केंद्रस्थानी असलेला बिंदू ऐक्याचे प्रतीक आहे, परमश्रेष्ठाचे प्रतीक आहे; आतील वर्तुळ हे निर्मितीचे, नगरीच्या संकल्पनेचे प्रतिनिधित्व करते; बाहेरील पाकळ्या त्या संकल्पनेच्या अभिव्यक्तीचे, मूर्तरूपाचे सामर्थ्य दर्शवितात.

*

शुभ संकल्प बाळगणाऱ्या सर्वांना ‘ऑरोविल’तर्फे शुभेच्छा ! ज्यांना प्रगतीची आस आहे आणि जे उच्चतर व अधिक सत्यमय जीवनाची अभीप्सा बाळगतात त्या सर्वांना ऑरोविल निमंत्रित करीत आहे.

– श्री माताजी

(CWM 13 : 212), (CWM 13 : 193)

ती २९ फेब्रुवारी १९५६ ची संध्याकाळ होती. श्रीमाताजी प्लेग्राऊंडवर उपस्थित होत्या. त्यांनी ‘Synthesis of Yoga’ या ग्रंथामधील एक उतारा वाचून दाखविला, त्यावरील प्रश्नोत्तरांनंतर सारे ध्यानस्थ झाले. ध्यानामध्ये जे घडले त्याविषयी श्रीमाताजींनी सांगितले की, “या संध्याकाळी दिव्य अस्तित्व, अगदी सघन, मूर्त स्वरूपात तुमच्यामध्ये उपस्थित होते. मी जणू सजीव असा सुवर्णाकार धारण केला होता; या विश्वापेक्षा मी विशाल झाले होते. मी एका भल्या मोठ्या प्रचंड सुवर्णदरवाज्यासमोर उभी होते, ह्या दरवाजाने विश्वाला ईश्वरापासून अलग केले होते. मी त्या दरवाजाकडे पाहिले आणि निमिषार्धात मला जाणवले, “वेळ आली आहे.” माझ्या दोन्ही हातांनी मी एक भला मोठा सुवर्ण हातोडा उचलला आणि जोरात त्या दरवाजावर मारला आणि एका झटक्यात त्या दरवाजाचे तुकडेतुकडे झाले. तेव्हापासून अतिमानसाचा प्रकाश, त्याची शक्ती, त्याची चेतना यांचा लोंढा या पृथ्वीवर अखंडितपणे वाहू लागला.”

ध्यान संपल्यानंतर परत जेव्हा दिवे लागले तेव्हा बसलेले सगळे उठले आणि उठून रोजच्याप्रमाणे जाऊ लागले, जणू काही घडलेच नव्हते… श्रीमाताजी म्हणतात, “या शक्तीच्या अवतरणाची जाणीव फक्त पाच जणांनाच झाली होती, त्यावेळी त्यातील दोघं जण आश्रमात होते आणि तिघे जण बाहेर होते.”

…यानंतर दोन महिन्यांनी श्रीमाताजींनी एक संदेश दिला :

“हे ईश्वरा, तू संकल्प केलास आणि मी तो कृतीत उतरविला.
ह्या पृथ्वीवर एक नूतन प्रकाश फाकला आहे;
एक नूतन विश्व जन्माला आले आहे.
ज्या गोष्टींचे वचन देण्यात आले होते त्यांची परिपूर्ती झाली आहे.”

– आधार : (Beyond Man by Georges Van Vrekhem : 317-318)

ऑरोविल ह्या प्रकल्पाचे उद्घाटन दि. २८ फेब्रुवारी १९६८ रोजी झाले. त्याच्या संस्थापक श्रीमाताजी यांनी, ऑरोविल विषयीची त्यांची भूमिका ‘ऑरोविलची सनद’ यामध्ये स्पष्ट केली आहे. हा उद्घाटनाचा कार्यक्रम चालू असताना, ‘ऑल इंडिया रेडिओ’वरून या सनदीचे सोळा भाषांमध्ये प्रक्षेपण करण्यात आले.

ऑरोविल मधील लहान मोठे निर्णय घेताना, धोरणे ठरविताना या सनदीचा आधार घेतला जातो. यामध्ये नमूद केलेल्या संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारात उतरविण्याचा प्रयत्न केला जातो. ऑरोविलमध्ये जीवन जगू इच्छितात, त्यांच्यासाठी असलेली ही मार्गदर्शक तत्त्वेच आहेत.

