ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

मला सत्याच्या मार्गाने घेऊन चल !

प्रश्न : एखाद्याला जर कोणत्या एका गोष्टीची माहिती हवी असेल, किंवा कोणाला मार्गदर्शन हवे असेल किंवा इतर काही, तर त्याच्या त्याच्या गरजेनुसार, त्या त्या व्यक्तीने ती गोष्ट, ईश्वराकडून कशी प्राप्त करून घ्यावी?

श्रीमाताजी : ईश्वराकडे त्याची मागणी करूनसुद्धा जर तुम्ही त्याची याचनाच केली नाहीत, तर ती तुम्हाला कशी मिळेल? तुम्ही ईश्वराकडे वळलात आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवलात आणि त्याच्याकडे याचना केलीत तर, आवश्यक असलेली गोष्ट तुम्हाला निश्चितपणे मिळेल – अर्थात् तुम्हाला जी गोष्ट गरजेची आहे अशी तुमची कल्पना असेल ती नव्हे तर, खरोखरीच तुम्हाला ज्या गोष्टीची आवश्यकता असेल, ती गोष्ट तुम्हाला मिळेल. परंतु त्या गोष्टीची तुम्ही त्याच्याकडे याचना केली पाहिजे. त्यासाठी तुम्ही मन:पूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. आधी स्वत:हूनच एखादी गोष्ट मिळविण्याचे इतर मार्ग अवलंबायचे, धडपड करायची आणि नंतर मग मात्र ईश्वराकडून अपेक्षा बाळगायची की, त्याने तुम्हाला ती द्यावी, आणि तीसुद्धा तुम्ही ती त्याच्याकडे न मागता; असे करता कामा नये.

खरे म्हणजे, दुसऱ्यांकडून जेव्हा तुम्हाला काही हवे असते, तेव्हा तुम्ही त्यांच्याकडे ते मागता, आणि ईश्वराच्या बाबतीत मात्र तुम्ही त्याच्याकडे काही न मागता, त्याने ते तुम्हाला द्यावे अशी त्याच्याकडून अपेक्षा का बाळगता?

सामान्य चेतनेच्या स्तरावर मात्र ही प्रक्रिया याउलट घडते. तुम्ही काहीतरी गृहीत धरता आणि म्हणता, “मला अमुक एका गोष्टीची गरज आहे, मला ह्या नात्याची आवश्यकता आहे, मला हे प्रेम, ही ममता हवी आहे, मला हे ज्ञान हवे आहे इ.इ. आणि ईश्वराने ते मला द्यायलाच हवे, नाहीतर तो ईश्वरच नाही” म्हणजेच असे की, तुम्ही समस्या पूर्णपणे उलट करून टाकता.

सर्वात प्रथम तुम्ही म्हणता, “मला गरज आहे.” पण त्या गोष्टीची तुम्हाला खरोखरीच गरज असते का? की, तशी तुमच्या मनात काहीतरी अस्फुट कल्पना असते? की, ती केवळ एक वासना असते? की, ती खरोखरच एक अज्ञानी हालचाल असते? तुम्हाला ह्याविषयी खरंच जाण असते का? पहिला मुद्दा असा की, तुम्हाला त्याविषयी काहीच माहीत नसते.

दुसरा मुद्दा हा की, खरंतर तुम्ही तुमचीच इच्छा ईश्वरावर लादू पाहत असता आणि त्याला म्हणत असता, “मला ह्याची आवश्यकता आहे. परंतु, “मला ते दे”, अशी याचनासुद्धा तुम्ही त्याच्याजवळ करत नाही. तुम्ही म्हणता, “मला ते हवे आहे. आणि ज्याअर्थी मला अमुक एक गोष्ट हवी आहे, त्याअर्थी मला ती मिळालीच पाहिजे, अगदी स्वाभाविकपणे, सहजपणे मला ती मिळालीच पाहिजे, मला जे हवे ते देणे, हे ईश्वराचे कामच आहे.”

पण जेव्हा असे घडते तेव्हा, तुम्हाला खरंच कशाची गरज आहे, हे तुम्हाला माहीत नसते. तो केवळ तुमच्या मनाचा खेळ असतो, आणि त्यात काही तथ्य नसते आणि त्या देवघेवीमध्येही, तुम्ही ती गोष्ट तुमच्या आजूबाजूच्या जीवनाकडून मिळावी अशी अपेक्षा बाळगता आणि त्या ईश्वराकडे वळतसुद्धा नाही, त्याच्यामध्ये व तुमच्यामध्ये कोणतेही नाते निर्माण करत नाही, त्याचा क्षणभरही विचार करत नाही, किंवा तुमच्या दृष्टिकोनात थोडीफारसुद्धा मन:पूर्वकता बाळगत नाही. आणि तुम्ही त्या ईश्वराकडे काहीच मागितलेले नसते त्यामुळे, त्याने तुम्हाला देण्याचे काही कारणच उरत नाही. पण जर तुम्ही ईश्वराकडे याचना केलीत, तर तो ईश्वरच असल्यामुळे, तुम्हाला नेमकी कशाची गरज आहे हे त्याला अधिक चांगले कळत असते आणि त्यामुळे तो ते तुम्हाला देईलच.

