श्रीमाताजींनी औदार्याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे केले आहे : उदारता म्हणजे सर्व वैयक्तिक लाभ-हानीच्या हिशोबांना नकार देणे. दुसऱ्यांच्या समाधानामध्ये स्वत:चे समाधान शोधणे म्हणजे औदार्य.
*
प्रश्न : इथे श्रीअरविंदांनी महालक्ष्मीविषयी असे म्हटले आहे, “ज्या ज्या गोष्टी दारिद्रयुक्त आहेत….त्या साऱ्या गोष्टी ह्या महालक्ष्मीच्या आगमनाला अटकाव करतात.”
श्रीमाताजी : हो, गरीब, औदार्यरहित, तेजहीन, वैपुल्यविहीन, आंतरिक श्रीमंतीविना असलेले जे जे काही शुष्क, थंड, संकुचित असे असते ते महालक्ष्मीच्या आगमनाला अटकाव करते. लक्षात घ्या की, हा काही पुष्कळ पैसा असण्याचा किंवा नसण्याचा प्रश्न नाही. अत्यंत सधन व्यक्तीसुद्धा महालक्ष्मीच्या दृष्टिकोनातून पाहता अतिशय दरिद्री असू शकते. आणि तेच एखादा गरीब माणूस, जर त्याचे हृदय उदार असेल तर तो अत्यंत वैभवसंपन्न असू शकतो. ज्याच्यापाशी गुण नाहीत, शक्ती नाही, सामर्थ्य नाही, औदार्य नाही असा माणूस दरिद्री होय. असा माणूस हा दुःखीकष्टी, असमाधानी असतो.
खरंतर, जेव्हा व्यक्ती उदार नसते तेव्हाच ती असमाधानी असते – जर एखाद्याची प्रकृती उदार असेल, कोणतीही मोजदाद न करता व्यक्ती दान देऊ करत असेल तर, अशी व्यक्ती कधीच दुःखी असणार नाही. जे स्वत:ला संकुचित करून घेतात आणि साऱ्या गोष्टी त्यांना त्यांच्यापाशीच आलेल्या हव्या असतात, जे केवळ स्वत:च्या माध्यमातून स्वत:साठीच साऱ्या गोष्टींकडे आणि जगाकडे पाहतात, असे लोक दुःखी असतात. पण जेव्हा व्यक्ती कोणतीही गणती न ठेवता, मोजदाद न करता, उदारतेने स्वत:ला देऊ करते, तेव्हा ती कधीच दुःखी राहणार नाही. जो घेऊ इच्छित असतो तो दुःखी असतो पण जो देऊ इच्छित असतो तो कधीच दुःखी असत नाही.
*
आपल्याकडे जे काही आहे ते इतरांना देण्यामध्ये जे भौतिक औदार्य आहे, त्याविषयी मला येथे बोलायचे नाही. परंतु अगदी हा भौतिक गुणसुद्धा मोठ्या प्रमाणात आढळत नाही; कारण जेव्हा कधी एखादा माणूस श्रीमंत होतो तेव्हा, तो ती संपत्ती देण्याऐवजी ती स्वत:जवळच राखू पाहतो.
मी नैतिक औदार्याविषयी बोलू इच्छिते. जेव्हा आपला एखादा साथीदार यशस्वी होतो, तेव्हा त्याच्या यशाने आनंदी होणे हे आहे नैतिक औदार्य. धैर्यशील अशी एखादी कृती, एखादी नि:स्वार्थी अशी कृती, एखादा उत्तम असा त्याग या साऱ्यामध्ये एक प्रकारचे सौंदर्य असते, ज्यामुळे तुम्हाला आनंद होतो. असे म्हणता येईल की, इतरांची श्रेष्ठता आणि त्यांची खरी किंमत ओळखण्याच्या क्षमतेमध्ये नैतिक औदार्य सामावलेले असते.
(CWM 10 : 282), (CWM 04 : 403-404), (CWM 04 : 30)
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३९ (पूर्वार्ध) श्रद्धा ही कोणत्या अनुभवावर (किंवा प्रचितीवर) अवलंबून नसते. ती अनुभवाच्या…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३८ (श्रीअरविंद लिखित पत्रामधून...) अंधश्रद्धा या शब्दाला वास्तविक तसा काहीच अर्थ नाही.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३७ श्रद्धा ही ज्ञानानंतर नव्हे तर, त्या आधीपासूनच अस्तित्वात असणारी गोष्ट आहे.…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३६ जेथे चांगल्या इच्छा असतात तेथे वाईट इच्छा देखील येणार. पूर्णयोगामध्ये संकल्प…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३५ (एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून...) तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये, म्हणजे…
पूर्णयोगाचे अधिष्ठान – ३४ अभीप्सेच्या उत्कटतेमुळे अनुभूतीमध्ये सघनता निर्माण होते आणि वारंवार आलेल्या सघन अनुभूतीमुळे…