१२४ देशांतील व भारताच्या २३ राज्यांतील प्रत्येकी एक युवक व एक युवती अशा प्रतिनिधींनी आपापल्या मायभूमीतून मूठभर माती आणली आणि ती ऑरोविलच्या केंद्रस्थानी असणाऱ्या संगमरवरी कमळामध्ये समारंभपूर्वक ठेवण्यात आली. श्रीमाताजींनी फ्रेंचमध्ये लिहिलेली ‘ऑरोविलची सनद’ देखील ह्यासोबत ठेवण्यात आली.

…ऑरोविलची पायाभरणी झाली. वैश्विक एकतेचा पाया रचला गेला.

या भूतलावर असे एक स्थान असावे की, जेथे कोणतेच राष्ट्र मालकी हक्काचा दावा करणार नाही. जिथे प्रामाणिक अभीप्सा बाळगणारी, शुभसंकल्प असणारी सर्व माणसं, या विश्वाचे नागरिक म्हणून मुक्त मनाने जीवन जगू शकतील. ती केवळ एकाचीच, म्हणजेच त्या परम सत्याचीच आज्ञा पाळतील.

शांती, सलोखा, सुमेळ यांनी युक्त असे हे स्थान असेल जेथे, माणसांमधील संघर्षभावनेच्या सर्व प्रेरणा ह्या केवळ आणि केवळ दु:खभोग व चिंता यांच्या मूळकारणांवर विजय मिळविण्यासाठीच उपयोगात आणल्या जातील, त्या प्रेरणा व्यक्तीची दुर्बलता आणि अज्ञान यांच्यावर मात करण्यासाठी उपयोगात आणल्या जातील, त्यांच्या मर्यादा व अक्षमता यांना उल्लंघून जाण्यासाठी उपयोगात आणल्या जातील.

हे असे स्थान असेल की, जेथे इच्छावासनांच्या परिपूर्तीपेक्षा, तसेच सुखसुविधा, मौजमजा यांच्या मागे धावण्यापेक्षा, प्रगतीची तळमळ व आत्म्याची गरज या गोष्टींना अधिक प्राधान्य दिले जाईल.

या ठिकाणी, स्वत:च्या आंतरात्म्याशी फारकत न होता, लहान मुलं समग्रपणे, सर्वांगीण रीतीने मोठी होतील, विकसित होतील; शिक्षण हे केवळ परीक्षेत उत्तीर्ण होणे, पद वा पदवी मिळविणे यांच्यासाठी दिले जाणार नाही तर, विद्यार्थ्यांमध्ये अंगभूत असलेल्या क्षमतांच्या विकसनासाठी तसेच सुप्त असलेल्या नवीन क्षमतांच्या प्रकटीकरणासाठी दिले जाईल.

या ठिकाणी, पद, नावलौकिक, प्रतिष्ठा यांची जागा सेवा करण्याची, सुव्यवस्था लावण्याची संधी घेईल. एखादी व्यक्ती बौद्धिक, नैतिक, आध्यात्मिक दृष्ट्या श्रेष्ठ असेल तर, त्या व्यक्तीचे श्रेष्ठत्व त्या संरचनेमध्ये जीवनातील वाढती सुखसमृद्धी व सत्ता यांच्याद्वारे अभिव्यक्त होणार नाही तर, त्या व्यक्तीवरील वाढत्या कर्तव्यांच्या व जबाबदाऱ्यांच्या रूपात ते श्रेष्ठत्व अभिव्यक्त होईल.

कलेच्या विविध रूपांमधून – चित्रकला, शिल्पकला, संगीत, साहित्य यांद्वारे – व्यक्त होणारे सौंदर्य सर्वांना सारख्याच प्रमाणात सुलभप्राप्य असेल; त्यामधून मिळणाऱ्या आनंदाचा आस्वाद घेण्याची क्षमता ही त्या व्यक्तीच्या सामाजिक वा आर्थिक स्थानावर अवलंबून असणार नाही तर, त्या त्या व्यक्तीच्या क्षमतांवर आधारित असेल.

कारण या आदर्श अशा ठिकाणी, पैसा हा सर्वसत्ताधीश या स्वरूपात अस्तित्वात उरणार नाही; भौतिक संपत्ती आणि सामाजिक स्थान यांपेक्षा व्यक्तीच्या गुणवत्तेला कितीतरी अधिक महत्त्व असेल.

तिथे, कर्म हे व्यक्तीच्या उपजीविकेचे साधन नसेल तर, स्वत:ला अभिव्यक्त करण्याचा तो मार्ग असेल, सर्व समष्टीसाठी सेवारत असताना, कर्म हा स्वतःच्या क्षमता व शक्यतांना विकसित करण्याचा मार्ग असेल, परिणामत: ते व्यक्तीला उपजीविकादेखील पुरवेल आणि कार्यक्षेत्रही पुरवेल.

