ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

प्रश्न : तंबाखू आणि दारू स्मरणशक्ती आणि इच्छाशक्ती नष्ट का करतात?

श्रीमाताजी : का? कारण त्या गोष्टी तसे करतात. याला काही नैतिक कारण नाहीये. तर ती वस्तुस्थिती आहे. दारुमध्ये विष असते, तंबाखूमध्ये विष असते आणि हे विष पेशींपर्यंत जाऊन पोहोचते आणि त्यांना इजा पोहोचविते. अल्कोहोल शरीरातून कधीच बाहेर पडत नाही; ते मेंदूच्या एका विशिष्ट भागामध्ये साठत राहते. आणि अशा रीतीने ते तेथे साठत राहिले की, मग मेंदूतील त्या पेशी कार्य करेनाशा होतात – काही जण तर यामुळे वेडेही होतात, (यालाच अतिसेवनामुळे होणारा भ्रम असे म्हणतात.) अतिप्रचंड प्रमाणात दारू प्यायल्यामुळे ती, ज्या पद्धतीने मेंदूमध्ये साठून राहते त्याचा परिणाम वेड लागण्यात होतो. आणि हे इतके तीव्र रूप धारण करते की….

फ्रान्समध्ये असा एक प्रांत आहे, जिथे वाईन तयार केली जाते. या वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अत्यल्प असते. मला वाटते चार किंवा पाच टक्के, अगदी कमी प्रमाण असते. आणि मग ही लोकं, स्वतःच ती वाईन बनवत असल्यामुळे, ते जणू काही पाणी प्यायल्यासारखी वाईन पितात. ते पद्धतशीरपणे तिचे सेवन करतात पण कालांतराने ते आजारी पडतात. त्यांना मेंदूचे आजार होतात. मला अशी काही माणसं माहीत आहेत, त्यांचा मेंदू नीट काम करू शकत नसे.

आणि तंबाखू – निकोटिन हे तर अतिशयच खतरनाक असे विष आहे. पेशी नष्ट करून टाकणारे हे विष असते. मी म्हणाले तसे, हे मंद विष आहे कारण व्यक्तीला त्याचे सेवन केल्यावर लगेचच त्याची जाणीव होत नाही. अपवाद, व्यक्ती पहिल्या वेळी सिगारेट ओढते आणि आजारी पडते, त्याचा !

आणि त्यातूनच तुम्हाला समजायले हवे की, व्यक्तीने त्याचे सेवन करता कामा नये. माणसं इतकी मूर्ख असतात की, त्यांना वाटते की, ही दुर्बलता आहे आणि जोवर त्यांना त्या विषाची सवय होत नाही तोवर ते त्याचे सेवन करतच राहतात. आणि मग त्याचे शरीर हे प्रतिक्रिया देईनासे होते, ते कोणतीही प्रतिक्रिया न देताच, स्वतःच्या नाश पावण्याला संमती देते : तुम्हाला त्या सेवनाचे शरीरावर काही परिणाम दिसेनासे होऊ लागलेले असतात. आणि ही गोष्ट शरीर तसेच नैतिकतेच्या बाबतीतही समानच आहे.

जेव्हा तुम्ही करू नये अशी एखादी गोष्ट करता आणि तुम्हाला तुमचा चैत्य पुरुष अगदी क्षीण आवाजात का होईना सांगत असतो की, तुम्ही हे करता कामा नये आणि तरीसुद्धा ती गोष्ट तुम्ही करता, कालांतराने तो तुम्हाला काही सांगेनासा होतो आणि मग तुमच्या कोणत्याही वाईट कृत्यांना आतून कोणतीच प्रतिक्रिया मिळेनाशी होते कारण जेव्हा तो आवाज काही सांगत होता, तेव्हा तुम्हीच त्याचे म्हणणे ऐकणे नाकारलेले असते. आणि मग तेव्हा तुम्ही साहजिकपणेच, वाईटाकडून अधिक वाईटाकडे जाता आणि एका गर्ततेत जाऊन पडता. तंबाखूच्या बाबतीतही अगदी नेमके असेच आहे : पहिल्यांदा जेव्हा तिचे सेवन केले जाते तेव्हा शरीर जोरदार प्रतिक्रिया देते, ते उलटी करते आणि सांगू पाहते की, “काहीही झाले तरी मला हे अजिबात नकोय.” तुम्ही तुमच्या मानसिक आणि प्राणिक मूर्खपणाच्या जोरावर शरीराला तसे करण्यास भाग पाडता आणि मग ते शरीर प्रतिक्रिया देईनासे होते आणि त्याचे विघटन होत नाही तोपर्यंत ते स्वतःमध्ये हळूहळू विष भिनवू देते. त्याचे कार्य बिघडून जाते; त्याच्या नसांवर परिणाम होतो; त्या इच्छेचे संक्रमण करेनाशा होतात कारण त्यांच्यावर परिणाम झालेला असतो, त्यांच्यामध्ये विष भिनलेले असते. इच्छाशक्तीचे वहन करण्याची ताकदच त्यांच्यात शिल्लक उरलेली नसते. आणि सरतेशेवटी मग अशा माणसांचे हात थरथर कापायला लागतात, मेंदूचा ताबा सुटल्यासारख्या त्यांच्या हालचाली होतात.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 74-76)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

ईश्वरी अवतरणाचा दाब

  (अगदी बारीकसारीक आध्यात्मिक अनुभवामुळे हुरळून जाणाऱ्या नवोदित साधकांना श्रीमाताजी सांगत आहेत...) तुम्हाला ईश्वरी अवतरणाचा…

12 hours ago

चालत्या गाड्याला खीळ…

  “तुम्ही ईश्वरी शक्तीसमोर खुले व्हा म्हणजे तुम्हाला ईश्वरी शक्ती प्राप्त होईल,” असे तुम्हाला सांगण्यात…

2 days ago

प्रकृतीचे शुद्धीकरण

(एका साधकाला स्वप्नामध्ये जे दिसले आहे त्यावरून दिव्य प्रकाश स्वीकारण्यासाठी तो सक्षम आहे असे दिसते,…

3 days ago

अडचणींना कसे हाताळावे?

(श्रीअरविंदांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुमच्या अडचणींना हाताळण्यात आणि तुमच्यावर अपप्रवृत्तींचा जो हल्ला होत आहे…

4 days ago

उच्चतर शक्तीचे अवतरण

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) ‘शक्तीला प्रवेश करू द्या,’ असे मी जेव्हा तुम्हाला लिहिले तेव्हा त्याचा अर्थ…

5 days ago

केवळ ईश्वरी शक्तीप्रतच खुले व्हावे

(श्रीअरविंद लिखित एका पत्रामधून...) ‘क्ष’ हा अवाजवी तामसिक, अक्रिय झाला आहे. तो प्रत्येक गोष्टीलाच खुला…

6 days ago