धम्मपद : सदाचरणी मनुष्यास इहलोकामध्ये आनंद होतो व परलोकामध्येही आनंद होतो. आपले शुद्ध कर्म पाहून त्याला संतोष वाटतो.
श्रीमाताजी : यावरून असे वाटते की, बौद्ध धर्माने स्वर्ग व नरक या कल्पनांचा स्वीकार केला आहे, पण असे केल्याने केवळ वरवरचा अर्थ घेतल्यासारखे होईल, कारण अधिक खोल अर्थाने पाहिले असता, ही बुद्धांची विचारप्रणाली नव्हती. उलट, त्यांचा या कल्पनेवर भर असे की, तुम्ही ज्या जगात वावरणार आहात ते जग तुमच्या आचरणाने आणि तुमच्या चेतनेच्या स्थितीनुसार, तुम्हीच निर्माण करता. मनुष्य ज्या जगात जगत असतो, आणि देह सोडल्यानंतरदेखील ज्या जगात तो जगणार असतो, ते जग तो स्वत:मध्येच बाळगत असतो. कारण बुद्धांच्या शिकवणुकीनुसार देहात असतानाचे जीवन व देहोत्तर जीवन यामध्ये काही फरक नाही….
…जेव्हा तुम्ही सदाचारी असता, उदार, उदात्त, नि:स्वार्थी, दयाळू असता, त्यावेळी तुम्ही तुमच्यामध्ये व तुमच्याभोवती एक विशिष्ट वातावरण निर्माण करीत असता. हे वातावरण म्हणजे एक प्रकारची प्रकाशमय अशी मुक्ती असते. सूर्यप्रकाशात बहरून येणाऱ्या एखाद्या फुलाप्रमाणे तुम्ही खुलून येता, त्याच प्रकाशमयतेमध्ये श्वासोच्छ्वास करता. त्यामुळे जीवनात कोणतीही कटुता, विद्रोह, क्लेश, दुःखद प्रतिघात तुमच्यावर होत नाहीत. अगदी सहज स्वाभाविकपणे तुमच्या भोवतालचे वातावरण प्रकाशमय होते आणि ज्या हवेत तुम्ही श्वासोच्छ्वास करता ते वातावरण आनंदमय होऊन जाते. देहामध्ये असताना किंवा देहातून बाहेर गेल्यावरही, जागृती किंवा निद्रेमध्ये, जीवनामध्ये किंवा मरणोत्तर नवीन जन्म मिळेपर्यंतच्या जीवनातही तुम्ही त्याच वातावरणात जगता.
छिन्नविछिन्न करून टाकणाऱ्या वाऱ्याप्रमाणे, गोठवून टाकणाऱ्या थंडीप्रमाणे, किंवा भस्मसात करून टाकणाऱ्या अग्निज्वालेप्रमाणे, दुष्कृत्ये ही मनुष्याच्या जाणिवेवर प्रतिकूल परिणाम घडवून आणतात.
सर्व सत्कृत्ये, शुभ कर्मे ही जीवनात प्रकाश, स्वास्थ्य, आनंद आणि पुष्पविकासी सूर्यप्रकाश भरत असतात.
– श्रीमाताजी
(CWM 03 : 199-200)
(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)
(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक…
अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही…
(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे.…
पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल…
तुमची इच्छा नसतानासुद्धा तुमच्यामध्ये जेव्हा एखादा आवेग निर्माण होतो तेव्हा लगेचच एक गोष्ट तुम्ही…
तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर…