पृथ्वीवर आज जी खरोखर दुःखदायक आणि भयंकर परिस्थिती आली आहे त्या तिच्या परिस्थितीकडे, तसेच सर्व देश ज्या दयनीय स्थितीतून जात आहेत त्या त्यांच्या अवस्थेकडे मी काही कारणासाठी पाहत होते. तेव्हा सर्वांना कवेत घेईल असे एक दृश्य माझ्या अंत:दृष्टीला दिसले; विविध देश आजवर जसे वागले आहेत आणि अधिकाधिक प्रमाणात, ज्या चढत्यावाढत्या खोटेपणाने वागत आहेत ते सारे त्या दृष्टीला दिसले. अत्यंत भयप्रद अशी विध्वंसक साधने तयार करण्यासाठी ते कशा रीतीने त्यांची सर्व सृजनशक्ती पणाला लावीत होते तेही दिसले. त्यापाठीमागे त्यांची अशी एक बालीश कल्पना होती की, ही संहारक साधने इतकी भयंकर असतील की त्याचा कोणी वापर करू धजावणार नाहीत. पण त्यांना हे कळत नाही की वस्तूंना देखील एक चेतना असते आणि त्यांच्यामध्ये आविष्करणाची शक्ती असते, ही सर्व विनाशाची साधनेच जणुकाही त्यांचा वापर व्हावा म्हणून दबाव टाकतात; आणि जरी माणसांना त्या साधनांचा वापर करावयाचा नसेल तरी त्यांच्यापेक्षाही अधिक बलवान अशी एक शक्ती त्यांना त्याचा वापर करण्यास प्रवृत्त करेल.
नंतर, हे संभाव्य अरिष्ट पाहून, ती चूक किमान निष्प्रभ करणारे असे काहीतरी खाली अवतरावे म्हणून मनातून एक प्रकारची याचना वा अभीप्सा निर्माण झाली. आणि एक उत्तर आले… मी ते माझ्या कानांनी ऐकले असे मी म्हणू शकत नाही, पण ते इतके सुस्पष्ट, इतके ठाशीव, इतके नेमके होते की जणू ते निर्विवाद होते. मला ते शब्दांत सांगणेच भाग आहे; मी जर ते शब्दांत व्यक्त करावयाचे ठरविले तर मी असे म्हणेन, “म्हणून तर तू ऑरोविलची निर्मिती केली आहेस.”
आणि असे सुस्पष्टपणे दिसले आहे की, ऑरोविल हे शक्तीचे व निर्मितीचे केंद्र होते, त्यामध्ये सत्याचे बीज होते आणि जर ते अंकुरित झाले, वाढू शकले, तर ज्या क्षणी ते विकसित पावेल तो क्षण म्हणजे ह्या युद्धसामग्री-सुसज्जतेच्या चुकीच्या भयावह परिणामाविरूद्ध दिलेली प्रतिक्रिया असेल.
– श्रीमाताजी
(Mother’s Agenda, Septermber 21, 1966)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…