थोडक्यात म्हणजे, हे असे एक स्थान असेल की जेथे, सर्वसाधारणत: जे मानवी नातेसंबंध स्पर्धासंघर्षांवर आधारित असतात त्यांची जागा खराखुरा बंधुभाव, सहकार्य, काही चांगले करण्याची, त्याचे अनुसरण करण्याची तळमळ ह्या गोष्टींनी घेतली जाईल.

हा आदर्श प्रत्यक्षात, वास्तवात उतरविण्यासाठी अजून तरी पृथ्वीची खचितच तयारी झालेली नाही, हे स्वप्न समजून घेण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी आवश्यक असणारे पुरेसे ज्ञान अजूनपर्यंत मानवजातीकडे नाही, तसेच ह्या आदर्शाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी अगदी अनिवार्य असणारी चेतनाशक्तीदेखील मानवजातीकडे आज रोजी नाही, म्हणूनच मी ह्यास ‘स्वप्न’ असे म्हणते.

(श्रीमाताजींचे हे उद्गार होते ऑगस्ट १९५४ मधील. आणि पुढे अल्पावधीतच, म्हणजे इ.स.१९६८ मध्ये हे स्वप्न प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने, त्याची मुहूर्तमेढ रोवली गेली.)
– श्रीमाताजी
(CWM 12 : 93-94)

ऑरोविल ही एक अशी वैश्विक नगरी बनू इच्छिते की, जेथे पंथातीत होऊन, सर्व राष्ट्रीयता व सर्व प्रकारच्या राजकारणाच्या अतीत होऊन, सर्व देशांमधील स्त्रीपुरुष, शांती व प्रगतशील सुसंवादाने जीवन व्यतीत करू शकतील. मानवी एकता प्रत्यक्षात उतरविणे हा ऑरोविलचा हेतू आहे.

*

पृथ्वीला अशा एका स्थानाची आवश्यकता आहे की, जिथे माणसे राष्ट्राराष्ट्रांमधील वैमनस्य, सामाजिक रूढी, स्व-विसंगत नैतिकता आणि परस्परांमध्ये झगडणारे धर्म यांच्यापासून दूर राहून जगू शकतील; एक असे स्थान की, जिथे मानव, भूतकाळच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन, अभिव्यक्त होऊ पाहणाऱ्या दैवी चेतनेच्या शोधामध्ये, त्याच्या सरावामध्ये स्वत:ला पूर्णत: वाहून घेऊ शकेल. असे स्थान बनण्याची ऑरोविलची इच्छा आहे आणि उद्याचे ‘सत्य’ जगणे, ही ज्यांची अभीप्सा आहे त्या सर्वांना, ऑरोविलने स्वत:स अर्पित केले आहे.

*

(ऑरोविल) अंतिमत: एक असे स्थान असेल की, जेथे एखादी व्यक्ती केवळ प्रगतीचा आणि स्वत:च्या अतीत जाण्याचा विचार करीत असेल.
अंतिमत: असे एक स्थान की, जेथे एखादी व्यक्ती राष्ट्र, धर्म व आकांक्षांच्या संघर्षांविना किंवा शत्रुत्वाविना शांतीने जगू शकेल.
अंतिमत: असे एक स्थान की, जेथे कोणत्याच गोष्टीला एकमेवाद्वितीय सत्य म्हणून स्वत:ला इतरांवर थोपविण्याचा अधिकार नसेल.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 188), (CWM 13 : 202), (CWM 13 : 195-196)

ऑरोविल’ हे नक्की काय आहे ?

ऑरोविल ही जगभरातील विविध देशांमधून रहिवासासाठी आलेल्या ५०,००० व्यक्तींना सामावून घेऊ शकेल, अशी एक वैश्विक नगरी आहे.

ऑरोविलची सुरुवात कशी झाली?

मानवी एकतेच्या प्रयोगाला वाहिलेल्या एका आदर्श नगरीची म्हणजेच ऑरोविलची संकल्पना श्रीमाताजींच्या मनात इ. स. १९३० च्या सुमारास उदयास आली. इ. स. १९६० च्या मध्यामध्ये ही संकल्पना कागदावर उतरविण्यात आली आणि भारत सरकारपुढे मांडण्यात आली, भारताने या संकल्पनेस पाठिंबा दिला आणि युनेस्कोच्या जनरल असेंब्लीसमोर ही संकल्पना मांडण्यात आली. आणि इ. स. १९६६ मध्ये युनेस्कोमध्ये त्याला एकमुखाने मान्यता देण्यात आली. मानवतेच्या भवितव्याच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून, या प्रकल्पास पूर्ण प्रोत्साहन देण्यात आले.

