ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

खऱ्या आध्यात्मिक चेतनेचा मुख्य आधार म्हणजे समता होय. आणि जेव्हा एखादा साधक स्वत:ला प्राणिक भावावेगाच्या लाटेबरोबर, भावनेद्वारे, वाणीद्वारे वा कृतीद्वारे वाहवत जाऊ द्यायला संमती देतो तेव्हा, तो साधक ह्या समतेपासूनच विचलित होतो.

स्थिर झालेली समता ही खूप मोठ्या प्रमाणात, कधीकधी तर अगदी अमर्यादपणे माणसाची सहनशीलता आणि क्षमाशीलता नि:संशयपणे वाढविते तरीही ती सहनशीलता, क्षमाशीलता म्हणजे समता नव्हे.

समता म्हणजे शांत, अविचल मन आणि प्राण.

समता म्हणजे, तुमच्या बाबतीत घडलेल्या किंवा तुमच्याविषयी बोलल्या गेलेल्या गोष्टींनी स्पर्शित वा विचलित न होणे. तर कोणत्याही वैयक्तिक भावभावनांमुळे विकार निर्माण न होऊ देता, त्यांच्याकडे स्वच्छ दृष्टीने पाहणे, आणि त्या गोष्टींच्या पाठीमागे काय आहे ते जाणण्याचा प्रयत्न करणे, त्या गोष्टी का घडल्या, त्यापासून आपण काय धडा घेतला पाहिजे, आपल्यामध्ये असे काय आहे की, ज्यामुळे त्या गोष्टी आपल्या विरोधात उभ्या ठाकल्या, त्यापासून कोणता आंतरिक लाभ किंवा प्रगती आपण करू शकतो हे सारे स्वच्छ दृष्टीने पाहणे.

समता म्हणजे प्राणिक आवेगांवरील आत्म-प्रभुत्व ! राग, संवेदनशीलता, गर्व किंवा ताठा, तसेच इच्छावासना आणि विश्रांती ह्या साऱ्या प्राणिक आवेगांवरील आत्म-प्रभुत्व! त्यांना आपल्या भावनिक अस्तित्वाचा ताबा घेऊन, आपली आंतरिक शांती बिघडवू न देणे ; त्यांच्या भरीस पडून, बोलण्याची किंवा कृती करण्याची घाई न करणे, नेहमी आत्म्याच्या आंतरिक शांत स्थितीत राहून कृती करणे आणि बोलणे..

कोणत्याही व्यक्तीमध्ये ही अशा प्रकारची समता पूर्णांशाने असणे ही काही सोपी गोष्ट नाही; तरीही व्यक्तीने ह्या अशा समतेला आपल्या आंतरिक स्थितीचा आणि बाह्य हालचालींचा पाया बनविण्याचा अधिकाधिक प्रयत्न करावयास हवा.

समतेचा अजूनही एक अर्थ आहे. विविध माणसं, त्यांची प्रकृती, त्यांच्या कृती, त्यांना कृतिप्रवण करणाऱ्या शक्ती ह्या साऱ्याकडे समदृष्टीने पाहणे. हे असे केल्याने, म्हणजे व्यक्तीच्या मनामधील, दृष्टीमधील, न्यायनिवाड्यातील सर्व वैयक्तिक भावना दूर सारल्याने, किंबहुना सारे मानसिक पूर्वग्रह मनातून दूर सारल्याने, व्यक्तीला त्यांच्याविषयीचे सत्य दिसण्यास मदत मिळते. वैयक्तिक भावभावनांमुळे नेहमीच विपर्यास होतो आणि माणसांच्या कृतींकडे पाहताना, कृती पाहण्याचे सोडून व्यक्ती त्यापाठीमागील गोष्टी पाहवयास लागते, अशा गोष्टी की ज्या बहुतांशी तिथे अस्तित्वातच नसतात. आणि ज्या गोष्टी टाळता येऊ शकल्या असत्या अशा गोष्टी म्हणजे गैरसमजुती, चुकीचे आडाखे अशा गोष्टींमध्ये त्यांचे पर्यवसान होते. छोटे परिणाम करणाऱ्या गोष्टीही मग विशालकाय रूप धारण करतात. मी हे पाहिले आहे की, जीवनातील निम्म्यापेक्षा अधिक संख्येने अनिष्ट घटना ह्याच कारणामुळे घडतात.

