मुक्त व पूर्ण मानवी जीवनात, ईश्वर व प्रकृती यांचे पुन:एकत्व हे ज्याचे ध्येय असते; आणि आंतरिक व बाह्य कृती यांच्यात सुमेळ ही ज्याची पद्धत असते; तसेच त्या दोन्हींची परिपूर्ती दिव्यत्वात होते ही ज्याची अनुभूती असते; तोच योगसमन्वय उचित होय.
कारण, भौतिक जगतात उतरलेल्या उच्चतर सत्तेचे, सद्वस्तूचे मानव हेच असे प्रतीक व निवासस्थान आहे की, तेथे निम्नतर वस्तूला स्वतःमध्ये रुपांतर घडवून, उच्चतर वस्तूचा धर्म आत्मसात करता येतो आणि उच्चतर वस्तूला निम्नतर वस्तूच्या नाना रूपांतून आपले स्वतःचे स्वत्व प्रकट करता येते. ही जी द्विविध शक्ती व शक्यता असते, ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी जे जीवन मानवाला दिले आहे, ते जीवन टाळणे ही केव्हाही योगाची अनिवार्य अट होऊ शकत नाही; किंवा त्याच्या परमोच्च प्रयत्नांचे वा त्याच्या सर्वात शक्तिशाली अशा आत्मपरिपूर्तीच्या साधनांचे म्हणजे योगाचे, अंतिम व पूर्ण साध्यही असू शकत नाही.
जीवन टाळणे, हे विशिष्ट परिस्थितीत तात्पुरत्या निकडीचे असू शकेल इतकेच; किंवा मानव जातीच्या सर्वसाधारण उद्धाराची तयारी करण्याकरिता म्हणून जीवन सर्वस्वी टाळण्याचा अत्यंतिक खास प्रयत्न कोणा व्यक्तीकडून करवून घेतला जात असेल, तर तेही समर्थनीय म्हणावे लागेल.
पण, योगाचा खरा व पूर्ण उद्देश, आणि उपयोग तेव्हाच सिद्ध झाला असे म्हणता येईल की, जेव्हा मानवाचा जाणीवयुक्त योग, निसर्गाच्या (प्रकृतीच्या) अर्धजागृत (Subconscious) योगाप्रमाणे बाह्यतः जीवनाशी समव्याप्त होईल; आणि अर्धजागृत व जाणीवयुक्त योगांचा मार्ग व सिद्धी यांजकडे पाहून आम्हाला सुस्पष्टपणे, खऱ्या अर्थाने व सर्वार्थाने असे म्हणता येईल की, “सर्व जीवन हे योगच आहे.”
– श्रीअरविंद
(CWSA 23 : 08)
(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…
मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…
नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…
असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम’ संपादन…
आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…
स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…