपेतून, सुस्तीतून जागे होता आणि स्वत:ला अशा एका विवरात पाहता की, जेथून सुटका होणे हे अतिशय कठीण असते.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 202-203)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…