परंतु सर्वसामान्य आयुष्यात मात्र वैयक्तिक भावभावना, संवदेनशीलता ह्या बाबी मानवी प्रकृतीचा एक नेहमीचा भाग असतात आणि त्यांची स्वसंरक्षणासाठी निकड भासू शकते. असे असूनदेखील मला असे वाटते की, अगदी तेथेसुद्धा माणसं आणि गोष्टींविषयीचा एक दृढ, विशाल आणि समतापूर्ण दृष्टिकोन हा संरक्षणाचा अधिक चांगला मार्ग असू शकतो. साधकासाठी मात्र, त्यांच्यावर मात करून, आत्म्याच्या शांत सामर्थ्यामध्ये जीवन व्यतीत करणे, हे त्याच्या प्रगतीचा एक आवश्यक भाग असतो.

आंतरिक प्रगतीची पहिली अट ही आहे की, प्रकृतीमधील कोणत्याही भागातील चालू असलेली किंवा आजवर चालत आलेली कोणतीही चुकीची कल्पना, चुकीची भावना, चुकीचे बोलणे, चुकीची कृती ओळखणे आणि ‘चुकीची’ असे म्हणत असताना त्याचा अर्थ असा की, जी कृती सत्यापासून, उच्चतर चेतनेपासून, उच्चतर आत्म्यापासून, ईश्वरत्वाच्या मार्गापासून व्यक्तीची फारकत करते. आणि एकदा ती लक्षात आल्यानंतर, ती कबूल करणे, तिच्यावर पांघरूण न घालणे किंवा तिचे समर्थन न करणे, हे आवश्यक असते. मग अशी कृती, त्यामध्ये प्रकाश व ईश्वरी कृपा अवतरित व्हावी आणि सत्चेतनेच्या सुयोग्य कृतीने तिची जागा घ्यावी म्हणून ती ईश्वराला अर्पण करावी.

*

समता नसेल तर, साधनेचा भरभक्कम पायाच रचला जाऊ शकत नाही. परिस्थिती कितीही त्रासदायक असू दे, इतरांची वागणूक भलेही तुम्हाला न पटणारी असू दे, तुम्ही त्या साऱ्या गोष्टी एका सुयोग्य धीराने आणि कोणत्याही अस्वस्थ प्रतिक्रियांविना स्वीकारायला शिकला पाहिजेत. ह्या गोष्टी म्हणजे समतेची कसोटीच असते. जेव्हा सर्व गोष्टी सुरळीत चालू आहेत, माणसं आणि परिस्थिती सुखकारक आहे तेव्हा समता बाळगणे, धीर राखणे सहजसोपे आहे. परंतु जेव्हा यापेक्षा विपरित परिस्थिती असते तेव्हा धीर, शांती, समता ह्यांच्या पूर्णतेचा कस लागतो, अशा परिस्थितीमध्ये, त्या अधिक बळकट, अधिक परिपूर्ण केल्या जाऊ शकतात.

(CWSA 29 : 130-131), (CWSA 29 : 129)

– श्रीअरविंद

Latest posts by श्रीअरविंद (see all)
श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

चैत्य पुरुष म्हणजे काय?

अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…

8 hours ago

तुमच्या अंतरीचे ईश्वरत्व

ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…

17 hours ago

चैत्य पुरुष खुला होणे

जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…

2 days ago

दिव्य अस्तित्वाचा शोध

  आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…

3 days ago

आत्मनिरीक्षण कसे करावे?

  (उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…

4 days ago

अंतरात्म्याचा शोध

तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…

5 days ago