ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

प्रश्न : तंबाखू आणि दारू स्मरणशक्ती आणि इच्छाशक्ती नष्ट का करतात?

श्रीमाताजी : का? कारण त्या गोष्टी तसे करतात. याला काही नैतिक कारण नाहीये. तर ती वस्तुस्थिती आहे. दारुमध्ये विष असते, तंबाखूमध्ये विष असते आणि हे विष पेशींपर्यंत जाऊन पोहोचते आणि त्यांना इजा पोहोचविते. अल्कोहोल शरीरातून कधीच बाहेर पडत नाही; ते मेंदूच्या एका विशिष्ट भागामध्ये साठत राहते. आणि अशा रीतीने ते तेथे साठत राहिले की, मग मेंदूतील त्या पेशी कार्य करेनाशा होतात – काही जण तर यामुळे वेडेही होतात, (यालाच अतिसेवनामुळे होणारा भ्रम असे म्हणतात.) अतिप्रचंड प्रमाणात दारू प्यायल्यामुळे ती, ज्या पद्धतीने मेंदूमध्ये साठून राहते त्याचा परिणाम वेड लागण्यात होतो. आणि हे इतके तीव्र रूप धारण करते की….

फ्रान्समध्ये असा एक प्रांत आहे, जिथे वाईन तयार केली जाते. या वाईनमध्ये अल्कोहोलचे प्रमाण अत्यल्प असते. मला वाटते चार किंवा पाच टक्के, अगदी कमी प्रमाण असते. आणि मग ही लोकं, स्वतःच ती वाईन बनवत असल्यामुळे, ते जणू काही पाणी प्यायल्यासारखी वाईन पितात. ते पद्धतशीरपणे तिचे सेवन करतात पण कालांतराने ते आजारी पडतात. त्यांना मेंदूचे आजार होतात. मला अशी काही माणसं माहीत आहेत, त्यांचा मेंदू नीट काम करू शकत नसे.

आणि तंबाखू – निकोटिन हे तर अतिशयच खतरनाक असे विष आहे. पेशी नष्ट करून टाकणारे हे विष असते. मी म्हणाले तसे, हे मंद विष आहे कारण व्यक्तीला त्याचे सेवन केल्यावर लगेचच त्याची जाणीव होत नाही. अपवाद, व्यक्ती पहिल्या वेळी सिगारेट ओढते आणि आजारी पडते, त्याचा !

आणि त्यातूनच तुम्हाला समजायले हवे की, व्यक्तीने त्याचे सेवन करता कामा नये. माणसं इतकी मूर्ख असतात की, त्यांना वाटते की, ही दुर्बलता आहे आणि जोवर त्यांना त्या विषाची सवय होत नाही तोवर ते त्याचे सेवन करतच राहतात. आणि मग त्याचे शरीर हे प्रतिक्रिया देईनासे होते, ते कोणतीही प्रतिक्रिया न देताच, स्वतःच्या नाश पावण्याला संमती देते : तुम्हाला त्या सेवनाचे शरीरावर काही परिणाम दिसेनासे होऊ लागलेले असतात. आणि ही गोष्ट शरीर तसेच नैतिकतेच्या बाबतीतही समानच आहे.

जेव्हा तुम्ही करू नये अशी एखादी गोष्ट करता आणि तुम्हाला तुमचा चैत्य पुरुष अगदी क्षीण आवाजात का होईना सांगत असतो की, तुम्ही हे करता कामा नये आणि तरीसुद्धा ती गोष्ट तुम्ही करता, कालांतराने तो तुम्हाला काही सांगेनासा होतो आणि मग तुमच्या कोणत्याही वाईट कृत्यांना आतून कोणतीच प्रतिक्रिया मिळेनाशी होते कारण जेव्हा तो आवाज काही सांगत होता, तेव्हा तुम्हीच त्याचे म्हणणे ऐकणे नाकारलेले असते. आणि मग तेव्हा तुम्ही साहजिकपणेच, वाईटाकडून अधिक वाईटाकडे जाता आणि एका गर्ततेत जाऊन पडता. तंबाखूच्या बाबतीतही अगदी नेमके असेच आहे : पहिल्यांदा जेव्हा तिचे सेवन केले जाते तेव्हा शरीर जोरदार प्रतिक्रिया देते, ते उलटी करते आणि सांगू पाहते की, “काहीही झाले तरी मला हे अजिबात नकोय.” तुम्ही तुमच्या मानसिक आणि प्राणिक मूर्खपणाच्या जोरावर शरीराला तसे करण्यास भाग पाडता आणि मग ते शरीर प्रतिक्रिया देईनासे होते आणि त्याचे विघटन होत नाही तोपर्यंत ते स्वतःमध्ये हळूहळू विष भिनवू देते. त्याचे कार्य बिघडून जाते; त्याच्या नसांवर परिणाम होतो; त्या इच्छेचे संक्रमण करेनाशा होतात कारण त्यांच्यावर परिणाम झालेला असतो, त्यांच्यामध्ये विष भिनलेले असते. इच्छाशक्तीचे वहन करण्याची ताकदच त्यांच्यात शिल्लक उरलेली नसते. आणि सरतेशेवटी मग अशा माणसांचे हात थरथर कापायला लागतात, मेंदूचा ताबा सुटल्यासारख्या त्यांच्या हालचाली होतात.

– श्रीमाताजी
(CWM 06 : 74-76)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

कंटाळ्यावरील उपाय

  व्यक्ती तरुण असो किंवा वृद्ध असो, तिने जर प्रगती केली नाही तर तिला कंटाळा…

15 hours ago

एक अक्षय्य ऊर्जास्रोत – भाग ०२

  (आपण कालच्या भागात अन्नाव्यतिरिक्त उपलब्ध असणाऱ्या एका ऊर्जास्रोताचा विचार केला. आज आता अविनाशी असणाऱ्या…

2 days ago

एक अनोखा ऊर्जास्रोत

  (पूर्वार्ध) जोपर्यंत माणसं आणि हे जग आत्ता जसं आहे तसंच राहील तोपर्यंत, ऊर्जा मिळविण्यासाठी…

3 days ago

तारुण्य आणि वार्धक्य

  तारुण्य हे, व्यक्ती किती वयाची आहे यावर अवलंबून नसते, तर ते प्रगती करण्याच्या आणि…

4 days ago

शाश्वत तारुण्याचा आश्रय

  श्रीअरविंद हे भूतकाळाशी किंवा इतिहासाशीदेखील संबंधित नाहीत. श्रीअरविंद म्हणजे प्रत्यक्षात येणारा भविष्यकाळ आहेत. तुम्हाला…

5 days ago

जगाची नवनिर्मिती तरुणच करतील

  भावी काळ हा तरुणांचा आहे. सद्यस्थितीत, एक नूतन व युवा जग आकाराला येत आहे…

6 days ago