आणि तरीही जर तुम्ही हट्ट धराल आणि तुमची इच्छा त्याच्यावर लादू पहाल, तर तुम्हाला जागृत करण्यासाठी, तुमच्या चुकीची तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी आणि खरोखरीच तुम्हाला त्या गोष्टीची काही गरज नव्हती, हे दाखवून देण्यासाठी तो तुम्हाला पाहिजे असलेली गोष्ट कदाचित देईलही. पण नंतर तुम्ही तक्रार करू लागता आणि तुम्ही म्हणू लागता की, “ईश्वराने मला त्रास होईल अशी गोष्ट का दिली?” पण तेव्हा तुम्ही हे पूर्णपणे विसरलेले असता, की ती गोष्ट तुम्हीच मागितलेली होती.

दोन्ही बाबतीत, कसेही असले, तरी तुम्ही तक्रारच करता. तुम्ही जे काही मागितले असेल, ते त्याने तुम्हाला दिले आणि त्यामुळे तुम्हाला उपयोग होण्याऐवजी अपायच झाला, तरी तुम्ही तक्रार करता आणि त्याने ते तुम्हाला दिले नाही तरी, तुम्ही तक्रारच करता. “हे काय ! मी त्याला सांगितले, की मला याची गरज आहे आणि तरी तो मला ते देत का नाही?” दोन्ही बाबतीत तुम्ही तक्रारच करता आणि बिचाऱ्या ईश्वरालाच दोषी ठरवता.

या सर्व गोष्टींपेक्षा, तुमच्या ठिकाणी जीवनाचे परम सत्य शोधून काढण्याची अभीप्सा असेल, उत्कंठा असेल, तीव्र, आर्त इच्छा असेल, ज्याला साधारणत: तुम्ही स्पष्टपणे तुमच्या जीवनाचे सारभूत सत्य समजता, वस्तुजाताचे मूळ उगमस्थान, सर्वोत्तम हितकारक अशी बाब समजता, आपल्या सर्व इच्छांवरील समाधान मानता, आपल्या सर्व समस्यांवरील उपाय मानता, त्याविषयी तीव्र निकड तुम्हाला भासत असेल, ते प्राप्त करून घेण्याची अभीप्सा तुम्ही बाळगत असाल, तर त्यानंतर तुम्ही ईश्वराला असे कधीच म्हणणार नाही, की “मला हे दे, मला ते दे.” किंवा “याची मला गरज आहे, ते मला मिळालेच पाहिजे.” तुम्ही त्याला अशी विनवणी कराल की, “माझ्यासाठी जे गरजेचे आहे ते तू कर आणि माझ्या अस्तित्वाच्या सत्याप्रत तू मला घेऊन चल; हे ईश्वरा, तुझ्या परमप्रज्ञेला जे दिसते की, अमुक एक गोष्ट माझ्यासाठी आवश्यक आहे, ती तू मला प्रदान कर.”

त्यानंतर मात्र, मग तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही, ह्याची तुम्हाला खात्री असेल. आणि ईश्वरही मग तुम्हाला अपायकारक असे काही तुम्हाला देणार नाही.

पुष्कळ धडपड केल्यानंतर, पुष्कळ चुका केल्यानंतर, बऱ्यापैकी दुःखकष्ट सहन केल्यानंतर, आणि खूप नाऊमेद झाल्यानंतर, मग सरतेशेवटी कधीतरी, एखादी व्यक्ती शहाणी, समजदार बनायला सुरुवात होते आणि स्तंभित होऊन, अकुंठित होऊन, जाणू पाहते की, ह्या सगळ्यामधून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नाही का? म्हणजेच असे की, स्वत:च्या अज्ञानातून बाहेर पडण्याचा एखाद्याला काही तरणोपायच नसतो का? आणि तेव्हा मग, त्या क्षणी ती व्यक्ती बाहू फैलावून असे म्हणू शकते की, “ही मी इथे आहे, माझा स्वीकार कर; मला सत्याच्या मार्गाने घेऊन चल.”

मग सारे काही सुरळीत व्हायला सुरुवात होते.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 121-124)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…

45 minutes ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७

(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…

1 day ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…

2 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…

3 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…

4 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३

आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…

5 days ago