ऑरोविल का?

विविधतेमध्ये मानवी एकता साकारणे हे ऑरोविलचे उद्दिष्ट आहे. ज्यामध्ये मानवी एकतेसाठी आणि जाणिवेच्या रूपांतरणासाठी कार्य केले जात आहे, असा ऑरोविल हा आंतरराष्ट्रीय मान्यता असलेला पहिला आणि आजवरचा तरी एकमेव प्रयोग आहे. मानवजातीच्या शाश्वत जीवनासाठी आणि भावी सांस्कृतिक, पर्यावरणीय, सामाजिक आणि आध्यात्मिक आवश्यकतांवर येथे प्रत्यक्ष संशोधनाचे काम चालू असते.

ऑरोविलचा प्रारंभ केव्हा झाला?

ऑरोविल ह्या प्रकल्पाचे उद्घाटन दि. २८ फेब्रुवारी १९६८ रोजी झाले. १२४ देशांतील व भारताच्या २३ राज्यांतील प्रत्येकी एक युवक व एक युवती अशा प्रतिनिधींनी आपापल्या मायभूमीतून मूठभर माती आणली आणि ती ऑरोविलच्या केंद्रस्थानी असणाऱ्या संगमरवरी कमळामध्ये समारंभपूर्वक ठेवण्यात आली. श्रीमाताजींनी फ्रेंचमध्ये लिहिलेली ‘ऑरोविलची सनद’ देखील ह्यासोबत ठेवण्यात आली. …ऑरोविलची पायाभरणी झाली. वैश्विक एकतेचा पाया रचला गेला.

ऑरोविल कोठे आहे ?

ऑरोविल हे दक्षिण भारतामध्ये, तामिळनाडू आणि पाँडिचेरी या राज्यांमध्ये वसलेले आहे. चेन्नईच्या दक्षिणेस १५० किमी अंतरावर आणि पाँडिचेरी शहराच्या उत्तरेस १० किमी अंतरावर ऑराविल वसलेले आहे.

ऑरोविलचे रहिवासी कोण आहेत?

ऑरोविलमध्ये ५९ देशांमधील, अगदी तान्ह्या बालकांपासून ते ८० वर्षे वयांपर्यंतच्या विविध वयोगटातील (सरासरी वय ३०), सर्व सामाजिक वर्गांमधील, विविध संस्कृती आणि पार्श्वभूमी असणारे, साऱ्या मानवतेचे प्रतिनिधित्व करणारे लोक राहतात. ऑरोविलमध्ये राहण्यास येणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. सध्या येथे सुमारे २५०० व्यक्ती राहतात आणि त्यातील साधारणतः एक तृतीयांश व्यक्ती भारतीय आहेत.

शहररचना

शांती क्षेत्र
ऑरोविलचा मध्यवर्ती भाग हा ‘शांती क्षेत्र’ म्हणून ओळखला जातो, याच्या केंद्रस्थानी ‘मातृमंदिर’ आणि १२ बगिचे आहेत. याच्या शेजारी १२१ देशांची आणि भारतातील तत्कालीन २३ राज्यांमधील माती ज्यामध्ये साठविलेली आहे असा, मानवी एकतेचा कुंभ आहे. तो कुंभ अॅम्फिथिअटर येथे स्थापित करण्यात आलेला आहे. तसेच वातावरण शांत आणि पवित्र राहावे म्हणून चालविण्यात आलेला तलाव-प्रकल्पदेखील याच भागात आहे.

औद्योगिक क्षेत्र
शांतीक्षेत्राच्या उत्तरेस १०९ हेक्टरचे क्षेत्र हे ‘औद्योगिक क्षेत्र’ म्हणून राखीव आहे, यामध्ये हरित उद्योगांचा समावेश होतो. ऑरोविल नगरीला स्वयंपूर्णतेकडे घेऊन जाण्याच्या प्रयत्नांवर या उद्योगांचे लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. या क्षेत्रामध्ये लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांचा, प्रशिक्षण केंद्रांचा, कलाकौशल्य, कारागिरी आणि शहराच्या प्रशासनाचा समावेश होतो.

निवासी क्षेत्र
शहराच्या चार क्षेत्रांपैकी हे सर्वात मोठे क्षेत्र असून ते १८९ हेक्टर एवढ्या भागात विस्तारलेले आहे. याच्या उत्तरेला, दक्षिणेला आणि पश्चिमेला बगिचे आहेत. वैयक्तिक आणि सामुदायिक जीवनासाठी सुयोग्य असा अधिवास पुरविण्याकडे या क्षेत्राचा कल आहे. यातील ५५% क्षेत्र हरित असेल तर उरलेल्या ४५% भागामध्ये शहरी जीवन विस्तारलेले असेल.

