ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

प्रश्न : तंबाखू आणि दारू स्मरणशक्ती आणि इच्छाशक्ती नष्ट का करतात?

श्रीमाताजी : का? कारण त्या गोष्टी तसे करतात. याला काही नैतिक कारण नाहीये. तर ती वस्तुस्थिती आहे. दारुमध्ये विष असते, तंबाखूमध्ये विष असते आणि हे विष पेशींपर्यंत जाऊन पोहोचते आणि त्यांना इजा पोहोचविते. अल्कोहोल शरीरातून कधीच बाहेर पडत नाही; ते मेंदूच्या एका विशिष्ट भागामध्ये साठत राहते. आणि अशा रीतीने ते तेथे साठत राहिले की, मग मेंदूतील त्या पेशी कार्य करेनाशा होतात – काही जण तर यामुळे वेडेही होतात, (यालाच अतिसेवनामुळे होणारा भ्रम असे म्हणतात.) अतिप्रचंड प्रमाणात दारू प्यायल्यामुळे ती, ज्या पद्धतीने मेंदूमध्ये साठून राहते त्याचा परिणाम वेड लागण्यात होतो. आणि हे इतके तीव्र रूप धारण करते की….

फ्रान्समध्ये असा एक प्रांत आहे, जिथे वाईन तयार केली जाते. या वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अत्यल्प असते. मला वाटते चार किंवा पाच टक्के, अगदी कमी प्रमाण असते. आणि मग ही लोकं, स्वतःच ती वाईन बनवत असल्यामुळे, ते जणू काही पाणी प्यायल्यासारखी वाईन पितात. ते पद्धतशीरपणे तिचे सेवन करतात पण कालांतराने ते आजारी पडतात. त्यांना मेंदूचे आजार होतात. मला अशी काही माणसं माहीत आहेत, त्यांचा मेंदू नीट काम करू शकत नसे.

आणि तंबाखू – निकोटिन हे तर अतिशयच खतरनाक असे विष आहे. पेशी नष्ट करून टाकणारे हे विष असते. मी म्हणाले तसे, हे मंद विष आहे कारण व्यक्तीला त्याचे सेवन केल्यावर लगेचच त्याची जाणीव होत नाही. अपवाद, व्यक्ती पहिल्या वेळी सिगारेट ओढते आणि आजारी पडते, त्याचा !

आणि त्यातूनच तुम्हाला समजायले हवे की, व्यक्तीने त्याचे सेवन करता कामा नये. माणसं इतकी मूर्ख असतात की, त्यांना वाटते की, ही दुर्बलता आहे आणि जोवर त्यांना त्या विषाची सवय होत नाही तोवर ते त्याचे सेवन करतच राहतात. आणि मग त्याचे शरीर हे प्रतिक्रिया देईनासे होते, ते कोणतीही प्रतिक्रिया न देताच, स्वतःच्या नाश पावण्याला संमती देते : तुम्हाला त्या सेवनाचे शरीरावर काही परिणाम दिसेनासे होऊ लागलेले असतात. आणि ही गोष्ट शरीर तसेच नैतिकतेच्या बाबतीतही समानच आहे.

जेव्हा तुम्ही करू नये अशी एखादी गोष्ट करता आणि तुम्हाला तुमचा चैत्य पुरुष अगदी क्षीण आवाजात का होईना सांगत असतो की, तुम्ही हे करता कामा नये आणि तरीसुद्धा ती गोष्ट तुम्ही करता, कालांतराने तो तुम्हाला काही सांगेनासा होतो आणि मग तुमच्या कोणत्याही वाईट कृत्यांना आतून कोणतीच प्रतिक्रिया मिळेनाशी होते कारण जेव्हा तो आवाज काही सांगत होता, तेव्हा तुम्हीच त्याचे म्हणणे ऐकणे नाकारलेले असते. आणि मग तेव्हा तुम्ही साहजिकपणेच, वाईटाकडून अधिक वाईटाकडे जाता आणि एका गर्ततेत जाऊन पडता. तंबाखूच्या बाबतीतही अगदी नेमके असेच आहे : पहिल्यांदा जेव्हा तिचे सेवन केले जाते तेव्हा शरीर जोरदार प्रतिक्रिया देते, ते उलटी करते आणि सांगू पाहते की, “काहीही झाले तरी मला हे अजिबात नकोय.” तुम्ही तुमच्या मानसिक आणि प्राणिक मूर्खपणाच्या जोरावर शरीराला तसे करण्यास भाग पाडता आणि मग ते शरीर प्रतिक्रिया देईनासे होते आणि त्याचे विघटन होत नाही तोपर्यंत ते स्वतःमध्ये हळूहळू विष भिनवू देते. त्याचे कार्य बिघडून जाते; त्याच्या नसांवर परिणाम होतो; त्या इच्छेचे संक्रमण करेनाशा होतात कारण त्यांच्यावर परिणाम झालेला असतो, त्यांच्यामध्ये विष भिनलेले असते. इच्छाशक्तीचे वहन करण्याची ताकदच त्यांच्यात शिल्लक उरलेली नसते. आणि सरतेशेवटी मग अशा माणसांचे हात थरथर कापायला लागतात, मेंदूचा ताबा सुटल्यासारख्या त्यांच्या हालचाली होतात.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 74-76)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

प्रामाणिक अभीप्सेचा परिस्थितीवर होणारा परिणाम

तुम्ही जर सचेत अभीप्सेच्या स्थितीमध्ये असाल आणि अगदी प्रामाणिक असाल तर, तुमच्या सभोवताली असणाऱ्या सर्व…

13 hours ago

प्रामाणिकपणा आणि आध्यात्मिक साक्षात्कार

आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये सामर्थ्याला निश्चितच एक महत्त्व असते; पण आध्यात्मिक साक्षात्कार हा केवळ सामर्थ्यामुळेच होऊ शकतो…

2 days ago

प्रामाणिकपणा आणि आध्यात्मिक अनुभव

व्यक्तीला आलेल्या सर्व आध्यात्मिक अनुभवांचे मोल हे फक्त तिच्या प्रामाणिकपणाच्या प्रमाणावरच अवलंबून असते. काही जण…

3 days ago

ईश्वरासाठी जीवन जगणे

व्यक्ती जे जे काही करते त्या सर्व गोष्टी ईश्वरार्पण करणे आणि असे करत असताना त्या…

4 days ago

पूर्णयोगाची साधना करायची तर…

  (मला पूर्णयोगाची साधना करायची आहे त्यासाठी मला संन्यास घ्यावा लागेल का, असा प्रश्न एका…

5 days ago

कामामधील प्रामाणिकपणा

  अर्थातच, श्रीमाताजींनी जे काम नेमून दिलेले असते ते त्यांचे स्वतःचे कार्य असते, तो त्यांच्या…

6 days ago