श्रीमाताजींनी औदार्याचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे केले आहे : उदारता म्हणजे सर्व वैयक्तिक लाभ-हानीच्या हिशोबांना नकार देणे. दुसऱ्यांच्या समाधानामध्ये स्वत:चे समाधान शोधणे म्हणजे औदार्य.
*
प्रश्न : इथे श्रीअरविंदांनी महालक्ष्मीविषयी असे म्हटले आहे, “ज्या ज्या गोष्टी दारिद्रयुक्त आहेत….त्या साऱ्या गोष्टी ह्या महालक्ष्मीच्या आगमनाला अटकाव करतात.”
श्रीमाताजी : हो, गरीब, औदार्यरहित, तेजहीन, वैपुल्यविहीन, आंतरिक श्रीमंतीविना असलेले जे जे काही शुष्क, थंड, संकुचित असे असते ते महालक्ष्मीच्या आगमनाला अटकाव करते. लक्षात घ्या की, हा काही पुष्कळ पैसा असण्याचा किंवा नसण्याचा प्रश्न नाही. अत्यंत सधन व्यक्तीसुद्धा महालक्ष्मीच्या दृष्टिकोनातून पाहता अतिशय दरिद्री असू शकते. आणि तेच एखादा गरीब माणूस, जर त्याचे हृदय उदार असेल तर तो अत्यंत वैभवसंपन्न असू शकतो. ज्याच्यापाशी गुण नाहीत, शक्ती नाही, सामर्थ्य नाही, औदार्य नाही असा माणूस दरिद्री होय. असा माणूस हा दुःखीकष्टी, असमाधानी असतो.
खरंतर, जेव्हा व्यक्ती उदार नसते तेव्हाच ती असमाधानी असते – जर एखाद्याची प्रकृती उदार असेल, कोणतीही मोजदाद न करता व्यक्ती दान देऊ करत असेल तर, अशी व्यक्ती कधीच दुःखी असणार नाही. जे स्वत:ला संकुचित करून घेतात आणि साऱ्या गोष्टी त्यांना त्यांच्यापाशीच आलेल्या हव्या असतात, जे केवळ स्वत:च्या माध्यमातून स्वत:साठीच साऱ्या गोष्टींकडे आणि जगाकडे पाहतात, असे लोक दुःखी असतात. पण जेव्हा व्यक्ती कोणतीही गणती न ठेवता, मोजदाद न करता, उदारतेने स्वत:ला देऊ करते, तेव्हा ती कधीच दुःखी राहणार नाही. जो घेऊ इच्छित असतो तो दुःखी असतो पण जो देऊ इच्छित असतो तो कधीच दुःखी असत नाही.
*
आपल्याकडे जे काही आहे ते इतरांना देण्यामध्ये जे भौतिक औदार्य आहे, त्याविषयी मला येथे बोलायचे नाही. परंतु अगदी हा भौतिक गुणसुद्धा मोठ्या प्रमाणात आढळत नाही; कारण जेव्हा कधी एखादा माणूस श्रीमंत होतो तेव्हा, तो ती संपत्ती देण्याऐवजी ती स्वत:जवळच राखू पाहतो.
मी नैतिक औदार्याविषयी बोलू इच्छिते. जेव्हा आपला एखादा साथीदार यशस्वी होतो, तेव्हा त्याच्या यशाने आनंदी होणे हे आहे नैतिक औदार्य. धैर्यशील अशी एखादी कृती, एखादी नि:स्वार्थी अशी कृती, एखादा उत्तम असा त्याग या साऱ्यामध्ये एक प्रकारचे सौंदर्य असते, ज्यामुळे तुम्हाला आनंद होतो. असे म्हणता येईल की, इतरांची श्रेष्ठता आणि त्यांची खरी किंमत ओळखण्याच्या क्षमतेमध्ये नैतिक औदार्य सामावलेले असते.
(CWM 10 : 282), (CWM 04 : 403-404), (CWM 04 : 30)
“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…
(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…
पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…
हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…
तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…
आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना, परम संकल्पशक्ती हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…