आंतरराष्ट्रीय क्षेत्र
शांती क्षेत्राच्या पश्चिमेस ७४ हेक्टर क्षेत्रामध्ये ‘आंतरराष्ट्रीय क्षेत्र’ विस्तारले आहे. येथे खंडांनुसार, वेगवेगळे राष्ट्रीय आणि सांस्कृतिक मंडप असतील. प्रत्येक देशाचे आजवर मानवजातीला जे योगदान राहिलेले आहे त्याचे आणि त्यांच्या प्रतिभेचे आविष्करण करणे आणि त्या माध्यमातून विविधतेतील मानवी एकतेचे जिवंत प्रत्यक्षदर्शन घडविणे ही याची केंद्रवर्ती कल्पना आहे.

सांस्कृतिक क्षेत्र
शांतीक्षेत्राच्या पूर्वला ९३ हेक्टर परिसरामध्ये ‘सांस्कृतिक क्षेत्र’ आहे. शैक्षणिक आणि कलाविष्काराच्या उपयोजित संशोधनासाठी वाहिलेले हे क्षेत्र असणार आहे. सांस्कृतिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा विषयक उपक्रमांसाठी आवश्यक सुविधा या क्षेत्रामध्ये उपलब्ध असतील.

हरित क्षेत्र
१.२५ किमी त्रिज्या असणाऱ्या शहराच्या सभोवती १.२५ किमी रुंदीचे हरित क्षेत्र असेल. सेंद्रीय शेती, दुग्धोत्पादन, जंगले, आणि वन्यजीवनाचा हा पट्टा असेल. शहरी अतिक्रमणाला रोखणारा असा हा भाग, जिथे वन्य-विविधता आढळून येईल. अन्नधान्य, लाकूडफाटा, औषधी वनस्पती यांचे उमगस्थान असेलेले असे हे ठिकाण असेल. मनोरंजनाचे देखील हे क्षेत्र असेल.
४०५ हेक्टरच्या हरित पट्याचे हे क्षेत्र आज घडणीच्या स्थितीत असले तरीही, ते पडिक जमिनीचे जिवंत इकोसिस्टिम मध्ये रूपांतरण घडवून आणण्याचे एक यशस्वी उदाहरण म्हणून मानले जाते. आणखी ८०० हेक्टर क्षेत्रामध्ये याच्या विस्ताराचे नियोजन आहे. ते मृदा व जल संरक्षण, जलपुनर्भरण, आणि पर्यावरणीय पुनर्स्थापनेचे एक जितेजागते उदाहरण बनू पाहत आहे. आणि हे क्षेत्र म्हणजे जणू संपूर्ण नगरीची फुफ्फुसे असल्याने, ते पूर्णत्वाला गेले की, ऑरोविलच्या निर्मितीबरोबर काही दशकांपूर्वी सुरु झालेली उपचारप्रक्रिया पूर्णत्वाला जाईल, अशी कल्पना आहे.

शरीरातील चैत्य अस्तित्वाची उपस्थिती हे नेहमीच सुरचना आणि परिवर्तनाचे केंद्र असते. म्हणून, दोन शारीर जन्मांच्या मधल्या संक्रमणाच्या काळात प्रगती होत राहते, असे समजणे किंवा काही जण मानतात त्याप्रमाणे, त्या काळात ही प्रगती अधिक पूर्णत्वाने आणि अधिक त्वरेने होते, असे मानणे ही मोठी चूक आहे. सर्वसाधारणत: त्या काळात कोणतीही प्रगती होत नाही; कारण चैत्य पुरुषाने विश्रांत स्थितीत प्रवेश केलेला असतो आणि इतर सर्व भाग, कमीअधिक क्षणिक जीवनानंतर त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये विसर्जित होऊन गेलेले असतात.

पृथ्वीवरील जीवन हेच प्रगतीचे स्थान आहे. इथे, या पृथ्वीवरच, पृथ्वीवरील जीवनकालावधीमध्येच प्रगती शक्य आहे. तो चैत्य पुरुष स्वत:च स्वत:च्या प्रगतीचे आणि उत्क्रांतीचे नियोजन करीत, एका जन्मामागून दुसऱ्या जन्मांमध्ये ही प्रगती घडवीत राहतो.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 270)

चैत्य पुरुष जेव्हा देह सोडून जातो तेव्हा, त्याने अगदी मन आणि प्राणाला देखील मार्गावरील त्यांच्या त्यांच्या विश्रांतीस्थानी सोडलेले असते, अशा वेळीदेखील तो स्वत:सोबत त्याच्या अनुभवांचा गाभा बाळगतो. तो भौतिक घटना किंवा प्राणिक हालचाली, मानसिक रचना, क्षमता किंवा स्वभाव यांपैकी काहीच बाळगत नाही तर या सगळ्यांतून अगदी आवश्यक असे जे काही त्याने त्यांच्याकडून जमवलेले असते असे काहीतरी तो बाळगून असतो, त्याला ‘दिव्य घटक’ असे म्हणता येईल. (या दिव्य घटकासाठीच वरील भौतिक घटना वगैरे गोष्टी अस्तित्वात होत्या.) ही कायमस्वरूपी अशी अभिवृद्धी असते की जी, दिव्यत्वाकडे जो विकास चालू आहे त्यामध्ये साहाय्यकारी होते. आणि म्हणूनच बहुतेक वेळी गत जन्मांमधील बाह्य घटना वा परिस्थिती स्मरणात राहत नाहीत. अशी आठवण राहण्यासाठी मन, प्राण आणि अगदी सूक्ष्म शरीर यांच्या अ-भंग सातत्याच्या दिशेने त्यांचे विकसन झालेले असावे लागते; कारण जरी ते एक प्रकारच्या बीजरूपाने स्मरणात राहिले तरी ते सहसा उमलत नाहीत, विकसित होत नाहीत. निष्ठा, उमदेपणा, उच्च कोटीचे धैर्य या रूपाने, योद्ध्याच्या महानतेमध्ये अंतर्भूत असणारा दैवी घटक, सुसंवादी मानसिकता आणि कवीची उदारमनस्कता ह्यांद्वारे अभिव्यक्त होणारा दैवी घटक शिल्लक राहतो आणि व्यक्तित्वाच्या नव्या सुमेळामध्ये एक नवीनच रूप घेऊन व्यक्त होऊ शकतो किंवा त्याचे जीवन जर ईश्वराभिमुख झाले तर साक्षात्कारासाठी म्हणून त्या शक्ती वळविल्या जाऊ शकतात किंवा ईश्वरासाठी जे कार्य करावयाचे आहे त्यामध्ये त्यांचा उपयोग केला जाऊ शकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 544)

प्रश्न : समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्या जन्मात बुद्धिमान बनावे म्हणून खूप मेहनत केली, पण जर तो पुढच्या जन्मात निर्बुद्ध म्हणून जन्माला आला, तर त्याच्या त्या मेहनतीचा, परिश्रमांचा काय उपयोग?

श्रीमाताजी : अशा व्यक्तीचा चैत्य पुरुष हा निर्बुद्ध नसतो. उदाहरणार्थ असे समजा की, त्या व्यक्तीच्या चैत्य पुरुषाने लेखक असण्याचा आणि त्यामुळे त्याचे अनुभव पुस्तकं आणि भाषणं या माध्यमातून शब्दबद्ध करण्याचा अनुभव घेतला आहे. म्हणजे तो ज्या परिस्थितीमध्ये, ज्या सहसंबंधांनिशी जगत होता त्या विशिष्ट क्षेत्रातील सगळे अनुभव त्याने घेतले आहेत. पण असे करण्यामध्ये अनुभवाच्या एका क्षेत्राची कमतरता राहून गेली. उदाहरणार्थ, आता तो म्हणतो की, “आजवर मी माझ्या मेंदूने, बुद्धिने विचार करत जगत आलो, एखादा बुद्धिमान माणूस जीवनाला जशा प्रतिक्रिया देईल तशा पद्धतीने आजवर मी देत आलो, आता मात्र मला भावनांनिशी माझे जीवन जगायचे आहे.” कारण बघा नेहमी, बुद्धिच्या अतिवापरामुळे सामान्य जीवनामध्ये भावनांची क्षमता क्षीण होऊन जाते, गमावली जाते. तेव्हा आता एका वेगळ्या अनुभवाचे, विकासाचे क्षेत्र त्याला हवे असल्याने तो त्याच्या वैचारिक उंचीचा त्याग करतो; तो आता बुद्धिमान, प्रज्ञावान लेखक राहत नाही तर, तो एक अतिसामान्य माणूस बनतो, पण आता तो सहृदय बनतो; तो खूप दयाळू, खूप उदार असा बनतो…..

हे काही फार दुर्मिळ उदाहरण आहे असे नाही. उदाहरणार्थ, जो चैत्य पुरुष त्याच्या कमाल वाढीपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे, एकदा त्याने सत्ताधीशाचे अनुभव (एखाद्या सम्राटाच्या किंवा राजाच्या जीवनाचे) घेतले आहेत तर, आता बारा महिने चोवीस तास शासकीय दिमाख, तामझाम यामध्ये अडकलेले जीवन त्याला नकोसे वाटेल; अगदी सामान्य जीवन, अगदी सामान्य अशा परिस्थितीमध्ये जन्माला येणे, अगदी पारंपरिक सामान्य, मध्यमवर्गीय परिस्थितीमध्ये जन्माला येणे तो पसंत करेल हे शक्य आहे; त्यामुळे देशाचा प्रमुख म्हणून ज्या सगळ्या शासकीय शिष्टाचारांना तो बांधलेला होता त्यांच्याविना, अगदी अज्ञात राहून देखील त्याला काम करता येणे शक्य होईल.

म्हणून जर तुम्ही एका विशिष्ट दृष्टीने त्याकडे पाहिले तर तुम्ही म्हणाल, “हे असे कसे काय ? त्याचे अध:पतन झाले की काय?” पण हे अध:पतन नसते. हे समस्यांना दुसऱ्या बाजूने भिडणे असते, दुसऱ्या दृष्टिकोनातून सामोरे जाणे असते. कारण चेतनेसाठी (खऱ्याखुऱ्या, दिव्य चेतनेसाठी) यश किंवा अपयश ह्या समानच गोष्टी असतात, झगझगाट किंवा सामान्यपण ह्या गोष्टीदेखील सारख्याच असतात. महत्त्वाचा असतो तो चेतनेचा विकास ! आणि जी परिस्थिती अनुकूल आहे असे माणसाला वाटत असते ती कदाचित चेतनेच्या विकासाच्या दृष्टीने खूप प्रतिकूल देखील असू शकते….

– श्रीमाताजी
(CWM 05 : 267)

प्रश्न : प्रत्येक जन्मामध्ये मन, प्राण आणि शरीर नवीन असल्यामुळे, गत जन्मांमधील अनुभव त्याला कसे उपयोगी पडू शकतील? का आपल्याला त्या सगळ्या अनुभवांमधून पुन्हा एकदा जावे लागते?

श्रीमाताजी : काही अगदी अपवादात्मक व्यक्ती आणि उत्क्रांतीची अतिप्रगत अवस्था वगळता – विकसित होणारा आणि जन्मोजन्मी प्रगत होत राहणारा असा चैत्य पुरुष असतो, मन वा प्राण नाही. तर घडते असे की : ह्या चैत्य पुरुषाचा, कार्यमग्नतेचा आणि विश्रांतीचा एका आड एक असा काळ असतो. जडदेहातील सक्रिय जीवनामध्ये, शारीरिक जीवन जगत असताना येणाऱ्या अनुभवांमुळे एक प्रगतिमय जीवन त्याच्या अनुभवाला येते; ते जीवन देह, प्राण आणि मन यांचे अनुभव घेत असते; नंतर, सहसा, चैत्य पुरुष त्याचे आत्मसातीकरण करण्यासाठी एक प्रकारच्या विश्रांत स्थितीमध्ये जातो – तो कार्यमग्न जीवनामध्ये असताना, जी प्रगती त्याने सिद्ध केलेली असते त्याच्या परिणामांवर तेथे कार्य केले जाते. आणि जेव्हा हे आत्मसातीकरण पूर्ण होते, पृथ्वीवर सक्रिय जीवनात असताना त्याने केलेली ती प्रगती आत जिरवली जाते तेव्हा, आजवर झालेल्या त्या प्रगतीचा परिपाक घेऊन तो नवीन देह धारण करतो आणि प्रगत अशा अवस्थेमध्ये अवतरतो. या किंवा त्या घटकाचा अनुभव पूर्ण करण्याच्या दृष्टीने कोणत्या प्रकारचे जीवन असावे, शरीर कसे असावे, वातावरण कसे असावे ह्या साऱ्याची तो निवड करतो. अतिप्रगत अवस्थेमध्ये चैत्य पुरुष, देह सोडण्यापूर्वीच, त्याच्या पुढील जन्मामध्ये तो कोणत्या प्रकारचे जीवन जगणार आहे हे ठरवू शकतो.

जेव्हा त्याची घडण जवळजवळ पूर्ण होते आणि तो जाणीवसंपन्न झालेला असतो तेव्हा तो नवीन देहाच्या घडणीमध्ये देखील सहभागी होतो आणि सहसा आंतरिक प्रभावाद्वारे, तो अशा प्रकारे त्या देहाचे घटक, द्रव्य निवडतो की, त्यामुळे त्या देहाला जे नवीन अनुभव घ्यावयाचे आहेत त्याच्या गरजा तो सहज स्वीकारू शकेल. पण हे खूपच प्रगत स्थितीमध्ये घडून येते. आणि नंतर, पूर्ण घडण झालेला तो जेव्हा या पृथ्वीतलावर सेवाभावी वृत्तीने परततो, समाजाला मदत करण्याच्या भावनेने येतो आणि ईश्वरी कार्यामध्ये सहभागी होतो तेव्हा, गत जन्मांमधील प्राण व मनाचे काही विशिष्ट घटक हे त्या देहाच्या निर्मितीमध्येही तो उतरवू शकतो. हे जे विशिष्ट घटक आहेत ते गेल्या अनेक जन्मांमधून चैत्य पुरुषाभोवती सुरचित होत गेलेले असतात, सगर्भ झालेले असतात आणि मग ते तसे घटक टिकून राहू शकतात आणि परिणामत: ते एकंदरच प्रगतीमध्ये सहभागी होऊ शकतात. पण हे फारच पुढच्या अवस्थेमध्ये घडून येते. जेव्हा चैत्य पुरुष हा पूर्ण विकसित आणि अत्यंत जाणीवसंपन्न होतो, जेव्हा तो ईश्वरी संकल्पाचे जागृत साधन बनतो तेव्हा, त्याच्याकडून प्राण व मन यांची अशा तऱ्हेने सुरचना केली जाते की, ज्यामुळे प्राण व मन देखील सर्वसाधारण सुमेळामध्ये सहभागी होऊ शकतात आणि टिकून राहू शकतात.

देहाचे जरी विघटन झाले तरी, विकसनाच्या उच्च स्तराकडून मानसिक आणि प्राणिक पुरुषाच्या काही भागांचे अस्तित्व टिकवून ठेवण्याची अनुमती दिली जाते. म्हणजे असे की, माणसाने एखाद्या कृतीचे जे भाग विशेषेकरून विकसित केले असतील ते – मनाचे वा प्राणाचे काही भाग – हे अगदी त्या आकारामध्ये, त्या रूपामध्ये देखील, (in their form) म्हणजे कृतीच्या ज्या आकारामध्ये ते जसे पूर्ण सुरचित झाले होते, तसेच्या तसे टिकवून ठेवले जातात. उदाहरणार्थ, ज्यांनी स्वत:च्या मेंदूचे विशिष्ट प्रकारे विकसन घडविलेले असते, अशा अतिशय बुद्धिमान लोकांमध्ये, त्यांच्या अस्तित्वाच्या मानसिक भागाची रचना ही एक सुविकसित, सुघटित मेंदू या रूपात तशीच टिकून राहू शकते, त्या मेंदूला त्याचे त्याचे असे स्वत:चे जीवन असू शकते आणि भावी जन्मापर्यंत ते अविकृत स्वरूपात म्हणजे जसे आहे तसेच, त्यात कोणताही बदल न होता टिकून राहू शकते की, ज्यामुळे त्याच्या सर्व लाभांनिशी ते त्या नवीन जन्मातही सहभागी होऊ शकते.

कलाकारांमध्ये, उदाहरणार्थ काही विशिष्ट वादकांमध्ये, ज्यांनी आपल्या हातांचा वापर विशिष्ट अशा जागरूकतेने केलेला होता, त्यांचे प्राणिक व मानसिक द्रव्य हे त्यांच्या हातांच्या रूपाने टिकून राहिले आणि ते हात पूर्णपणाने जागरूक राहिले होते. ज्यांच्याविषयी त्यांना विशेष जिव्हाळा आहे अशा जिवंत व्यक्तींच्या देहांचा ते उपयोग करून घेऊ शकतात.

अन्यथा, अगदी सामान्य लोकांमध्ये म्हणजे ज्यांच्यामध्ये चैत्य अस्तित्व हे पुरेसे विकसित आणि सुघटित झालेले नाही, त्यांच्या बाबतीतही जेव्हा ते चैत्य अस्तित्व देह सोडते तेव्हा, विशेषत: मृत्यूवेळी ती व्यक्ती शांतचित्त आणि एकाग्र असेल तर, त्या व्यक्तीचे मानसिक व प्राणिक आकार काही काळ पर्यंत टिकून राहू शकतात; पण जर का व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला, आवेगपूर्ण स्थितीमध्ये, अनेकविध आसक्तींमध्ये गुंतलेले असताना जर मृत्यू झाला तर, अस्तित्वाचे हे विविध भाग विखुरले जातात, त्यांच्या त्यांच्या स्वत:च्या आयुष्यमानानुसार ते कमीअधिक काळ, त्या त्या संबंधित क्षेत्रांमध्ये जिवंत राहतात आणि नंतर नाहीसे होतात.

– श्रीमाताजी
(CWM 09 : 268-270)